आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
भारताच्या इतिहासात किल्ल्यांची भूमिका महत्त्वपूर्ण होती. त्यामुळे सगळ्याच राजे महाराजांनी किल्ल्यांना विशेष महत्त्व दिलेले दिसते. किल्ले बांधण्यासाठी राजे-महाराजे आपल्या दरबारी खास वास्तुतज्ज्ञ बाळगत. याशिवाय इतरांनी बांधलेले काही भक्कम आणि मोक्याचे किल्ले जिंकून घेण्यासाठीसुद्धा अनेकदा लढाया होत.
अशाच काही किल्ल्यांपैकी एक भक्कम किल्ला म्हणजेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवगिरीचा किल्ला. हा किल्ला कुणालाही जिंकता येत नसे, जेव्हा जेव्हा जिंकला गेला तो फितुरीनेच जिंकला गेला. या किल्ल्याला अभेद्य ठेवणारी त्याची रचना अशी काय विशेष होती हे आपण पाहूयात.
देवगिरी प्राचीन काळापासूनच अनेक शक्तिशाली राजांचे आकर्षण होता. याचे मुख्य कारण हे होतं की हा किल्ला भारताच्या मध्यवर्ती ठिकाणी होता, अभेद्य होता. साधारणतः ११८७ ते १३१८ च्या दरम्यान देवगिरीचे बांधकाम झाले असावे. त्यानंतर १७६२ पर्यंत या किल्ल्याने कित्येक राजवटी पाहिल्या. सुरुवातीला यादव वंशाचा राजा ‘भिलम्मा’ याने देवगिरीवर राज्य केले.
भिलम्मानंतर देवगिरी, यादव राजा रामचंद्र यादव याच्या हाती आला. पण रामचंद्र यादव फार काळ देवगिरी किल्ला ताब्यात ठेवू शकला नाही आणि या भक्कम केल्यावर अल्लाउद्दीन खिलजीची नजर पडली.
तो काळ १२९६ च्या दरम्यानचा असावा. त्याने देवगिरीवर चढाई करण्याची योजना बनवली; मात्र त्याला त्यात अपयश आले. मलिक कफुर हा अल्लाउद्दीनचा सेवक होता. तो अतिशय चतुर आणि क्रू*र होता. देवगिरी किल्ल्यावर सरळ मार्गाने चढाई करुन त्याला कधीही जिंकता येणार नाही हे मलिक कफुरने बरोबर ओळखले होते. त्यानंतर त्याने कपटाने सतत १३०७, १३१० आणि पुन्हा १३१८ साली देवगिरीवर चढाई केली. देवगिरी ताब्यात घेतला आणि देवगिरीवर खिलजी घराण्याची राजवट सुरू झाली.
खिलजी घराण्यानंतर १३२८ मध्ये या किल्ल्यावर तुघलक वंशाने सत्ता गाजवली. मोहम्मद बिन तुघलक या लहरी राजाने आपली राजधानी दिल्लीहून देवगिरीला हलवली आणि देवगिरीचे नाव बदलून दौलताबाद केले. तुघलकाने घेतलेला निर्णय म्हणजे शुद्ध मूर्खपणा होता. या निर्णयामुळे खूप लोक मारले गेले व त्याने पुन्हा आपली राजधानी देवगिरीवरून दिल्लीला हलवली. दिल्लीहून देवगिरी त्या काळात आलेल्या लोकांचे वंशज आजही त्या परिसरात राहतात.
मोहम्मद तुघलकानंतरही देवगिरीने अनेक शासक पाहिले.
मोगल बादशहा अकबराच्या काळात मुघलांनी देवगिरीला जिंकून घेतले. तेव्हापासून देवगिरीवर मुघल राजवट सुरू झाली. आणि मुघल सम्राट औरंगजेबाने देवगिरी जवळच्या खडकी या शहराचे नाव बदलून औरंगाबाद असे केले. त्यानंतर औरंगाबाद ही अहमदनगर या प्रांताची राजधानी म्हणून ओळखली जाऊ लागली. मलिक अंबर हा अहमदनगर या राज्याचा पंतप्रधान बनला.
देवगिरीचे आज दिसत असलेल्या बांधकामापैकी बरेचसे बांधकाम मलिक अंबरच्या कार्यकाळात झालेले आहे. औरंगजेबाचा मृत्यू होईपर्यंत हा किल्ला मोगलांच्या ताब्यात होता. त्यानंतर तो निजामाने जिंकून घेतला.
