आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
उत्तर व दक्षिण अमेरिकेतील मूळ रहिवाशांना ‘रेड इंडियन’ म्हणतात. कोलंबसने १४९२ साली अमेरिकेच्या किनाऱ्यावर पाऊल ठेवले. त्यावेळी सुरुवातीला त्याला आपण हिंदुस्थानात म्हणजे इंडियात आलो आहोत, असे वाटले. त्या समजुतीने त्याने तेथील रहिवाशांना इंडियन म्हणून संबोधले. पुढे खरा प्रकार लक्षात आल्यावर हे मूलनिवासी लोक अमेरिकन इंडियन म्हणून ओळखले जाऊ लागले. या लोकांच्या त्वचेचा रंग सामान्यतः तांबूस असल्याने आणि ते आपल्या अंगाला लाल रंग लावत असल्याने त्यांना ‘रेड इंडियन’ असे नाव मिळाले.
पंधराव्या शतकात रेड इंडियन लोकांची संख्या साधारण सव्वा कोटीच्या घरात होती. हे लोक आशियातून स्थलांतर करून आले आहेत, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. ते अमेरिकेत येण्यापूर्वी अमेरिका खंडात मानवी वस्ती नव्हती. त्या वेळी आशिया व अमेरिका ही दोन खंडे अलास्काच्या बाजूने जोडली गेलेली होती. स्थलांतर करणारे रेड इंडियन हे आशियाई मंगोलवंशाचे होते. शिकार व मासेमारी हे त्यांचे मुख्य व्यवसाय होते. अमेरिकेच्या पश्चिम भागात आल्यानंतर त्यांनी शेती करायला सुरुवात केली. ते अमेरिकेत येताना आपल्याबरोबर कुत्रा व अग्नी घेऊन आले.
ख्रिस्तपूर्व २,००० वर्षांपूर्वी, पेरूच्या उत्तरेला राहणाऱ्या रेड इंडियन्सचा मुख्य व्यवसाय मासेमारीचा होता. ते कापूस, भोपळा व घेवडा यांची लागवड करीत. जसजशा वसाहती होत गेल्या तसतशी त्यांची संस्कृती विकसित झाली. मातीची भांडी, लामांचे पालन, मक्याची लागवड, विणकाम, धातूंचा उपयोग, कला, शिल्प इत्यादींची त्यांना माहिती मिळाली.
पॅराग्वे व बोलिव्हियात त्यांनी मका, रताळी, काळी मिरी, तंबाखू इत्यादीं पिकांची लागवड करायला सुरुवात केली. या पिकांची ही जगातील पहिलीच लागवड. शिवाय कोको व बटाट्याचे पीक अँडीज प्रदेशातील इंडियन्सनी प्रथम घेतले असावे, असा कयास आहे.
त्यांच्या माया व ॲझटेक या भाषांना स्वतंत्र लिपीही आहे. मात्र त्यांच्या आजच्या भाषेचा आशियाई भाषांशी काहीही संबंध उरलेला नाही. अपाचे ही अशीच एक रेड इंडियन जमात. अपाचे हा दक्षिण -पश्चिम अमेरिकेत राहणाऱ्या मूळ अमेरिकन लोकांच्या सांस्कृतिकदृष्ट्या संबंधित गट आहे.
जेरोनिमो हा अपाचे लोकांचा एक प्रमुख नेता आणि वैद्यकशास्त्रज्ञ होता. १८५० ते १८८६ दरम्यान, जेरोनिमोने मेक्सिकन आणि अमेरिकेच्या लष्करी मोहिमांविरुद्धच्या लढ्यात भाग घेतला आणि असंख्य छापे घातले. तो छापेमारी आणि युद्धकलेत अत्यंत प्रवीण होता. जेरोनिमो अपाचे जमातीच्या बेडोन्कोहे वर्गाचा होता. तो वयात आला तेव्हा अपाचे जमातीचे दक्षिणेच्या मेक्सिको आणि उत्तरेच्या अमेरिका या देशांशी युद्ध सुरू होते. अपाचे-मेक्सिकन आणि अपाचे-अमेरिकन संघर्षात, छापेमारी ही अपाचे लोकांच्या रणनीतीचा महत्त्वाचा भाग बनली होती. गंमत म्हणजे छापेमारी त्यावेळी आर्थिक कारणांसाठीही वापरली गेली.
हे अपाचे जमातीचे लोक डोंगरावर वसाहती करू लागल्यावर छापेमारी ही त्यांची जीवनशैली बनली. मेक्सिकन आणि अमेरिकन लोकांनी या अपाचेंविरोधात प्रत्युत्तरात्मक हल्ले केले. १८५० ते १८८६ दरम्यान जेरोनिमो आणि इतर अपाचे नेत्यांनी हल्ले केले. याला जोड मिळाली ती जेरोनिमोच्या मनातील सूडभावनेची.
