आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
कागद!
कागद कुठे कुठे वापरला जात नाही? या प्रश्नाचे उत्तर देणे जरा कठीणच जाईल नाही का? डिजिटल पोर्टल, ॲप्स आणि सोशल मिडियाचा जमाना असला तरी कागदाचे महत्त्व नाकारता येते का? अजिबात नाही. हो ना? कागद तो कागदच, त्याची जागा कुणीच घेऊ शकत नाही. हे खरे असले तरी हा कागद नेमका कधीपासून वापरात आला? पूर्वीच्या काळी कागद नव्हते तेव्हा राजेमहाराजे आपल्या नावाचे शिलालेख किंवा ताम्रपट बनवून घेत असत. जेव्हापासून कागद आले तेव्हापासून इतिहास जतन करण्याचे काम कितीतरी सोपे झाले! सर्व प्रांतातील, सर्व प्रदेशातील, सर्व प्रकारचा इतिहास जपून ठेवणाऱ्या आणि तो सतत पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करणाऱ्या कागदालाही काही तरी इतिहास असणारच ना?
कागदाचा शोध कधी लागला? कुठे लागला? कोणी लावला? असे प्रश्न तुम्हालाही पडत असतील आणि या प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर हा लेख तुमच्यासाठीच आहे.
पूर्वीच्या काळी लिहिण्यासाठी हाडे, कापड, बांबू, लाकूड अशा वस्तूंचा उपयोग केला जात असे . या साऱ्याच वस्तू वापरण्यास अतिशय जड होत्या. रेशमी वस्त्र तर महागही होते.
तेव्हा त्याकाळच्या राजांना वापरण्यास सोपा, बनवण्यास सोपा आणि ने-आण करण्यास सहज सुटसुटीत ठरेल असा पर्याय हवा होता. चीनच्या हान वंशाचा राजा हो टीश याने आपल्या दरबारातील अधिकाऱ्यांना अशा एखाद्या वस्तूचा शोध लावण्यास सांगितला.
त्याच्या दरबारातील अधिकारी त्साई लुन याने भांग, तुती, झाडांच्या साली, वेगवेगळ्या प्रकारचे तंतू, अशा कितीतरी पदार्थांचा वापर करून पाहिले आणि शेवटी त्याला कागदाची निर्मिती करण्यात यश आले. त्याने निर्माण केलेला पहिला कागद अतिशय मऊ, चकचकीत आणि गुळगुळीत होता असे म्हटले जाते.
त्साईने जेव्हा राजासमोर आपला कागद नेला तेव्हा राजा हो टीश अतिशय खुश झाला. त्याने मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या कागदाची निर्मिती करण्याचे आदेश दिले. लवकरच चीनमधे सगळीकडे हा कागद वापरला जाऊ लागला. नंतर चीनमधूनच हा कागद संपूर्ण जगभर पसरला.
चीनसोबतच भारतातही कागद निर्मितीसाठी प्रयत्न सुरू होते असे म्हटले जाते. सिंधू संस्कृतीपासून भारतात कागद निर्मिती करण्याचे प्रयत्न सुरू होते. यासाठी विविध प्रयोग केले जात होते. याचवेळी इजिप्तमध्येही कागद निर्मितीसाठी प्रयत्न केले जात होते. इजिप्तमध्ये पपायरस नावाच्या झाडापासून कागदाची निर्मिती केली जात होती. पपायरस वरूनच याला पेपर हे नाव पडले.
चीनमधून नेपाळमार्गे भारतात कागद आला असे म्हटले जाते. तर काही अभ्यासकांच्या मते तुर्कांनी भारतावर ह*ल्ला केल्यानंतर इस्लामी राष्ट्रातून भारतात कागद आयात केला जाऊ लागला. याचवेळी भारतात अरबीतून आलेला ‘कागज’ आणि फारसीतून आलेला ‘कागद’ हे दोन्ही शब्द रूढ झाले.
मोहम्मद बिन तुघलकच्या काळात दिल्ली आणि लाहोरमध्ये कागद निर्मितीच्या व्यवसाय फोफावला होता असे म्हटले जाते. त्याने आपल्या शासन काळात कागदी चलन देखील सुरु केले होते.
