आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
प्राचीन काळापासून भारतावर अनेक परकीय शासकांनी आक्रमण केले आहे. यात हूण वंशीय शासकांचाही समावेश आहे. हूणांनी भारतावर आक्रमण करून भारतातून अतोनात लुट केली. इथपर्यंतचा इतिहास तरी आपल्या सर्वांना माहितीच आहे. मंगोल राज्यकर्त्यांनंतर हूण वंशीय राजे सर्वात शक्तिशाली मानले जात होते. या हूण राजांनी आपल्या साम्राज्याचा भरपूर मोठ्या प्रमाणात विस्तार केला. हूण शक्तिशाली राजे होते परंतु त्यांच्यात असलेल्या स्वयंशिस्तीच्या अभावाने त्यांनी जितक्या लवकर आपल्या साम्राज्य विस्तार केला तितक्याच वेगाने त्यांचा नायनाटही झाला.
पण, या हूण शासकांमध्ये अत्तिला हूण नावाचा एक अत्यंत क्रूरकर्मी शासक होऊन गेला. या अत्तिला हूणने आशियापासून युरोपपर्यंत आपल्या साम्राज्याचा विस्तार केला होता. त्याच्या एकसारख्या आक्रमणांनी रोमन साम्राज्याला हळूहळू खिंडार पडू लागले.
अत्तिलाला वर्षाकाठी ७०० पौंड किंमतीचे सोने कर म्हणून देण्याच्या तह रोमन आणि अत्तिला यांच्यात झाला. अत्तिलाच्या मृत्युपर्यंत रोमन साम्राज्याने त्यांचा हा शब्द पाळला.
त्यानंतर अत्तिलाने आपला मोर्चा पश्चिमी साम्राज्यांकडे वळवला. याच दरम्यान ब्लेदाचा मृत्यू झाला आणि हूण साम्राज्याची निरंकुश सत्ता अत्तिलाच्या हाती आली. पश्चिमी साम्राज्यात अत्तिलाला विरोध झाला. त्यांनी सहजासहजी हार पत्करली नाही.
पश्चिमी साम्राज्याचा सम्राट तिसरा वॅलेंटीनियन याची बहिण जुस्ताग्राटा हिने आपल्याच भावाविरुद्ध बंड करत अत्तिलाला भेट म्हणून अंगठी पाठवली. अत्तिलाला वाटले हा लग्नाचा प्रस्ताव असावा. म्हणून त्याने तो प्रस्ताव मान्य केला आणि हुंड्यात अर्धे राज्य मागितले. त्याने मेत्सची लुट करून ऑर्लीयापर्यंत धडक मारली होती. परंतु इथून पुढे त्याला घुसता आले नाही.
त्याने यावेळी माघार घेतली आणि ४५१ सालाच्या आसपास त्याने पुन्हा एकदा पश्चिमी साम्राज्यावर हल्ला केला. पश्चिमेकडील सेना आणि अत्तिलाची सेना यांच्यात तुंबळ युद्ध झाले. युद्धात रक्ताचे पाट वाहू लागले.अत्तिलाने पूर्ण ताकदीनिशी हे युद्ध लढले. तरीही त्याला विजय मिळाला नाही. पराजयाने अत्तिला आणखीनच संतापला. असे म्हटले जाते की त्याच्या आयुष्यातील हा शेवटचाच पराजय होता.
त्याने आपले सैन्य आणखी मजबूत केले. सैन्याची ताकद वाढवल्यानंतर त्याने इटलीवर हल्ला केला. सम्राट वॅलेंटीनियनला जीव मुठीत घेऊन पाळावे लागले. या युद्धात अत्तिलाने भास्मासुराचेच रूप धरण केले होते. अत्तिलाच्या नावानेही युरोपियन कापत असत. अशाप्रकारे त्याने युरोपपर्यंत त्याने हुणांच्या साम्राज्याचा विस्तार केला.
