आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
आज देशात कोरोना नंतर सर्वात जास्त चर्चेचा विषय आहे तो म्हणजे चीन. काही महिन्यांपूर्वी चीनने लदाखमधील नि:शस्त्र भारतीय सैनिकांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात भारताचे वीस जवान शहीद झाले. चीनच्या या आक्रमक पवित्र्यामुळे सीमेवरील वातावरण काही काळ तणावग्रस्त बनले होते. सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.
गलवान खोऱ्याच्या सीमेवरून भारत-चीन यादरम्यान पूर्वीपासून वाद आहेत. या भागात चीनने जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न केला होता. मधेच कधीतरी चीन आक्रमक भूमिका घेऊन हे वाद आणखी चिघळवण्याचा प्रयत्न करत असतो. गलवान खोऱ्यातील भारतीय सैनिकांवर हल्ला केल्यापासून भारतात चीन विरोधी वातावरण निर्माण झाले आहे.
संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना विषाणूचा जन्मदाता म्हणून चीनची प्रतिमा आधीच आंतरराष्ट्रीय पातळीवर डागाळली आहे. त्यात चीनने भारतीय सैनिकांवर हल्ला करून त्यांना ठार मारल्याने चीनबद्दलचा संताप वाढीस लागला आहे. मागच्या वर्षीही चीनने डोकलाम सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण केले होते. या सगळ्या घटनांमुळे देशात चीन विरोधी तयार झाले आहे.
चीन जर भारतासोबत युद्ध करण्याच्या तयारीत असेल तर अशा परिस्थिती भारताने चीन सोबतचा व्यापार थांबवावा असे काहींचे मत आहे. कारण, व्यापारही आणि युद्धही एकाच वेळी शक्य नाही. चीन सीमेवर कुरापती काढत असताना, भारताने चीनसोबतचे सर्व आर्थिक संबंध संपुष्टात आणावेत असेही मत व्यक्त केले जात आहे.
आज देशात फक्त चीनच्या वस्तूच विकल्या जातात असे नाही तर देशातील काही पायाभूत सुविधांच्या निर्मितीचे कॉट्रँक्ट देखील चीनी कंपन्याना देण्यात आले आहे. याच धर्तीवर भारतात ५९ ऍप्सवर बंदी घातली आहे.
नागरिक स्वतःहून चीनच्या वस्तूंचा बहिष्कार करत आहेत. मात्र चीनने नव्वदच्या दशकापासूनच भारतासोबतच्या व्यापारात आयातीपेक्षा निर्यातीवर जास्त भर दिला.
आज भारतातील बाजारपेठेत अधिकांश वस्तू या मेड इन चायना असतात. चहाच्या कपांपासून रोषणाई करण्यासाठी लागणाऱ्या लाईटींगपर्यंत सगळ्या वस्तू मेड इन चायना आहेत.
परंतु चीनच्या वस्तूंसाठी भारतीय बाजारपेठ कधीपासून खुली झाली? चीन आणि भारतादरम्यानचा व्यापार कधी वाढला? जाणून घेऊया चीन आणि भारता दरम्यानच्या व्यापाराविषयी अधिक माहिती या लेखातून.
१९९१ साली नरसिंहराव यांच्या सरकारच्या काळात मंद झालेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सरकारने उदारीकरणाच्या धोरणाचा स्वीकार केला. या धोरणामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेत एक ऐतिहासिक परिवर्तन दिसून आले.
पी. व्ही. नरसिंहराव यांनी परकीय गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी देशोदेशींचे दौरे केले. देशात परकीय गुंतवणुकीसाठी दरवाजे खुले करण्यात आले. १९६२ च्या युद्धानंतर भारत आणि चीन यांच्या दरम्यानचे संबंध तणावपूर्ण बनले होते.
१९९३ साली नरसिंहराव यांनी चीनचा दौरा केला आणि चीनला भारतात गुंतवणुकीसाठी चालना दिली.
