आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
===
दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाने सगळ्यांच लक्ष वेधलं आहे. पुढे काही वर्षांत फक्त दिल्लीच नव्हें तर संपूर्ण जगाची काय परिस्थिती असेल याची कल्पना सगळ्यांना आली आहे. पण तरीही आपल्याकडून काही ठोस पाउलं उचलली जात नाहीत. १८ व्या शतकात विजेचा शोध लागला आणि मानवाने विज्ञानात प्रचंड मोठी झेप घेतली. औद्योगिक क्रांतीसाठी विजेचा शोध एक मैलाचा दगड होता. पुढे विजेवर चालणारे अनेक उपकरणं तयार केले गेले. मानवाचं आयुष्य सुखकर आणि सोपं करण्यासाठी दररोज नवनवीन शोध लावले जातात.
पण सद्ध्याची परिस्थिती बघता मानव आता या उपकरणांवर पुर्णपणे अवलंबुन आहे. त्यासाठी तो निसर्गातील साधनांचा त्याला हवा तसा उपयोग करून घेत आहे. त्यात वीज निर्मिती सर्वांत समोर आहे.
वीजेशिवाय आपण जगूच शकत नाही. मोठमोठ्या कारखान्यांपासून ते अगदी आपला मोबाईल चार्ज करण्यापर्यंत या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण विजेवर अवलंबून आहोत.
पण यामुळे नैसर्गिक साधनांचा किती मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहेत याचा विचार आपण करत नाही. याच टप्प्यावर आपण वीजेसाठी पर्यायी उपाय शोधायला हवा. हीच भविष्याची आणि वर्तमानाची गरज आहे. अक्षय ऊर्जा सर्वोत्तम उपाय आहे. सौर ऊर्जा , पवन ऊर्जा आणि जलविद्युत ऊर्जा सगळ्यांत स्वच्छ आणि कधीही न संपणाऱ्या ऊर्जांचा स्त्रोत आहे. सौर ऊर्जेचे काही प्रकल्प गेल्या काही वर्षांत भरतात उभारण्यात आले.
पण एवढी बलाढ्य लोकसंख्या असलेल्या देशाला एवढी ऊर्जा पुरेशी नाही. त्यामुळे सर्वांनीच आपल्यापरीने सौर ऊर्जेचा दैनंदिन कामात वापर करायला हवा.
सोलर कूकर, सोलर हीटर, सोलर स्ट्रीट लाईट्स, सोलर लँम्प असे अनेक उपकरणं दैनंदिन कामात खूप उपयोगी आहेत आणि उत्तम पर्याय आहेत.
पण हे उपकरणं सांभाळायला थोडं कठीण आहे. पण त्यावरहीं एका भारतीय तरुणाने तोडगा शोधून काढला आहे. विवेक काब्रा असं या युवकाच नाव. त्याचा जन्म जालन्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला . त्यांचा घरी त्याच्या बालपणापासूनच सोलर कूकर अन्न शिजवण्यासाठी वापरल जायचं.
त्या वयात सौर ऊर्जेवर शिजणार अन्न बघून त्याला नवल वाटायचं. पुढे आयआयटी बॉम्बे महाविद्यालयात त्याला प्रवेश मिळाला. कॅम्पस मधे येणाऱ्या कंपनीमध्ये त्याला नोकरी करायची इच्छा नव्हती.
इतरांसारखं सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत एकाच टेबलवर बसून काम करायची त्याची इच्छा नव्हती. याहून काहीतरी वेगळं करण्याचं त्याच्या मनात होतं. प्राध्यापकांना देखिल त्याच्या बुद्धिमत्तेच आणि या धोरणाच कौतुक वाटायचं. कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या प्राध्यापकांनी त्यांची आवड बघून त्याच्या समोर एक प्रस्ताव ठेवला. त्याला सोलर आणि थर्मल ऊर्जा प्रकल्पावर काम करशील का असं विचारलं.
