आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
१९३९ साली दुसऱ्या महायु*द्धाला सुरुवात झाली. युरोपीय राष्ट्रे, सोव्हिएत आणि अमेरिका यु*द्धाच्या धुमश्चक्रीत अडकले. युरोपमधील राष्ट्रांच्या विशेषत: ब्रिटनच्या जगभरात अनेक ठिकाणी वसाहती होत्या. भारत देखील ब्रिटनच्या अधिपत्याखाली होता. तिकडे युरोपात दुसरं महायु*द्ध सुरू झाल्यानंतर भारतीय नागरिकांनी आणि नेत्यांनी स्वातंत्र्यांचा लढा अधिक तीव्र केला. निदान आता तरी ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य द्यावं, अशी भारतीयांची अपेक्षा होती. देशातील प्रमुख नेत्यांनी ब्रिटनसोबत पत्रव्यवहार करून वाटाघाटी करण्याचा प्रयत्न सुरू केला होता.
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या वाटाघाटींमध्ये अमेरिकेची मदत मागितली होती. जर अमेरिकेनं भारताला पाठिंबा दिला तर जपान विरोधात भारत अमेरिकेला मदत करेल असं आश्वासन देखील नेहरूंनी दिलं होतं. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रुझवेल्ट (एफडीआर) यांनी भारताला मदत करण्याचा प्रयत्न केला. रुझवेल्टचे त्यावेळचे प्रयत्न भारत-अमेरिकेच्या संबंधांचा पाया ठरले आहेत.
दुसरं महायु*द्ध सुरू असताना ब्रिटिश वसाहतवाद संपवण्यासाठी एफडीआरचे प्रयत्न नक्कीच लक्षात ठेवण्यासारखे आहेत. तत्कालीन ब्रिटीश पंतप्रधान विन्स्टन चर्चिलच्या विरोधात जाऊन रुझवेल्टनं ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली असलेल्या देशांना मुक्त करण्यासाठी पाऊल उचललं होतं. १९४१ साली रुझवेल्ट आणि चर्चिल अटलांटिक चार्टरच्या अटींविषयी चर्चा करत होते.
दुसऱ्या महायु*द्धानंतर सहयोगी देशांसाठी काही उद्दिष्टे निर्धारित केली. याचं रुपांतर नंतर संयुक्त राष्ट्रांच्या निर्मितीमध्ये झालं. रुझवेल्टनं चर्चिलला परिस्थितीचं गांभीर्य ओळखण्यास आणि भारताला स्वातंत्र्य देण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ब्रिटिश पंतप्रधान चर्चिल एक अराजक साम्राज्यवादी नेता होता.
भारतासारखं संपन्न राष्ट्र इतक्या सहज सोडण्याची त्याची तयारी नव्हती. “भारताची सत्ता काही काळात बदमाश, चोर-दरोडेखोरांच्या हाती जाईल. ते सत्तेसाठी आपापसांत लढतील आणि भारतात राजकीय भांडणं उभी राहतील. शिवाय एक दिवस असाही येईल जेव्हा हवा आणि पाण्यावरही कर लावला जाईल” असं द्रष्टं विधान चर्चिलनं केलं होतं. स्वातंत्र्यानंतर काही वर्षांत भारतीयांनी नेत्यांनी हे विधान दुर्दैवाने खरं ठरवलं. असो.
फ्रँकलिन डी रुझवेल्ट (एफडीआर) जागतिक राजकारणातील प्रभावी नेत्यांपैकी एक होते. रुझवेल्टनं सर्वात जास्त काळ अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षपद भूषवलेलं आहे. त्यांची कारकीर्द उल्लेखनीय होती. वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता त्यामुळं त्यांच्या पायावर परिणाम झाला होता.
आपलं भारदस्त व्यक्तिमत्वं आणि चपळ बुद्धीच्या बळावर त्यांनी जागतिक राजकारणात आपला दरारा निर्माण केला होता. ग्रेट डिप्रेशन आणि दुसरं महायु*द्ध या दोन मोठ्या संकटांतून त्यांनी अमेरिकेला बाहेर काढल्यानं त्यांचं मोठ्या प्रमाणात कौतुक झालं होतं. असा हा नेता वसाहतींच्या भविष्याचा विचार करून ब्रिटनच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करत होता.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी पहिल्या महायु*द्धानंतर १९१८ साली झालेल्या पॅरिस शांतता परिषदेत १४ मुद्दे मांडले होते. जगातील सर्व देशांना ‘स्वयंनिर्णयाचा’ अधिकार असल्याचं समर्थन विल्सननं केलं होतं. याचं गोष्टीनं भारतीय नेत्यांना स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अधिक प्रेरित केलं. याच १४ मुद्द्यांनी ‘लीग ऑफ नेशन्स’ आणि त्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या निर्मितीचा पाया घातला होता.
१९४१ साली अटलांटिक सनदेच्या घोषणेमुळे नेहरूंच्या अपेक्षा आणखी मजबूत झाल्या. भारतीय स्वातंत्र्यासाठी अमेरिकेचा पाठिंबा मिळेल, अशी त्यांना आशा होती. रुझवेल्टनं तसे प्रयत्न देखील केले. मात्र, ब्रिटीश पंतप्रधान विन्स्टन चर्चिलच्या धूर्तपणापुढं त्यांना हात टेकावे लागले.