तेव्हा नुकतीच कुठे भारत आणि चीनमध्ये १९६२ साली झालेल्या युद्धानंतर भारत चीन संबंधातील तणाव निवळून परिस्थिती सुधरू लागली होती. चीनने भारतासोबतचा व्यापार वाढवण्यास सुरुवात केली. यानंतर भारत चीन व्यापार वाढतच गेला. भारतीय बाजारपेठेतील चीनची उलाढाल वाढत गेली.
१९९१ मध्ये चीन आणि भारत यांच्यातील व्यापार २६.५ कोटी डॉलर इतका होता, जो २००२ पर्यंत ५ अब्ज डॉलर झाला.
फक्त दक्षिण आशियाचाच विचार केला तर, चीनने इतर शेजारी देशांपेक्षा भारतात जास्त रस घेतला. इतर देशांशी चीनचा व्यापार वाढतच होता पण, चीनच्या परराष्ट्रीय व्यापारात इतर देशांच्या तुलनेत भारताचा वाटा मोठा होता.
१९९३ साली चीनच्या परकीय व्यापारात एकट्या भारताचा वाटा ३५% इतका होता. याचवेळी पाकिस्तान आणि चीनचा व्यापार ४४% इतका होता. १९९९ पर्यंत भारत आणि चीनचा व्यापार ४७% इतका वाढला आणि पाकिस्तानसोबतचा व्यापार २३% वर आला.
भारत आणि चीनच्या व्यापाराचा विचार केल्यास हा व्यापारात नेहमीच चीनची उलाढाल अधिक राहिली आहे. चीनसोबतच्या व्यापारातून भारताला तितकासा फायदा झालेला नाही. २०१९मध्ये भारत आणि चीन दरम्यानचा व्यापार ९२.६८ अब्ज डॉलर इतका होता. यात भारताला ५६.७७ अब्ज डॉलरचे नुकसान सोसावे लागले.
चीनने भारतात निर्यात वाढवली मात्र भारतातून होणाऱ्या आयातीत त्यांनी कधीच वाढ केली नाही. १९९०पासूनच चीनने भारतासोबतचा व्यापार वाढवत असताना, आयतीपेक्षा निर्यातीवर जास्त भर दिला.
गेल्या दहा वर्षातील भारत आणि चीन दरम्यानची व्यापारी आकडेवारी लक्षात घेतल्यास भारत आयतीसाठी चीनवर जास्तीत जास्त अवलंबून असल्याचे दिसते. २०२० या आर्थिक वर्षात भारताच्या एकूण आयातीच्या प्रमाणात चीनचीच आयात १३.८% इतकी आहे.
भारत ज्या देशांकडून जास्तीत जास्त आयात करतो त्या देशांची माहिती घेतल्यास इतर कुठलाही देश चीनशी स्पर्धा करू शकत नाही. याच वर्षात म्हणजे २०२०मध्ये भारताने एकूण ४७३ अब्ज डॉलर किमतीचे समान आयात केले आहे. यात एकट्या चीनचा वाटा १४% आहे.
आयतीपेक्षा निर्यात कमी असेल तर तो दोन देशांमधील व्यापारातील तोटा समजला जातो. गेल्या दहा वर्षात चीन सोबतच्या व्यापारात भारताला मोठा तोटा सोसावा लागला आहे. म्हणजेच निर्यातीच्या तुलनेत चीनकडून केली जाणारी आयात कतीतरी पटीने मोठी आहे.
सध्या भारत सरकार चीनकडून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवरील आयात कर वाढवण्याचा विचार करत आहे. ज्यामुळे चीनकडून होणारी आयात काही प्रमाणात कमी होईल. परंतु चीनकडून होणारी आयात कमी होईल की वाढेल हे भारतीय उद्योजकांना चीनकडून आयात कराव्या लागणाऱ्या वस्तू स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध होतील की नाही यावर अवलंबून राहील.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.