आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
इतिहासात जरी ‘जर-तर’ला जागा नसली तरी एक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र म्हणून इतिहासात झालेल्या चुकांकडे कानाडोळा न करता त्या सुधारण्यानेच एक भारतीय आणि हिंदू म्हणून आपली स्वतंत्र, विशेष ओळख आपल्याला जपता येईल. अशाच विचाराने १९८० च्या दशकात श्री राम जन्मभूमी आंदोलनाला सुरुवात झाली. अनेक शतके तोंड दाबून बुक्क्याचा मार खाणाऱ्या आणि मूक गिळून शांत बसणाऱ्या भारतातील बहुसंख्य हिंदू समाजाला आपल्यावर झालेल्या अन्यायाची जाणीव झाली होती. त्यामुळे हजारो वर्षे समाजाच्या अंतःकरणात दडपलेला ज्वालामुखी उफाळला आणि अवघा देश ६ डिसेम्बरचा साक्षीदार बनला.
त्याकाळात याचसाठी अनेक आंदोलने झाली, कित्येक नागरिकांचे बळी गेले, कित्येकांना तुरुंगवास भोगावा लागला. ६ डिसेंबर १९९२ च्या बाबरी वि*ध्वंसानंतर मात्र या लढ्याला न्यायालयीन स्वरूप प्राप्त झाले. २०१० साली अलाहाबाद उच्च न्यायालायात ३ न्यायमूर्तींच्या खंडपीठाने अनेक शतके चालत आलेल्या श्री रामजन्मभूमीचे प्रकरण निकालात काढले आणि २:१ या प्रमाणात आपला निर्णय जाहीर केला. निर्णयानुसार २.७७ एकरची विवादित जमीन सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि हिंदू महासभेद्वारे प्रतिनिधित्व केलेले ‘राम लल्ला’ या तीन पक्षांमध्ये विभागली जाणार होती.
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या या निकालावर तिन्ही पक्षांपैकी कोणीही समाधानी नव्हते आणि म्हणूनच या निकालाला आव्हान देत त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले. सर्वोच्च न्यायालयाने ९ मे २०११ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिली आणि सध्या जे काही आहे ते कायम राहील (स्टेट्स को) असे सांगितले. सुमारे ८ वर्षांनंतर सर्वोच्च न्यायालयाने आपला अंतिम निकाल जाहीर केला आणि राम मंदिराच्या बांधकामासाठी ९ नोव्हेंबर २०१९ रोजी अधिकृतरीत्या परवानगी देण्यात आली.
याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने ०६ डिसेंबर १९९२ रोजी घडलेल्या घटनेची निंदा करत ते पूर्णतः बेकायदेशीर असल्याचेही सांगितले. शिवाय मस्जिदीसाठी वेगळी ५ एकर जागा देण्याचेही आदेश देण्यात आले. सध्या या मस्जिदीचेही बांधकाम सुरु असून त्यामध्ये जगातील सर्वांत मोठी कुराणाची प्रत असणार आहे, या मस्जिदीच्या उद्घाटनासाठी काबा येथील इमाम उपस्थित असतील. येत्या वर्षांमध्ये सगळं काही आलबेल झालं तर अयोध्या ही शांततापूर्ण सहअस्तित्व कसं असावं याचा आदर्श घालून देणारी नगरी ठरेल.
५ ऑगस्ट २०२० रोजी विधिवत भूमिपूजनाने मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि आता श्री राम ललाची प्राणप्रतिष्ठापना होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. हा आनंद साजरा करताना अनेकांनी असीम त्याग करून यासाठी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवणे क्रमप्राप्त आहे. मग ते योगदान आर्थिक स्वरूपाचं असो किंवा कोणत्याही स्वरूपाचं. मंदिरासाठी फक्त देशभरातूनच नाही तर जगभरातून योगदान आलं आहे. परंतु काही योगदानं कायम लक्षात राहण्यासारखी आहेत, त्यातीलच एक म्हणजे ‘फक्कड बाबांनी’ दिलेलं १ करोड रुपयांचं दान.
अयोध्येत निर्माणाधीन असलेल्या श्री रामजन्मभूमी मंदिरासाठी आपल्यापैकी अनेकांनी देणग्या दिल्या असतीलच. उत्तराखंडातील स्वामी शंकर दास उर्फ फक्कड बाबांनी मंदिरासाठी तब्बल १ करोड रुपयांची देणगी दिली आहे. फक्कड बाबा गेल्या ५० वर्षांपासून गुहांमध्ये वास्तव्यास आहेत. मग त्यांच्याकडे एवढा पैसा आला कुठून असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.
अनेक श्रद्धाळूंनी त्यांना दिलेल्या दानामधून एवढी मोठी रक्कम उभी राहिली आहे. स्वामीजींनी विश्व हिंदू परिषदेने अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिरासाठी सुरू केलेल्या निधीसंकलनाच्या मोहिमेबद्दल ऐकले होते आणि त्यांना देखील यामध्ये योगदान द्यायचे होते. देशातील असंख्य हिंदूंप्रमाणेच त्यांचे देखील राम मंदिर होण्याचे स्वप्न आता सत्यात उतरत आहे.
स्वामी शंकर दास आपले दान देण्यासाठी उत्तराखंड राज्यातील ऋषिकेशमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेत चेक घेऊन गेले. तेथील कर्मचारी देखील आश्चर्यचकित झाले. त्यांनी तातडीने शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना हा चेक स्वीकारण्यासाठी पाचारण केले. सुरुवातीला स्वामी शंकर दास यांना आपले नाव जाहीर करू नये असे वाटत होते पण त्यांच्यासोबत चेक धरून फोटो काढण्यात आला आणि ते अनेकांसाठी एक उत्तम उदाहरण बनले.
आता प्रतीक्षा आहे ती या सर्वांनी केलेला त्याग फलित होण्याची.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.