आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
१९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचाच काही भाग विलग करून पाकिस्तानची निर्मिती करण्यात आली. भारतातील बहुसंख्य मुस्लिमांनी पाकिस्तान हे स्वतंत्र मुस्लीम राष्ट्र हवे अशी मागणी केल्याने पाकिस्तानच्या निर्मितीला मान्यता देण्याशिवाय गत्यंतर नव्हते. भारताच्या स्वातंत्र्याला यावर्षी ७४ वर्षे पूर्ण झाली तशीच पाकिस्तानच्या निर्मितीलाही ७४ वर्षे पूर्ण झाली.
पाकिस्तान हा धर्माधिष्ठित देश असला तरी, तिथे काही हिंदू धर्मीय लोकही राहतात. पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या स्थानिक हिंदूनी भारतात येण्याऐवजी पाकिस्तानातच राहण्याचा निर्णय घेतला. काही हिंदू स्थलांतरीत होऊन भारतात आले.
पण, या काळात दोन्ही देशांनी प्रचंड रक्तपात आणि हिं*साचार अनुभवला. भारताच्या स्वातंत्र्याच्या आनंदावर फाळणीच्या काळातील दंगलीमुळे विरजण पडले.
भारत धर्मनिरपेक्ष देश असल्याने इथे प्रत्येक धर्माचा आणि त्यात्या धर्माच्या प्रार्थनास्थळांचाही तितकाच आदर केला जातो. परंतु पाकिस्तानात मात्र फाळणीनंतर काही काळ हिंदूद्वेषाने कळस गाठला होता. त्यात १९९२ साली भारतात बाबरी मशिदीचे पतन झाल्यानंतर पाकिस्तानातही हजारो मंदिरांना लक्ष्य करण्यात आले.
पाकिस्तानमधील पुरातन हिंदू मंदिरे नष्ट करण्यात आली. काही मंदिरांमध्ये पूजापाठ करण्यावर बंदी घालण्यात आली. त्यामुळे हिंदू मंदिरे नामशेष होण्याच्या स्थितीस पोहोचली. जिथे जुन्या मंदिराच्या देखरेखीवर बंदी घातली गेली तिथे नव्या मंदिराच्या बांधकामाचा विचार करण्याची तर सोयच नव्हती.
अगदी बोटावर मोजता येतील अशीच मंदिरे तिथे सुस्थितीत आढळून येतील. या मंदिरातून आजही पूजा अर्चा केली जाते.
हिंदू धर्मीय अल्पसंख्य असल्याने पाकिस्तानमध्ये हिंदू धर्मीयांची अवस्था अत्यंत बिकट आहे. सांप्रदायिक सलोखा आणि सौहार्द औषधालाही नसल्याने हिंदू प्रार्थनास्थळांविषयी आदर सन्मान व्यक्त केला जाईल अशी अपेक्षाही कुणी करत नाही.
अशी परिस्थिती असतानाही पाकिस्तानात गेल्या दोनदशकात दोन नवी आणि भव्य हिंदू मंदिरे उभारण्यात आली आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिमा सुधारण्यासाठीच पाकिस्तान सरकारने या मंदिरांच्या बांधकामाला परवानगी दिली.
इतकेच नाही तर या मंदिरासाठी सरकारने जमीन देखील दिली आहे. पाकिस्तानमध्ये ही मंदिरे कुणी बांधली? ही मंदिरे कुठल्या देवतेची आहेत? याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
पाकिस्तानच्या निर्मितीला ७४ वर्षे झाली. तिथे धार्मिक आणि सांप्रदायिक तेढ इतक्या मोठ्या प्रमाणात पसरली होती की, हिंदू धर्मीय मंदिरे बांधली जाण्याची शक्यताच नव्हती. हा विचार कोणी स्वप्नातही करू शकत नव्हता. बाबरीच्या पतनानंतर तर पाकिस्तानातील १००० हिंदू मंदिरांवर ह*ल्ला करून ही सगळी मंदिरे उ*ध्वस्त करण्यात आली.
या सगळ्या द्वेषपूर्ण पार्श्वभूमीवर अलीकडे इथे दोन भव्य हिंदू मंदिरांचे बांधकाम करण्यात आले आहे. २००० सालानंतर इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शसनेस म्हणजेच इस्कॉनने इथे मंदिर पाकिस्तान सरकारसोबत मंदिर बनवण्यासाठी चर्चा सुरु केली.
