आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
१५ एप्रिल २००८. उत्तरप्रदेशमधील अमरोहा जिल्ह्यातील एक छोटंसं गाव, बावनखेडी. रात्री सगळीकडे सामसूम होत असतानाच एका घरातून एका मुलीच्या जोरजोरात रडण्याचा आवाज येतो. शेजारीपाजारी गोळा होतात आणि तिला विचारायला लागतात, घराबाहेर बोलावतात. पण तिचं एकच वाक्य असतं- “ते आता मला पण मारून टाकतील!”
शेवटी कसं तरी तिला खाली आणण्यात त्यांना यश येतं. मुलगी फाटक उघडून शेजाऱ्यांना घरी येऊ देते. शेजारी वरच्या मजल्यावर जाऊन बघतात तर काय! सगळीकडे रक्ताचे पाट वाहतायत आणि घरातील सगळे लोक त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेत. आणि मग पोलीस येतात वगैरे वगैरे.
एखाद्या थरारपटाची कथा वाचल्यासारखं वाटतंय ना? पण ही कुठल्या चित्रपटाची नाही तर उत्तरप्रदेशमधली खरीखुरी घटना आहे. या घटनेतील गुन्हेगाराला जर फाशी देण्यात आली तर स्वातंत्र्यानंतरची फासावर लटकवण्यात आलेली ती पहिली महिला ठरेल. नेमकी काय घटना घडली होती ज्यामुळं शबनमला फासावर लटकवण्यात येऊ शकतं? जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचाच.
अमरोहा जिल्ह्यातील बावनखेडी गावात शौकत मियाँ आपल्या परिवारासोबत राहत होते. शौकत मियाँ आणि त्यांचा परिवार गावातील सगळ्यात जास्त शिक्षित होते. शौकत स्वतः कॉलेजात लेक्चरर होते. एक मुलगा एमबीए पदवीधर तर दुसरा इंजिनिअर. मुलगी शबनमसुद्धा उच्चशिक्षित, इंग्रजी आणि भूगोलात एमए केलेली. गावात ती “शिक्षा मित्र” (जिल्हा परिषद शिक्षिका) म्हणून नोकरी करत होती.
इथवर सगळं ठीक होतं पण कहानी में ट्विस्ट आला. शबनम सलीमच्या प्रेमात पडली. शबनमकडे डबल एमएच्या डिग्री तर सलीम सहावीत शाळा सोडलेला. शबनम शिक्षिका आणि सलीम तिच्या घराबाहेर एका वर्कशॉपमध्ये लाकूड तोडायचं काम करायचा. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे शबनम सैफी मुस्लिम समाजातील तर सलीम पठाण.
जेव्हा शबनमच्या घरी ही बातमी कळली साहजिकच त्यांनी खूप विरोध केला. पण हे दोघं कसले ऐकतायत. प्रेमपुढं कोणालाच काहीच दिसाफ्ट नाही असं म्हणतात. इथं पण तसंच झालं. शबनम आणि सलीमने आपलं नातं संपवलं नाही.
शबनमच्या घरी रोज या नात्यावरून खटके उडायचे. अशातच शबनमला दिवस गेले. दोन महिने गेले. शबनमला ठाऊक होतं की आपण जर घरी सांगितलं तर खूप मोठ्ठा राडा होईल. या अवस्थेतही तिला घरच्यांनी सलीमकाकडे जाऊ दिलं नसतं. मग या दोघांनी प्रेमाच्या मार्गातला अडथळाच बाजूला करायचं ठरवलं.
तो दिवस उगवला. रात्री सगळ्यांची जेवणं झाली. शबनमने सगळ्यांसाठी चहा बनवला आणि त्यात गुंगीचं औषध मिसळलं. फक्त तिच्या काही महिन्यांच्या भाच्याला सोडून. सगळे बेशुद्ध झाल्यावर तिनं सलीमला आत बोलावलं आणि एक एक करून शौकत, त्यांची बायको, दोन्ही मुलं, एक सून आणि एक लहान मूल अशा सहा जणांचा कुऱ्हाडीनं वार करून खून केला. पण एवढ्यावरच ते दोघं थांबले नाहीत. शबनमनं छोट्या बाळाचा गळा दाबून खून केला.
