आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
हैदराबाद मुक्तीसंग्राम हे वास्तविक पाहता भारतीय स्वातंत्र्य लढ्याची प्रतिकृतीच. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात जसे इंग्रजाच्या कौर्याचे उदाहरण म्हणून जालियनवाला बाग हत्याकांड ओळखले जाते तसेच हैदराबाद मुक्तीसंग्राम लढ्यात रझाकारांच्या कौर्याचे प्रतिक म्हणून ‘मुचलंब’ व ‘गोर्टा’ येथील हत्याकांड ओळखले जाते. १० मे १९४८ रोजी झालेल्या या पूर्णपणे दुर्लक्षित घटनेविषयी हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे अभ्यासक भाऊसाहेब शिवाजीराव उमाटे यांनी सादर केलेल्या शोध निबंधाचा काही संपादितांश.
मुचळंबच्या घटनेनंतर सरकार दरबारी कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे रझाकारांना अधिकच जोर चढला, हिसामोद्दीनच्या वधात गोरटयातील लोकांचा सहभाग होता असा रझाकारांचा समज झाला होता.
१० मे १९४८ला सकाळीच हिसामोद्दिनच्या वधाच्या सूडबुद्धीने पेटलेल्या २५०० पेक्षा जास्त रझाकारांनी व पस्तकौमानी गोरटयावर आकस्मिक हल्ला केला, यात घोरवाडी, भालकी, हुमनाबाद, बसवकल्याण, हुलसूर, बेलूर, मेहकर, इ. गावचे रझाकार व पस्ताकौम होते. मोठया संख्येने हत्यारबंद रझाकार अचानक गावात घुसले व त्यांनी दिसेल त्यास मारण्यास सुरवात केली.
हिंदू लोकांची आकस्मिक हल्ल्यामुळे पाचावर धारण बसली, ते गडबडले, त्यांना काहीच सुचत नव्हते. जो तो आपल्या घरांनी दडून जीव वाचविण्याचा प्रयत्न करीत होता. रझाकार लोकांना घराबाहेर ओढत आणि ठार करत. नारायणराव मक्तेदार, रामराव पटवारी व बस्वप्पा माली पाटील यासारख्या व्यक्तींना देखील त्यांच्या वाडयातून बाहेर ओढत आणून लक्ष्मीच्या मंदिरासमोर मारले गेले.
गोरटयात महादप्पा डूमणे यांचा तीन मजली मजबूत व भव्य वाडा होता, जणू छोटा किल्लाच. त्यावेळी इतर कोणत्याही इमारतीपेक्षा वाडा उंच व विस्ताराने मोठा होता. गावातील लुटालूट, जाळपोळ, कापाकापी पाहून जवळपास ७०० ते ८०० लोकांनी या वाडयात आश्रय घेतला त्यात जांच्याकडे हत्यारे होती असे हत्यारधारी नागप्पा हलम्बरे, काशाप्पा भालके, सिद्रामप्पा पटणे, मारतीअण्णा कोणे, चनाप्पा डूमने, दानू कोळी, विठोबा कोळी व मारुतीराव परीट हे कुशल वीर होते.
वाडयात जमलेल्या लोकांच्या संरक्षणाची जबाबदारी या बहादूर तरुणांवर होती. माडीवर पत्रे लावून मोर्च्याच्या जागा केल्या गेल्या. मोर्चे धरले गेले. इकडे गावात घोंगावणारे रझाकाररूपी वादळ आता डूमणे सावकाराच्या वाडयाकडे वळले, डूमणे सावकार हे परिसरातील प्रसिद्ध आसामी होती, ते जरी सावकार असले तरी एक दानशूर व्यक्तिमत्त्व व मदतीला धावून जाणारे म्हणून त्यांची ख्याती होती.
डूमणे सावकाराचा वाडा लुटावा व जाळून टाकावा या हेतूने रझाकार तिकडे वळले पण तिथे वेगळेच घडले. रझाकाराना वाडयातून प्रतिकार होऊ लागला. वाडयातील तरुणांनी आता निर्वाणीचे युद्ध करायचे ठरविले होते, आतून फायरिंग होऊ लागली. गोफण गुंडयाचा व दगड धोंडयाचा भयानक मारा सुरु झाला. वाडयातून होत असलेल्या आकस्मिक प्रतीकारामुळे अनेक रझाकार ठार झाले, कित्येक जखमी झाले. रझाकारांशी लढताना मारुतीअण्णा कोणे व चनाप्पा बिरादार या दोघांना वीरमरण आले, दिवसभर हा मुकाबला चालला, सूर्यास्त होऊन अंधार पडू लागला तशी रझाकारांनी फायरिंग बंद केली व ते गाव सोडून निघून गेले.
रझाकार जाताच वाडयातील ग्रामस्थांनी विचार केला की अपमानित झालेले रझाकार उद्या दुप्पट तयारीने येतील या विचाराने रात्रीच्या सुमारास वाडयातील लोक बाहेर पडले व आपापल्या पाहुण्याच्या गावांनी रातोरात निघून गेले.
इकडे रझाकारांनी दिवसभर गावातील जवळपास २०० लोकांची हत्या केली वकिलांच्या ‘प्रोटेस्ट कमिटीने’ होनाळी, गोरटा व परिसरातील गावांचा दौरा केला. कमिटीच्या मते गावात फक्त पस्ताकौम व मुसलमानांची घरे न जळता शिल्लक होती.
कमिटीने आपल्या अहवालात नमूद केले आहे की, या हल्ल्यात २०० लोक मृत्युमुखी पडले तर अनेक जखमी झाले, आर्थिक नुकसान सुमारे ७० लाख रुपयांचे झाल्याचे कमिटीने नमूद केले. या घटनेची नोंद भारत सरकारच्या श्वेतपत्रिकेतही करण्यात आली आहे, हैदराबाद संस्थानातील भारत सरकारचे प्रतिनिधी के.एम.मुन्शी यांनी सुद्धा या परिसराचा दौरा केला व आपल्या ‘द एंड ऑफ अन इरा’ या पुस्तकात या विषयी सविस्तर माहिती दिली आहे.
लेखक :- भाऊसाहेब उमाटे, लातूर.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.