आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
चिमाजी आप्पा म्हणजे बाळाजी विश्वनाथ यांचा धाकटा मुलगा. यांचा जन्म कधी झाला याबद्दल फारसे तपशील मिळत नाहीत. सन १७१५च्या आसपास दामाजी थोराताच्या कैदेत बाळाजी विश्वनाथ यांच्यासोबत ते होते. बाजीरावांना पेशवाईची वस्त्र मिळाल्यानंतर चिमाजी आप्पा यांना सरदारी मिळाली.
पेशव्यांचे खाजगी व्यवहार सांभाळणे व पुण्यातील कुटुंबाकडे लक्ष देणे ही दोन मुख्य कामे चिमाजी आप्पा यांच्याकडे होती तसेच काही वेळा मोहिमांवर सुद्धा जावे लागे. चिमाजी आप्पा यांची पहिली मोहीम ही माळवा प्रांतात सन १७२८मध्ये झाली. या मोहिमेत आमझरा येथे झालेल्या लढाईमध्ये त्यांनी गिरीबहाद्दर या मुघल सरदाराला संपवले.
त्यानंतर सन १७२९मध्ये पावसाळा संपल्यानंतर गुजरात प्रांतात चौथाई वसूल करण्यासाठी म्हणून चिमाजी आप्पा यांची स्वारी झाली. चिमाजी आप्पा यांच्या पराक्रमामुळे तेथील मुघल सरदार सरबुलंदखानाने शरणागती पत्करून मराठ्यांच्या चौथाई व सरदेशमुखीचे हक्क कबुल केले.
त्यानंतर पुढे शाहू राजांच्या आदेशानुसार जंजिरा किल्ला घेण्यासाठी तसेच सिद्दी सात याचा बंदोबस्त करण्यासाठी सन १७३६ मध्ये याने कोकणात स्वारी केली. या स्वारीत सिद्दी सात मारला गेला.
पुढे चिमाजी यांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची लढाई घडली, ती म्हणजे वसई येथे पोर्तुगीज सत्तेविरुद्ध झालेले युद्ध. वसई प्रांतातील पोर्तुगीजांच्या धार्मिक छळाला कंटाळून तेथील जनतेने पेशव्यांकडे रक्षण करण्याची विनंती केली. तेव्हा पेशव्यांनी आपले बंधू चिमाजी आप्पा यांना या मोहिमेवर पाठवले.
सन १७३७मध्ये झालेल्या या मोहिमेत मराठ्यांनी सुरुवातीला ठाणे, घोडबंदर, मनोर, पारसिक, अर्नाळा इत्यादी ठाणी जिंकून घेत पोर्तुगीजांना शह दिला. या मोहिमेची जबाबदारी प्रामुख्याने अणजूरकर बंधूंवर होती. नंतर काही दिवसांनी चिमाजी आप्पांना भोपाळच्या लढाईत निजामाविरुद्ध जावे लागले, त्यामुळे वसईची ही मोहीम अर्धवटच राहिली.
पुढे पावसाळा संपल्यानंतर नोव्हेंबर १७३७मध्ये पुन्हा एकदा युद्ध सुरु झाले. माहीमचे ठाणे घेतल्यानंतर चिमाजी आप्पा आपल्या फौजेसह वसई प्रांतात दाखल झाले. काही दिवस मुक्काम केल्यानंतर चिमाजी पुण्यास परतले. त्यानंतर सन १७३८चा पावसाळा संपल्यानंतर जेव्हा थोरले बाजीराव पुण्यात आले, तेव्हा पुन्हा एकदा वसईवर हल्ला करण्याचे ठरवले. यानंतर प्रचंड फौज घेऊन चिमाजी आप्पा वसई प्रांती उतरले. यावेळी त्यांच्यासोबत मल्हारराव होळकर वगैरे सरदारसुद्धा सामील झाले होते.
डिसेंबर महिन्यात पोर्तुगीजांचा सेनापती पद्रेमेलो हा मारला गेला. यानंतर मराठ्यांनी तारापूरचे ठाणे जिंकून घेतले. जानेवारी, सन १७३९मध्ये मराठ्यांनी बाजी रेठेकरसारखा योद्धा गमावला. यानंतर केवळ वसईचे ठाणे घ्यायचे बाजी राहिले होते.