अमेरिकन परराष्ट्र खात्यात वॉलेस मरेसारखे अनेक अधिकारी होते, ज्यांना ब्रिटीशांचं भारतातील धोरण चुकीचं वाटत होतं. अमेरिकन लोकांच्या मनात वसाहतवादाबद्दल सहानुभूती नव्हती. मात्र, ब्रिटन त्यांचा सहयोगी देश असल्यानं ते कात्रीत सापडले होते. सेक्रेटरी वेल्सला देखील भारताचा स्वातंत्र्यासाठीचा संघर्ष योग्य वाटत होता.
मात्र, महायु*द्ध सुरू असताना आणि अनेक अमेरिकन सैनिक युरोपीय भूमीवर असताना ब्रिटनला प्राधान्य देणं त्यांना भाग पडलं. रूझवेल्टला देखील अमेरिकेच्या फायद्याचा निर्णय घेण्याचा सल्ला अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिला. असे असले तरी, अमेरिकेनं भारताच्या राष्ट्रवादी आकांक्षांना मदत करण्यासाठी फारसं काही केलं नाही, असा निष्कर्ष काढणं चुकीचं आहे.
रॉबर्ट ई. शेरवूड्सनं आपल्या ‘रूझवेल्ट अँड हॉपकिन्स’ या पुस्तकात या प्रसंगाविषयी लिहिलं आहे. रुझवेल्टनं चर्चिलला भारताचा प्रश्न सोडवण्याचा आग्रह केला होता. त्यावेळी ब्रिटन आणि अमेरिका यांच्यातील ‘विशेष संबंध’ अस्थिर होण्याच्या मार्गावर होते आणि याचं कारण भारत होता.
जेव्हा जपाननं पर्ल हार्बरवर हल्ला केला तेव्हा अमेरिका प्रत्यक्षपणे यु*द्धात सामील झाली. त्यानंतर त्यांनी २ लाख ५० हजार अमेरिकन सैन्य चीन -बर्मा (म्यानमार) -भारत सीमेवर तैनात केलं होतं. ब्रिटिश सरकारच्या सांगण्यावरून हे सैन्य भारतीय सीमेवर ठेवलं गेलं होतं. मार्च १९४२ साली, रूझवेल्टनं आपला खास मित्र आणि विश्वासू कर्नल लुई जॉन्सन यांना ‘निरीक्षक’ म्हणून भारतात पाठवण्याचा निर्णय घेतला होता.
जॉन्सनच्या मदतीनं देखील भारतीय नेत्यांनी स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले होते. जॉन्सनचं भारतात येणं ब्रिटिशांची अस्वस्थता वाढवणारं ठरलं होतं. कारण, भारतात आल्यानंतर जॉन्सननं पंडीत नेहरू आणि स्वातंत्र्य चळवळीतील अनेक नेत्यांशी मैत्री केली. भारतीय नेत्यांशी चर्चा करण्यासाठी मार्च १९४२ मध्ये, जेव्हा ब्रिटिशांनी सर स्टॅफोर्ड क्रिप्सला भारतात पाठवलं तेव्हा जॉन्सनच्या उपस्थितीचा तणाव शिगेला पोहोचलेला होता.
अमेरिकन इतिहासकार हेन्री विल्यम ब्रॅण्ड्सच्या मते, ‘रुझवेल्टनं लुई जॉन्सनला, एका बाजूला क्रिप्स व व्हाईसरॉय लिनलिथगो आणि दुसरीकडे नेहरू व काँग्रेस पक्ष यांच्यात मध्यस्थी करण्याचे निर्देश दिले होते. क्रिप्स भारतात आलेला उदारमतवादी आणि सहानुभूतीशील ब्रिटिश अधिकारी होता. मात्र, जॉन्सननं जो प्रस्ताव मांडला होता तो चर्चिलच्या विरोधात जाणारा होता. त्यामुळं क्रिप्सनं देखील जास्त उत्साह दाखवला नाही.
चर्चिलवर दबाव टाकण्यात अमेरिकेला अपयश आल्यानं भारतीयांच्या मनात त्याच्याविषयी काहीसा कडवटपणा निर्माण झाला. ज्या देशानं स्वातंत्र्य आणि समानता या तत्वांचा पुरस्कार करण्याचा जगाला संदेश दिला त्याचं देशानं भारताला मदत केली नाही, असा विचार स्वातंत्र्य चळवळीतील अनेक नेत्यांनी व्यक्त केला.
भारतातील सर्व नेते आपापल्या परीने आणि बुद्धिसामर्थ्याने स्वातंत्र्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत होते. या सगळ्यावरून काँग्रेस आणि विशेषतः नेहरूंना अमेरिकेकडून अपेक्षा असल्याचे दिसत आहे आणि नेताजी आपल्या परीने जपानच्या साहाय्याने स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करीत होते.
रुझवेल्टचे प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर भारत आणि अमेरिकेदरम्यानचे संबंध काहीसे कटू झाले होते. मात्र, रुझवेल्टनं भारतासाठी आपल्या मित्र देशाच्या विरोधात मत मांडण्याचं धाडस नक्कीचं केलं होत, हे आपण मान्य केलचं पाहिजे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.