आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
भारतात चार्ल्स शोभराज हे नाव माहिती नसलेली व्यक्ती विरळ आहे. ७० च्या दशकात चार्ल्स शोभराजच्या नावानेच लोकांची गाळण उडायची. चार्ल्स हा फक्त त्याच्या गुन्ह्यांसाठी नाहीतर त्याचा चाणाक्ष बुद्धिसाठी ओळखला जात होता. त्याच बुद्धीच्या बळावर तो जेलमधून पलायन करण्यात यशस्वी ठरला होता.
चार्ल्स शोभराज कुठल्याही प्रकारे एक अपराधी वाटत नव्हता. त्याचा लूक विदेशी होता आणि तो फ्रेंच स्टाईलची वस्त्रे परिधान करायचा, त्याच्या या सधन आणि सभ्य बाह्यरूपामुळे तो अट्टल गुन्हेगार असेल यावर कोणालाच विश्वास बसायचा नाही.
७० च्या दशकात चार्ल्सने गुन्हेगारी जगतात प्रवेश केला. तो एखाद्या सामान्य पर्यटकाप्रमाणे आशिया खंडातील विविध भागांची भ्रमंती करत होता. कोणाला त्याच्यावर संशय येईल, अशी काडीमात्र शक्यता नव्हती. त्याकाळी भारतात परदेशी पर्यटक येणे हे काही विशेष नव्हते.
चार्ल्स आपल्या विदेशी लूकच्या मदतीने बेमालूमपणे गुन्हे करायचा.
भारताच्या अगोदर चार्ल्स हा पॅरिसच्या जेलमध्ये गेला होता. त्याने १९७२ ते १९७६ या काळात तब्बल २० लोकांची ह*त्या केली होती. बँकॉकमध्ये त्याने दोन पर्यटकांची ह*त्या केली होती, त्यामुळे त्याला तेथील न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. चार्ल्स तेथून पळ काढण्यात यशस्वी ठरला होता. यानंतर त्याने नेपाळमध्ये ह*त्या केल्या आणि तेथून तो भारतात आला होता.
१९७१ साली चार्ल्स नेहमी चर्चेत असायचा. सुईपासून हत्तीपर्यंत कुठल्याही वस्तूची तस्करी करण्यात चार्ल्स शोभराज तरबेज होता. सुरुवातीला चार्ल्सला ज्यावेळी भारतात अटक करण्यात आले त्यावेळी त्याच्याकडून ह*त्यारे जमा करण्यात आली होती. चार्ल्सने ते ह*त्यारे भारतात विक्री करण्यासाठी अफगाणिस्तानातून आणले होते. ज्यावेळी चार्ल्स शोभराज फक्त १४ दिवसांत तुरुंगातून पळ काढण्यात यशस्वी ठरला होता, त्यावेळी भारत आणि पाकिस्तानमध्ये यु*द्ध सुरु होते. या यु*द्धाच्या वेळी वीजपुरवठा मोठ्या प्रमाणात खंडित करण्यात येत होता, त्यामुळे निर्माण झालेल्या अंधाराचा फायदा चार्ल्सने घेतला होता.
यानंतर त्याचे गुन्हे वाढतच गेले. त्याने मुंबईच्या अशोक हॉटेलमध्ये दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा त्याला पकडून दिल्लीला आणण्यात आले. तो पुन्हा पळून जाण्यात यशस्वी ठरला होता. १९७६ साली दिल्ली पोलिसांनी त्याला पुन्हा अटक केली. त्याच्या वारंवार पळून जाण्याने हैराण झालेल्या पोलिसांनी त्याची तिहार जेलमध्ये रवानगी केली. सर्वांना वाटले होते की तिहार जेलमध्ये पळून जाणे चार्ल्सला जमणार नाही, पण त्याने सर्वांना खोटे ठरवले.
चार्ल्स अत्यंत सुपीक डोक्याचा आणि सगळ्यांशी गोडीगुलाबीने वागणारा होता. त्याच्या याच स्वभावाचा त्याला गुन्हा करताना फायदा व्हायचा. तुरुंगातून पळ काढण्यासाठी त्याला याचा फायदा झाला होता. चार्ल्स ज्या जेलमध्ये जात होता, त्याच दिवशी तेथून पळ काढण्यासाठी तो तयारी सुरु करायचा. ज्या तिहार तुरुंगातून त्याला आता पळ काढायचा होता, ते कारागृह भारतातील सर्वात कडक शिस्तीचे असे कारागृह आहे. इथे भारतातील सगळ्यात खतरनाक गुन्हेगारांना ठेवण्यात येते.
