आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
1971 च्या युद्धाने आपल्याला खूप बहादूर दिले, त्यांनी गाजवलेल्या पराक्रमाच्या गाथा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिल्या गेल्यात. त्यातीलच एक बहादूर म्हणजे “मेजर जनरल इयान कार्डोझो” उर्फ “कार्तुस साहिब.”
1971 साली पाकिस्तानशी झालेल्या युद्धात त्यांनी जो पराक्रम गाजवला त्यासाठी त्यांना कायमच लक्षात ठेवण्यात येईल. 71च्या युद्धात त्यांनी तामिळनाडूमधील डिफेन्स सर्व्हिस स्टाफच्या कॉलेजमध्ये एका कोर्ससाठी प्रवेश घेतला होता. पण युद्धामध्ये गरज भासली म्हणून त्यांना तातडीने वारफ्रंटवर येण्याचे आदेश दिले गेले.
71 च्या युद्धात ते गोरखा रायफल्स मध्ये एक तरुण मेजर म्हणून सामील झाले. त्यावेळी त्यांच्यासोबत 480 जवान होते. ह्याच 480 जणांनी 1500 युद्धकैद्यांना शरण येण्यास भाग पाडले होते. पण याच सिल्हेटच्या लढाईत एक अपघात झाला.
मेजर कार्डोझो यांनी सुरुंगावर पाय ठेवला आणि त्याच्या स्फोटात गंभीर जखमी झाले. त्यांच्या पायाला जबरदस्त दुखापत झाली होती.
ती दुखापत एवढी गंभीर होती की त्यांचा पाय कापावा लागणार होता. पण तो पाय कापण्यासाठी लागणारे साहित्य त्यावेळी डॉक्टरकडे उपलब्ध नव्हते म्हणून त्याने पाय कापण्यास नकार दिला.
मेजर साहेबांनी त्यांच्या साथीदाराला सांगितले “खुकरी (गुरखा वापरतात तो धारदार चाकू) घे आणि काप तो पाय.” पण साथीदाराने सुद्धा नकार दिला. मग काय मेजर साहेबांनी स्वतः खुकरी घेतली आणि स्वतःच पाय कापून टाकला आणि त्या साथीदाराला सांगितले, ” हे घे आणि पुरून टाक.”
आजकाल आपल्या पायाला ठेच लागली तरी आपला जीव कासावीस होतो पण इथे तर मेजर साहेबांनी स्वतःच स्वतःचा पाय कापून टाकला होता.
आता आयुष्यात त्यांना फक्त एकाच पायाने सगळी कामं करावी लागणार होती. एवढा मोठा अपघात झाल्यावर बरेचदा लोकं सेवानिवृत्त होऊन साधं आयुष्य जगण्याला प्राधान्य देतात. पण मेजर साहेब त्यांच्यापैकी नव्हते “पाय गेला म्हणून काय झालं अजूनही मी त्याच जोशाने काम करू शकतो.” असं म्हणून मेजर साहेब पुन्हा कामावर रुजू झाले.
पण त्यांना हे कार्यालयीन काम नव्हतं करायचं त्यांना पुन्हा फिल्डवर जायचं होतं त्यांचा सगळा जीव हा फिल्डवर अडकला होता. मग त्यांनी ठरवलं की आता “शारीरिक तंदूरस्ती चाचणी” द्यायची. सैन्यामध्ये जेव्हा अशी चाचणी असते तेव्हा तिथे कुठल्याही प्रकारची दयामाया दाखवता येत नाही ,सगळ्यांना सारखेच नियम आणि गुणप्रणाली असते.
पण इथेसुद्धा प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर मेजर साहेबांनी धडधाकट लोकांनाही मागे टाकलं आणि चाचणी उत्तीर्ण झाले .
