आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
१९व्या शतकात अर्ध्या पृथ्वीवर ब्रिटीश साम्राज्याचे राज्य होते पण चीनवर मात्र त्या काळात कुठल्याही विदेशी शक्तीचा प्रत्यक्ष प्रभाव नव्हता. चीनच्या गौरवशाली परंपरेवर गंज चढला होता. चीनवर कुठल्याही विदेशी साम्राज्याची सत्ता नव्हती तरीही चीनची अवस्था कुठल्याही गुलाम देशापेक्षा कमी नव्हती. चीन आणि युरोपीय सत्तांमधील संघर्ष तेव्हाही सुरु होताच.
याच काळात माओ से-तुंग या नेत्याने चीनमध्ये साम्यवादी क्रांती घडवून आणली.
चीनमधील या बदलत्या प्रवाहाचा संपूर्ण जगावर परिणाम झाला. भारतात देखील माओच्या विचारांचा प्रभाव पडला. भारतात माओच्या विचारसारणीला माओवाद म्हणून ओळखले जाते. माओ से-तुंग यांच्या विचाराने प्रेरित झालेली ही विचारधारा असल्याने याला त्यांच्याच नावाने ओळखले जाते.
माओंनी चीनचा सामाजिक आर्थिक इतिहास बदलण्याच्या प्रयत्नात अनेक हुकुमशाही निर्णय घेतले. माओचे हे निर्णय जनतेवर बंधनकारक होते. संपूर्ण क्रांतीच्या वेडाने माओला इतके झपाटले होते की, त्याचे निर्णय देशवासीयांसाठी जीवघेणे ठरत आहेत याची देखील त्याने तमा बाळगली नाही.
माओच्या या क्रांतीने जगभरात बदलाचे वारे वाहू लागले असले तरी प्रत्यक्षात मात्र चीनमधील लाखो लोकांच्या जीवावर त्याची ही क्रांती बेतली होती. या क्रांतीच्या परिणामांनी लाखो लोकांचा बळी घेतला होता. हे चीनच्या इतिहासातील एक काळे सत्य आहे.
माओच्या विचारधारेबद्दल अनेक मतप्रवाह आहेत. जगभर त्याच्या विचारांवर अनेक वादविवाद झडत असतात. प्रत्यक्षात चीनमध्ये माओची प्रतिमा एक महान क्रांतिकारी, प्रखर देशभक्त आणि राष्ट्रनिष्ठ नेता अशी आहे. माओच्या धोरणांमुळे आणि देशभरात राबवल्या गेलेल्या त्याच्या कार्यक्रमांमुळे, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक विकासाच्या दृष्टीकोनातून आंतरराष्ट्रीय पटलावर चीनची एक नवी ओळख निर्माण झाली.
स्टॅलिनप्रमाणेच माओदेखील क्रांतीच्या विचाराने झपाटून गेला होता. त्याला देशात संपूर्ण क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणायचे होते. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने ग्रेट लीप फॉरवर्ड नावाची एक चळवळ सुरु केली.
ग्रेट लीप फॉरवर्ड म्हणजे, भविष्याच्या दिशेने घेतलेली एक झेप! या चळवळीने माओचे स्वप्न पूर्ण तर झाले नाहीच. पण, या चळवळीमुळे देशात भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. हा दुष्काळ इतका भयावह होता की, चीनमध्ये लाखो लोक केवळ अन्नपाण्यावाचून भुकेने तडफडून मेले.
त्याच्या ग्रेट लीप फॉरवर्ड या चळवळीबद्दल जाणून घेण्याआधी माओ आणि त्याच्या विचारधारेबद्दल काही माहिती घेऊया.
माओचा जन्म २६ डिसेंबर १८९३ रोजी हुनान प्रांतातील शाओशान भागात झाला. त्याचे वडील एक सामान्य शेतकरी होते. शेती करता करता त्यांनी गव्हाचा व्यापार सुरु केला, ज्यात त्यांना चांगला फायदा होत होता. माओ १३व्या वर्षी शाळा सोडून वडिलांसोबत शेतात काम करू लागला.
