आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
लहानपणी गावात एक भिकारी बसलेला दिसायचा. तसा त्रास काही द्यायचा नाही पण लहान मुलं त्याला घाबरायची. फाटके कपडे, वाढलेली दाढी, केसांच्या जटा, अंगाचा १० फुटावरून सुद्धा नाकाला जाणवणारा घाण वास.
लोक सांगायचे आईचा एकुलता एक होता. लग्न करून बायको आणली ती दुसऱ्याचा हात धरून पळून गेली. त्याच दु:खात ती माउली हाय खावून गेली. हा सैरभैर झाला, गेलेल्या बायकोला आणि आईला हाका मारून बोलवायला लागला. खाणं-पिणं, घर–दार विसरला, अकाली पिकला, वेडा झाला.
आता घराच्या जागी फक्त पडक्या भिंती आणि माळरान वाढलं होतं पण उन, वारा,पाउस काही असो त्याच्या तिथेच आडोशाला झोपायचा गावात भिक मागून जे मिळेल त्यावर गुजराण करून जगायचा. भीक मागायचा पण चोरी कधी करत नव्हता. भीक दिली तर ठीक नाहीतर तसाच मुकाट्याने लोकांनी दिलेल्या शिव्या खावून पुढे सरकायचा. स्वत:शीच बोलायचा, हसायचा.
अचानक ८-१५ दिवस झाले तो नेमका शाळेच्या यायच्या जायच्या वाटेवर आडवा यायला लागला. शाळेपासून काही अंतरावर ग्रामपंचायत कार्यालय आणि एक भलं थोरलं झाड होतं. त्याला ते झाड बहुदा आवडलं असावं. झाडाशी ठिय्या देवून बसायला लागला. तसा तर त्रास कुणाला देत नव्हता पण तरी शाळेत जाणारी मुले त्याला घाबरत होती.
एक दिवस अचानक खालच्या गल्लीतल्या माळवाल्या काकाचा पोरगा शाळेतून घरी आलाच नाही. ५ चे ६ वाजले, ६ चे ७. घरची लोकं घाबरून शोधायला बाहेर पडली. बाकीच्या लोकांना हाळी देवून बाहेर बोलावलं, शोधकार्य सुरु झालं, मित्रांना विचारणा झाली. एकानं सांगितलं शेवटचं त्याला झाडाखाली पाहिलं होतं.
झालं १५-२० माणसांचा घोळका शाळेच्या झाडाजवळ आला. तिथे इदुळाच्या मावळत आलेल्या सावल्या आणि झाडाखालचा भिकारी सोडला तर कुणीच नव्हतं. हरवलेल्या पोराच्या बापाने दरडावून त्याला विचारलं, तो काहीच न कळल्यागत टकामका सगळ्यांकडे बघायला लागला.
मुलाच्या काळजीने लोकांची डोकी तापत चाललेली. बापाने परत एकदा ४ शिव्या हासडून मुलाबद्दल विचारलं तसं तो वेडसरपणे हसला. बस डोक्यात ठिणगी पेटायला त्याचं ते वेडसर मूर्खपणाचं हसू जमावाला पुरेसं झालं.
पोराच्या बापाने चप्पल काढून खाडकन त्याच्या तोंडावर मारली तसा तो जमिनीवर बसलेला सपशेल आडवा झाला. हाणा भां#$%^ पोरगा पळविला मा@#$%^ ने असं म्हणत १५-२० जणांचा जमाव त्याच्यावर तुटून पडला. खाली जमिनीवर पडलेल्या त्या जीवाला आपल्याला का म्हणून लोक लाथा बुक्क्या काठ्याने तुडवत आहेत हे कळण्याची अक्कल देखील येत नव्हती. किती चपला बसल्या असतील, किती डोक्यात, पाठीत, अवघड जागी लाथा बसल्या असतील याची गणती नाही.
डोकं फुटलं, रक्त वाहायला लागलं, गुरासारखं ओरडून ओरडून शेवटी त्याचा आवाज सुकला. निपचित पडून तो मार सहन करत राहिला. कधीतरी जमावाचं समाधान झालं. इतकं मारून पण तोंड उघडत नाही म्हणून त्याला उचलून लोक पोलीस स्टेशन ला घेवून गेले, रीतसर तक्रार नोंदवून झाली इतका वेळ लोकांनी मारला होता नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला.
