आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
प्रत्येक ठिकाणचं, जागेचं, स्वतःचं एक वैशिष्ट्य असतं. त्याची निर्मिती, त्याचे स्थान आणि तिथली स्थानिक संस्कृती याच्याशी निगडीत काही इतिहास असतो. हा इतिहास जाणून घेणं देखील फार रोचक असतं आणि त्यातून त्या विशिष्ट ठिकाणाबद्दलच्या माहितीत आणखीन भर तर पडतेच पण, त्या त्याबद्दलच कुतूहल आणखीन वाढतं. काही शहरांशी निगडीत अनुभव आपल्याला अजून समृद्ध करून जातात.
भटकंती करताना हा त्याचा इतिहास आणि वर्तमान यातील बदललेले स्वरूप आपल्याला आणखीन रोमांचकारी अनुभव देऊन जातो. अशा कित्येक रंजक कथा त्या त्या ठिकाणांशी जोडलेल्या असतात. अशीच एक कथा आहे मुंबईच्या निर्मितीची. मुंबई हे शहर आता आहे, त्याप्रमाणे एक सलग नव्हते पण, इंग्रजांनी त्याकाळी समुद्रातील छोट्या छोट्या बेटांना एकत्र करून बॉम्बे शहर वसवले होते.
जगभरातील अनेक प्रसिद्ध शहरांच्या यादीत वरच्या स्थानावर असणारे शहर म्हणजे आपली मुंबई. आपली राजधानी. हा तर आपला नेहमीचा कौतुकाचा, आवडीचा आणि कुतूहलाचा विषय. मुंबईची समृद्धी ही फक्त आज-कालची नाही तर त्या समृद्धीला एक इतिहास देखील आहे आणि हा इतिहासही अतिशय समृद्ध आहे. आजची मुंबई तर कित्येक पटींनी आकर्षक आणि अनेकांसाठी तर अक्षरश: आयुष्याला कलाटणी देणारे स्थान बनली आहे. पण, ही मुंबई कधी अस्तित्वात आली असेल? तिचा विस्तार कुणी केला असेल? या मुंबईच्या इतिहासात कधी डोकावायचा प्रयत्न केलाय का?
मुंबईबद्दल सांगायचेच झाले तर हे शहर सात बेटांना एकत्र करून वसवलेलं आहे. आजची जे मुंबई मुख्य शहर आहे, तिथे सात छोटी छोटी बेटे वसलेली होती. या सातही बेटाच्या मधल्या भागात म्हणजे खाडीत भराव घालून तिथला समुद्र बुजवण्यात आला आणि अशा पद्धतीने ही सातही बेटे एकमेकांशी जोडून सलगपणे हे शहर वसवण्यात आले.
मुंबई शहर वसवण्यासाठी जी सात बेटे एकत्र करण्यात आली ती कोणती होती? तर, माहीम, वरळी, परळ, माझगाव, मुंबई (बॉम्बे), कुलाबा आणि छोटा कुलाबा – ज्याला पूर्वी म्हातारीचे बेट म्हटले जाई. या बेटांच्या आजूबाजूचा समुद्र हा जास्त खोल नव्हता आणि त्यातही ठिकठिकाणी खाजणी होती. समुद्राला जेव्हा ओहोटी लागत असे तेव्हा यातील बराचसा भाग उघडा पडत असे.
ब्रिटीशांच्या काळात, सुमारे चार ते पाच शतकांपूर्वी जेराल्ड ऑन्जिअर या मुंबईच्या दुसऱ्या ब्रिटीश गव्हर्नरने या सात बेटांमधील खाड्या बुजवण्याचा आणि समुद्र हटवण्याचा निर्णय घेतला. यानंतर टप्प्याटप्प्याने हा प्रकल्प राबवण्यात आला आणि सात बेटे एकत्र करून मुंबई बेटाची निर्मिती करण्यात आली.
एक तर या बेटांमधील अंतर अतिशय कमी होते आणि दुसरी बाब म्हणजे या बेटा दरम्यानचा समुद्र उथळ होता. ओहोटीच्या वेळी तर, तो पूर्ण कोरडाच व्हायचा. अशावेळी एका बेटावरून दुसऱ्या बेटावर लोक चालतच जायचे. कारण उथळ पाण्यात नाव हाकणे देखील शक्य नव्हते. पण, तरीही हा प्रदेश दलदलीचा होता, म्हणून हा प्रवास करताना खूप त्रास व्हायचा. ही बेटे एकमेकांशी जोडले गेल्याने एका बेटावरील लोकांना दुसऱ्या बेटावर जाण्यासाठी फारशी दगदग करावी लागली नाही.
