आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
शीख म्हटले की आपल्या डोळ्यासमोर एका सहा फुटाच्या गोलाकार पगडी बांधलेल्या पुरुषाची मूर्ती उभी राहते. शीख समुदायातील पुरुष हे शीख संप्रदायाची प्रतिमा बनले आहे, पण शीख संप्रदायात महिलांना ही तितकेच महत्वाचे स्थान प्रदान करण्यात आले आहे, जितके पुरुषांना प्रदान केले आहे.
शीख धर्म त्यांच्यातील स्त्रीपुरुष समानतेसाठी ओळखला जातो.
शीख संप्रदायातील महिलांचा देखील त्या संप्रदयातील वीर पुरुषांप्रमाणे एक मोठा स्व-कर्तुत्वाचा, पितृसत्ताक मानसिकतेविरोधातील लढ्याचा इतिहास आहे.
पण पुरुषांच्या पराक्रमांच्या मोठ्या पडद्यासमोर शीख महिलांचे कर्तुत्व झाकोळले गेले आहे. शीख समुदायाच्या इतिहासात अशा अनेक महिला होऊन गेल्या आहेत ज्यांनी आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवला आहे. आम्ही तुमच्यासाठी पाच शीख महिलांच्या कर्तुत्वगाथा घेऊन आलो आहोत ज्यांनी इतिहासावर आपल्या कर्तुत्वाची मोहर उमटवून देखील त्या इतिहासाच्या पानात हरवलेल्या आहेत.
माता खिवी (१५०६ -१५८२)
शीख समुदायाच्या उदारतेचे प्रतिक असणाऱ्या ‘लंगर’ संकल्पनेला आकार देण्याचे काम माता खिवी यांनी केले. त्यांचा जन्म एका श्रीमंत कुटुंबात झाला होता.
त्या शिखांचे २रे गुरु अंगद देव यांच्या धर्मपत्नी होत्या. ते दोघेही अत्यंत वेगळ्या परिस्थितीत शीख संप्रदायात आले होते.
ज्यावेळी गुरु अंगद देव यांना गुरुपद बहाल करण्यात आलं त्यावेळी माता खिवी यादेखील त्यांच्या सोबतीने धर्मप्रसाराच्या कार्यात गुंतल्या, त्यांनी लोकांना शीख संप्रदायाचे महत्व पटवून देण्याचे असंख्य प्रयत्न केले होते.
सोबतच शीख संप्रदायातील स्त्रियांना समानता प्रदान करणाऱ्या तत्वज्ञानाचा प्रसार देखील माता खिवी यांनी केला होता.
त्यांनी शिखांचे आद्यगुरु नानक साहेब यांच्या तत्वानुसार गरजू लोकांना मोफत अन्न वाटपाची प्रथा चालू ठेवली आणि त्याला लंगर असे नाव दिले. यामुळे त्या लंगरला “माता खिवी दा लंगर” म्हणून ओळखले जाते.
त्यांनी लंगरच्या रचनेत अनेक सुधारणा घडवून आणत, त्यांनी त्यात एक मानवता आणि करुणेचा भाव रुजवला, जो आजपर्यंत पाळला जातो आहे.
अन्न ही देवाची देणगी आहे, तिच्यावर देवाचा अधिकार आहे, त्यामुळे कुठलाही भेद न करता तो सर्वांना मिळाला पाहिजे असा विचार त्यांनी मांडला होता.
त्यांच्या नावाने आज भारतातल्या बहुसंख्य गुरुद्वारात लंगरद्वारे प्रसाद वाटप आणि जेवण दिले जाते. अनेक उच्चपदस्थ लोक देखील ह्या लंगरमध्ये गरिबांना अन्न वाढताना दिसून येतात, हे माता खिविंच्या विचारांचे यश आहे.
माता सुंदरी (१६७०-१७४७ )
१६६० सालच्या आसपास जन्माला आलेल्या माता सुंदरी या शिखांचे नववे आणि शेवटचे गुरु गोविंदसिंग यांच्या पत्नी होत्या. पतीच्या निधनानंतर त्यांनी शीख धर्माचा सांभाळ केला होता.
असे म्हटले जाते की त्यांच्या राज्यात शीख समुदाय ४० वर्ष होता. त्यांनी आपल्या दिवंगत पतीच्या सर्व लिखाण एकत्रीत करून त्याचे प्रकाशन केले.
त्यांनी सर्व गुरुद्वारांच्या रचना व्यवस्थितपणे लागल्या आहेत की नाही, याची देखील काळजी घेतली.
त्यांनी खालसा सैन्य दलाचे नेतृत्व देखील केले होते.
त्यांनी आपल्या मुत्सुद्दी आणि आध्यात्मिक ज्ञानाच्या बळावर बाही मान सिंह याच्या मदतीने गुरु गोविंदसिंग यांच्या निधनानंतर अस्ताव्यस्त झालेल्या शीख सैन्याला पुन्हा एकत्र आणण्याचे काम देखील केले होते.
इतके मोठे कर्तुत्व असून देखील शूर मुलांची आई असेच वर्णन शिखांच्या इतिहासात करण्यात आले आहे.