वसई काही हातात येईना त्यामुळे चिमाजी आप्पांनी सर्व सरदारांना एकत्र बोलावले व सांगितले की, “वसई ताब्यात येत नाही. माझा हेतू वसई घ्यावी असा आहे. तरी, तोफ डागून माझे मेलेले शरीर तरी वसई किल्ल्यात पडेल असे करा.” हे वीरश्रीयुक्त बोलणे सर्व सरदारांनी ऐकले आणि वसईवर निकराचा लढा केला व वसईवर मराठ्यांचे निशाण फडकले.
या लढाईमुळे चिमाजी आप्पांचे व मराठ्यांचे नाव अजरामर झाले. उत्तर कोकण प्रांतातून पोर्तुगीजांची सत्ता संपूर्णपणे उखडून टाकण्यात आली. मराठ्यांना फिरंग्यांच्या ताब्यात असलेला ३४० गावांचा प्रदेश, २० किल्ले, २५ लाखांचा दारूगोळा वगैरे साहित्य मिळाले. तितक्यात बाजीराव साहेब वारल्याची खबर चिमाजी आप्पांना मिळाली. त्यामुळे ते लगेच पुण्यात परतले. पुढे सातारा येथे जाऊन शाहू राजांच्या करवी नानासाहेब पेशव्यांना पेशवाई पदाची वस्त्रे देवविली. यावेळी वसई येथे केलेल्या पराक्रमामुळे चिमाजी आप्पा यांचा सन्मान करण्यात आला.
पुढे सन १७४०मध्ये चिमाजींनी दिवदमण प्रांतावर हल्ला करून तेथील उरलेल्या पोर्तुगीज सत्तेचा पराभव केला. त्यामुळे पोर्तुगीज आता फक्त गोव्यापुरतेच मर्यादित राहिले. चिमाजी आप्पा यांना क्षयाचा त्रास होता, त्यात या सर्व दगदगीमुळे त्यांची तब्येत आणखीनच खालावली. या मोहिमेनंतर लगेचच १७ डिसेंबर, १७४० रोजी त्यांचा मृत्यू झाला.
चिमाजी आप्पा याची पहिली बायको रखमाबाई. तिच्यापासून त्यांना ३ ऑगस्ट, १७३० रोजी सदाशिव नावाचा मुलगा झाला. मुलगा झाल्या झाल्याच रखमाबाईचे निधन झाले. यानंतर पुढील वर्षात चिमाजी आप्पांनी दुसरे लग्न केले. त्यांच्या दुसऱ्या बायकोचे नाव होते अन्नपूर्णाबाई. तिच्यापासून त्यांना बयाबाई नावाची मुलगी झाली. तिचा विवाह गंगाधर नाईक ओंकार यांच्याशी झाला. चिमाजी आप्पा यांची समाधी पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरात आहे.
चिमाजी आप्पा हे काही बाबतीत थोरल्या बाजीराव पेशव्यांपेक्षा श्रेष्ठ होते. ते शूर, धोरणी व मनमिळाऊ होते. बाजीरावांच्या अनुपस्थितीत घर आणि खासगी कारभार त्यांनी अत्यंत कौशल्याने सांभाळला. वसईच्या किल्ल्यात सापडलेल्या एका फिरंग्याच्या मुलीला याने सन्मानाने पाठविल्याची हकीकत तर प्रसिद्ध आहेच. शाहू महाराजांच्याकडील खासगी कामेसुद्धा याने अनेक वेळा केली आहेत.
संदर्भ –
- डॉ. आर.एच. कांबळे – मराठ्यांच्या इतिहासातील चिमाजी आप्पांचे योगदान (प्रबंध आणि ग्रंथ). पुणे. २०१६
- गो. स. सरदेसाई – मराठी रियासत मध्यविभाग – १ (सन १७०७ ते १७४०) मुंबई. १९२५
- चिमाजी आपा – कै. कृ. वा. पुरंदरे
या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.