आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
हिंदुस्थानच्या इतिहासात असे अनेक वीरपुरुष होवून गेले ज्यांचा इतिहास आपल्याला कदाचित शाळा कॉलेजमध्ये शिकायला मिळाला नाही. आपल्याला शाळेत शिकवला जाणारा इतिहास भारतीय स्वातंत्र्ययुद्ध आणि भारताच्या जडणघडणीमध्ये मुघलांचे योगदान या दोन टोकांमध्ये सीमित राहिला आहे.
परंतु आपल्या इतिहासाच्या पानांमध्ये असे अनेक अद्वितीय, पराक्रमी आणि महान राजे होऊन गेलेत ज्यांच्या कार्याची महती अनेक पिढ्यांपर्यंत दुर्दैवाने पोहोचू शकली नाही. इंग्रजांना धूळ चारणारी कर्नाटकची राणी आबाक्का असेल, तेलंगणा साम्राज्याची पहिली महिला राणी रुद्रम्मा देवी असेल, लच्छीत बडफुकन असेल, छत्रपतींचे सेनापती थोरले बाजीराव पेशवे असो, यांच्याबद्दल जास्त माहिती शालेय इतिहासामधून फारशी समोर येत नाही.
मात्र आजच्या माहिती तंत्रज्ञान युगाचे आभार मानावे लागतील. या काळात आपल्याला अनेक माहितीचे स्त्रोत उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे आपल्या मातीत होवून गेलेल्या या दुर्लक्षित परंतु अफाट धाडसी वीर आणि वीरांगनांचा इतिहास आपल्याला आज ज्ञात झालेला आहे.
आजच्या लेखातून आपण आपल्या देशात होऊन गेलेल्या अशाच एका महापराक्रमी वीर योद्ध्याच्या इतिहासाची झलक पाहतोय ज्याचं नाव आहे राजा बाप्पा रावळ!
बाप्पा रावळ म्हणजे गहलोत राजपूत वंशात होऊन गेलेले ८ वे शासक, मेवाडच्या राज घराण्याचे संस्थापक, मेवाडच्या गादीचे संस्थापक, अरब सैन्याला पळवत त्यांचा पार गझनीपर्यंत पाठलाग करणारे एकमेव हिंदू राजा, ज्याच्या नावावरून एका शहराचे नाव रावळपिंडी असे पडले.
आज हे रावळपिंडी पाकिस्तानमध्ये येते.
बाप्पा रावळला कालभोज या नावानेसुद्धा ओळखले जाते. त्यांच्या जन्माचा कालावधी साधारणपणे इसवी सन ७०३ मानला जातो. बाप्पा ९७ वर्ष जगले. त्यांनी आपल्या कार्यकाळात मेवाड या प्रदेशाची स्थापना केली, चित्तोड शहराला आपल्या राज्याची राजधानी केले आणि मेवाडच्या नावाने स्वतंत्र सिसोदिया वंश तिथून पुढे चालू केला.
स्वत:च्या मनगटातील बळावर आणि कर्तृत्वावर स्वत:च्या नावाचा वंश स्थापन करणारे बाप्पा रावळ आपल्या भारतीय इतिहासातील बहुदा अग्रगण्य नाव. बाप्पाच्या वीरतेच्या आणि पराक्रमाच्या अनेक कथा राजस्थानमध्ये सांगितल्या जातात.
सर्वप्रथम बप्पा रावल ने केसरिया फहराया ।
और तुम्हारे पावन रज को अपने शीश लगाया ।।
फिर तो वे ईरान और अफगान सभी थे जिते ।
ऐसे थे झपटे यवनो पर हों मेवाड़ी चीते ।।
बाप्पाच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या या लोकगीतातून बाप्पांनी आपल्या काळात मुस्लीम आक्रमणाविरुद्ध कसे दंड थोपटले होते याचा अंदाज येतो.
मुस्लीम धर्माची स्थापना झाल्यानंतर अरब वाळवंटातून बाहेर पडले आणि त्यांनी विविध देशांचा पाडाव करायला सुरुवात केली. भारतावर अरबी आक्रमणे सुरु झाली.
सिंध प्रदेश जिंकून त्यांनी पुढे मुसंडी मारली मात्र सिंधच्या पुढे त्यांना भारतात प्रवेश करता येईना कारण अभेद्य भिंतीप्रमाणे भारत भूमीचे रक्षण करण्यासाठी बाप्पा रावळ सिंधच्या काठावर उभे राहिले.
या अरबांना बाप्पांसमोर अनेक वेळा शिकस्त खावी लागली. सिंध प्रदेशाच्या पश्चिम तटावर नंतर हे अरब वस्ती करून राहिले. त्यांनी रावळ बाप्पाचे मांडलिकत्व पत्करले. हा प्रदेश आज बलुचिस्तान म्हणून ओळखला जातो. विशेष म्हणजे आजही बलुच प्रांत पाकिस्तानला आपला शत्रू मानतो आणि भारताला आपला मित्र मानतो.
बाप्पा रावळची पुढची दमदार कामगिरी म्हणजे बाप्पांनी फक्त देशावर आक्रमण करून येणारे शत्रूच अडवले नाही तर स्वत: आक्रमण करून अरबांना पार गझनीपर्यंत ताणले. बाप्पा रावळ यांनी तेथील गझनीचा तेंव्हाचा शासक सलीम याला हरवून तिथे आपला प्रतिनिधी नियुक्त केला.