नॉर्वे आणि स्वीडनपर्यंत त्याने आपल्या साम्राज्याचा विस्तार केला. हंगेरीवर सत्ता स्थापन करून त्याला स्वतःचे नाव दिले. अत्तिलाने सोन्या-चांदीची प्रचंड लुट केली. रोमन साम्राज्याशी तह करतानाही त्याने सोन्याच्या स्वरूपातच कर मागितला पण, प्रत्यक्षात अत्तिलाला मात्र सोन्याची तितकीशी हाव नव्हती.
त्याला भेटायला येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार करताना तो सोन्याचांदीच्या भांड्याचा वापर करी. मात्र स्वतःसाठी तो लाकडी भांडीच वापरत असे.
रोमन राजदूत प्रीसियस जेव्हा तहाची बोलणी करण्यासाठी त्याच्या हंगेरी येथील महालात गेला तेव्हा त्याने प्रत्यक्ष या पाहुणचाराचा आणि अत्तिलाच्या सध्या राहणीचा अनुभव घेतला होत. त्याच्या कपड्यातूनही त्याचा साधेपणा झळकत असे. इतरांप्रमाणे त्याच्या कपड्यावर सोन्याची किंवा रत्नांची कलाकुसर कधीच केलेली नसे. पण, त्याचे कपडे मात्र अतिशय स्वच्छ असत.
खुद्द राजाच इटलीतून पळाल्यानंतर इटलीतील पोपने जनतेची बाजू घेतली आणि अत्तिलाला जनतेवर जुलूम न करण्याची विनंती केली. पोपच्या विनंतीला मान देऊन अत्तिला इटलीतून माघारी आला. त्यानंतर तो चीनच्या कासू प्रांताकडे वळला.
अत्तिलाने इटलीतून माघारी येताना बगर्डोची राजकुमारी इल्डीको हिच्याशी विवाह केला. इल्डीको अत्यंत सुंदर होती. लग्नाच्या रात्री तो आपल्या पत्नीसोबत होता. पण, त्याच रात्री अचानक त्याचा मृत्यू झाला. रात्री अचानकच त्याच्या डोक्यातून रक्तप्रवाह सुरु झाला. पण त्याला अचानक हा त्रास कसा सुरु झाला हे मात्र कळू शकले नाही.
अत्तिलाचा मृत्यू ही एक संशयास्पद घटना होती. हूणांसाठी हा एक खूप मोठा धक्का होता. त्याला त्याच रात्री दफन करण्यात आले. त्याला दफन करताना सोन्या-चांदीची बनवलेली शवपेटी वापरण्यात आली. त्याला दफन करणाऱ्या सेवकांनाही नंतर मारून टाकण्यात आले. त्यामुळे त्याला कुठे दफन केले आहे, हेही कुणाला कळू शकले नाही. यशाच्या शिखरावर असताना अत्तिलाचा झालेला हा मृत्यू अनेक प्रश्न चिन्ह उपस्थित करतो. कदाचित त्याला समोरासमोर हरवणे शक्य नसल्यानेच त्याचा घातपाताने कुणीतरी काटा काढला असण्याची शक्यता आहे. काहीजणांच्या मते त्याची पत्नी इल्डीको हिचाही यात हात असण्याची शक्यता आहे.
अत्तिलाच्या मृत्युनंतर हूण साम्राज्य डळमळीत झाले. अत्तिलाने निम्न स्तरातील लोकांनाही लढण्यासाठी प्रवृत्त केले आणि त्यांना सैन्यात सामावून घेतले. यामुळेच त्याच्याकडील सैन्य वाढत गेले. रोमन साम्राज्याला या सैन्याने खिळखिळे करून सोडले होते.
अत्तिला क्रूर होता. शत्रूवर तुटून पडताना त्याला जराही दयामाया येत नसे हे खरे असले तरी हुणांच्या नावाने युरोपमध्येही धडकी भरवण्याची किमया त्याने साधली होती. खरे तर त्यावेळचे अनेक शासक असेच क्रूर होते. पण अत्तिला शूर होता. त्याने एकदाच पराभवाचा सामना केला. पण त्याचाही त्याने वचपा काढलाच.
पण, एका लढवय्या योद्ध्याचा यशोशिखरावर असताना अशा पद्धतीने अंत व्हावा, याहून मोठे दुर्दैव ते कोणते?
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.