आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
एखाद्या वस्तू पेक्षा तिची जाहिरातच जास्त प्रसिद्ध होते. हळूहळू बाजारातून ती वस्तू गायब झाली तरी, जाहिरात मात्र लोकांच्या चांगलीच लक्षात राहते. घरात वपरला जाणारा एक छोटासा बल्ब त्याची अशी काय मोठी किंमत असते. घरात कोणत्याही कंपनीचा बल्ब वापरला तरी फार काही मोठा फरक पडत नाही.
मात्र, तरीही इसीइ बल्बने अशी काही जाहीरात केली होती की २० वर्षानंतर आजही ही जाहिरात लोकांना चांगलीच आठवते. या जाहिरातीची कल्पना आणि त्याच्या पार्श्वभूमीवर वाजली जाणारी धून यामुळे या जाहिरातीने लोकांच्या मनात एक वेगळा ठसा उमटवला.
इसीइ इंडस्ट्रीद्वारे इसीइ बल्बची निर्मिती केली जात असे. ही इंडस्ट्री त्या काळी बिर्ला ग्रुपचाच एक भाग होती. १९८० हे बल्ब बाजारात आले तेंव्हा या बल्बच्या जाहिरातीने अक्षरश: धमाल केली होती. अर्थात, त्याकाळी ऑफिस किंवा घरात प्रकाश आणणे म्हणजे फक्त एक साधा बल्ब होल्डर मध्ये अडकवणे एवढीच संकल्पना माहित होती. आजच्या प्रमाणे स्लॅबमध्ये वेगवेगळ्या आकाराचे रंगाचे बल्ब बसवण्याची संकल्पना अजून आली नव्हती.
आज बल्बचे कितीतरी वेगवेगळे आकार मिळतात आणि त्यातही विविध रंग असतात. ज्या रंगाचे हे बल्ब असतील त्या रंगाचा प्रकाश घरभर पसरला जातो. बल्ब हा काही घराच्या किंवा ऑफिसच्या इंटेरीअर डिझायनिंगचा भाग नव्हता. आज यामध्येही अनेक प्रकारची कल्पकता वापरली जाते. घराच्या कोपऱ्याकोपऱ्यातून रोषणाई केली जाते.
परंतु त्याकाळी बल्ब ही जरी एक साधीसुधी बाब असली तरी इसीइ बल्बने मात्र आपल्या उत्पादनाची जाहिरात अगदी कल्पकतेने बनवली होती. या कंपनीचे नावच किती रुक्ष वाटते पहा. ही कंपनी बल्ब निर्माण करते हे देखील कुणाच्या लक्षात राहणार नाही.
एक रुक्ष आणि सामान्य नाव कुणाच्या लक्षात राहणार? ग्राहकांना आकर्षित करण्यासारखे या नावात काहीच नव्हते. म्हणून याची जाहिरात करताना काही तरी अशी वैशिष्ट्यपूर्ण कल्पना वापरली पाहिजे. जेणेकरून हे नाव लोकांच्या मनात ठसले जाईल.
या जहिरातीसाठी साधी पण आकर्षक ओळ वापरण्यात आली. लोकांच्या फक्त एवढेच लक्षात राहिले पाहिजे की आपल्याला इसीइ बल्ब घ्यायचे आहेत. “भूल मत जाना, इसीइ बल्बही लाना” या एकाच ओळीत जाहिरात करण्यात आली असली तरी या एका ओळीतही इतके ग्लॅमर होते की जाहिरातीमुळे इसीइ बल्ब ग्राहकांच्या चांगलेच लक्षात राहिले.
टीव्हीवरून प्रसारित होणाऱ्या या बल्बच्या जाहिरातीत कंवरजित पैन्तल या अभिनेत्याने काम केले होते. भूल ना जाना, इसीइ बल्बही लाना हे एकच वाक्य वेगवेगळ्या भाषेत सांगण्यात आले होते. त्यामुळे लोकांना ही जाहिरात पाहणे गमतीशीर वाटायचे आणि भारतातील प्रत्येक भाषेत ही एकच वाक्य भाषांतरित करून वापरलेले असल्याने प्रत्येक भाषेचा प्रेक्षक वर्ग या जाहिरातीकडे आकृष्ट झाला नसता तरच नवल!
वेगवेगळ्या भाषेत सांगितलेले एक एकच वाक्य हीच या जाहिरातीची खासियत होती, यापेक्षा वेगळे आणि आकर्षक असे यात काहीच नव्हते.
