आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
१९९७. भारतीय राजकारणातील सगळ्यात अस्थिर वर्षातील एक वर्ष. सप्टेंबर महिन्यात राजकारण तापलेले होते आणि याचा फायदा घेण्यासाठी अनेक पक्ष तयार होते. शक्यतांचे पदर धरून होते ते काही मोठी नावं म्हणजे अटलबिहारी वाजपेयी, गोविंदाचार्य, लालकृष्ण अडवाणी आणि सिताराम केसरी.
केसरींचे वजन वाढतच चालले होते. त्यांच्या पक्षाचा पाठिंबा घेऊन देवेगौडा सरकार चालवत होते. अध्यक्ष असलेल्या केसरींना अचानकच पंतप्रधान व्हावेसे वाटले आणि त्यांनी देवेगौडाला असलेला आपला पाठिंबा काढून घेतला. त्याचा परिणाम म्हणून सरकार पडले. आता खुर्ची केसरींच्याही हाती आली नाही ही बाब वेगळी.
मन मारुन केसरींनी इंद्रकुमार गुजराल यांना खुर्चीवर बसवले. गुजराल सत्तेवर येताच शक्यतांचे पेव पुन्हा फुटले. १३ दिवस सरकार चालवलेल्या भाजपला ही संधी सोडायची नव्हती.
सबा नक्वी यांनी लिहिलेल्या “शैडोज ऑफ सैफ्रोन” या पुस्तकात त्यांनी यावेळी रंगलेल्या शीतयुध्दाची कहाणी मांडली आहे.
अटलबिहारी वाजपेयी भलेही पंतप्रधानपदी नव्हते, तरीही सगळ्या जगाबरोबरच त्यांचंही भारतीय राजकारणाकडे लक्ष होतेच. सत्तेची हौस असणारे सगळे लोक एकत्र येण्याचा प्रयत्न करत होते. विदेशी नेत्यांची लुडबुडही वाढत होती. याच दरम्यान भाजप पक्षाचे नेते महासचिव कोडिपकम नीलमेघाचार्य गोविंदाचार्य यांनी दोन ब्रिटिश प्रतिनिधींशी मुलाखत घेतली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक झालेले गोविंदाचार्य यांना भाजपची खडा न खडा माहिती आहे असं म्हटलं जात होतं. प्रत्येक वर्गातील लोकांशी त्यांचा जवळचा संबंध होता. देश-विदेश, मित्र-शत्रु अशा सगळ्यांशी त्यांचे सौख्याचे संबंध होते. जसे जसे भाजपचे सत्तेवर येण्याचे मार्ग मोकळे होत गेले तसतशी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतली गर्दी वाढत गेली.
गोविंदाचार्य संघाचे स्वयंसेवक तर होतेच परंतु पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांच्याशीही त्यांचे खुप जवळचे संबंध होते. काम आणि प्रतिष्ठा दोन्ही वाढत असताना स्वप्नांची उंची कमी कशी राहणार. मागासलेल्या जातीच्या नेत्यांना पक्षात आणणे, रामजन्मभूमी आंदोलनाला हवा देणे या कामाची पोचपावती मिळवण्याची वेळ आता आली होती. पंतप्रधानपदाच्या रुपात आपली गुरुदक्षिणा मिळवण्याचा पुर्ण अधिकार गोविंदाचार्य यांना होता.
परंतु भाजपाचे समर्थन अटलबिहारी वाजपेयी यांना होते. वाजपेयी आणि गोविंदाचार्य यांचे संबंध तेव्हापासुन जगजाहीर होते जेव्हा त्यांनी १९९२ मध्ये भाजपच्या एका अधिवेशनात स्पष्ट म्हटले होते- “माझ्याकडे गोविंदाचार्य यांच्यासाठी एक प्रश्न आहे, एका नेत्याचा सन्मान करण्यासाठी दुसरया नेत्याचा अपमान गरजेचा आहे का?”. १९९७ मध्ये हाच प्रश्न अडवाणींनी विचारला.
१८ सप्टेंबरला गोविंदाचार्य आणि ब्रिटिश प्रतिनिधींमध्ये झालेल्या चर्चेवर एक लेख ६ ऑक्टोबर १९९७ मध्ये लिहुन आला. ज्यामध्ये भाजपच्या एका उच्च नेत्याने म्हटले होते की अटलवर नाही तर अडवाणीवर लक्ष ठेवा. अडवाणी चेहरा तर अटल त्या चेहऱ्यावर असलेला एक मुखवटा आहे असं त्या लेखात नमुद केले होते.
