आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
भारतात दरवर्षी १४ नोव्हेंबरला बालदिनी, केंद्र सरकारकडून बाल शौर्य पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. १६ वर्षांपेक्षा कमी वयाचा २५ मुलांना त्यांनी संकटसमयी दाखवलेल्या अतुलनीय शौर्यासाठी या पुरस्काराने सन्मानित केले जाते. पण हा बाल शौर्य पुरस्कार कसा सुरू करण्यात आला या मागची कथा देखील रंजक आहे.
हरीशचंद्र मेहरा हे नाव हे आज बहुतांश लोकांना परिचयाचे नसले तरी एकेकाळी या व्यक्तीने भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे प्राण वाचवले होते. हरिश्चंद्र मेहरा हे दिल्लीच्या चांदणी चौक परिसरात वास्तव्यास असून त्यांनी बालपणी दाखवलेल्या शौर्यामुळे बाल शौर्य पुरस्काराचा पाया रचला गेला होता.
१९५७ साली दिल्लीत एका रामलीला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १४ वर्षीय हरिश्चंद्र मेहरा यांची स्वयंसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. विशेष अतिथींच्या व्यवस्थेची जबाबदारी हरिश्चंद्र मेहरा यांच्यावर सोपवण्यात आली होती.
नेहरू ज्या तंबूत होते, त्याला अचानक आग लागली. या तंबूतल्या लोकांचे याकडे लक्ष नव्हते सर्व रामलीला पाहण्यात मग्न होते. अशावेळी हरिश्चंद्र मेहरा यांचे लक्ष त्या आगीकडे गेले आणि त्यांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता तंबूत जाऊन नेहरूंचा हात पकडुन त्यांना बाहेर सुरक्षित स्थळी पोहचवले. नंतर पळत परत जाऊन एका २० फूट उंचीच्या लांब तंबूच्या खांबावर चढून त्यांनी ज्या कपड्याला आग लागली होती तो बाजूला केला. हे सर्व होत असताना हरिश्चंद्र मेहरा यांच्याकडे पुरेसे स्वसंरक्षणात्मक साहित्य नव्हते, यामुळे हरिश्चंद्र यांचा हात बऱ्यापैकी भाजला गेला.
हरिश्चंद्र यांनी दाखवलेल्या शौर्यामुळे प्रभावित झालेल्या पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांचा व्यक्तिशः सन्मान करण्याची योजना तयार केली. यासाठी त्यांनी त्यांची मुलगी इंदिरा यांना त्यांच्या शाळेत जाऊन सन्मानित करण्यास सांगितले.
इतकेच नाहीतर त्यांना ३ फेब्रुवारी १९५८ रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले. त्यांच्याबरोबर अजून एका मुलाचा सन्मान करण्यात आला, तेव्हापासून दरवर्षी या पुरस्काराचे वितरण करण्यात येते.
भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचे नेतृत्व करण्याचा मान देखील हरिशचंद्र यांना मिळाला होता.
दुर्दैवाने या घटनेनंतर मात्र हरिश्चंद्र यांचं शाळेत जाणं बंद झालं आणि ५ वर्षांनी त्यांनी आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी नोकरी करायला सुरुवात केली. आज हरिश्चंद्र दिल्लीच्या चांदणी चौक परिसरात वास्तव्यास असून त्यांचे वय ७५ वर्षे इतके आहे. आजही त्या परिसरातले लोक त्यांना ‘नेहरू की जान बचानेवाला लडका’ म्हणून ओळखतात.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.