एवढं करूनही डॉक्टरांनी त्यांना “clearance” दिला नाही. कसा देतील ? कारण मेजर साहेब जर फिल्डवर गेले तर तिथे त्यांना जास्त त्रास होऊ शकतो आणि हा त्रास जीवघेणाही ठरू शकतो. डॉक्टरांनी त्यांना खूप समजवायचा प्रयत्न केला ,पण ऐकतील ते मेजर कार्डोझो कसले.
त्यांनी सरळ आपला खटला लष्करप्रमुख जनरल रैना यांच्यासमोर मांडला. लष्करप्रमुखांनी त्यांना आपल्यासोबत लडाखला येण्यास सांगितले. लडाखमध्ये जनरल रैना यांनी जे काही पाहिलं ते खूपच आश्चर्यकारक आणि अविश्वसनीय होतं .
ज्या बर्फाळ डोंगरावरून धडधाकट माणसालाही चालताना घाम फुटेल अशा ठिकाणी मेजर कार्डोझो अतिशय सहजरीत्या चालत होते. हे पाहून जनरल रैना यांनी मेजर कार्डोझोंना बटालियनची कमांड सांभाळण्याची परवानगी दिली.
जेव्हा ब्रिगेडची कमांड घेण्याची वेळ आली तेव्हासुद्धा त्यांना असेच अडथळे पार करावे लागले. “जर मी बटालियनची कमांड सांभाळू शकतो तर मला ब्रिगेडची कमांड सांभाळण्यात कुठलीच अडचण नाहीये.” मेजर कार्डोझो हे इंफंट्री बटालियन आणि ब्रिगेडला आज्ञा देणारे भारतीय सैन्यातील पहिले अपंग अधिकारी बनले. त्यांचा आदर्श घेऊन अजून 3 अधिकारी प्रेरित झाले, त्यातील एकाने थेट उपप्रमुख होण्यापर्यंत मजल मारली.
निवृत्त झाल्यानंतरसुद्धा ते अजिबात शांत नाही बसले दरवर्षी ते मुंबई मॅरेथॉनमध्ये भाग घेतात आणि लोकांना प्रेरित करतात.
सेवानिवृत्तीनंतर त्यांनी 2005 ते 2011- Rehabilitation Council of India चे चेअरमन पद सुद्धा भूषविले आहे. भारतीय सैन्यातील अतुलनीय कामगिरीसाठी त्यांना “अतिविशिष्ट सेवा मेडल” आणि “सेना मेडल”ने गौरविण्यात आले.
एका मुलाखतीत जेव्हा त्यांना विचारण्यात आलं होतं “तुम्ही स्वतःच पाय कसा काय कापू शकले म्हणजे खूप जास्त शौर्य असणारा माणूसच असं काहीतरी करू शकतो, नाही?”
त्याला उत्तर देताना मेजर साहेब म्हणले होते,
“ही गोष्ट शौर्याबाबतीत अजिबात नाहीये मी सुद्धा एक माणूस आहे ,भीती तर मला पण वाटली होती .पण जेव्हा मी विचार केला की माझ्यापेक्षा वाईट गोष्टी लोकांनी सहन केल्यात ,अतोनात हाल झेललेत , त्यांच्यासमोर माझं हे दुखणं काहीच नाहीये. मी नशीबवान आहे की माझं एकाच पायावर निभावलं .”
मेजर कार्डोझोबद्दल वाचल्यानंतर माझ्यासमोर फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांचं एक वाक्य येतं, “जर तुम्हाला कोणी सांगितलं की तो कशालाच घाबरत नाही , तर समजून जा एकतर तो खोटं बोलतोय किंवा तो गुरखा आहे.”
आम्ही 1971च्या युद्धातील “कार्तुस साहिब” यांना अभिवादन करतो, ज्यांची निडरता आणि कर्तव्याप्रती असलेली बांधिलकी केवळ कल्पित नाही तर भारतीय सैन्य इतिहासात लिहिली गेलेली सुवर्णगाथा आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.