१८५१ साली तो व्यापारासाठी बाहेर गेला असताना त्याच्या कुटुंबाची – त्याची पत्नी, आई आणि तीन मुले यांची- मेक्सिकन सैनिकांनी अमानुषपणे हत्या केली होती, त्याला त्याचा सूड घ्यायचा होता. त्यासाठी त्याने छापेमारीची एकूण एक तंत्रे आत्मसात केली. नंतर आपल्या सहकाऱ्यांना घेऊन त्याने आपल्या कुटुंबाला यमसदनी धाडणाऱ्या त्या क्रूर मेक्सिकन शिपायांना शोधून अक्षरशः टिपून काढले. जेरोनिमोच्या अंगी असलेली निडरता हे त्याचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य. अमेरिकन असो वा मेक्सिकन, आदिवासींच्या हक्काच्या जमिनी बळकावणाऱ्यांना तो सोडत नसे.
पण पुढे त्याचा शत्रू बदलला. हा नवा शत्रू जास्त प्रबळ होता. त्याचे नाव होते अमेरिका. १८४८ साली मेक्सिकन-अमेरिकन युद्ध थांबले. या युद्धात मेक्सिकोच्या बऱ्याच भागावर अमेरिकेचा हक्क प्रस्थापित झाला. यात अपाचे जमातीचा भूप्रदेशही अमेरिकेच्या ताब्यात आला. या प्रदेशात सोन्याच्या खाणी असल्याचा शोध लागल्याने येथे येणाऱ्या लोकांची झुंबड उडाली. हे लोक या प्रदेशात स्थायिक होऊ लागले.
त्यातून त्यांचा मूलनिवासी असलेल्या अपाचे जमातींशी संघर्ष वाढू लागला. अपाचे तसेही युद्धकलेत, विशेषतः गनिमी युद्धतंत्रात प्रवीण होते. त्यांनी या उपऱ्यांना प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. अगदी वेळप्रसंगी त्यांची अमानुष कत्तलही केली. पुढे १८७२ साली अमेरिकेच्या सरकारने अपाचे जमातीच्या चिरिकाहुआ लोकांना उत्तरेकडे जायला भाग पाडले.
ते राहत असलेला प्रदेश आता नव्याने स्थायिक होणाऱ्या लोकांच्या वसाहतींसाठी वापरला जाणार होता. याने आगीत तेल ओतले गेले. जेरोनिमोने परत त्यांच्याशी लढायला सुरुवात केली. छापेमारी करायची, जमतील तेवढे सैनिक टिपायचे आणि पळून जायचं अशी त्याची पद्धत. याच आधारे त्याने अमेरिकेला हादरवून सोडले.
१८७७ साली तो पकडला गेला. नव्याने मिळालेल्या जमिनीच्या ‘तुकड्यावर’ त्याने चार वर्षे कशीबशी काढली. पण हा अनुभव सुखद नक्कीच नव्हता. पूर्वीची त्याची जमीन हिसकावून त्याच्यासारख्या निर्भय माणसाचे अशा फेकलेल्या तुकड्यावर पुनर्वसन करणे हा फार मोठा धक्का होता. १८८१ च्या सप्टेंबर महिन्यात तो परत परागंदा झाला.
पुढे पाच वर्षे त्याने अमेरिकन सैनिकांविरुद्ध युद्ध सुरु केले. तसे हे रेड इंडियन आणि अमेरिकन यांच्यातील शेवटचे युद्ध. यातही जेरोनिमो आणि त्याचे सहकारी अमेरिकन सैन्याच्या हातावर तुरी देऊन निसटले. त्याला पकडण्यासाठी ५००० सैनिकांची मोठी तुकडी प्रयत्न करत होती, यावरून या नेत्याचे महत्त्व लक्षात यावे.
अखेर १८८६साली त्याने शरणागती पत्करली. त्याची आणि त्याच्या सहकाऱ्यांची रवानगी तुरुंगात झाली. जवळपास २० वर्षे त्यांचा गट युद्ध*कैदी म्हणून या तुरुंगातून त्या तुरुंगात असा रवाना होत राहिला.
१९०९ च्या फेब्रुवारी महिन्यात घराकडे निघाला असताना घोड्यावरून पडून तो जखमी झाला आणि पुढे यातच त्याचा मृत्यू झाला. एका श्रेष्ठ आख्यायिकेचा अखेर अंत झाला.
जेरोनिमोबद्दल जनसामान्यांची धारणा स्वतः या मनुष्याइतकीच जटिल होती. त्याच्या अनुयायांच्या मते तो मूळ अमेरिकन जीवनशैलीचा शेवटचा संरक्षक होता. तर काहीजणांच्या मते तो जिद्दी, सूडबुद्धीने वागणारा आणि आपल्या मूर्खपणाने लोकांचे जीव धोक्यात घालणारा होता. काहीही असो, मूलनिवासी असलेल्या रेड इंडियन लोकांचा हा नेता वेगळा होता हे मात्र खरे!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.