झाडाखाली जो तमाशा झाला तो पोलीस स्टेशन मध्ये सुरु झाला. इथे त्याला मारणारे हात सराईत होते. चौकीच्या बाहेर पटांगणात जिथे झेंडावंदन होते तिथल्या झेंड्याच्या पायरीवर तो शेवटी रक्त ओकत निपचित पडला.
जमावाचं समाधान झालं. लोक हरवलेल्या पोराला शोधायला मागे फिरले. वेशीत आले तशी कुणीतरी खबर आणली पोरगा घरी आलाय. माणसं धुमाट पळत माळवाल्या काकाच्या घरी आली. चिरंजीव मारुतीच्या देवळाकडं होते. देवळाच्या पाठीमागच्या झाडाच्या चिंचा आणि उंबरं गोळा करायला. रोज मंदिराचा पुजारी फटकावून हाकलून लावायचा म्हणून पाळत ठेवून मंदिराचा पुजारी ७ ला दिवा लावून घरी गेला आणि यांची कामे सुरु झाली.
हकीकत कळल्यावर ताण निवळला. लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. बापाने प्रेमाने २ धपके ठेवून त्याला जवळ घेतलं. रागावणार कसं? एकुलता एक सुसंस्कृत, सुशिक्षित घराण्यातला मुलगा, आई- बापाचा लाडका. त्याला काय बोलणार आणि रागावणार? बरं त्याने चोरी केली हे तरी कसं म्हणणार? तोडली असतील उंबर आणि चिंचा देवळाच्या मालकीच्या काय गुन्हा झाला?
खरा गुन्हेगार तर पोलीस कस्टडीत बंद होता. भिकारचोट माणूस. कमवायची अक्कल नसलेला. खायला काळ आणि भुईला भार. हरामखोर भिकारी कुठला.
1 वर्षांपूर्वी धुळ्याची बातमी आली मुले पकडणारी टोळी समजून जमावाने ५ जणांना जबर मारहाण केली. बळी गेलेले लोक सगळे नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे. भिक्षा अथवा दारोदार मागुन खाणारे. जमाव मारहाण करत असताना तिथे सरपंच आणि पोलीस पाटील पोहोचले. त्यांनी मध्यस्थी करून लोकांना शांत केलं. तोवर हे पाच जण अर्धमेले झाले होते. त्यांना घेऊन पोलीस पाटील ग्रामपंचायत कार्यालयात गेले पण गर्दीचं समाधान होईना. त्यांनी कार्यालय तोडुन हाताला येईल त्या गोष्टीने चोप द्यायला सुरुवात केली आणि शेवटी त्या ५ जणांना ठार मारलं. सगळं कार्यालय रक्ताने न्हावून निघालं होतं.
आता पालघर मधून बातमी येतेय, चोर असल्याचा संशयावरुन 3 साधूंना पालघर मध्ये जमावाने ठेचून मारून टाकलंय! स्वतः च्या वयस्कर गुरूंच्या निधनाची बातमी ऐकून ते त्यांच्या अंतिम विधीसाठी निघाले होते अशी बातमी येतेय.
सगळ्यात वाईट कुठल्या गोष्टीचं वाटलं म्हणून सांगू?
सरेआम गोळ्या झाडणारा कसाब सरकारी पहुणचार झोडत राहिलेला या देशाने बघितलाय पण काल या पालघर च्या व्हिडीओ मध्ये जेंव्हा लोक काठी दगडी घेऊन मारत होते तेंव्हा तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांच्या मागे लपण्यासाठी जो म्हातारा माणूस जात होता त्याचा हात हिसडून जमावाच्या ताब्यात मरून जाण्यासाठी देऊन टाकण्यात आलं! एरवी पोलिसातल्या माणूसपणाचे शेकडी व्हिडीओ, फोटो शूट करून टाकणारे लोक पोलिसाच्या या नृशंस कृत्याचे व्हिडीओ स्वतः हुन शेअर करणार नाहीत.