इस्कॉनने यासाठी बरीच वर्षे परिश्रम घेतले. अत्यंत संयमाने आणि सातत्याने त्याने मंदिर बांधणीचा मुद्दा लावून धरला. तेंव्हा कुठे पाकिस्तानमध्ये दोन मंदिरे उभी राहिली आहेत.
इस्लामाबादमध्येही एक मंदिर उभारण्याची चर्चा सुरु होती परंतु, त्याला विरोध केल्याने ही योजना रद्द करण्यात आली.
यातील पहिले मंदिर क्वेटा येथे उभारण्यात आले आहे. हे मंदिर श्री श्री राधा राधानाथ मंदिर आहे. क्वेटातील हे पहिले राधानाथ मंदिर २००७ मध्ये बांधण्यात आले. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात आजही जुनी हिंदू मंदिरे अस्तित्वात आहेत मात्र या मंदिरात मोठ मोठे कार्यक्रम, उत्सव आणि हिंदू सण साजरे केले जातात.
या मंदिरानंतर इस्कॉननेच कराची येथे दुसरे मंदिर बांधण्यासाठी चर्चा सुरु केली. त्यांना कराची येथेही मंदिर बांधण्याची परवानगी मिळाली. कराची येथे इस्कॉनने राधा गोपीनाथ मंदिर बांधले आहे. कराचीमध्ये स्वामीनारायण संप्रदायाचेही एक मंदिर आहे. २००० साली या मंदिराचाही विस्तार करण्यात आला.
क्वेटा आणि कराची येथील ही दोन्ही मंदिरे बांधण्यासाठी सरकारने जमीन दिली असली तरी, ही मंदिर बांधण्याचा खर्च इस्कॉन आणि इथल्या भाविकांनीच केला. इस्कॉनने या मंदिर उभारणीसाठी प्रयत्न सुरु केले तेंव्हा याला थोडाफार विरोधही दर्शवला गेला.
परंतु मुळात पाकिस्तानमध्ये हिंदू मंदिरे बांधण्यासाठी परवानगी मिळाली याचेच काहीजणांना मोठे आश्चर्य वाटत आहे. आहे तीच मंदिरे उ*ध्वस्त केल्यानंतर नवीन मंदिराच्या परवानगीमागे पाकिस्तान सरकारचा कोणता उद्देश होता?
पाकिस्तानातील अल्पसंख्य समुदायावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या घटनांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची प्रतिमा डागाळली होती. म्हणूनच पाकिस्तानने या दोन मोठ्या मंदिरांना परवानगी दिली.
नुसती परवानगीच नाही तर मंदिरासाठी जमीनही दिली. आपल्या देशात अल्पसंख्याकांच्या हितसंबंधांचेही रक्षण केले जाते, हे पाकिस्तानला दाखवून द्यायचे होते.
इस्कॉन संस्था जगभर कृष्णभक्तीचा प्रसार करण्यासाठी ओळखली जाते. या संस्थेचे अनुयायी जगभर पसरलेले आहेत. हरे राम हरे कृष्णचा जप करणारे लोक फक्त भारतातच नाही तर न्यूयॉर्क, लंडन, बर्लिन, मास्को, मथुरा, वृंदावन अशा अनेक ठिकाणी भेटतात.
इस्कॉनने फक्त पाकिस्तानमध्येच नाही तर जगभर राधाकृष्णाची मंदिरे उभारली आहेत. इस्कॉनने जगभर अशी सुमारे ४०० पेक्षा जास्त मंदिरे उभारली आहेत. अनेक पाश्चिमात्य देशांतही इस्कॉनने अशीच मंदिरे उभारली आहेत.
इस्कॉनने १९९७ साली बंगळूरूमध्ये असेच एक मोठे मंदिर उभारले आहे. हे मंदिर हरे कृष्ण टेकडीवर उभारलं आहे. हे मंदिर जगातील सर्वात मोठे मंदिर आहे, असे मानले जाते.
इस्कॉनच्या या मंदिरांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या कुठेही गेले तरी या मंदिरांची रचना एकसारखीच असलेली पहायला मिळते. इस्कॉनने फक्त मंदिरेच नाही तर विद्यालयेही बनवली आहेत.
आज त्यांच्याच प्रयत्नांनी पाकिस्तानात दोन मंदिरांची निर्मिती झाली आहे. यांना नष्ट केले जाणार नाही अशीच आशा करूयात!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.