आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
“आम्ही होस्टेल मधले लोक कधीतरी अंघोळ करत असतो बाबा, रोजरोज अंघोळ. कंटाळा येतो राव.”
“अरेरे, वास येईल तुझ्या अंगाला”
अशी असंख्य वाक्य आपण होस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलांकडून अनेकदा ऐकत असतो. स्वच्छता आणि सवयीचा भाग म्हणून दररोज अंघोळ करून टापटीप राहणं प्रत्येकाला आवडतं. पण तुम्हाला माहिती आहे का की आपल्या जगाच्या इतिहासात असं एक साम्राज्य होतं जिथल्या लोकांनी कधीच अंघोळ केली नाही आणि स्वतःचे कपडेसुद्धा धुतले नाहीत?
आश्चर्य वाटलं ना? पण हे खरंय.
तुम्ही चंगेझ खानचं नाव जगाचा इतिहास अभ्यासताना ऐकलं असेल. या चंगेझ खानाच्या साम्राज्याचं नाव होतं ‘मंगोल साम्राज्य’. चीन देशाच्या उत्तरेला हे साम्राज्य १३ आणि १४व्या शतकात अस्तित्वात होतं. महान मंगोल साम्राज्य अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. यापैकी काही गोष्टी चांगल्या आहेत तर काही अगदी घृणास्पद आहेत.
चांगल्या गोष्टी म्हणजे पत्र व्यवहार, बुद्धिमत्ता अहवाल आणि अगदी प्रवाश्यांसाठी असलेली त्याची रिले सिस्टीम. आणि त्यांची वाईट वैशिष्ट्ये म्हणजे ही की त्यांनी कधीही अंघोळ केली नाही आणि कपडेसुद्धा धुतले नाही.
आपल्याला माहिती आहे की अगदी हडप्पा संस्कृतीपासून सार्वजनिक स्नानगृहाची संकल्पना अस्तित्वात होती. पण इतिहासातील मंगोल साम्राज्य जरा वेगळे होते बरं का! त्यांच्यामध्ये स्वच्छतेचा अभाव होता तो त्यांच्या अंधश्रद्धेमुळे.
या लोकांचा असा विश्वास होता की, जलचक्र हे ड्रॅगनद्वारे नियंत्रित केले जाते. जर आपण स्नान केले तर पाणी दुषित होईल आणि त्यामुळे प्रदूषण होईल. जर पाण्याचे प्रदूषण झाले तर ड्रॅगनला राग येईल आणि तो चिडेल अशी अंधश्रद्धा मनात अगदी ठासून भरल्यामुळे त्यांनी कधीच अंघोळ केली नाही असे म्हटले जाते.
आता साहजिकच तुम्हाला प्रश्न पडला असेल की ,एखाद्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यात कधीच अंघोळ केली नाही म्हणजे दुर्गंधी तर येणार? तर हो. तेही अगदीच खरंय.
पण मंगोल साम्राज्य आणि तिथले लोक जरा खासच होते. त्यांनी या येणाऱ्या वासाला काहीतरी खास आणि वैयक्तिक मानले.
जर कोणी एखाद्या व्यक्तीला भेटले आणि दुर्गंधी येते म्हणून नाक बंद केले तर त्यांना ते आदरयुक्त वाटत असे. ते त्यांच्या व्यक्तिमत्वाशी जोडले जात असे.
दुसरी आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यांनी कधीच कपडेसुद्धा धुतले नाहीत. स्वतःचे कपडे सुद्धा ते वारंवार बदलत नसत. अगदीच फाटत आले तर आणि तरच ते बदलले जाई. फक्त याला अपवाद होता तो सण समारंभाचा. तेव्हा प्रत्येक जण विशेष कपड्यात असे.
महान राजा चंगेज खान जर एखाद्या व्यक्तीला त्याचे जुने, फाटके आणि दुर्गंधीयुक्त कपडे देत असेल तर त्या व्यक्तीला तो स्वतःचा सन्मान वाटत असे. महान मंगोल साम्राज्याच्या नेत्याच्या कपड्यावर स्वतःची मालकी झाली ही भावना कपडे घेणाऱ्या व्यक्तीमध्ये असे आणि यात तो आनंद मनात असे.
मंगोल साम्राज्यातील लोक प्रामुख्याने लांब वाहणारे गाऊन परिधान करत असत त्याला कॅफटन म्हणून ओळखले जात असे. समाजातील एखाद्या व्यक्तीच्या स्थानानुसार त्याची कॅफटनची स्थिती अवलंबून असे. मंगोल लोकांनी वापरलेल्या साहित्यात रेशीम फर, सुती कपडे, चामडे, लोकर आणि ब्रोकेडचा समावेश होता.
त्या गाऊनसोबतच गाय आणि पट्ट्यापासून बनवलेले बूट घालत असत आणि त्यांचे बूट जवळजवळ नेहमीच शेणाने माखलेले असत.
तर अशा चंगेज खानने विस्तार केलेल्या जगातील दुसऱ्या मोठ्या क्रमांकाच्या साम्राज्याची आहेत की नाही हे आगळेवेगळे वैशिष्ट्य ???
Source : http://ipfactly.com/the-mongols-never-ever-took-a-bath/
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.