आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
भारतात राहणाऱ्या अबालवृद्धांनी एकदातरी ‘स्लमडॉग मिलिनिअर’ हा चित्रपट पहिलाच असेल. या चित्रपटाला २००८-०९ या वर्षात ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याचा मुख्य विषय होता लहान मुलांना अंध किंवा अपंग करून भीक मागायला लावणे. त्याबरोबरच या चित्रपटाने मानवी तस्करी आणि विशेषतः लहान मुलांच्या तस्करीचा मुद्दा उचलून धरला. पण हा मुद्दा फक्त आशिया आणि भारतातच नाही तर जगभरात गांभीर्याने विचारात घेण्यासारखा आहे.
मानवी तस्करीला कारणीभूत ठरते बेरोजगारी. लोकांच्या हातात काम नसलं की गुन्हेगारीचं प्रमाण वाढतं. दुसऱ्या महायु*द्धानंतर अमेरिकेत असंच काहीसं चित्र होतं. बऱ्याच लोकांना अमेरिकेतील आर्थिक-सामाजिक समस्येबद्दल माहिती नाही. पण या समस्येमुळे अमेरिकेच्या प्रतिमेला धक्का लागण्याची शक्यता निर्माण झाली होती.
१९२९ नंतर आलेल्या ग्रेट इकॉनॉमिक डिप्रेशनच्या काळात अमेरिकेत अतिशय भीषण परिस्थिती होती. त्यावेळी आर्थिक परिस्थिती तर ढासळली होतीच, पण त्याबरोबरच सामाजिक स्थिती देखील अतिशय बिकट होती. यामध्ये विवाहबाह्य संबंधांतून निर्माण झालेली संतती, घटस्फोटांचं वाढलेलं प्रमाण, गुन्हेगारी हे प्रकार वाढले होते. अशीच काहीशी स्थिती दुसऱ्या महायु*द्धानंतर तयार झाली. लुसिल चालिफॉक्स या चोवीस वर्षीय अमेरिकन महिलेला चार मुले होती आणि ती आता गरोदर असल्याने तिला लवकरच पाचवं मूलसुद्धा होणार होतं. ते पाचवं मूलसुद्धा ती विकणार होती.
दुसरं महायु*द्ध संपल्यानंतर अमेरिकेत नोकऱ्या उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे लुसिल आणि तिचा नवरा दोघेही बेरोजगार होते. एवढेच नाही तर यु*द्धात आवश्यक असणारं शस्त्रास्त्र उत्पादन थांबल्याने अनेक कारखाने बंद पडले होते आणि दुसऱ्या महायु*द्धाचा फटका बसलेल्या युरोपियन देशांतून अनेक लोक अमेरिकेत स्थलांतरित होत होते.
त्यांच्याकडे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी जेमतेम पैसे नव्हते. याशिवाय त्यांच्याकडे गहाण ठेवण्यासाठी काहीही नसल्याने ते अमेरिकेतून बेदखल होण्याच्या मार्गावर होते. मग अशा हजारो लोकांच्या मते, त्यांच्याकडे आपली मुले विकण्याशिवाय दुसरा काहीही पर्याय नव्हता.
मूल विकणे ही गोष्ट क्रूरतेची परिसीमा आहे असं आपल्याला वाटत असेल. पण या आर्थिक आणि सामाजिक समस्येकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे. युरोपातून अमेरिकेत स्थलांतरित झालेले लोक आणि काही मूळ अमेरिकन्ससुद्धा बेघर तर होतेच, पण त्याशिवाय दोन पेक्षा जास्त मुलांचं संगोपन करणं हे त्यांच्यासाठी अशक्य होतं.
मुलांच्या विक्रीसाठी २ डॉलर्स किंवा जी काही किंमत निश्चित केली गेले होती त्या किमतीला अनेकदा ती मुलं विकलीही जात नसत. पण ते पालक आपल्या अपत्यांना चांगलं अन्न आणि शिक्षण मिळेल या आशेनेच आर्थिक स्थिती सुदृढ असलेल्या घरांमध्ये मिळेल त्या भावाने विकून टाकायचे. रस्त्यावर भुकेलं राहण्यापेक्षा डोक्यावर किमान छत आणि खायला नीटनेटकं मिळेल इतकीच काय त्यांची अपेक्षा होती.
पण दुर्दैवाने मूळ समस्येची सुरुवात येथूनच होते. कारण बहुतेकदा अशी विकाऊ मुले आर्थिक स्थिती सुदृढ असलेल्या लोकांनी विकत घेतलीच नाहीत, तर कित्येकदा गरीब शेतकऱ्यांनी विकत घेतली. या शेतकऱ्यांना शेतमजुरीसाठी “स्वस्त” कामगारांची गरज भासत असे. शेतामध्ये मजुरीसाठी वापरण्याव्यतिरिक्त, या लहान मुलांना अत्यंत वाईट वागणूक दिली गेली. त्यांना फारच कमी जेवण दिले जात असे आणि जेव्हा काहीही काम नसायचे तेव्हा त्यांना एका खोलीमध्ये साखळदंडाने बांधून ठेवले जात. म्हणजेच विक्री झाल्यानंतरही त्यांच्या पालकांच्या अपेक्षेप्रमाणे या लहान मुलांना माणसासारखं जगण्याचंही स्वातंत्र्य नव्हतं.