त्यांचं काम आटोपल्यावर सलीम निघून गेला आणि थोड्या वेळानं शबनमनं आपलं नाटक सुरु केलं. जोरजोरात हंबरडा फोडून ती रडायला लागली. रडून रडून तिनं शेजारी गोळा केले. ते घरात येऊन बघतात तर सगळ्या खोल्यांमध्ये रक्ताच्या थारोळ्यात शबनमच्या घरचे पडलेले.
शेजारी तर विचारतीलच. या बाईनं त्यासाठीपण कहाणी बनवून ठेवली होती. तिनं सांगितलं की गर्मी होते म्हणून ती गच्चीत झोपायला गेलेली. पाऊस आला म्हणून खाली उतरू लागली तेव्हा कळलं की काही चोर घरात घुसलेत आणि त्यांनी सगळ्यांचा खून केलाय. तिनं बघितलं आता ते तिला पण मारून टाकतील. घरचे सगळे गेले आता तिनं काय करावं वगैरे वगैरे नाटक सुरु झालं.
तोवर शेजाऱ्यांनी तिला धीर देत पोलिसांना बोलावणं धाडलं. पोलिसांनी सगळी नीट चौकशी सुरु केली. सगळ्या बॉडीज पोस्ट मार्टमसाठी पाठवण्यात आल्या. दुसऱ्या दिवशी संपूर्ण देशात एकच बातमी पसरली. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी शबनमच्या घरी जाऊन तिचं सांत्वन करणं, मदत जाहीर करणं वगैरे प्रकार झाला. आणि इकडे पोस्ट मार्टमचा रिपोर्ट आला. त्यात लहान बाळ सोडून सगळ्यांच्या शरीरात गुंगीचं औषध आढळून आलं.
सहाजिकच आता शबनम पोलिसांच्या रडारवर आली. हळूहळू शबनमचा खोटारडेपणा उघडा पडू लागला. जर सगळ्यांच्या शरीरात गुंगीचं औषध सापडलं आणि फक्त शबनमच्याच शरीरात नाही. जर चोर आले तर शेजारी आले तेव्हा फाटक आतून बंद कसं होतं आणि जरी ते कंपाउंडवरून आले तर तसे निशाण का नव्हते?
पोलिसांनी शबनमची चौकशी करायला सुरु केली आणि तिनं सगळं सांगायला सुरुवात केली. सलीम आणि तिच्या नात्याला घरून असणारा विरोध सांगून तिनं सलीमने हे खून केल्याचं पोलिसांना सांगितलं. इकडं सलिमने आपण शबनमच्या सांगण्यावरून खून केल्याची कबुली दिली.
सगळे जबाब घेऊन झाल्यावर शबनम आणि सलीलला जेलमध्ये टाकण्यात आलं आणि खटला सुरु झाला. जेलमध्येच शबनमने एका मुलाला जन्म दिला. तब्बल ७ वर्षांनी दोघांनाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. शबनमच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. सुप्रीम कोर्टानेही फाशीची शिक्षा सुनावल्यावर त्यांनी राष्ट्रपती आणि राज्यपालांकडे याचिका दाखल केली. दोन्ही याचिका फेटाळण्यात आल्या.
शबनमचा मुलगा ताज याने आपल्या आईची शिक्षा माफ व्हावी अशी याचिका दाखल केल्याने पुन्हा एकदा या केसने डोकं वर काढलंय.
प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं असं म्हणतात पण प्रेमासाठी केलेले खून आपली न्यायदेवता माफ करेल की शबनम, स्वातंत्र्यानंतर फाशीवर लटकवण्यात येणारी पहिली महिला ठरेल हे तर येणारा काळच सांगेल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.