या क्षेत्राविषयी सुरुवातीपासून त्याला आकर्षण होतच. आपल्या पाच मित्रांसोबत पुण्याला तो काम करु लागला. दहा महिन्यांत त्याने नोकरी सोडली व ती घरी परतला.
याच दरम्यान डब्ल्यूएचओचा एक सर्वेक्षण त्याच्या वाचनात आलं. या सर्वेक्षणानुसार एका वर्षात जवळपास १४ लाख लोकांचा चुलीमुळे निर्माण झालेल्या वायू प्रदूषणामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे मृत्यू होत आहे. इथूनच त्याला त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी मार्ग सापडला. आपल्या बालपणात वापरला जाणारा सोलार कुकर या लोकांपर्यंत पोहचवायचा असं त्याने ठरवलं.
२०१२ पासून आत्तापर्यंत त्याने १२ लाख मुलांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सोलार कूकर बनवायला शिकवला व चुलीच्या धूरापासून मुक्ती दिली. विवेकने सूर्यकुंभ नावाने एक नविन सण सुरू केला. एवढंच नाही तर दुबई आणि केनिया मधील मुलांनी देखिल याचं प्रशिक्षण घेतलं.
अनेक मुलं मुली इथे जमून या मागील विज्ञान समजून घ्यायचा प्रयत्न करायची व स्वतः बनवलेल्या कुकर मधे अन्न शिजवण्याचा आनंद लुटायची.
या सोलर कुकरची सर्वांत मोठी खासियत ही की हा जलरोधक आहे व एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेण्यास सोयीचा आहे. या मागे अनेक वर्ष प्रयोग त्याने केले व सोलर कुकरची नावीन्यपूर्ण आणि उपयोगी रचना उभी केली .या कल्पनेला पाठिंबा देत बँगलोर मधील तज्ञ देखिल सर्व वयोगटातील लोकांना स्वतःचा सोलर कुकर बनवण्याच प्रशिक्षण देत आहेत.
या कुकर मधे बेकिंग सुद्धा करु शकतो. ट्रेकिंग वर जाताना देखिल हा सोलार अन्न शिजवण्यासाठी सोबत घेवू शकतो, इतका तो हलका व सांभाळायला सोयीचा आहे.
कुठल्याही पदार्थाची चव ज्या प्रमाणे त्यात घातलेले मसाल्यांवर अवलंबून असते त्याच प्रामाणे किति तापमानावर शिजवल आहे व कुठल्या पद्धतिने शिजवल आहे, यावर देखिल अवलंबून असतं. जितक्या कमी तापमानावर शिजवले जाईल तितकं ते अन्न पौष्टिक असतं, थोडक्यात त्याचे पौष्टिक घटक त्यातच राहतात . याचा विचार करून देखिल हा सोलार कुकर बनवण्यात आला आहे.
आपण नेहमीच पौष्टिकता व चवीमधे ‘चवीला’ निवडतो. पौष्टिक अन्न चवीला तेवढं चांगलं नसेल पण आपल्या स्वास्थ्यसाठी आवश्यक आहे.
जर नैसर्गीक ऊर्जा खर्च न करता, पौष्टिक अन्न मिळणार असेल तर चवीशी थोडी तडजोड करायला हरकत नाही !
जर्मनीत सगळ्यांत मोठा हिवाळा असतो पण तरीही इतर जगाच्या तुलनेत सर्वाधिक सौर ऊर्जेचा वापर करणारा देश म्हणजे जर्मनी. भारतात सर्वाधिक काळ सूर्यप्रकाश असूनही आपण त्याचा योग्य तर्हेने वापर करण्यासाठी कमी पडत आहोत! या ऊर्जेचे अनेक फायदे आहेत. कुठेही उपलब्ध आहे, असीमीत प्रमाणात आहे व अगदि स्वच्छ ऊर्जा आहे.
या उर्जेसाठी निसर्गाचे व सूर्य देवाचे आभार मानायला हवे. येणाऱ्या पिढीचा विचार करून सौर ऊर्जकडे आपण वळायला हवं..
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.