ऑफिसला निघालेला एक सामान्य माणूस. कुंवरजीत यांनी ही भूमिका वठवली होती. त्याला त्याची बायको संध्याकाळी घरी येताना इसीइ बल्ब घेऊन येण्याची आठवण करते. दिवसभरात तो ज्याला ज्याला भेटतो ते सर्वजण त्याला हीच एक आठवण करून देत असतात. अगदी घरातील नोकरापासून ते लिफ्टमध्ये भेटणारी माणसे, तो ज्या रेस्टॉरंटमध्ये बसलेला असतो त्या रेस्टॉरंटचा मालक, सगळे लोक त्याला फक्त इसीइ बल्बची आठवण करून देत असतात.
भारताचे राष्ट्रीय चॅनेल दूरदर्शनवरून ही जाहिरात प्रसारित केली जात असे. त्यामुळे देशातील वेगवेगळी भाषा बोलणाऱ्या वेगवेगळ्या प्रांतातील लोकांपर्यंत ही जाहिरात पोहोचत असे. त्यात जाहिरातीतच वेगवेगळी भाषा वापरण्यात आल्यामुळे सर्व भाषिक लोकांपर्यंत ही जाहिरात पोहोचत असे. वेगवेगळ्या भाषेतून फक्त एकच संदेश दिला जात होता तो म्हणजे, इसीइ बल्ब आणायला विसरू नका.
वेगवेगळ्या भाषेतून पोहोचवलेल्या संदेशामुळे ही जाहिरात एकप्रकारे राष्ट्रीय एकात्मकचेही प्रतिक बनली. जसे की दूरदर्शनचे क्लासिक, “मिले सूर मेरा तुम्हारा” हे गीत विविधतेत एकता दर्शवणारे होते, तसेच या जाहिरातीच्या बाबतीतही म्हणता येईल.
एक तर त्याकाळी कोणत्याही कंपनीचा बल्ब असो त्यात फार काही वेगळेपण आणता येत नसे. एका कंपनीचा बल्ब दुसऱ्या कंपनीपेक्षा कसा वेगळा आहे, हे सांगणे आणि समजावून देणे तसे कठीणच होते. तीच अवस्था साबण आणि टूथपेस्टच्या बाबतीतही होती. म्हणूनच आपल्या ब्रँडचे नाव जास्तीत जास्त लोकांच्या मनावर ठसवणे हेच जाहिरातींचे काम होते.
या जाहिरातीच्या आकर्षक पंचलाईनमधून हे काम निश्चितच साध्य झाले होते. संपूर्ण देशात कसा हा एकच ब्रँड प्रसिद्ध आहे, आणि देशातील लोक याच एका ब्रँडचा बल्ब वापरतात हे ठसवण्यात ही जाहिरात निश्चितच यशस्वी झाली होती.
या जाहिरातीतून एकाच वेळी दोन बाबी समोर येतात. ही जाहिरात एकाच वेळी समावेशक आहे आणि त्याचवेळी ती फक्त आपलाच अजेंडा रेटणारी देखील आहे. या जाहिरातीतून सातत्याने एकाच गोष्टीवर भर देण्यात आला होता. त्यामुळे कदाचित ही जाहिरात यशस्वी होणार नाही असे वाटत होते. परंतु या जाहिरातीचा लोकांच्या मनावर परिणाम झाला आणि त्यांच्या खरेदीवरही.
जाहिरात क्षेत्रातील दिग्गज नाव असलेले अलेक पदमसी एकदा म्हणाले होते की, जाहिरात लोकांच्या मनात सतत घोळत राहिली पाहिजे. तेव्हा ती नक्कीच यशस्वी होते. दुसरी गोष्ट म्हणजे जाहिरात सामान्य लोकांच्या जगण्याशी जुळली पाहिजे.
आपल्या उत्पादनासाठीचा ग्राहक वर्ग कोणता आणि त्यांच्या गरजा, अपेक्षा, नेमक्या काय आहेत हे ओळखता आले पाहिजे.
एकदा का माणसांची नस पकडली की, जाहिरात बनवणे आणि ती प्रसिद्ध होणे दोन्ही गोष्टी सोप्या होऊन जातात. जाहिरातीत काहीतरी वेगळेपण हे असलेच पाहिजे जेणेकरून ती लोकांच्या स्मरणात रहील आणि त्यातून त्यांना एक सोपा संदेश मिळेल.
१९९० पासून बाजार पेठेचे स्वरूप बदलत गेले आणि स्पर्धा वाढत गेली. २०१३ साली जर्मनीच्या ओसराम जीएमबीएच या कंपनीने इसीइ इंडस्ट्री ४२.५ कोटी रुपयात विकत घेतली.
बिर्ला ग्रुपने व्यवसायाच्या इतर भागांवर लक्ष केंद्रित केल्याने त्यांनी ही कंपनी विकणे इष्ट समजले. तरीही विविधतेत एकता हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य अधोरेखित करणारी ही जाहिरात मात्र देशभरातील प्रेक्षकांच्या मनावर कोरली गेली!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.