परंतु माओला अभ्यासात प्रचंड रुची होती. त्याचा अभ्यासातील कल ओळखून त्याच्या वडिलांनी चांगल्या शाळेमध्ये त्याला प्रवेश घेऊन दिला. इथेच माओला हुनानच्या स्थानिक रेजिमेंटमध्ये भरती होण्याची संधी मिळाली. त्याकाळी चीनमध्ये जीन्हाई क्रांतीचे वारे वाहत होते. माओने देखील या क्रांतीत सहभाग घेतला.
चीनमध्ये चिंग वंशाची सत्ता आल्यानंतर माओने पुन्हा आपला अर्धवट राहिलेला अभ्यास सुरु केला. १९१८ साली माओ पदवी परीक्षा उत्तीर्ण झाला. १९१९ साली प्राध्यापक ‘यां च्यां जि’ यांच्या सांगण्यावरून प्राध्यापकाची नोकरी स्वीकारली. ‘यां च्यां जि’ यांच्या मुलीशी विवाह केल्यानंतर तो शांघायला निघून गेला. इथेच साम्यवादी विचारांशी माओची पहिल्यांदा ओळख झाली.
साम्यवादी विचारधारा मानणारा माओ पुढे कम्युनिस्ट पक्षाचे अध्यक्ष बनला.
१९५६ साली माओने सोव्हिएत युनियनचा दौरा केला. यादरम्यान त्याची भेट निकिता ख्रुश्चेव्ह याच्याशी झाली. येत्या १५ वर्षांत संयुक्त अमेरिका चीनच्या ताकदीला नवे आव्हान निर्माण करेल असा निकिताचा दावा होता. सोव्हिएत युनियनच्या दौऱ्यावरून परतत असतानाच माओला औद्योगिकीकरण आणि सार्वत्रीकरणाच्या माध्यमातून देशातील कृषीव्यवस्थेत क्रांतीकरी सुधारणा घडवून आणायची कल्पना सुचली.
सोव्हिएतवरून परत आल्याआल्याच त्यानी ग्रेट लीप फॉरवर्डच्या धोरणाची घोषणा केली. चीनने या धोरणांचा अवलंब केल्यास पुढील १५ वर्षात चीन ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला देखील मागे टाकेल असा त्याला विश्वास होता.
चीनच्या वाढत्या लोकसंख्येला व्यवस्थितरित्या वापरून घेतल्यास चीनमध्ये सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन फारशी अशक्य बाब नाही असे त्याचे मत होते. शेतीतून येणारे उत्पन्न हेच जर अर्थप्राप्तीचे मूळ स्त्रोत बनले तर आर्थिक क्रांती फारशी दूर राहणार नाही. मात्र यासाठी मोठमोठ्या कृषी क्षेत्राची गरज होती.
शेतीसाठी माओने रातोरात मोठमोठे जमिनीचे व्यवहार केले. अनुभवी धोरणकर्ते आणि इंजिनियर्सनी अशा प्रकारे उत्पादनाचा वेग वाढवता येणे शक्य नसल्याचा सल्ला दिला. परंतु, माओच्या स्वतःच्या काही पद्धती होत्या. त्यांनी इतरांच्या सल्ल्याकडे लक्ष न देता उत्पादन वाढवण्यावर अधिकाधिक भर दिला.
आपल्या धोरणांना समर्थन मिळवण्याच्या जिद्दीपोटी अनेक माओने अनेक नेत्यांचा पराभव केला. त्याच्या विरोधात बोलणाऱ्यांना धुळीस मिळवले. मिश्र राजनीतीची घोषणा केली. परिणामत: माओच्या काही मुठभर स्तुतीपथकांच्या हातात सत्ता नियंत्रित झाली.
त्यानंतर काही वर्षातच चीनच्या कृषी क्षेत्रात ग्रेट लीप फॉरवर्डच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यात आली. एकाच वेळी २३ हजार खेड्यांमधून ही प्रक्रिया सुरु झाली. या धोरणानुसार कामाची पद्धती अगदी वेगळी होती.
शेतकऱ्यांना शेतकऱ्यांप्रमाणे न वागवता त्यांना सैनिकांप्रमाणे वागणूक दिली जाऊ लागली. त्यांच्यासाठी वेगळे बराक बनवण्यात आले. महिला, शेतकरी आणि सामान्य खेडूताला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. या प्रशिक्षणासाठी सर्वांना उपस्थित राहण्याची सक्ती केली जाऊ लागली. लहान मुलांसाठी पाळणाघर उभारण्यात आले.