हे प्रकाशीत झाले तेव्हा अटलजी बल्जेरियाच्या दौऱ्यावर होते. भारतात परत आल्यावर त्यांनी वेळ वाया न घालवता दोन पत्र लिहिले. पहिल्या पत्रावर नाव होते- तत्कालीन पक्ष अध्यक्ष लालजी यांना. आत मध्ये फक्त ३ ओळी लिहिल्या होत्या.
परदेशातुन आल्यावर गोविंदाचार्य यांची एक मुलाखत ऐकली. तुम्ही पण वाचली असेल. विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.
ज्याला जे कळायला हवं ते कळालं होतं. शब्द कमी पण गोष्ट मोठी. वाजपेयींचे दुसरे पत्र होते ते गोविंदाचार्यजींना. या पत्रात त्यांनी त्यांच्या वक्तव्याचं स्पष्टीकरण मागितले होते.
ही गोष्ट इथेच येऊन थांबली नाही. अटलजींच्या गटातील काही लोकांनी ही दोन्ही पत्रे माध्यमांमध्ये पसरवली. यानंतर मात्र अटलजींनी गोविंदाचार्य यांच्या विरोधात कंबरच कसली. दुसऱ्या दिवशी एका वर्तमानपत्राच्या चर्चासत्रात अटलजी मंचावर आले. तिथे संघ आणि भाजपच्या नेत्यांसमोर म्हटले की “मला आश्चर्य वाटतं जेव्हा कोणी मला एखादा विषय मांडण्यासाठी बोलावतं. एका मुखवट्याला एवढी किंमत कशासाठी?”
अटलजींच्या भात्यातुन निघालेला हा तिसरा बाण गोविंदाचार्यांना अजुनच घायाळ करुन गेला. वर्तमानपत्रात सर्वेक्षित निकाल छापले जात होते, ज्यात अटलजी भाजपपेक्षाही जास्त प्रसिध्द होत होते. भारतीय जनता युवा मोर्चाच्या एका अधिवेशनात अटलबिहारी वाजपेयी यांनी साफ केले की पंतप्रधान जनता बनवते, पक्षाचे वरिष्ठ नेते नाही. आपले मनसुबे स्पष्ट करण्याची ही अटलजींची पध्दत होती. दसरा येतोय, रावणाचा वध निश्चित आहे हेच त्यांना सांगायचं होतं.
या वारंवार होणाऱ्या हल्ल्यात गोविंदाचार्य पुर्णपणे उध्वस्त झाले आणि शेवटी त्यांनी हार मानली. माध्यमांना मुलाखत देऊन त्यांनी मुखवट्याबद्दलचं त्यांचं वक्तव्य चुकीचे होते हे मान्य केले. गोविंदाचार्यांचा पराभव त्यांच्या वागण्यात दिसत होता. अटलजी आणि अडवाणीजी म्हणजे राम-लक्ष्मण आहेत आणि माझ्या रामाबद्दल मी असं वक्तव्य करु शकत नाही असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. भावनेच्या आहारी जाऊन त्यांनी अटलजी माझ्यावर खुप प्रेम करतात असंही वक्तव्य केले.
गोविंदाचार्यजींच्या मुलाखती नंतर भाजप नेते, अडवाणी या सगळ्यांना पत्ता कट झाल्याची खात्री झाली. नविन ताकद, शक्ती आता अटलजीच आहेत हे स्पष्ट झाले. अडवाणींनी गोविंदाचार्यजींना बाहेरचा रस्ता दाखवला.
एका छायाचित्राचे वर्णन इथे करणे गरजेचे आहे, ज्यात गोविंदाचार्यजींच्या समोर नरेंद्र मोदी बसलेयत आणि त्यांच्या शेजारी व्यैंकय्या नायडू. पुढे जाऊन मोदीजी पंतप्रधान झाले आणि नायडूजी उपराष्ट्रपती. गोविंदाचार्यजी मात्र फक्त एक किस्सा म्हणून ओळखले जातील.
वाजपेयी पंतप्रधान झाले तेव्हा अजुन एक पत्र लालजींना पाठवण्यात आले. यावेळी त्यात दोनच शब्द लिहिले होते- दसऱ्याच्या शुभेच्छा..!!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.