आता, चार्ल्स लोकांना मारण्यासाठी किंवा त्यांना लुटण्यासाठी एकाच पद्धतीचा वापर करायचा. तो एखाद्या विषारी औषधाने समोरच्याला बेशुद्ध करायचा. सर्वांना ते औषध देण्यासाठी चार्ल्सने सर्वांशी मैत्री केली होती. चार्ल्सने फक्त कैद्यांशी नाहीतर जेलरशी देखील मैत्री केली होती. भेटायला येणाऱ्या लोकांकडून त्याने ड्रग्ज मागवून घेतले होते.
प्रत्येक १६ मार्चला चार्ल्स शोभराज आपला वाढदिवस साजरा करत होता. दहा वर्षे जेलमध्ये त्याने ही परंपरा जपली होती. १६ मार्चला त्याने हेच केले, त्याने आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून सगळ्यांना लाडू वाटले. या लाडवांतून त्याने संपूर्ण तुरुंगाला बेशुद्ध पाडण्यात यश मिळवले. १० वर्षांनी चार्ल्स शोभराज पुन्हा जेलमधून फरार झाला.
जगातील सर्वात कडक सुरक्षाव्यवस्था असलेल्या तुरुंगांपैकी एका असलेल्या तिहार जेलमधून चार्ल्स शोभराजने पळ काढला होता. आशिया खंडातील सर्वात मोठा अपराधी म्हणून ओळखला जाणारा चार्ल्स शोभराज फरार असल्याने जगभरातील मीडियावर याचीच चर्चा होती. भारतभर पोलीस त्याचा शोध घेत होते. मुंबई पोलिसांनी चार्ल्सच्या एका साथीदाराला अटक केली, त्याने चार्ल्सची पुढील योजना काय असेल याविषयी माहिती पोलिसांना दिली. त्या माहितीच्या आधारावर पोलीस चार्ल्सच्या पाठीमागे गोव्यापर्यंत पोहचले.
६ एप्रिल १९८६ला चार्ल्सला पुन्हा अटक करण्यात आली. ६ तारखेला त्याला अटक करण्यात आली तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचे आश्चर्य व भीती नव्हती, असे वाटत होते जणू त्याला हेच अपेक्षित होते. त्याला ज्या पोलिसांनी पकडले हो त्यांना तो म्हणाला होता की तुम्ही लवकरच प्रसिद्ध होणार आहात.
काही पत्रकार मानतात की चार्ल्सने स्वत: मुद्दाम पोलिसांच्या तावडीत जाण्याचा निर्णय घेतला होता. याचं एक कारण देखील होतं. थायलंड सरकारने चार्ल्स शोभराजला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. भारत सरकार आणि थायलंड सरकारमध्ये आपल्या गुन्हेगारांना एकमेकांकडे सोपविण्याचा करार करण्यात आला होता. शोभराजला भारतात ठोठावण्यात आलेल्या शिक्षेचा कालावधी पूर्ण होत आला होता, यानंतर भारत सरकारने त्याला सरळ थायलंडच्या ताब्यात दिले असते. हे होऊ नये यासाठी त्याने जेलमधून पळून जाण्याचा प्रकार घडवून आणला होता.
थायलंडमध्ये जर एखाद्या शिक्षेची २० वर्षांच्या कलावधीत अंमलबजावणी करण्यात आलेली नसेल तर ती शिक्षा रद्द करण्यात येते, शोभराजला याची कल्पना होती. यामुळेच त्याने अजून एक गंभीर गुन्हा करून त्याचा दिल्लीच्या कारागृहातील मुक्काम वाढवला जेणेकरून थायलंडच्या शिक्षेपासून त्याला सुटका मिळेल.
२० वर्षे भारतीय जेलमध्ये घालवल्यानंतर शोभराजची भारत सरकारने सुटका केली व त्याची फ्रान्सला रवानगी करण्यात आली. पण कुत्र्याचे शेपूट, वाकडे ते वाकडेच. चार्ल्सला २००३ साली काठमांडू शहरात पुन्हा अटक करण्यात आली. इथे त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या चार्ल्स शोभराज नेपाळच्या जेलमध्ये बंदिस्त आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.