मर्डर केलेल्या माणसाला पकडून तुम्ही कोर्टात हजर करता, जामीन देऊन सोडून पण देता आणि जिथे लोकांना फक्त संशय आहे म्हणून लोकांनी दगडफेक केली तिथे तुम्ही संशयिताला ताब्यात न घेता मरणासाठी
सोडून देता!
सकाळपासून व्हिडीओ बघतेय. प्रत्येक वेळी डोळ्यातून घळघळ अश्रू येत राहतात त्या म्हाताऱ्या माणसाची तडफड पाहून!
सैरावैरा पळणारा भगव्या संन्याश्याच्या कपड्यातला म्हातारा माणूस,पोलिसांच्या मागे लपण्यासाठी पोलिसाचा हात पकडतोय, त्याच्या पाठीमागे पळतोय आणि हात हिसडून त्या माणसाला जमावाच्या ताब्यात मारण्यासाठी दिलं जातंय!
इतकी क्रूर विटंबना भगवे कपडे घालून परमेश्वराची भक्ती केल्याने होत असेल तर तो परमेश्वर पण खोटा आणि ती भक्ती पण खोटी! गरज नाही आस्तिकतेची. जगात फक्त सैतान असू शकतो. बाकी कुणी नाही.
सायबर क्राईम माहीत आहे आता सोशल मीडिया क्राईम नावाचा नवीन अजेंडा येतोय. फेसबुक वरून भांडण पेटल्यामुळे खऱ्या आयुष्यात ही तशाच हाणामाऱ्या, वॉट्सऍप ग्रुप वर भांडण पेटल्यामुळे खुनी हल्ले, अशा तक्रारी जोर धरू लागल्या आहेत.
फुकट काम धाम सोडून २४ तास सोशल मीडियावर फॉलोवर जमा करून पंतप्रधान, मुख्यमंत्री ते विविध संघटनांचे प्रमुख यांना धारेवर धर, लोकांना पेटव, फालतू भडकाऊ पोस्टी तयार करून व्हायरल कर, जातीय रंग देवुन अफवा पसरव, असले उद्योग करायला अनेक लोकांना वेळ आहे.
याच्यामुळे कुठेतरी निष्पाप माणसे भरडली जावू शकतात याची कल्पना करायला सध्या आम्हाला कुणाला वेळ नाही. मुलांना पकडणारी टोळी पकडली गेली का नाही ते माहीत नाही पण हकनाक निष्पाप माणसे मात्र जीवानिशी गेली त्याची ही कुणाला खंत असेल असं वाटत नाही कारण जमाना कितीही बदलला तरी या सगळ्यामध्ये चिरंतन राहिलेली एकच गोष्ट आहे ती म्हणजे जो गरीब असतो तोच चोर असतो.
गुन्ह्याच्या व्याख्या ठरवणारा कायदा आहे पण गुन्हेगार कोण याच्या व्याख्या या समाजाने आधीच निश्चित करून ठेवलेल्या आहेत. शेती-वाडी, घर-दार, पैका-पाणी, इस्टेट-अडका, शिक्षण, नोकरी, उद्योग, कुळ असणारे ते प्रतिष्ठित, सभ्य! आणि यापैकी काहीही नसणारे ते भिकारी, हरामी आणि गुन्हेगार!
पालघर चा व्हिडीओ पाहून विस्मृती मध्ये गेलेला प्रसंग जागा झाला.शाळेला जाण्याच्या वाटेवर झाडाखाली अचानक पणे माती इतकी लाल का दिसतेय म्हणून आम्ही सगळे झाडाखाली थांबून तिथल्या गेलेल्या भिकाऱ्याचा शोध घेत राहिलो होतो. तो आम्हाला परत कधीच दिसला नाही. मात्र झाडाखालची माती पावसाच्या पाण्याने धुवून जाईपर्यंत लाल रंगात चमकायची! एव्हढाच काय तो त्याच्या डागाळलेल्या भिकारचोट आयुष्यामधील निष्पाप पणाचा पुरावा!
या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. ThePostman.co.in संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही. | आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.