आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
काही वर्षांपूर्वी झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत आयर्लंडच्या संघाने इंग्लंडच्या संघाला चांगलेच पाणी पाजले होते. आयर्लंडच्या संघाने केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत होते. इंग्लंडच्या तुलनेत नवख्या असलेल्या आयर्लंड संघाची कामगिरी बघून सगळेच प्रभावित होऊन त्यांच्या संघांचे चाहते बनले होते, यात अनेक भारतीयांचा देखील समावेश होता.
२०१९ साली देखील आयर्लंडच्या संघाने अशाच पद्धतीने इंग्लंडला एकदिवसीय मालिकेत धूळ चारली होती. आयर्लंडच्या संघाने गेल्या काही वर्षांत आपल्या जबरदस्त कामगिरीमुळे क्रिकेटविश्वात चांगले नाव कमावले आहे.
आज संपूर्ण जगात आयर्लंडच्या क्रिकेटपटूंचे चाहते बनत असताना आयर्लंडचे खेळाडू मात्र एका भारतीय माणसाचे चाहते बनले होते, कारण याच भारतीय माणसाच्या पाठबळामुळे आयर्लंडच्या संघाला मोठं यश मिळवण्यासाठी पाठबळ मिळाले आहे.
१६ वर्षांपूर्वी ही व्यक्ती भारत सोडून आयर्लंडला स्थायिक झाली, इतकेच नाहीतर त्यांनी तिथले नागरिकत्व देखील मिळवले. आज त्यांनी दिलेल्या आर्थिक पाठबळाच्या बळावरच आयर्लंडचा संघ उभा राहू शकला आहे. आयर्लंडमध्ये क्रिकेट रुजवण्यातच नाहीतर तिथे क्रिकेटसाठी अत्यावश्यक अशा महत्त्वपूर्ण घटकांना उभारण्यात या अनिवासी भारतीय व्यक्तीने मोठे योगदान दिले आहे.
पालोनजी मिस्त्री असे त्या भारतीय व्यक्तीचे नाव असून आयर्लंडच्या डब्लिन येथे ते आपल्या पत्नीसह वास्तव्यास होते. आज ते आपल्यात नाहीत, २८ जून २०२२ रोजी त्यांचा मृत्यू झाला. तसं पाहता आयर्लंडमध्ये त्यांचा कुठलाच उद्योग नव्हता, ते फक्त तिथे वास्तव्यास होते. त्यांनी आयर्लंडमध्ये साधी गुंतवणूक देखील केलेली नसताना आयर्लंडच्या प्रतिष्ठित व्यक्तींमध्ये त्यांची गणना करण्यात येते. आयर्लंडमधील सामाजिक कामात मात्र त्यांनी मोठ्या प्रमाणात आपले पैसे खर्च केले होते, त्यांच्या या सामाजिक जबाबदारीच्या कार्यामुळेच आयरिश लोकांच्या मनात त्यांच्या प्रति आदराची भावना आहे.
पालोनजी मिस्त्री यांचा व्यवसाय आजही जगभरात पसरलेला आहे. भारतातही मोठ्या प्रमाणात त्यांचा व्यवसाय उभारला आहे. त्यांच्या संपत्तीचा बहुतांश भाग हा भारतात आहे.
२०१७ च्या फोर्ब्जच्या यादीनुसार पालोनजी यांच्याकडे १८.७ अब्ज डॉलर्स इतकी संपत्ती आहे. जगातील सर्वांत मोठ्या बिझनेस ग्रुप्सपैकी एक असलेल्या टाटा ग्रुपमध्ये त्यांची १८.४ टक्के भागीदारी आहे. यातून त्यांना मोठ्या प्रमाणात नफा मिळतो.
भारतातील सर्वांत मोठी रियल इस्टेट कंपनी शापोरजी-पालोनजी ग्रुपचे ते माजी चेयरमन होते.
