आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रातील विविधांगी माहिती देणारी पुस्तके कशी जन्माला आली, याचाही एक रंजक इतिहास आहे. जेंव्हा कागद नव्हते, कंप्युटर नव्हते, छपाई यंत्र नव्हते, तेंव्हाही आपल्या जवळचे ज्ञान जतन करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या काढल्या जायच्या. शिलालेख, ताम्रपट अशा त्यावेळी हाताशी असलेल्या साधनांचा वापर करून त्या काळाच्या महत्त्वपूर्ण घटना, प्रसंग, त्यांचे वर्णन जतन करून ठेवण्यात आले.
आज आपल्या घरातील, शाळेतील, विद्यापीठातील किंवा ग्रंथालयातील पुस्तकांचे कपाट पाहतो तेंव्हा लक्षात येते की आज पुस्तके संग्रहित करून ठेवण्याची पद्धतही किती बदलली आहे. ही पुस्तके कपाटावर मांडण्याचीही एक विशिष्ट पद्धत आहे. ती कशीही कुठेही ठेवली जात नाहीत.
ही पुस्तके ठेवताना ती उभीच ठेवली जातात. पुस्तकांचा मागचा कणा बाहेरच्या बाजूला असतो, जेणेकरून त्यावरील पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव, प्रकाशन स्पष्ट दिसावे. ग्रंथालयात तर पुस्तके कशी मांडली जायला हवे किंवा जातात याचा अभ्यास करणारे एक संपूर्ण शास्त्रच आज विकसित झाले आहे. ज्याला आपण ग्रंथालयशास्त्र म्हणतो. पण फार फार वर्षापूर्वी ही सगळी योजना अस्तित्वात नव्हती.
एकेकाळी जेंव्हा पुस्तके छापण्याची आणि त्यांची निर्मिती करण्याची प्रक्रिया आजच्या इतकी स्वस्त नव्हती तेंव्हा पुस्तकांनाही साखळ्या आणि कुलुपे लावली जात असत हे तुम्हाला माहित आहे का?
शेकडो वर्षापूर्वी पुस्तके जतन करून ठेवण्याची किंवा त्यांचा संग्रह करून ठेवण्याची पद्धत फारच विचित्र होती. त्याकाळी पुस्तकांना सुद्धा सुरक्षित ठेवण्यासाठी कडी-कुलूप आणि साखळ्यांचा वापर करावा लागे.
आजच्यासारखी आयताकृती आकाराची पुस्तके तयार होण्याआधी लिखित साहित्याची गुंडाळी करून ठेवण्याची पद्धत होती. यासाठी कापडाचा वापर केला जाई. त्यानंतर वेगवेगळ्या धातूंचा घडी करता येण्याजोगा पातळ तुकडा घेऊन त्यावर लिहून ते जतन करून ठेवले जाई. छपाई आणि पुस्तकाची आधुनिक स्वरूपातील बांधणीचे शास्त्र अवगत होण्यापूर्वी पुस्तके लिहिण्यापासून ते त्यांची बांधणी करण्यापर्यंतची सगळी कामे हातानेच केली जात आणि चर्च किंवा मठातील साधू हे काम स्वत:हून करत.
अशा प्रकारे हाताने केलेले काम हे खूपच सुबक असे. त्यामुळे ते तितकेच मौल्यवान समजले जाई. शिवाय, या सगळ्या प्रक्रियेसाठी खर्चही खूप येत असे म्हणूनच ही पुस्तके जतन करून ठेवणेही तितकेच जिकीरीचे काम होते. म्हणून मध्ययुगीन काळात पुस्तके जतन करून ठेवण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली गेली. मठातील पुस्तकालयात पुस्तके गहाळ होऊ नयेत म्हणून त्यांना लोखंडी साखळीने बांधले जाऊ लागले.
ज्या कपाटात ही पुस्तके ठेवलेली असत त्या कपाटाला साखळीचे एक टोक जोडलेले असे आणि दुसरे टोक पुस्तकाच्या वरच्या पृष्ठाला जोडलेले असे.
हळूहळू सगळ्याच ग्रंथालयातून हीच पद्धत वापरली जाऊ लागली. त्यामुळे कोणालाही पुस्तक ग्रंथालयाच्या बाहेर नेणे शक्य नव्हते. पुस्तकांच्या कपाटाच्या शेजारीच पुस्तके वाचण्यासाठी बाकडे बनवलेले असत. तिथेच बसून पुस्तक वाचायचे आणि परत कपाटात ठेऊन द्यायचे. पुस्तकांना लावलेली साखळी पुरेशी लांब असे त्यामुळे पुस्तके सहज हाताळता येत, पण त्यांना कपाटातून काढता येत नसे.
साखळीत अडकून पुस्तके फाटू नयेत म्हणून पुस्तकांची पुढची कडा बाहेरच्या बाजूने ठेवलेली असे. पुस्तके छापणे, त्यांची बांधणी करणे, या सगळ्या गोष्टी सहज सोप्या आणि स्वस्त होईपर्यंत पुस्तके अशीच साखळी लावून सुरक्षित ठेवली जात होती.
जगभरातील अनेक ग्रंथालयांनी हीच पद्धत स्वीकारली होती.
युनायटेड किंग्डममधील हेअरफोर्ड कॅथेड्रलमधील चेन्ड लायब्ररी यासाठी विशेष प्रसिद्ध होती. हे जगातील सर्वात मोठे ग्रंथालय आहे. आजही तिथे ही चेन सिस्टीम पाहायला मिळते.
या ग्रंथालयात ८व्या शतकातील हस्तलिखिते आजही उपलब्ध आहेत. शिवाय, आणखीही काही मध्ययुगीन हस्तलिखिते आहेत. त्यांना आजही अशीच साखळी लावून ठेवण्यात आले आहे.
पुस्तके ही खरेच मौल्यवान संपत्ती आहेत. जगाच्या पाठीवर त्या त्या प्रदेशात विशिष्ट कालखंडातील संस्कृतीची लोकजीवनाची माहिती देणारी ही जुनी हस्तलिखिते म्हणजे तर दुर्मिळ खजानाच. ग्रंथालयातून पुस्तके गहाळ होण्याचे प्रकार आजही पूर्णतः थांबलेले नाहीत. पण, आजच्या काळात एक पुस्तक हरवले गेले तरी त्याच पुस्तकाची दुसरी प्रत सहज उपलब्ध होऊ शकते. ज्या काळात अशी सोय नव्हती, त्याकाळात वापरलेली ही कल्पना खरोखरच छान आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.