आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
सध्या भारतातील प्रमुख शहरांत मेट्रोचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. भारतातील बहुतांश शहरात निर्माण केल्या जाणाऱ्या मेट्रो या इलेव्हेटेड प्रकारातील आहेत, अर्थात त्या जमिनीपासून उंचावर आहेत. भारताच्या काही भागात भूमिगत मेट्रो लाईन्सची देखील निर्मीती केली जात आहे. भारतात सर्वत्र उभ्या राहत असलेल्या या मेट्रोच्या जाळ्यामुळे शहरातील वाहतूक वेगवान होण्यास मोठी मदत होणार आहे.
आज आकाशात उंचावर पुलावर धावणाऱ्या मेट्रोच्या आधी ‘मेट्रो’ची वाहतूक बहुतांश भूमिगत असायची.
भूमिगत मेट्रो आजदेखील उंचावरून जाणाऱ्या मेट्रोपेक्षा जलद वाहतुक करण्यास सक्षम आहे. जगभरातील असंख्य चाकरमान्यांचा आयुसियाचा ‘मेट्रो’चा प्रवास हा एक अविभाज्य भाग आहे. इंग्लंडमध्ये पहिल्यांदा मेट्रोचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले पुढे रशिया, जर्मनी, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स अब्ज न्युझीलंड सारख्या कित्येक देशात मेट्रोचा प्रसार झाला.
भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला ब्रिटिशांनीच ‘मेट्रो’चे तंत्रज्ञान प्रदान केले आहे.
जगातील पहिल्या भूमिगत मेट्रोची सुरुवात लंडनमध्ये १८६३ साली झाली. सुरुवातीच्या काळात लाकडी रचनेची आणि गॅसवर चालणारी ही मेट्रो, ‘ट्यूब’ म्हणून ओळखली जायची.
१९ व्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटिशांनी कॅनडा, आयर्लंडपासून ते ऑस्ट्रेलिया न्युझीलंडपर्यंत आपल्या साम्राज्याचा विस्तार केला. भारतातील १८५७ चा उठाव चिरडून ब्रिटनने भारतावर देखील आपले वर्चस्व प्रस्थापित केले. इंग्लंडमध्ये त्यावेळी ग्रीनिच मिन टाईम (GMT) प्रमाणे वेळ गृहीत धरली जात होती. ब्रिटिश साम्राज्यात सूर्य कधीच मावळत नाही, असे त्याकाळी म्हणायचे. ब्रिटिशांच्या या अफाट साम्राज्याचा कारभार लंडन शहरातून पाहिला जात होता. मसाले, कापड, यंत्र, रसायने, सैन्य, राजकारण, शिक्षण या सर्वांचेच जागतिक केंद्र त्यावेळी लंडन होते.
आज भारतात सर्वत्र ज्याप्रमाणे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते, तशी समस्या एकेकाळी लंडनमध्ये देखील निर्माण झाली होती. १८५० साली तर अशी परिस्थिती होती की लंडनचे रस्ते वाहनांच्या दाटीवाटीने पुर्णपणे भरलेले असायचे. “चार्ल्स पिअरसन” हे त्याकाळी लंडनचे महापौर होते. लंडनच्या वाहतुकीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी अनेक उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या उपाययोजना अत्यंत कल्पक स्वरूपाच्या होत्या, अशीच एक कल्पक योजना होती जमिनीखालून रेल्वे वाहतूक सुरू करण्याची!
जमिनीच्या खालून म्हणजेच भूमिगत पद्धतीने रेल्वे वाहतूक सुरू झाली तर रस्ते मोकळे होतील, असा त्यांचा विचार होता. शिवाय लंडनमध्ये त्याकाळी ज्या ‘ट्रॅम’मधून नागरिक प्रवास करायचे, ती ट्रॅम देखील रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे फारच संथ गतीने प्रवास करत होती.
भूमिगत रेल्वेमुळे सार्वजनिक वाहतुकीचा व रस्ते वाहतुकीचा वेग वाढणार होता व कोंडी सुटणार होती.
पण लंडन शहराच्या मधोमध असणाऱ्या थेम्स नदीचे काय करायचे असा प्रश्न उभा ठाकला, त्यावर पीअरसने नदीच्या खाली १५० -२०० मीटरवर असलेल्या खडकाळ भागाला भगदाड पाडून त्यातून रेल्वे लाईन टाकण्याची अभिनव कल्पना दीडशे वर्षांपूर्वी लोकांसमोर ठेवली.
अर्थातच त्याकाळी देखील आजच्या प्रमाणे एखाद्या अभिनव कल्पनेला होतो, तसा विरोध सुरू झाला. ‘लंडन टाइम्स’ या प्रसिद्ध वृत्तपत्राने तर या योजनेची “द ग्रेट बोअर” म्हणून खिल्ली उडवली होती. परंतु १८६३ साली ठीक १३ वर्षांनी रॉदर राईट या पितापुत्राने नदीच्या खाली असा बोगदा यशस्वीपणे निर्माण केला आणि त्या बोगद्यातून भूमिगत रेल्वेची अर्थात मेट्रोची वाहतुक सुरू झाली. या भूमिगत मेट्रोचे सर्व लंडनभर जाळे पसरले.
भविष्यात हीच भूमिगत मेट्रो लंडन शहराची ओळख बनली. बोगद्यातून प्रवास करावा लागतो म्हणून या भूमिगत रेल्वेला लंडनमध्ये बहुतांश लोक “ट्यूब” म्हणून ओळखतात.
दुसऱ्या महायु*द्धाच्यावेळी, हि*टल*रच्या आदेशावरून ना*झी जर्मनीचे विमान ज्यावेळी लंडनवर बॉ*म्बगोळे डागत होते, त्यावेळी बहुतांश लंडन वासियांनी याच मेट्रोच्या बोगद्यात आसरा घेतला होता. अनेक लोकांचे जीव वाचवण्यात या मेट्रोच्या भूमिगत बोगद्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.
१९८१ मधे कोलकात्यात भूमिगत मेट्रो सुरू करण्यात आली. या मेट्रोच्या निर्मितीत आशिदा इलेक्ट्रॉनिक्स या ठाण्यातील कंपनीने मोठी भूमिका बजावली होती.
त्या कंपनीच्या मनोहर कुलकर्णी यांचा त्यावेळी मोठा सत्कार करण्यात आला होता. दिल्लीत ई श्रीधरन यांच्या प्रयत्नातून मेट्रो उभी राहिली. त्यांना मेट्रो मॅन हा किताब मिळाला.
सध्या मुंबईत कुलाबा – सीप्झ या मार्गावर भूमिगत मेट्रोच्या निर्मितीचे काम सुरू आहे. पुण्यात देखील स्वारगेट ते शिवाजीनगर या मुख्य भागात निर्माण होणारी मेट्रो भूमिगत स्वरूपाची असणार आहे, त्यासाठी जमिनीच्या खाली बोगदा निर्मितीचे कार्य आता जवळजवळ पूर्ण झाले आहे.
अशा प्रकारे येत्या काही वर्षात दीड दोनशे वर्षांपूर्वी सुरू झालेली मेट्रो भारतीयांच्या प्रवासाचे एक प्रमुख माध्यम म्हणून आकारास येणार आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.