आता आणखी एक प्रश्नचिन्ह उपस्थित होईल, ते म्हणजे, या मुलांना अनाथालयात किंवा पालनपोषण गृहामध्ये का दिले जात नसत. अनाथालयातून अशी मुले उत्तम घरातच दत्तक घेतली जातील हे निश्चित करण्यात येते. पण अनाथालयात किंवा पालनपोषण गृहात न पाठवण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यावेळी देशात सगळीकडेच आर्थिक मंदीची लाट होती. या आर्थिक मंदीमुळे सगळ्या अनाथालयांची आणि पालनपोषण गृहांची अवस्था अतिशय बिकट होती.
याशिवाय अशा अनाथालयांनी किंवा पालनपोषण गृहांनी या मुलांना वयाच्या अठराव्या वर्षीच वाऱ्यावर सोडून दिले असते. कारण त्याकाळामध्ये दत्तक घेणे आर्थिकदृष्ट्या अजिबात परवडण्यासारखे नव्हते. एका मुलाला दत्तक घेण्यासाठी ५ ते १० हजार डॉलर्स द्यावे लागत होते.
काही जणांनी या संकटसमयी आपला नफा कसा होईल याचा विचार केला आणि त्यांनी आपले डाव टाकायला सुरुवात केली. काही लोकांनी आपले एक सुंदर कुटुंब आहे असं ढोंग केलं आणि नेहमीप्रमाणे या मुलांच्या मूळ पालकांकडून २ डॉलर्स किंवा त्याहीपेक्षा कमी भावामध्ये विकत घेतले.
नंतर मात्र ही मुले इतर श्रीमंत कुटुंबांना सुमारे १०० डॉलर्स किंवा त्याहूनही अधिक किमतीत विकली जात असत. यामध्ये काहीही कायदेशीर किंवा बेकायदेशीर नव्हतं. कारण अमेरिकेच्या किंवा अमेरिकेतील कोणत्याही राज्याच्या संविधानाने किंवा विधिमंडळाने या समस्येवर कधी विचारच केला नाही. तसेच या मुलांचे ‘बर्थ सर्टिफिकेट’ तयार करणे काही अवघड काम नव्हते.
याच काळामध्ये अनेकदा काही जोडप्यांना त्या मुलाच्या बर्थ सर्टिफिकेटची किंवा किंवा इतर प्रकारच्या कागदपत्रांचीसुद्धा आवश्यकता नव्हती. कारण अशा दाम्पत्यांना कोणत्याही परिस्थितीत मूल हवं होतं आणि जर दाम्पत्यांना काही आणखी पर्याय सुचला असेल तर मधला दलाल त्यांना कोणत्या न कोणत्या प्रकारे ते मूल दत्तक घेण्यास प्रवृत्त करीत असे. अशी परिस्थिती असताना गुन्हेगारीमध्ये वाढ होऊ लागली.
मुलांना जास्त किंमत मिळत आहे म्हटल्यावर अनेकांनी मुलांचं अपहरण करायला सुरुवात केली. अनेकांच्या मते, युनायटेड स्टेट्समधील आधुनिक इतिहासात मुलांची तस्करी येथूनच सुरू झाली. बार्बरा बिसांट्झ रेमंडच्या अहवालानुसार, १९३६ ते १९५० या कालावधीत ५० हजारपेक्षा जास्त मुलांचं अपहरण झालं आणि ५ हजारपेक्षा जास्त मुले विकली गेली. बार्बरा बिसांट्झ रेमंडच्याच अहवालानुसार, वेगळे झालेले भाऊ आणि बहिणी इतक्या रडू लागल्या की “दत्तक पालकांना” त्यांना एकत्र राहण्यासाठी दुसऱ्या भावन्डालासुद्धा विकत घेणे भाग पडले. यामुळे केवळ अल्पावधीतच दीर्घकालीन गंभीर मानसिक समस्या उद्भवू लागल्या.
त्यांच्या मुलांना कायमचे सोडून देणे हे पालकांसाठी अतिशय कठीण होते. पण एखाद्या आईपासून इतक्या लहानपणीच मूल कायमचं दुरावत असेल, त्या भावना शब्दांकित करणं अत्यंत अवघड आहे, शिवाय आपण आपल्या कुटुंबापासून वेगळं का होतोय याचं कारण समजण्याइतकं त्यांचं वयही नव्हतं. पण ही कथा इथेच संपत नाही..
२०१३ साली, दोन मुली तब्बल ३३ वर्षे वेगळे राहिल्यानंतर पुन्हा एकत्र आल्या. त्या दोघीही अतिशय खडतर जीवन जगल्या पण शेवटी एकत्र आल्याने त्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. त्या दोघींप्रमाणेच अशीच अनेक मुले आयुष्याच्या संध्याकाळी एकत्र आली होती.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.