आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
कुठल्याही क्षेत्रात पाया रचणाऱ्या व्यक्तीला समाजात काकणभर का होईना पण त्याच क्षेत्रातील इतर महानुभावांपेक्षा जास्त सन्मान मिळतो. त्यांचा संघर्ष नक्कीच आव्हानात्मक असतो. त्यांनी केलेला संघर्ष इतरांसाठी प्रेरणादायी ठरतो.
त्यातही महिलांचा विशेष उल्लेख करतो. याचं कारण असं की मधल्या काळात महिलांनी चूल आणि मूल यातच गुंतून राहावं असा समज रूढ झाला होता. समाजाच्या मत प्रवाहाच्या विरोधात जाणं नक्कीच धाडसाचं काम होतं व त्यासाठी सन्मान मिळायलाच हवा.
पहिली महिला डॉक्टर, पहिली महिला अंतराळवीर, पहिली महिला आएएस अधिकारी, या यादीत विज्ञान व संशोधन क्षेत्रात आणखी एक नाव जोडावं लागेल ते म्हणजे पहिली भौतिकशास्त्रज्ञ डॉ. पूर्णिमा सिन्हा !
त्यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९२७ साली कलकत्ता येथें झाला. त्यांचे वडील नरेशचंद्र सेनगुप्ता वकीली करायचे. ते लिंगभेद पाळत नसत, त्यांचा त्याला स्पष्ट विरोध होता.
महिला व पुरुषांना समसमान संधीचे अधिकारी आहेत या मताचे ते होते. त्यांच्या या पुढाकारामुळेच त्यांच्या घरातील मुली उच्च शिक्षण घेऊ शकल्या. पूर्णिमा यांनी भौतिकशास्त्राचं शिक्षण घेण्याचं ठरवलं.
त्यांच्या बहिणींनी देखील रसायनशास्त्र, गणित, अर्थशास्त्र, हे विषय घेऊन शिक्षण पूर्ण केलं. त्यांचं कुटुंब कलकत्ता येथील एक प्रतिष्ठित कुटुंब होतं. त्यांच्या घरी अनेक नामांकित व्यक्तींचं येणं जाण कायम असायचं.
त्यांच्या वडिलांचे गुरु थोर शास्त्रज्ञ निर्मल बोस, त्यांच्या आईचे गुरु सत्येन बोस यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. कवी, सिनेमासृष्टीतील कलावंत, दिग्दर्शक यांच्याशी देखील त्यांचे चांगले संबंध होते. घरचं वातावरण कायमच उत्साही आणि कुतुहलाने भरलेले असल्याने त्यांच्यावर तसेच संस्कार होणं स्वाभाविक होतं .
१९४५ साली सत्येंद्रनाथ बॉस कलकत्ता विद्यापीठात भौतिकशास्त्राचे प्राचार्य म्हणुन काम करत होते. पूर्णिमा तिथेच शिक्षण घेत होत्या.
त्यांची बुद्धिमत्ता, चिकाटी आणि जिद्द बघून १९५५ साली सत्येंद्रनाथ बोसांनी त्यांना त्यांच्या संशोधन कार्यात काम करण्याची संधी दिली. इथूनच त्यांचं संशोधनात्मक कार्य सुरू झालं.
१९५४ साली त्यांना पदवी प्राप्त झाली. पुढच्याच वर्षी त्यांचा संशोधक प्रबंध प्रसिद्ध झाला. ‘एक्स रे अँड थर्मल अनेलिसिस ऑफ इंडीयन क्ले’ या विषयावर त्यांनी प्रबंध सादर केला.
या संशोधनाची विशेषता ही आहे की भारतातील विविध प्रदेशातील मातीची “क्ष किरणां”च्या मदतीने समीक्षा व प्रयोग करून वर्गीकरण केलं. या प्रयोगातून मातीचे जवळपास ५० प्रकार शोधण्यात त्यांना यश आलं. अशा प्रकारचं संशोधनाचं कार्य प्रथमतः सत्येंद्रनाथ बोस यांनी सुरू केलं.
हे संशोधन, प्रयोग करण्यासाठी वापरलेल्या गेलेल्या प्रयोगशाळेची आणि उपकरणांमागे देखिल प्रचंड मेहनत आणि जिज्ञासु बुद्धिमत्ता आहे. या विषयावर खैरा प्रयोगशाळेत दहा शास्त्रज्ञ काम करत होते.