या धोरणानुसार कुणाचीही स्वतःच्या जमिनीवर वैयक्तिक किंवा खाजगी मालकी उरली नाही. जी काही शेती होती ती चीन सरकारची होती.
सर्व शेतजमिनीवर सरकारचे नियंत्रण होते. या धोरणांची काटेकोर अंमलबजावणी करून घेण्यासाठी आयुक्त आणि त्याच्या हाताखाली इतर कर्मचारी नेमण्यात आले. आत्तापर्यंत चीनी समाजावर माओवादाचा एक वेगळाच प्रभाव होता. परंतु, हळूहळू समाजाची मानसिकता बदलत गेली.
स्थानिक नेत्यांना उत्पादन वाढवण्याच्या प्राथमिक पद्धतींचे प्रशिक्षण घेण्यासाठी बीजिंगला पाठवण्यात आले. तसेच त्यांना स्टीलच्या उत्पादनाचेही प्रशिक्षण देण्यात आले. असे प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांच्यासाठी उद्दिष्टे निश्चित करण्यात आलीत.
या नेत्यांच्या कामावर या प्रशिक्षणाचा काहीच परिणाम दिसून आला नाही आणि त्यांची उद्दिष्टे देखील अपूर्णच राहिलीत. स्वतःवर कोणतेही बालंट येऊ नये म्हणून स्थानिक नेत्यांनी योजनेला भरपूर यश मिळत असल्याचे नकली अहवाल तयार केले. हे अहवाल पाहताच माओने असा तर्क केला की ग्रेट लीप फॉरवर्डचे काम अगदी व्यवस्थित सुरु असून त्याला अपेक्षेप्रमाणे यश मिळत आहे.
माओने सरकारला हा अहवाल पाठवला आणि सरकारकडून स्वतःचा हिस्सा मागितला. अर्थात या धोरणांमुळे काही क्षेत्रातील उत्पादन वाढले असले तरी एकंदर समग्र व्यवस्थेचा विचार करता वास्तव चित्र मात्र अगदीच नकारात्मक होते. एकीकडे सरकारची मागणी वाढत होती आणि दुसरीकडे लोकं खेडी सोडून शहरात स्थलांतर करत होती.
वास्तविक उत्पादन कमी असताना देखील ते वाढवून चढवून सांगण्यात आले. १९५८ साली २०० मिलियन टन इतके उत्पादन झाले असताना, अधिकाऱ्यांनी अहवालात ३७५ मिलियन टन उत्पादन दाखवले. केंद्र सरकारने धान्याच्या निर्यातीत वाढ केली ज्यामुळे शेतकऱ्यांना दिवसरात्र शेतात राबावे लागे. तरीही त्यांचे नुकसान भरून निघत नव्हते. मग मात्र सरकारी स्तरावर ग्रेट लीपच्या अपयशाची चर्चा सुरु झाली. तरीही सरकारने धान्याची निर्यात थांबवली नाही.
विरोधकांनी या धोरणाला कडाडून विरोध केला. या धोरणामुळे देशात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होईल असा इशारा विरोधकांनी दिला होता. तरीही सरकार नमले नाही आणि त्यांनी निर्यात थांबवली नाही. देशाच्या औद्योगिक क्षेत्रातील उत्पादनात मात्र कमालीची घट झाली होती.
औद्योगिक क्षेत्रातही भरपूर प्रमाणात कारखाने उभारण्यात आले. शेतकऱ्यांप्रमाणेच कामगारांवर देखील अतिरिक्त ताण देऊन उत्पादन केले जाऊ लागले. जी अवस्था शेतीची तीच उद्योगाची.
शेवटी १९५९ ते १९६१ या काळात चीनमध्ये प्रचंड भीषण दुष्काळ पडला. लोकांच्या घरात खायला अन्न उरले नाही तेंव्हा लोकांनी आपली जनावरे मारून खाल्ली. भुकेने लोकांचा जीव जात होता. तरीही सरकारने निर्यात थांबवली नाही.
१९६० च्या सुमारास माओच्या हे लक्षात आले की त्याच्या योजनेमुळे लाखो लोकांचा मृत्यू ओढवला आहे, तेंव्हा त्याने हे धोरण थांबवले. अर्थात यानंतर त्याने सांस्कृतिक क्रांती हाती घेतली जी चीनी समाजासाठी याहून जास्त वेदनादायी ठरली.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.