आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हणून डॉ. विक्रम साराभाई यांना ओळखले जाते. भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या कार्यकाळात भारताच्या आण्विक कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. डॉ. विक्रम साराभाई यांनी भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला दिशा दिली. भारताचे चंद्रावरील पहिले मिशन असलेले चंद्रयान हे साराभाईंनी घेतलेल्या कष्टाचे फळ आहे. रशिया आणि अमेरिकेत शीतयुद्ध सुरू होते त्यावेळी दोन्ही देशात आंतराळ संशोधन, उपग्रह प्रक्षेपण, रॉकेट निर्मिती इत्यादी क्षेत्रात चढाओढ सुरू होती.
स्वातंत्र्यानंतर भारताने अंतराळ कार्यक्रम आखायला सुरुवात केली. डॉ. विक्रम साराभाई यांनी फक्त भारतीय उपग्रह आणि रॉकेट यांच्या निर्मितीची व्यवस्था केली नाही, त्यांनी या उपग्रहांचा ज्या क्षेत्रांमध्ये वापर केला जाऊ शकतो, त्यांना गती देण्याचे काम केले.
डॉ. साराभाई यांचा जन्म १२ ऑगस्ट १९१९ मध्ये गुजरातच्या अहमदाबादमधील एका श्रीमंत कुटुंबात झाला. साराभाई बालपणापासूनच अत्यंत जिद्दी व मेहनती होते. पियर क्युरी व मेरी क्युरी या नोबेल पारितोषिक विजेत्या संशोधक जोडप्याचे ते चाहते होते. गुजरात कॉलेजमधे इंटरमीडियट सायन्सची परीक्षा पास झाल्यावर ते १९३७ साली ब्रिटनला गेले.
दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली त्यावेळी ते भारतात परतले. त्यांनी बंगलोरच्या भारतीय विज्ञान संस्थेत डॉ. सी व्ही रमण यांच्या मार्गदर्शनाखाली कॉसमिक किरणांवर संशोधन केले.
त्यांचा पहिला प्रबंध हा कॉसमिक किरणांच्या प्रसारणावर आधारित होता. भारतीय विज्ञान अकादमीत त्यांनी हा शोधनिबंध सादर केला होता.
विश्वयुद्ध समाप्तीनंतर साराभाई ब्रिटनला परतले. त्यांनी भौतिकशास्त्रात संशोधन करून आपली पीएचडी मिळवली. भारतात टेलिव्हिजनला प्रसाराचे माध्यम बनवण्यात डॉ. विक्रम साराभाई यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. दूरदर्शनवरील कार्यक्रमांची ब्लु प्रिंट देखील साराभाई यांनी तयार केली होती. १९७५-७६ मधे नासाच्या मदतीने साराभाई यांनी सॅटेलाइट इंस्ट्रक्शनल टेलीविजन एक्सपेरिमेंट संचलित केला होता. त्यांच्या या प्रयोगाने भारतातील २५०० हुन अधिक गावात टीव्हीचे प्रक्षेपण करण्यात आले होते.
डॉ. विक्रम साराभाई हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) पहिले अध्यक्ष होते. साराभाई यांनी सर्वप्रथम अहमदाबादच्या टेक्सटाईल अनुसंधान केंद्राची पायाभरणी केली होती. अहमदाबाद येथील भौतिक अनुसंधान प्रयोगशाळा आणि कम्युनिटी सायन्स सेंटरची स्थापना साराभाई यांनी केली होती.
१९६६मधे भारताच्या आण्विक कार्यक्रमाचे जनक असलेल्या डॉ. होमी भाभा यांच्या मृत्यूनंतर डॉ. साराभाई यांनी भारतीय अणु आयोगाचे अध्यक्षपद स्वीकारले होते. साराभाई यांनी फार्मास्युटिकल्स अनुसंधान केंद्राची देखील पायाभरणी केली होती.
भारताला विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात गरुडझेप घेण्यासाठी सज्ज करणाऱ्या या महान वैज्ञानिकाचे ३०डिसेंबर १९७१ रोजी निधन झाले. आज साराभाई हयात नसले तरी विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताची उंचावत जाणारी विजयी पताका ही निश्चितच त्यांची आपल्याला देण्यात आलेली सर्वात मोठी देणगी आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.