आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
लॉकडाऊनच्या काळात आपल्या सर्वांनाच कोंडल्यासारखे वाटत आहे ना? हिंडण्याफिरण्याची हौस प्रत्येक माणसाला असते. ‘शकुंतलादेवी-द ह्युमन रोबोट’मध्ये विद्या बालन नेहमी म्हणते, “हम इन्सान हैं, पेड नहीं, हमारे पास पैर हैं, जडे नहीं, बोलो क्युं? ताकी हम दुनिया घूम सके!”
जगभ्रमंती करण्याचे स्वप्न कित्येक जण पाहतात, पण आजही मुठभर लोकच हे स्वप्न पूर्ण करू शकतात. तसे तर खिशात बक्कळ पैसे असले तरी आणि आजच्या काळात एका देशातून दुसऱ्या देशात किंवा एका खंडातून दुसऱ्या खंडात जाण्यासाठी अनेक साधने असली तरी खूप लोक जग पालथे घालण्याचे स्वप्न पाहत असतील असे वाटत नाही. आता काही जण मोठमोठ्या हुद्द्यावर काम करतात, तेव्हा कामाच्या निमित्ताने त्यांचे अनेक देशांत फिरणे होते हा भाग वेगळा, पण फक्त फिरण्यासाठी म्हणून कुणीही उचलली बॅग, घातल्या चपला आणि चालला जग पालथा घालायला असे होत नाही.
पण तुम्हाला माहिती आहे का, १४ व्या शतकात ज्याकाळी प्रवासासाठी फारशी प्रगत साधने उपलब्ध नव्हती, जगाचा नकाशाही कुणाला माहित नव्हता, त्याकाळात एका माणसाने अर्धेअधिक जग पालथे घातले होते.
फिरण्याचे अफाट वेड असलेल्या या माणसाचे नाव होते, ‘उब्न बतुता मुहम्मद बिन अब्दुल्लाह बिन मुहम्मद बी इब्राहीम अललवाती अलतंजी अबू अब्दुल्लाह.’ इतके मोठे नाव एका दमात घेणे तर शक्य नव्हते म्हणून लोक त्यांना इब्न बतुता या नावाने ओळखत.
इब्न बतुता आफ्रिकेतील मोरोक्को प्रदेशातील तंजीयार शहराचा रहिवासी. २४ फेब्रुवारी १३०४ रोजी त्याचा जन्म झाला. त्याचे कुटुंब तंजीयार शहरातील एक प्रतिष्ठित कुटुंब म्हणून ओळखले जात होते. त्याच्या कुटुंबात सगळेच लोक अभ्यास आणि ज्ञानार्जनाच्या क्षेत्राशी संबधित होते. त्यांचे कुटुंब काजींचे कुटुंब म्हणून ओळखले जाई. अशा मोठ्या घराण्यातील इब्न बतुताला लहानवयापासूनच चांगले शिक्षण मिळाले. अर्थात, त्याकाळी शिक्षणाचा अर्थ धार्मिक शिक्षणापुरताच मर्यादित होता. फारसी, अरबी आणि संस्कृत या तीन भाषा त्याला अवगत होत्या. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला घराण्याच्या परंपरेप्रमाणे काजीचा पदभार सांभाळण्याची संधी चालून आली होती. पण इब्न बतुताच्या नशिबी मात्र काजीपद नव्हते. जग पालथे घालून इतिहासाच्या पानावर आपले नाव कोरण्यासाठी त्याचा जन्म झाला होता.
घरातील धार्मिक वातावरणामुळे इब्न बतुतावरही धार्मिक विचारांचा मोठा पगडा होता. त्याला आपला धर्म कुठे कुठे पाळला जातो, वेगवेगळ्या देशांत कुठल्याप्रकारे लोक याचे पालन करत असतील अशा अनेक प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे मिळवायची होती. धर्माचा अजून गाढा अभ्यास करायचा होता आणि जग समजून घ्यायचे होते. अर्थात त्याकाळी असे काही तरी स्वप्न पाहणे म्हणजे वेडगळपणाचेच ठरले असते.
शेवटी हज यात्रा करण्याच्या निमित्तानं इब्न बतुता घरातून बाहेर पडलाच. प्रत्येक मुस्लीम व्यक्तीने आपल्या हयातीत एकदा तरी हज यात्रा करावी असे म्हटले जाते. या यात्रेला मुस्लीम धर्मात खूपच मोठे महत्व आहे. २१व्या वर्षी १३२५ मध्ये त्याने आपला प्रवास सुरु केला. या प्रवासात त्याचे वाहन होते एक खेचर! हज यात्रा करण्यासाठी म्हणून घरातून बाहेर पडल्लेल्या इब्न बतुताने काही लवकर परतण्याचे मनावर घेतलेच नाही.
तीस वर्षे तो या देशातून त्या देशात फिरत राहिला. या तीस वर्षात त्याने आफ्रिकेचा अर्धा भाग आणि संपूर्ण आशिया खंड पालथा घातला.
आफ्रिकेतून तो पहिल्यांदा मदीनेला गेला. या प्रवासात इजिप्त, सिरीया आणि लिबिया हे देशही फिरले. अनेक लोकांच्या भेटी झाल्या. यातील कित्येक लोक तर ज्ञानी आणि संत होते. शेख बुरहानुद्दीन यांनी त्याला पाहताच ‘तू जगभ्रमंती करण्यासाठीच जन्माला आला आहेस,’ अशी भविष्यवाणी केली. अनेकांनी त्यांना भारतात जाण्याचाही सल्ला दिला.
त्याचवेळी इब्न बतुताला असे स्वप्न पडले एका मोठाल्या पक्षाच्या पंखावर बसून तो पूर्वेकडील देशांचा प्रवास करत आहेत. या स्वप्नाचा अर्थ जाणून घेण्यासाठी तो सुफी संत शेख मुर्शिद यांच्याकडे गेले. तेव्हा त्यांनीही तेच सांगितले की, ‘याचा अर्थ हाच होतो की, तू जगभ्रमंती करणार आहे.’
त्याने आता आपला मोर्चा मक्का शहराकडे वळवला. या शहरात काही महिने वास्तव्य केल्यानंतर तो पुढच्या प्रवासाला निघाला. इराण, सोमालिया आणि अशाच देशातून फिरत फिरत तो सिंध नदीच्या काठाशी पोहोचला. नदीपार करून तो दिल्लीत आला. त्यावेळी दिल्लीत मुहम्मद बिन तुघलकचे राज्य होते. तुघलकाबद्दल इब्न बतुताने आधीच माहिती जमवली होती. शिकलेल्या आणि पात्र व्यक्तीला सुलतान आपल्या पदरी आसरा देतो हेही त्याला माहिती होते. सुलतानची इब्न बतुताशी भेट झाल्यावर झालेही तसेच. सुलतान इब्न बातुताच्या ज्ञानावर इतका भाळला की, त्याला दिल्ली दरबारचे काजी पद बहाल केले.
भारतातही त्यांनी अनेक ठिकाणे पाहिली. एकदा त्याच्याबद्दल गैरसमज झाल्याने बादशाहने त्याला तुरुंगातही टाकले होते. मुहम्मद तुघलक तसा अतिशय कठोर राजा होता. गुन्हेगाराला शिक्षा देताना त्याला जराही दयामाया येत नसे. त्याच्या या गरम डोक्याच्या स्वभावामुळेच इब्न बतुताला त्याची फार भीती वाटायची. तो नेहमीच काही ना काही कारण सांगून दरबारातून निसटण्याचा प्रयत्न करत असे.
भारतात राहिल्यानंतर आता त्याला चीनला जायचे वेध लागले होते पण तुघलकाच्या तावडीतून इतक्या लवकर सुटका होणे काही शक्य दिसत नव्हते. तेव्हा तुघलकनेच त्याला आपला दूत म्हणून चीनला पाठवले आणि इब्नची तुघलकाच्या तावडीतून सुटका झाली.
भारत ते चीन हा प्रवास त्याच्यासाठी खूपच आव्हानात्मक होता. तुघलक बादशाहने त्याच्यासोबत खूप मोठा लवाजमा आणि किंमती वस्तू पाठवल्या होत्या. वाटेत दरोडेखोरांच्या टोळीने त्यांच्यावर हल्ला केला आणि या सगळ्या किमती वस्तूंची लुट केली. त्याच्यासोबतची अनेक माणसे इब्न बतुताला तिथेच टाकून आपला जीव वाचवून पळाली. अशा अवस्थेत त्याला परत गेला असता तर नक्कीच तुघलकाने त्याला सोडले नसते म्हणून त्याने प्रवास सुरूच ठेवला.
चीनमध्येही त्याने बरेच दिवस मुक्काम ठोकला. ताओइस्ट साधूंना भेटला. चीनमधील मोठमोठ्या राजा-महाराजांना भेटला. इब्न बतुताची ख्याती या लोकांनी आधीच कुठून तरी ऐकली असल्याने त्यांनाही इब्न बतुताविषयी खूप कुतूहल होते. अनेक राजा-महाराजांना वाटे की इब्नने कायमचे त्यांच्या पदरी रहावे. पण इब्नच्या मूळ फिरस्त्या स्वभावामुळे एका ठिकाणी त्याचा जीव अजिबात रमत नसे.
चीनमध्ये काही दिवस वास्तव्य केल्यावर आता इब्नला घराची ओढ लागली होती. मोराक्कोला जाता जाता वाटेतील काही देश पाहण्याची त्याची इच्छा होती, पण वाटेतच त्याला त्याच्या वडिलांच्या मृत्युच्या बातमीने गाठले आणि तो सरळ घराच्या दिशेने निघाला. तब्बल तीस वर्षानंतर इब्न आपल्या घरी आपल्या माणसात पोहोचला. तिथे गेल्यावर त्याने लोकांना आपल्या प्रवासाच्या गोष्टी सांगण्यातच आपले उर्वरित आयुष्य व्यतीत केले. या तीस वर्षांच्या प्रवासाने त्याला खूप काही दिले होते.
इब्नने हे प्रवास वर्णन लिहून ठेवले आहे. त्याला ‘रिहला’ म्हटले जाते. रिहला म्हणजे प्रवासवर्णन. यात भारताबद्दलही खूप काही लिहिले आहे. अर्थात, इब्नचे हे लिखाण त्याच्या आठवणींवर बेतलेले आहे. त्याने प्रवासात कुठल्याही नोंदी केल्या नव्हत्या. ज्या ठिकाणांना त्याने भेट दिली नाही अशा ठिकाणांबद्दलही लिहून ठेवले आहे.
इब्न बतुताची ही कथा वाचल्यानंतर तुम्हाला कळाले असेल की प्रवास करण्यासाठी कसलेही पूर्वनियोजन नाही तर फिरण्याची उत्कट इच्छा तेवढी जवळ असावी लागते. हो ना?
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.