त्यानंतर बाप्पा भारतात परत येऊन आपला कारभार चित्तोड येथून पाहू लागले. बाप्पा रावळ यांनी आपल्या काळात अनेक छोट्या मोठ्या राजपूत राज्यांना गोळा केले आणि त्यांचे मजबूत संघटन बनवले.
बाप्पाच्या या अद्भूत शक्ती कौशल्यासंदर्भात एक कथा सांगितली जाते. बाप्पा ३ वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांची हत्या झाली होती.
बाप्पाला घेऊन त्यांची आई त्या काळातील कमलावती नामक नगरातील गुहील राजवंशाचे जे पुरोहित ब्राम्हण होते त्यांच्या आश्रयाला गेली. क्षत्रिय असणाऱ्या बाप्पाचे लालनपालन हे ब्राम्हणांनी केले.
साधारणपणे ब्राम्हणांच्या गाई चरून आणण्याचे काम बाप्पा लहानपणी करत असत. कुरणात गाई चरण्यासाठी घेऊन गेल्यानंतर बाप्पांनी एक अद्भुत चमत्कार पाहिला. बाप्पाच्या कळपामध्ये जी गाय सगळ्यात जास्त दुध द्यायची तिने काही दिवस दुध देणे बंद केले.
याचा मागोवा घेण्यासाठी एक दिवस बाप्पा त्या गाईच्या पाळतीवर राहिले. गाय सरळसरळ कुरणापासून दूर एका दुर्गम वाटेवरून गुप्त गुहेमध्ये शिरली जिथे हरित ऋषी नामक एक सिद्ध ऋषी तप करत बसलेले होते. त्या गाईने ऋषीच्या जवळ असलेल्या शिवलिंगावर आपल्या दुधाच्या धारांनी अभिषेक केला.
असे मानले जाते याच हरित ऋषी कडून बाप्पा रावळ यांना अनेक रहस्यमय साधना आणि विद्या प्राप्त झाल्या. हरित ऋषींच्या सांगण्यावरून आणि त्यांच्या आशीर्वादाने बाप्पांनी तलवार हाती घेतली आणि मेवाड राजघराण्याची स्थापना केली. भारतातील सिद्धांचा कल्याणकारी इतिहास बघितला तर या गोष्टीमध्ये तथ्य वाटते.
बाप्पांनी त्यावेळी मौर्य राजवंशातील मानमोरी राजाचा पराभव करून चित्तोडचा किल्ला हस्तगत केला. ८व्या शतकामध्ये मोहम्मद बिन कासीमने सिंध प्रांतावर आक्रमण केले आणि तिथुन अरबांनी आपल्या महान संस्कृतीला ग्रहण लावायला सुरुवात केली. या अरबांना सिंधू नदीवर रोखण्यात बाप्पा रावळ यांनी महत्वाची कामगिरी बजावली.
बाप्पांनी आपल्या कार्यकाळात अनेक शिव मंदिरे बांधली, मंदिरांचे जीर्णोद्धार केले, नगरे बांधली, प्रजेच्या हितासाठी कामे केली. बापा रावळ यांचे स्वत:चे शिक्के देखील होते ज्याच्यावर त्रिशूल, नंदी, शिवलिंग यांची चित्रे असून नाण्याच्या वरच्या भागात बोप्प लेख नावाने बाप्पा रावळ यांच्या साम्राज्याचे गुणगान आढळते. याच नाण्याच्या मागच्या बाजूला सूर्य, चामर, छत्र असे चक्रवर्ती राज्याची चिन्हे आढळतात.
सुमारे २० वर्षे राज्य करून बाप्पा रावळ यांनी आपल्या मुलाच्या हाती राज्य सोपवून निवृत्ती पत्करली आणि शिवभक्तीमध्ये आपले जीवन वाहून घेतले.
विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे याच बापा रावळ यांच्या वंशात महाराणा सांगा, उदय सिंग, महाराणा प्रताप असे एकाहून एक शौर्यवान अतुल पराक्रमी योद्धे निर्माण झाले. वीर बाप्पा रावळ यांच्या पराक्रमामुळे अरबांनी पुढची ४०० वर्षे सिंधू नदी ओलांडून येण्याची हिम्मत दाखवली नाही. त्यानंतर ११ व्या शतकात गझनी भारतवार चालून आला मात्र त्यालाही अनेकदा राजपुतान्याकडून पराभवाचा सामना करावा लागला.
आज बाप्पा रावळ यांच्याबद्दल पाठ्यपुस्तकात फारसे शिकवले जात नाही ही खरे तर दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यांचे कार्य जर पाहिले तर असा महान पराक्रमी योद्धा पुन्हा होणे नाही!
बाप्पा रावळसारखे योद्धे म्हणजे आपल्या इतिहासाचा असा झळाळता हिस्सा आहेत ज्यांनी भारताच्या विजयाची गाथा स्वत:च्या शौर्याने शेवटपर्यंत तळपत ठेवली. अशा महान योद्ध्याला शत शत नमन!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.