शापोरजी-पालोनजी ग्रुप ही १४० वर्ष जुनी कंपनी असून त्यांच्या आजोबांनी १८६५ साली या कंपनीची ब्रिटिशांच्या भागीदारीत स्थापना केली होती. त्यावेळी या कंपनीचे नाव ‘लिटिलवूड्स पालोनजी’ असे होते. त्यांच्या कंपनीने मुंबईच्या फोर्ट भागातील अनेक हॉटेलांची निर्मिंती केली आहे. ज्यांची रचना अत्यंत आकर्षक स्वरूपाची आहे. मुंबईतील बहुतांश मोठमोठ्या इमारतींच्या बांधकामाचे कार्य या कंपनीनेच केले आहे.
या कंपनीने ओमानच्या सुलतानाचा राजवाडा देखील बांधला आहे. १९२१ साली त्यांच्या आजोबांचे निधन झाले, मग त्यांच्या वडिलांनी यशस्वीपणे कंपनी चालवली.
पालोनजी यांच्या वडिलांच्या निधनानंतर १९७५ साली कंपनीचा कारभार त्यांच्या हातात आला. त्यांनी टाटा ग्रुपमध्ये वैयक्तिक भागीदारी घेतली व अनेक नवीन कंपन्यांची उभारणी केली. एफकेन्स इन्फ्रास्ट्रक्चर, एसपीसीएल, एसपी इंटरनॅशनल, स्टर्लिंग अँड विल्सन आणि एसपी रियल इस्टेट अशा कंपन्या त्यांनी सांभाळल्या. त्यांच्या कंपन्यांचे एकूण उत्पन्न चार अब्ज डॉलर इतके आहे. गोकाक स्टाईल आणि युरेका फोर्ब्ज दोन मोठ्या कंपन्यांची मालकी देखील पालोनजी ग्रुपकडे आहे.
पालोनजी यांनी लंडनमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. टाटा समूहात त्यांना फँटम या नावाने ओळखले जात. वयाच्या ९३व्या वर्षी त्यांचे निधन झाले पण वयाच्या ९२व्या वर्षापर्यंत ते अगदी सक्रिय होते. व्हिस्की आणि घोडे या दोन गोष्टींची त्यांना विशेष आवड होती.
पालोनजी यांचा बहुतांश काळ भारतातील पुण्याच्या फार्म हाऊसवर नाही तर आयर्लंडमध्ये जात असे. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या लोकांसाठी ते आदर्श होते. त्यांच्याबद्दल लोक काय म्हणतात? त्यांना काय सल्ला देतात? यामध्ये त्यांना अजिबात रस नाही, अगदी शांत आणि निवांत जीवन जगण्यावरच त्यांचा भर होता.
दोन दशकांपासून आयर्लंडमधील वास्तव्यात स्थानिक क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. काही वर्षांपूर्वी त्यांनी आयर्लंड क्रिकेट असोसिएशनसोबत करार देखील केला.
आयर्लंडच्या क्रिकेटर्सच्या मनात पालोनजी यांच्याबद्दल आदराचे स्थान आहे. त्यांच्यामुळेच आज आम्ही इथवर पोहचलो अशी कृतज्ञतेची भावना त्यांच्या मनात आहे.
पालोनजी यांच्या परिवारात दोन मुलं आणि दोन मुली आहेत. त्यांच्या दोन मुलांपैकी एका असलेला सायरस मिस्त्री हा टाटा ग्रुपचा माजी सीईओ होता, त्यांचा दुसरा मुलगा शापोर हा एसपी रियल इस्टेटचा कारभार संभाळतो. त्यांची मोठी मुलगी आलू हीचा नोएल टाटा याच्याशी विवाह झाला आहे. लंडनमध्ये शिक्षण घेत असताना पालोनजी यांची गाठ पेस्टी पेरीन या महिलेशी पडली. पुढे ते या महिलेच्या प्रेमात पडले व त्यांच्याशी विवाह केला. पेस्टी यांच्यामुळेच त्यांनी डब्लिन येथे वास्तव्य करण्यास सुरुवात केली.
आज ते नसले तरी आयर्लंड आणि त्यांची क्रिकेट टीमच्या ते सदैव स्मरणात असतील हे निश्चित.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.