त्यानंतर काश्मिरी सुलतान जैनुल आबिदिन (इ.स.१४१७-१४६७) याने आपल्या राज्यात कागद कारखान्यांना प्रोत्साहन दिले. त्याने आपली राजधानी नौशहरमध्येही कागदाचा कारखाना स्थापन केला होता. या काळात तयार केल्या गेलेल्या काश्मिरी कागद धुवून सुकवता येत होता. याच्या याच वैशिष्ट्यामुळे त्याला जगभरातून खूप मोठी मागणी होती.
कलकत्त्याच्या हुगळी नदी काठावर आधुनिक भारतातील पहिला कागद कारखाना उभा राहिला. हळूहळू भारतातील सर्वच प्रांतात कागदाचा वापर वाढू लागला. तसतसे सर्वच प्रांतात हे कागद कारखाने देखील वाढू लागले. मध्ययुगीन काळात मात्र उत्तरप्रदेशमधील जौनपुर आणि पंजाबच्या सियालकोटमध्ये कागद निर्मितीचा उद्योग भरभराटीला आला होता. यासोबतच आग्रा, दिल्ली, लाहोर, अहमदाबाद आणि दौलताबाद या शहरातही कागद निर्मिती उद्योगाला चालना मिळाली. त्याकाळी भारत कागदाची निर्यातही करत होता.
दौलताबादमधील कागद कारखाना विशेष प्रकारचा गुळगुळीत कागदाची निर्मिती करण्यासाठी प्रसिद्ध होता. दौलताबादपासून एलोराकडे जायच्या रस्त्यावर कागजीपुरा नावाचे एक गाव देखील वसलेले आहे. येथील काही घरांमध्ये आजही जुन्या पद्धतीने कागद बनवले जातात.
आठव्या शतकात अरबांनी चीनवर ह*ल्ला केला आणि तिथले कागद कारखाने आपल्या ताब्यात घेतले. इथूनच त्यांनी कागद निर्मितीचे तंत्र आत्मसात केले आणि जगभर त्याचा प्रसार केला असे म्हटले जाते. युरोपमध्येही अरबांनी ह*ल्ले केल्यानंतर त्यांच्यामागून कागद तिथे पोहोचला असे म्हटले जाते. युरोपमधील स्पेनमध्ये पहिल्यांदा कागद निर्मितीचा कारखाना काढण्यात आला. अमेरिकेत मात्र १५व्या आणि १६व्या शतकात कागद निर्मिती केली जाऊ लागली.
गटेन बर्गने छपाई यंत्राचा शोध लावल्यानंतर तर कागदाचा वापर आणखीनच वाढला.
उत्तर अमेरिकेत १६९० साली फिलाडेल्फिया इथे कागद निर्मिती उद्योग सुरू झाला. त्यानंतर जर्मन संशोधक एफ. ज. केलर आणि चार्लस फेनेर्टी यांनी लाकडावर प्रक्रिया करून त्याचा लगदा बनवून त्यापासून कागद निर्मिती करण्याची पद्धत विकसित केली. यासाठी त्यांनी एक मशीनही तयार केली होती. या मशीनद्वारे लाकडातील तंतू वेगळे केले जात. कागदाला पांढरा रंग देण्यासाठी त्यांनी ब्लिचिंग प्रक्रीयेचा वापर केला.
आजही कागद निर्मितीसाठी लाकड्याच्या लगद्याचाच वापर केला जातो. ही प्रक्रिया जास्त सोपी आणि जलद होणारी होती. आज प्रचंड वृक्षतोडीमुळे कागदासाठी लाकडी लगद्याऐवजी इतरही पर्याय वापरले जात आहेत.
आज कागदाचा प्रवास “इकोफ्रेंडली” दिशेने सुरू आहे. इंटरनेट आणि डिजिटल क्रांतीमुळे कागदाचा वापर कमी झाला असला तरी त्याचे महत्त्व कमी झालेले नाही. आजही लोक सॉफ्ट कॉपीपेक्षा छापील पुस्तके वाचण्यालाच जास्त प्राधान्य देतात.
तंत्रज्ञानाने कागदावरील भार कमी केला आहे, हे खरे असले तरी कागदाला आपल्या जीवनातून पूर्णतः हद्दपार करता येणार नाही. कागद हा लोकांच्या दृष्टीने आजही भावनिकतेचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. कागदाने आजवर बराच इतिहास आपल्या शिरावरून इथवर वाहून आणला आहे आणि इथून पुढेही कागद मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग बनून राहील, यात तिळमात्र शंका नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.