आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
युगांडा. केनिया, सुदान, काँगो, रवांडा, टांझानिया अशा आफ्रिकेतील अनेक छोट्या-छोट्या देशांनी वेढलेला, आकाराने मोठा असलेला देश. युगांडाला लाभलेल्या नैसर्गिक भौतिक संपन्नतेमुळे या देशाला आफ्रिकेचे रत्न म्हटले जाते. अनेक वांशिक भिन्नतेचे लोक याठिकाणी गुण्यागोविंदाने नांदतात. गोरिलांचा देश म्हणूनही युगांडाला ओळखले जाते.
पण, इतक्या सुंदर देशाच्या इतिहास मात्र खूप भयावह आहे. १९७० च्या दशकात युगांडाचे अध्यक्षपद एका अशा व्यक्तीच्या हाती आले, जो अत्यंत क्रूर स्वभावाचा होता. इदी अमीन. हा युगांडाचा तिसरा राष्ट्राध्यक्ष होता. हा काळ मानवी मुल्यांची, नैतिकतेची आणि राजकीय मुल्यांच्या हत्येचा काळ म्हणून ओळखला जातो.
इदीने आपल्या सत्तालालसेपोटी प्रत्येक विरोधकाला संपवून टाकले. जगात जे जे हुकुमशहा होऊन गेले त्या सगळ्यांत अतिहिंस्र, क्रूर आणि गूढ व्यक्तिमत्व असलेला इदी या सगळ्या हुकुमाशाहांचाही बाप शोभेल.
शरीरानेही इदी अत्यंत बलवान, धष्टपुष्ट आणि धिप्पाड होता. त्याची उंची ६ फुट ४ इंच आणि वजन तब्बल अडीचशे किलो होते. ब्रिटीश कालीन म्हणजे १९४६ साली सैन्यातील किंग्ज आफ्रिकन रायफल्समध्ये इदी एक सामान्य स्वयंपाकी होता.
एका सामान्य सैनिकापासून ते देशाचा शासक होण्यापर्यंतच्या प्रवासात इदीने अनेक अनैतिक, क्रूर आणि हिंस्र पद्धतींचा अवलंब केला. १९७१ मध्ये सैन्यात मोठी उलथापालथ झाली याचवेळी तो सैन्यात मेजर जनरल पदापर्यंत पोचला. याचवर्षी त्याने मिल्टन ओबोटेचे सरकार उलथवून आफ्रिकेची सत्तासूत्रे स्वतःच्या बंद मुठीत एकवटली.
इदी आफ्रिकेतील काकवा या आदिवासी जमातीतील होता. याच्या क्रूरतेचे किस्से ऐकले तर, कुणाच्याही मनाचा थरकाप उडेल.
इदीला आशियाई लोकांचा खूप तिरस्कार वाटे. त्याच्या मते आशियातून आलेल्या परकीय व्यक्तींमुळे आपल्या देशाचा आणि देशातील स्थानिक नागरिकांचा विकास होत नाही. युगांडाची सत्ता स्वत:च्या हातात एकवटल्यानंतर इदीने आफ्रिकेतील भारतीय लोकांना एकाएकी युगांडा सोडून जाण्याचे आदेश दिले.
ही गोष्ट आहे १९७२ सालच्या ऑगस्ट मधील.
एके दिवशी अचानक इदीने जाहीर केले की, अल्लाहने त्याच्या स्वप्नात येऊन आशियाई लोकांना देशातून बाहेर काढण्यास सांगितले आहे. युगांडातील आशियायी लोकसंख्या ५०,००० ते ७०, ००० हजार होती. इतक्या लोकांना त्याने अचानक देश सोडून जाण्याचा हुकुम दिला.
अमीनने लोकांना तीन महिन्याची नोटीस दिली. या तीन महिन्यात आशियाई लोकांना युगांडातील आपेल घर सोडून परत जावे लागले. जाताना सोबत दोन सुटकेस आणि ५० पौंड पैसे घेऊन जाण्याची मुभा दिली होती. या आदेशाने धास्ती खावून काही लोकांनी आत्महत्या केल्या.
अनेक लोकांनी आपली घरे, कंपनी, व्यवसाय सगळे काही स्थानिक लोकांना फुकटात देऊन टाकले आणि ब्रिटन, अमेरिका, कॅनडा सारख्या देशात आश्रय घेतला. या लोकांच्या पूर्वजांनी खूप वर्षांपूर्वी युगांडामध्ये स्थलांतर केले होते. आपल्या पूर्वजांनी कमावलेली आणि स्वतः कमावलेली सगळी संपत्ती त्यांना तिथेच टाकून देश सोडून जावे लागले.
आयुष्यभराची मेहनत एका क्षणात फुकाची ठरून गेली होती. भारतीय लोकांनी या देशात खूप उद्योग व्यवसाय उभे केले होते. युगांडातील उद्योग क्षेत्रासह, शेती आणि व यापार यातही भारतीय लोक आघाडीवर होते.
इदीच्या या निर्णयाचा परिणाम जसा भारतीय लोकांना भोगावा लागला तसाच परिणाम युगांडाच्या अर्थव्यवस्थेवरही झाला. देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाली.
इदीच्या शासन काळात त्याने देशातील पाच लाख लोकांची हत्या केली होती. स्टेट ऑफ ब्लड: द इनसाइड स्टोरी ऑफ इदी अमीन या पुस्तकात त्याच्या अनेक क्रूर किस्स्यांचे वर्णन केलेले आहे. या पुस्तकाचे लेखद हेन्री केम्बिया इदीसोबत एका दवाखान्यातील शवागारात गेले होते. यावेळी इदीने दवाखान्यातील त्या शवागारात काही काळ एकट्याने राहण्याची इच्छा व्यक्त केली.
हेन्रीने या पुस्तकात असेही लिहिले आहे की इदीला माणसाला रक्त पिण्याची चटक लागली होती. कधीकधी इदी आपल्या अधिकाऱ्यांशी बोलताना माणसाचे मांस किती स्वादिष्ट असते याचे वर्णन करत असे, असेही या पुस्तकात लिहिले आहे.
इदीच्या काळात मदनजीत सिंह हे युगांडातील भारतीय राजदूत होते. त्यांनीही युगांडातील अनुभवावर आधारित कल्चर ऑफ द सेपाल्चर: इदी अमिंस मॉंस्टर रिझाइम नावाचे पुस्तक लिहिले आहे. त्यांनी अमीनला माणसाचे रक्त आवडत असल्याचा उल्लेख केला आहे. या पुस्तकात मदनाजीत यांनी अमीनच्या कृरतेचे अनेक किस्से नमूद केलेले आहेत.
यात त्यांनी असेही लिहिले आहे, अमीनच्या घरात एक बंद खोली होती. तिथे कुणालाही जाण्यास परवानगी नव्हती. अगदी अमीनच्या पत्नींना देखील नव्हती. एकदा अमीनची एक पत्नी त्या खोलीत गेली. तिथे तिने जे पहिले त्याने तिची वाचाच बसली. या खोलीत तिच्या प्रियकराचे शीर धडापासून अलग करून ठेवण्यात आले होते. अमीनला आपल्या शत्रूचे रक्त प्यायला खूप आवडत असे.
इदीची शरीरयष्टी मजबूत होती. १९५० साली तो देशातील एक नामांकित शरीरयष्टी रक्षक होता. शिवाय त्याला रग्बी खेळण्याचाही छंद होता. शारीरिक ताकद हे एकमेव इदीचे बलस्थान होते. ताकद सोडल्यास त्याच्या व्यक्तीमत्वात एकही सकारात्मक गोष्ट नव्हती. परंतु या ताकदीचाही तो दुरुपयोगच करत असे.
त्याचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध होते. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिला त्याच्या संपर्कात असत. त्याने सहावेळा लग्न केले होते. शिवाय त्याला किती प्रेयस्या होत्या याला तर गिनती नव्हती. इदीला ४० मुले होती. ही वैवाहिक संबंध आणि अनैतिक संबंध या दोहोतून झालेली होती. इदीचे परदेशी स्त्रियांशीही संबंध होते.
युगांडावरही ब्रिटीशांची सत्ता होती. ७० वर्षाच्या गुलामगिरीनंतर १९६२ मध्ये हा देश स्वतंत्र झाला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अमिनने ओबोटो यांना मदत केली होती. ओबोटोनी संविधानिक शासन संपवून स्वतःला कार्यकारी अध्यक्ष घोषित केले. त्यांनी इदीला याबद्दल जाब विचारायला सुरुवात केली.
पण, नंतर ओबोटोंना इदीच्या हेतूवर आणि प्रामाणिकपणाबद्दल संशय येऊ लागला. शेवटी इदीने ओबोटोंची हत्या घडवून आणली आणि स्वतः राष्ट्रपती पदावर स्थानापन्न झाला. सत्ता हाती येताच इदीने ख्रिस्ती मिशनऱ्यांची हत्या सुरु केली.
सर्वसामान्य जनतेवरही आपली दहशत बसवण्यासाठी त्याने सरकारी सुरक्षा यंत्रणेचा वापर करू लागला. आपल्या विरोधातील प्रत्येक आवाज त्याने चिरडून टाकला. त्याने विरोधकांना अत्यंत क्रूरपणे संपवून टाकले.
स्वतःच्याच देशात त्याच्या विरोधात असंतोष शिगेला पोहोचला असताना, इदीने टांझानियाविरोधात युद्ध पुकारले. या युद्धात त्याला लिबिया, सिव्हीएत संघ आणि जर्मनीने पाठींबा दिला. पण, इदीला हे युद्ध महागात पडले. त्याला स्वतःचाच देश सोडून पळून जावे लागले. जीवाच्या भीतीने त्याने सौदी अरेबियात आश्रय घेतला. २००३ मध्ये सौदीत असतानाच इदीचा मृत्यू झाला.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.