माई भागो (१६६६- अज्ञात)
पंजाबच्या रणांगणात लढणारी पहिली महिला म्हणून माई भागो यांची नोंद करण्यात आली आहे. त्या जबाल कालन नामक गावाच्या रहिवासी होत्या आणि शीख पंथात त्यांची वाढ झाली होती.
खालसा सैन्य दल ज्यावेळी मुख्तसारच्या प्रदेशातून जात होते, तेव्हा तिची गाठ ४० शीख सैनिकांशी पडली, जे रणांगणातून पळ काढत होते.
त्यांनी शीख सैनिकांकडून वस्त्रे घेतली आणि त्या शीख सैनिकांना आपल्यासोबतच युद्ध भूमीवर लढण्यासाठी घेऊन गेल्या.
त्यांनी गटका या पारंपारिक शीख मुष्टीयुद्धाची कला तयार केली. खालसा सैन्य हे काही आजच्या सैन्यासारखं नव्हते ते औरंगजेबाच्या विरोधात्त गुरु गोविंदसिंहांनी तयार केलेले सैन्य होते. मुख्तसारच्या लढाईत २९ डिसेंबर १९०५ रोजी २५० खालसा सैनिक आणि २०,००० मुघल सैनिक यांच्यात युद्ध झालं. या युद्धात फक्त माई भागो वाचल्या आणि त्या युद्धात वाचलेल्या एकमेव शीख त्या होत्या.
या लढाईत ४००० मुघल मृत्युमुखी पडले होते. युद्धानंतर त्यांनी गुरु गोविंद सिंहांचा सुरक्षारक्षेची सेवा बजावली होती. त्या शेवटपर्यंत गुरु गोविंदसिंहांच्या सोबतीला होत्या.
सोफिया दुलीप सिंह (१८७६-१९४८)
सोफिया यांचा जन्म १८७६ साली झाला होता. भारताच्या बिटीशविरोधी लढ्याच्या सोफिया अग्रणी होत्या. त्या शीख साम्राज्याच्या महाराजा दुलीप सिंह यांच्या कन्या होत्या. त्यांच्या पित्याला ब्रिटीश साम्राज्याची तत्व न पाळल्यामुळे स्वतच्या राज्याचा त्याग करावा लागला होता.
पुढे त्यांचे निधन झाले आणि सोफियांचा सांभाळ खुद्द राणी व्हिक्टोरिया यांनी केला होता.
त्या फक्त १७ वर्षांच्या होत्या. पुढे १९०५ आणि १९०७ साली भारताला भेट दिल्यावर, त्यांच्या मनात ब्रिटीशांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या संग्रामाबद्दल आपुलकी निर्माण झाली होती.
त्या भारतात आल्यावर गोपाळ कृष्ण गोखले आणि लाला लजपतराय यांसारख्या कॉंग्रेसच्या मोठ्या नेत्यांना भेटल्या.
त्यांनी एका स्त्रीवादी संघटनेत प्रवेश केला आणि त्या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी महिलांना मतदानाचा अधिकार मिळावा या मागणीसाठी लढा उभारला. त्यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानाची भेटसुद्धा घेतली होती. त्यांना कुत्रा पाळण्याचा परवाना नसल्याच्या अत्यंत क्षुल्लक आरोपाखाली त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले.
पहिल्या महायुद्धावेळी त्यांनी रेडक्रॉस सोसायटीत प्रवेश घेतला आणि पहिल्या महायुद्धातील जखमी शीख सैन्याची सेवा केली. त्या सैनिकांना याची कल्पना देखील नव्हती, जी मुलगी त्यांची सेवा करत होती, ती महाराजा रणजित सिंहाची नात आहे.
गुलाब कौर (१८३१ -१९३१ )
गुलाब कौर या प्रसिद्ध अशा गदर पार्टीच्या सदस्य होत्या. आपल्या पतीसोबत अमेरिकेला निघालेले असताना वाटेत ते फिलीपाईन्सला थांबले, याठिकाणी त्यांचा संबंध गदर पार्टीशी आला. पुढे आपल्या पतीला मागे सोडून त्या अमेरिकेला गेल्या जिथे गदर पार्टी प्रामुख्याने कार्यरत होती.
भारताच्या स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या शीख लोकांनी ह्या गदर पार्टीची स्थापना केली होती. ही पार्टी कॅलिफोर्नियात स्थापन झाली आहे. त्यांनी पार्टीच्या पत्रकाच्या छपाईचे आणि त्यांच्या वितरणाचे काम हाती घेतले. पुढे त्यांना ब्रिटिशांनी प्रवासात अटक केली. त्यांना लाहोरच्या तुरुंगात ठेवण्यात आले आणि त्यांच्यावर तिथे अनन्वित अत्याचार करण्यात आले. १९३१ साली त्यांचा मृत्यू झाला. फार कमी लोकांना त्यांच्या त्यागाबद्दल आज माहिती आहे.
या पाच नाहीतर अशा अनेक शीख महिला आहेत ज्यांनी आपले आयुष्य राष्ट्रासाठी अर्पण केले होते.
आज त्यांचा इतिहास शीख समुदायातील पुरुषांच्या सोनेरी कर्तुत्वापुढे झाकोळला गेला असला तरी तो लपून राहिलेला नाही. त्यांच्या त्यागाला आणि निस्सीम राष्ट्रप्रेमाला आमचा सलाम!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.