आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
शिवरायांच्या व शंभुराज्यांच्या नंतर मराठा साम्राज्याचा खरा विस्तार झाला तो मराठा साम्राज्याचे पंतप्रधान अजिंक्य योध्दा श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या कालखंडात. बाजीराव पेशव्यांनी आपल्या बेजोड राजकीय कौशल्याच्या बळावर संपूर्ण भारतावर भगवा फडकवला होता. यात बाजीरावांना खरी साथ दिली ते त्यांचे बंधू चिमणाजी अर्थात चिमाजी आप्पा पेशवे यांनी.
“जैसा रामा सह लक्ष्मण तैसा राऊ सह चिमाजी” असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही.
चिमाजी आप्पा हे बाजीरावांचे धाकटे बंधू, बाजीराव पेशव्यांप्रमाणेच चाणाक्ष व कर्तबगार होते, बाजीरावाच्या अनेक मोहिमात चिमाजी वा चिमणाजी आप्पांचा सहभाग असायचा. चिमाजी आप्पा राजकारण आणि युद्धनीती यात निपुण होते. चिमाजी आप्पा प्रसिद्धीस आले ते पोर्तुगिजांबरोबर झालेल्या वसईच्या लढाईमुळे.
पालघर जिल्ह्यात असणारा वसईचा किल्ला आजही चिमाजी आप्पांच्या महापराक्रमाची साक्ष देतो. बाजीराव पेशवे निजाम आणि उत्तरेच्या रणनीतीत व्यस्त असल्याने वसईची मोहीम त्यांनी चिमाजी आप्पा यांच्यावर सोपविली होती.
तत्पूर्वी १७३३ मध्ये चिमाजी आप्पांनी सरदार शंकरबुवा यांच्यासोबत बेलापूर किल्ला जिंकला. त्यामुळेच त्यांना ही जबाबदारी दिली गेली होती.
त्याकाळी वसई व नजीकच्या परिसरात पोर्तुगीजांनी स्थानिकांवर अन्यन्वित अत्याचार करत हाहाकार माजवला होता. शिवाय समुद्र किनाऱ्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित करत, जुलमी अंमल राबवून धर्म परिवर्तन केले जात होते, पोर्तुगीजांना धडा शिकवून पश्चिम किनारा कायमचा स्वराज्यात मिळवण्याचा बेत चिमाजींनी आखला.
हा पश्चिमेचा किनारा पोर्तुगीजांपासून मुक्त करण्यासाठी श्रीमंत पेशवे चिमाजी आप्पा पुण्याहून सैन्यानिशी वसईत येऊन दाखल झाले. वसईचा हा किल्ला जिंकणे मुळात एवढे सोपे काम नव्हते. मराठा सैन्याकडे तलवारी होत्या फार फार तर लाकडी तोफा पण पौर्तुगीजांच्या सैन्याकडे बंदुकी व मोठा दारू साठा असायचा. त्यामुळे मराठा सैन्याला यासाठी मोठा संघर्ष करावा लागला.
“किल्ला ताब्यात येत नसेल तर मला तोफेच्या तोंडी देऊन किल्यावर पाठवा”, असे उद्गार चिमाजींनी वसई किल्ल्याच्या लढाई दरम्यान म्हणाले होते.
चिमाजी आप्पांनी २ वर्षे झुंज देऊन पश्चिम किनाऱ्यावरचा वसईचा किल्ला जिंकला, आणि समुद्राच्या पश्चिम किनाऱ्यावर मराठ्यांचा झेंडा फडकावला. त्यासाठी आप्पांकडे असणारा युद्धाचा अनुभव चांगलाच कामी आला, पोर्तुगीजांना शह देताना अप्पांनी कल्याण, धारावी, वांद्रे अशा किल्यांवर वांद्र्यापासून ते डहाणूपर्यंतच्या समुद्र किनार पट्टीवर विजय मिळवला.
त्यावेळी चिमाजी आप्पांनी नुसती वसईच मुक्त केली नाही तर क्रूर पोर्तुगीजांच्या वसईला वेढा घालून आता पालघरच्या तलासरीपासून ते मुंबईच्या वर्सोवा, मढपर्यंतचा मुलुख जिंकून घेतला.
या २ वर्षाच्या काळात चिमाजी आप्पांनी किनारपट्टीच्या परिसरात असलेले पोर्तुगीजांचे अस्तित्वच मिटवून टाकले.
वसई किल्ल्याच्या निमिताने सुरु झालेल्या या संग्रामादरम्यान चिमणाजी अप्पांनी अनेक भुईकोट, पानकोट स्वराज्यात दाखल केले.
१६ मे १७३९ ला आपल्या कौशल्याचा कस लाऊन, तलवारीने महापराक्रम गाजवत चिमाजी आप्पा यांनी वसईचा किल्ला स्वराज्यात खेचून आणला, यातून पोर्तुगीजांना एक जबर चपराक बसली.
चिमाजींनी दाखवलेल्या या कर्तबगारीमुळे “चिमाजी अशक्य ते शक्य करील” असे बोलले जाऊ लागले.
चिमाजी शूर होते, स्वराज्याच्या जडण घडणीत त्यांनी कधीही स्वतःच्या प्राणांची चिंता केली नाही. हिंदुस्थानावर भगवा ध्वज फडकावण्याच्या साठी माझा देह कामी येत असेल तर ते मी माझे पुण्य समजेन असे म्हणत हा लढवय्या नेहमी लढत राहिला.
चिमाजी आप्पांनी आयुष्यात एकही लढाई हरली नाही म्हणूनच अनेक इतिहासकार त्यांचा अजातशत्रू म्हणून उल्लेख करतात.
चिमाजी आप्पांनी आपल्या हयातीत स्वराज्यासाठी अतुलनीय योगदान दिले. चिमाजी आप्पांच्या तलवारीने महापराक्रम गाजवत स्वराज्याचा विस्तार केला. थोरल्या बाजीरावांच्या मृत्युनंतर सहा महिन्यातच १७ डिसेंबर १९४०ला चिमाजी अप्पांचे निधन झाले.
पुढे त्यांचे पुत्र सदाशिवराव भाऊ देखील पानिपताच्या युद्धात पेशव्यांचे सेनापती बनले, आपल्या वडिलांप्रमाणे शूर असणाऱ्या सदाशिवराव भाऊंनी देखील पानिपतच्या युद्धात आपली आहुती देत खिंड लढवली.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.