आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
शीर्षक वाचून तुम्हाला धक्का बसला असेल पण जम्मू आणि काश्मीरला स्पेशल स्टेट्स देणारे कलम ३७० हटवण्याला एक खराब फॅक्स मशीन जबाबदार आहे, हे एक विचित्र सत्य आहे. या मागे २१ नोव्हेंबर २०१८ रोजी घडलेल्या एका राजकीय घटनाक्रमाची पार्श्वभूमी आहे, ज्यात ह्या खराब फॅक्स मशीनची मोठी भूमिका आहे.
२० जून २०१७ ला तत्कालीन जम्मू काश्मीर राज्यातील मेहबुबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील पीडीपी-भाजपा युती सरकार, भाजपाने पाठिंबा काढून घेतल्यामुळे कोसळले. मेहबुबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी)च्या नेत्यांची काश्मीरमध्ये फुटीरतावादी गटासोबत सुरू असलेली गुप्त खलबतं आणि सैन्य विशेषाधिकार कायदा रद्द करण्यासाठी पीडीपीकडून वारंवार केली जाणारी मागणी, ह्या दोन कारणामुळे भाजपच्या गटात नाराजी पसरली होती.
२१ नोव्हेंबर २०१८ ला अचानक राजकीय गतिविधींना वेग आला आणि मग राजभवनातल्या खराब फॅक्स मशिनची ह्या राजकीय नाटकात एन्ट्री झाली. मेहबुबा मुफ्ती यांनी ट्विटरवर एक ट्विट टाकलं, ज्यात एका लेटरचा फोटो होता.
त्यांनी लेटरचा संदर्भ देऊन म्हटले होते की ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसच्या साथीने त्या जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा सरकार स्थापन करण्याचा तयारीत आहेत.
हे लेटर त्या राजभवनात राज्यपालांना फॅक्स करू शकत नाहीये, म्हणून हे ट्विटर फेसबुकवर पोस्ट करतोय, जेणेकरून राज्यपालांपर्यंत हे पोहचू शकेल. हे ट्विट बघून नॅशनल कॉन्फरन्सच्या ओमर अब्दुल्लानी पुढाकार घेऊन ट्विट केलं आणि राजभवनात अचानक उद्भवलेल्या ‘तांत्रिक’ अडचणींचा त्यांनी निषेध केला.
हे सर्व घडत असताना अचानक राज्यपालांनी जम्मू-काश्मीर राज्याची विधानसभा बरखास्त केली. अगदी एका रात्रीत ही विधानसभा भंग करण्यात आली. जेव्हा मेहबुबा मुफ्ती यांच्या ट्विट संदर्भात व फॅक्स मशीन संदर्भात विचारणा करण्यात आली. त्यावेळी राज्यपाल म्हणाले की
राजभवनातील फॅक्स मशीन खराब झाली असल्यामुळे मेहबुबा यांचा सरकार स्थापनेचा दावा करणारे लेटर माझ्यापर्यंत पोहचू शकले नाही. त्यामुळे मी नियमाप्रमाणे विधानसभा बरखास्त केली.
हे ऐकून मेहबुबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्लाचा तिळपापड झाला. त्यांनी केंद्र सरकारवर आरोप केले. पण त्याचा उपयोग झाला नाही आणि केंद्र सरकारने हात वर केले.
अचानक ७ ऑगस्ट २०१९ रोजी भारताचे महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घोषणा केली की जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा प्रदान करणारे कलम ३७० हटवण्यात आले आहे.
जम्मू काश्मिर राज्याला वेगळ्या घटनेचा, वेगळ्या ध्वजाचा दिलेला अधिकार काढून घेण्यात आला व भारताची राज्यघटना जम्मू काश्मीरमध्ये लागू करण्यात आली. ही भारताच्या दृष्टीने एक अत्यंत महत्वपूर्ण राजकीय-घटनात्मक खेळी होती.
कलम ३७० हटवण्यात अडचण आली नाही कारण जम्मू काश्मीरची विधानसभा बरखास्त करण्यात आली होती, हे सर्व शक्य झालं होतं ते राजभवनातील खराब फॅक्स मशीनमुळे!
जर तो फॅक्स त्या दिवशी पोहचला असता तर कदाचित इतिहास वेगळा असता पण त्या खराब फॅक्स मशिनने मोलाची भूमिका बजावली होती. यामुळेच त्या फॅक्स मशिनला स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एका अजरामर राजकीय घटनाक्रमाची निशाणी म्हणून राष्ट्रीय वस्तु संग्रहालयात ठेवायला काही हरकत नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.