एक अलिखित नियम घालून देण्यात आला होता. जितक्या उपकरणांची गरज आहे ती सर्व स्वतः बनवायची. त्यासाठी द्वितीय महायुद्धात अतिरिक्त झालेल सामान ‘क्ष किरण’ उपकरण बनवण्यासाठी वापरलं.
जमा केलेले उर्वरित सामान प्रयोगशाळेत ठेवण्यात आलं. ‘बेस्ट आऊट ऑफ वेस्ट’चं याहून अधिक चांगलं उदाहरण कदाचितच कुठे सापडेल.
याच उपकरणांद्वारे त्यांनी भारतातील मातींवर संशोधन पुर्ण केलं. अनेकदा अपयशाचं कारण साधनाची कमतरता असं देतो. पण मनापासून एखादी गोष्ट ठरवली तर कुठुनही मार्ग निघतात व कार्य पूर्णत्वास जातं.
यशस्वी आणि अपयशी व्यक्तींमधे हाच मोठा फरक असतो. अपयशी काम टाळण्याचे कारणं शोधतात तर यशस्वी व्यक्ती काम करण्याचे कारणं शोधतात!
पुढे जीवपदार्थ या विषयात संशोधन करण्यासाठी त्या स्टेन्फर्ड विद्यापीठात गेल्या. ‘जीवनाची व्युत्त्पत्ती’ या विषयावर संशोधन केलं.
जियोलॉजीकल सर्वे ऑफ इंडिया आणि जेसीबि बोस इन्स्टिट्यूट इथे त्यांनी पुढील दोन दशक काम केलं. सेंटर फॉर ग्लास अँड सरेमिक रीसर्च इन्स्टिट्यूट येथें सरेमिकवर संशोधक करण्याची संधी मिळाली.
विज्ञानाप्रती त्यांची श्रद्धा आणि निष्ठा अतूट होती. जन्मभर त्यांनी विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार केला. बंगाल सायन्स असोसिएशन सोबत त्यांनी बंगालमधे विज्ञान अगदी सोप्या भाषेत घरा घरात पोहचवलं!
‘माईंड अँड मेंटर्स’ या पुस्तकाच बंगाली भाषेत भाषांतर केलं. शिवाय त्यांनी लिहलेलं, त्यांच्या जीवनावर व प्राचार्य बोसांच्या कार्यावर आधारित पुस्तक प्रसिद्ध आहे.
संगीताची देखील त्यांना प्रचंड आवड होती. त्या तबला वाजवण्याचं प्रशिक्षण पंडित जगनप्रकाश घोष यांच्या कडून घेतलं. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताविषयी त्यांना लगाव होता.
त्यांचा विवाह विश्व भारती विद्यापीठाचे कुलपति डॉ. सुराजित सिन्हा यांच्याशी झाला. दोघांनी मिळून शांतिनिकेतन येथे शाळा सुरू केली जिथे त्यांनी फिझीक्स ऑफ म्युझिक हा विषय शिकवण्यास सुरुवात केली.
या दोघांनी एकमेकांच्या कार्याला प्रोत्साहन देत एकमेकांना कायम मदत केली. वैवाहिक जीवनाचा आदर्श त्यांनी घालून दिला. या प्रचंड कामाच्या आवाक्यात एका आईचं कर्तव्य देखील त्यांनी तितक्याच सक्षमतेने बजावलं.
त्यांच्या दोन्ही कन्या डॉ. सुकन्या सिन्हा व सूपूर्णा सिन्हा आपल्या आईच्या पाउलांवर पाऊल ठेऊन संशोधन क्षेत्रात मोठी भूमिका बजावत आहेत. शिवाय त्यांच्या पासून प्रेरणा घेवून अनेक महिला या क्षेत्रात समोर येत आहेत.
नासा, इस्रो अशा अनेक संस्थेत महिलांची संख्या उल्लेखनीय आहे व त्यांचं कार्य प्रशंसनीय आहे !
११ जुलै २०१५ साली त्यांना देवाज्ञा झाली. त्यांचं संपूर्ण आयुष्य सर्व भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.