समुद्र हटवून तिथे जमीन बनवण्याची पहिली योजना १७०८ साली करण्यात आली. माहीम ते सायनपर्यंतचा रस्ता करण्यासाठी हा भराव घालण्यात आला.
दुसऱ्यांदा १७७२ साली, महालक्ष्मी आणि वरळी यांना जोडण्यासाठी आणि मुंबईला सततच्या येणाऱ्या भरतीच्या पाण्यापासून आणि सतत येणाऱ्या पुरापासून वाचवण्यासाठी समुद्र हटवून ही दोन ठिकाणे जोडण्यात आली.
१८०३ साली सायनपासून सालसेट हा भाग जोडण्यात आला. कुलाबा ते मुंबई या भागाला जोडणारा रस्ता १८३८ मध्ये पूर्ण करण्यात आला. माहीम आणि बांद्रा हे दोन भाग १८४५ मध्ये जोडण्यात आले. या सगळ्या प्रकल्पासाठी त्यावेळी १,५७,००० रुपये इतका खर्च आला होता. सरकारने हे काम बेकायदेशीर ठरवून नामंजूर केल्याने पहिले बॅरोनेट सर जमशेदजी जीजीभोय यांच्या पत्नी लेडी अवाबाई जमशेदजी जीजीभोय यांनी ही सगळी रक्कम दान दिली होती. सातही बेटे एकमेकांना जोडण्यासाठी सुमारे दीडशे वर्षांचा कालावधी लागला. पण, त्यामुळे मुंबई हे एक विस्तृत व्यापारी बंदर म्हणून नावारुपाला आले.
त्यानंतर वेगवेगळ्या गव्हर्नरच्या कारकिर्दीत उर्वरित बेटे जोडण्यात आली. यामुळे समुद्रामार्गे होणारा व्यापार सुलभ झाला आणि दोन बेटांदरम्यानचा प्रवासही सुधारला. बॉम्बेच्या पोर्टवरून त्याकाळी कापसाचा व्यापार अगदी धामधुमीने चालत असे. हा व्यापार देखील तेजीत आला. एकूण मुंबईच्या भरभराटीला यामुळे अधिक योगदान मिळाले.
१६६१च्या काळात ही सातही बेटे पोर्तुगीजांच्या ताब्यात होती. इंग्लंडच्या दुसरा चार्ल्सने पोर्तुगीजची राजकुमारी कॅथेरीन ऑफ ब्रगांझा हिच्याशी विवाह केल्यानंतर ही सातही बेटे त्याला हुंड्यात देण्यात आली होती.
जी नंतर त्याने इस्ट इंडिया कंपनीला वार्षिक १० पौंड या दराने भाडे तत्वावर दिली. या सात बेटांव्यतिरिक्त मुंबईच्या आसपास जी दुसरी बेटे होती त्यावर तर पोर्तुगीजांचेच वर्चस्व होते. या सात बेटांवर त्यांचा अंमल राहू नये आणि सुरळीतपणे प्रवास करता यावा या हेतूने पहिल्यांदा या सात बेटांच्या एकत्रीकरणाची योजना मांडण्यात आली.
अर्थात, बेटे जोडून शहरे वसवण्याची इंग्रजांची ही कल्पना स्वातंत्र्यानंतरही सुरूच राहिली. पण, यामुळे पर्यावरणावर होणारे विपरीत परिणाम पाहता, सर्वोच्च न्यायालयाने यावर बंदी आणली आहे. छोटी छोटी बेटे जोडून बनलेले हे मुंबई शहर तर आजही प्रसिद्ध शहराच्या आणि व्यापाराच्या दृष्टीनेही जगभरातील प्रमुख शहराच्या यादीत सामाविष्ट आहेच. पण, या व्यापारी बंदराने बाहेरच्या देशांशी असलेले व्यापारी संबंध आणखी दृढ करण्यात भरीव योगदान दिले.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.