या किल्ल्याची अभेद्यता हीच त्याची ओळख आहे. देवगिरी भारतातील सर्वात भक्कम किल्ला म्हणून ओळखला जातो. इतर किल्ल्यांच्या तुलनेत हा थोडा कमी उंचीवर बांधला असला तरीही त्याची रचनाच त्याला अजिंक्य ठरवते. किल्ल्याच्या चारही बाजूंनी भलेमोठे खंदक खोदलेले आहेत आणि त्या खंदकात कायम पाणी भरलेले असते. त्यामुळे मुख्य दरवाजा वगळता या किल्ल्यात शिरण्यासाठी शत्रूला दुसरी जागाच नाही. शिवाय मुख्य दरवाजाला भगदाड पाडण्यासाठी सुद्धा हत्तींचा वापर करावा लागत असे. दरवाज्यात अणकुचीदार खिळे बसवले जात, त्यामुळे हत्तीसुद्धा रक्तबंबाळ होत असे.
याव्यतिरिक्त शत्रूला रोखून ठेवण्यासाठी आणखी काही उपाय केले होते. किल्ल्याच्या बुरुजांवर तोफा असत. या तोफांमुळे दुरूनच शत्रू सैन्याची राखरांगोळी करता येणे शक्य होते. किल्ल्यावरती मेंढातोफ नावाची एक खास तोफ ठेवलेली आहे. पंचधातुने बनविलेली ही तोफ आकर्षक तर आहेच, शिवाय तिची वेधन-क्षमतादेखील कमाल आहे. तिला ‘किल्ला शिकंजी’ असेही म्हणतात. कारण तिच्यात किल्ला उ*ध्वस्त करण्याची क्षमता आहे.
ही सोळा फूट लांब तोफ आजही आपल्याला देवगिरीवर बघायला मिळते.
तुघलक वंशाच्या कारकीर्दीत या किल्ल्याभोवती पाच किलोमीटर लांब भिंत बांधली गेली. त्यामुळे देवगिरी किल्ला आणखी सुरक्षित झाला.
देवगिरी किल्ला जितका अभेद्य आहे तितकाच प्रेक्षणीय सुद्धा आहे. या किल्ल्यावर असलेलं ‘चांदमिनार’ म्हणजे लोकांचे खास आकर्षण! चांदमिनार म्हणजे एक तीस मीटर उंचीचा सुंदर मनोरा आहे. अल्लाउद्दीन बहामनी शहाने याचे बांधकाम केले होते. या मनोऱ्याच्या आत पायऱ्यासुद्धा आहेत त्यामुळे सर्वात वरती जाऊन देवगिरीचे विहंगम दृश्य पाहता येते.
महाराष्ट्रातील वास्तुकलेचा हा एक खास नमुना आहे. मनोऱ्याच्या चारही बाजूंना बगीचे आहेत, त्यात एकूण चोवीस चेंबर्स आणि एक छोटी मशिदसुद्धा आहे. ही मशिद १३१८ दरम्यान मुबारक शहा याने बांधली. मशिदीच्या घुमटावर आतल्या बाजूने सुंदर निळ्या रंगाच्या टाईल्स आहेत त्यामुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडते. चांदमिनारप्रमाणेच किल्ल्यावर चिनी महाल बरादरी, शाही निवास, स्नान घर, मनोरंजन खोल्या आणि एक मंदिरसुद्धा बघायला मिळते. देवगिरीच्या या सौंदर्यामुळे या किल्ल्यावर पर्यटकांची नेहमी वर्दळ बघायला मिळते.
देवगिरीच्या किल्ल्यावर पोहोचण्यासाठी तुम्हाला संभाजीनगरपासून पंधरा किलोमीटर दूर जावे लागते. येथे पोचण्यासाठी विमान, बस आणि रेल्वे ही तिन्ही साधने उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त आपण खासगी वाहनानेसुद्धा देवगिरीला पोहोचू शकतो.
असा हा देवगिरी अनेक लढायांची साक्ष देत आजही तसा बराच सुस्थितीत राहिला आहे. शिवाय त्यावर आता बरेच सुशोभीकरणसुद्धा करण्यात आले आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी माहिती फलक आहेत. आपला इतिहास जाणून घेणाऱ्या साधनांची माहिती करून घेण्यासाठी का होईना पण देवगिरीच्या किल्ल्याला आयुष्यात एकदा तरी भेट जरूर द्या!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved










