आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
गुण्यागोविंदानं राहणारं एक प्रसिद्ध जमीनदार कुटुंब. अचानक काळाचं चक्र फिरतं आणि कुटुंबातील काही महत्त्वाच्या व्यक्तींचा मृत्यू होतो.हळूहळू सर्वांचीच वाताहत होत जाते. अशातच कुटुंबाचा शेवटचा वारसदार असलेल्या व्यक्तीचा देखील मृत्यू होतो. मात्र, एका तपानंतर ‘तो वारसदार’ अचानक एक साधू बनून येतो. मेलेला व्यक्ती जिवंत कसा होऊ शकतो? जर परत आलेला व्यक्ती बहुरूपी आहे तर, मृत व्यक्ती आणि त्याच्यात इतकी समानता कशी असू शकते? अशा कितीतरी प्रश्नांच्या गोंधळात न्यायालयात एक वाद उभा राहतो. साधू बनून आलेला व्यक्ती खरा आहे की खोटा, हे पडताळून पाहण्याचा वाद…
७०-८०च्या दशकातील एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभेल असं हे वर्णन आहे ना? मात्र, ही घटना प्रत्यक्षात घडलेली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील बंगाल प्रांतामध्ये असलेल्या ‘भवाल’ जमीनदाराच्या घरात ही नाट्यमय गोष्ट घडून गेलेली आहे.
आपल्या विस्तीर्ण देशात रहस्यमयी लोककथांचा मोठा खजिना आहे. अनेक राजा-महाराजा, राजकुमारी, जमीनदार यांचं विलासी जीवन, संपत्तीचे वाद याबाबतच्या अनेक कथा आपल्याला आजी-आजोबांकडून ऐकायला मिळतात. काही गोष्टी तर इतक्या प्रसिद्ध आहेत की, येणाऱ्या कित्येक पिढ्यांना त्या ऐकवल्या जातात. भवाल जमीनदाराची गोष्ट देखील बंगालमधील मुलांना नेहमी ऐकवली जाते. स्वातंत्र्यानंतर जन्मलेलं प्रत्येक बंगाली मुल तर ही गोष्ट ऐकूनच मोठं झालेलं आहे. इतकी प्रसिद्ध असलेली ही गोष्ट नेमकी आहे तरी काय हे आपणही जाणून घेऊया…
‘भवाल राज इस्टेट’ ही एकेकाळी ढाका जिल्ह्यातील दुसरी मोठी जमीनदारी होती. प्रदेशाचा विस्तार, महसूल आणि प्रतिष्ठेच्या दृष्टीने ते ख्वाजा घराण्यातील ‘ढाका नवाब इस्टेट’च्याही वरचढ होते.
सध्याच्या बांगला मोटर परिसरापासून ते तेजगावच्या आसपासची व ढाका शहराच्या उत्तरेकडील बहुतेक जमीन भवाल इस्टेट अंतर्गत होती. असं म्हटलं जात, या इस्टेटमध्ये २ हजार गावांचा समावेश होता. २६ एप्रिल १९०१ रोजी या इस्टेटीचे शेवटचे महान कारभारी राजेंद्र नारायण रॉयचौधरी यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात विधवा राणी बिलासमणी देवी आणि सहा मुले राहिले. इंदुमाय, ज्योतिर्मयी आणि तारिनमयी अशा तीन मुली होत्या तर रनेंद्र उर्फ बारो कुमार, रामेंद्र उर्फ मेझो कुमार आणि रवींद्र उर्फ सेझो कुमार अशी तीन मुलं होती.
१९०४ साली, गैरव्यवस्थापनाचा हवाला देऊन ‘कोर्ट ऑफ वॉर्ड्स’ने भवाल इस्टेट ताब्यात घेतली. दरम्यान, बंगालमधील राष्ट्रवादी गट आणि प्रिंट मीडियानं पूर्व बंगालमधील प्रमुख जमीनदारी वसाहतींवर ताबा मिळवण्याच्या प्रकरणावर मोठ्या प्रमाणावर आवाज उठवला. ब्रिटिशांचं हे नियंत्रण भारतीय भवाल घराण्याचा अपमान असल्याचं त्याचं म्हणणं होतं.
थोडाफार पाठिंबा मिळाल्यानं कुमारांची आई, राणी बिलासमणी यांनी कोर्ट ऑफ वॉर्ड्सविरोधात खटला दाखल केला आणि तो जिंकला देखील. परिणामी इस्टेटचे अधिकार पुन्हा तीन कुमारांकडे आले. पुढे १९०७ साली राणी बिलासमणी यांचं आजारपणामुळं निधन झालं.
त्यानंतर असुरक्षित शारीरीक संबंध आणि दारूच्या अतिसेवनामुळे रामेंद्र कुमार आजारी पडले. असं म्हटलं जातं की त्याला सिफिलीस (लैंगिक आजार) झाला होता. त्याच्या फॅमिली डॉक्टरनं पुढील उपचारांसाठी त्याला दार्जिलिंगला नेण्यास सांगितलं. १८ एप्रिल १९०९ रोजी रामेंद्र आपली पत्नी विभावती देवी, मेहुणा सत्येंद्रनाथ बॅनर्जी, फॅमिली डॉक्टर आशुतोष दासगुप्तासह दार्जिलिंगला गेला. त्यानंतर काही दिवसातच त्याचा मृत्यू झाल्याची आणि तिकडेच त्याच्यावर अंत्यसंस्कार केल्याची बातमी इस्टेटमध्ये पसरली.
मधला कुमार रामेंद्र याला त्याच्या पत्नी आणि मेहुण्यानेच डॉक्टरच्या मदतीनं विषप्रयोग करून मारल्याची चर्चा सर्वत्र होत होती.
याच दरम्यान सर्वात मोठा कुमार दारूच्या आहारी जाऊन मरण पावला त्यानंतर १९१३ साली सर्वात लहान कुमारचा देखील मृत्यू झाला. तिन्ही कुमारांना अपत्य नव्हतं. त्यामुळ भवाल घराणं वारसहीन राहिलं. ब्रिटिशांनी पुन्हा इस्टेट आपल्या ताब्यात घेण्याची तयारी केली.
पण, भवाल राजकुटुंबातील शक्तिशाली गटांनी एकत्र येऊन परिस्थितीला स्वतःच्या बाजूनं उलटवलं. यामध्ये सर्वात लहान कुमारची पत्नी राणी आनंदा कुमारी देवीनं महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तिनं राम नारायण रॉय नावाचा मुलगा भवालचा नवा कुमार म्हणून दत्तक घेतला. हा गुंता इतक्यातच सुटणार नव्हता. या प्रकरणातील महत्त्वाचं वळण येणं अद्याप बाकी होतं.
१९२०च्या दशकात ढाका येथील बकलंड बंधाऱ्यावर एक हिंदी भाषिक साधू आला. त्याला पाहून अनेकांना धक्का बसला. कारण तो साधू भवाल इस्टेटचा मधला कुमार रामेंद्रसारखाच दिसत होता. रामेंद्रचं कुटुंब त्या साधूला भेटायला गेले आणि त्याला घरी घेऊन आले. मात्र, रामेंद्रची पत्नी असलेल्या विभावती देवीनं तो आपला पती असल्याचं मान्य केलं नाही.
उपलब्ध माहितीनुसार त्या साधुला संस्थानात काहीही रस नव्हता परंतु परिस्थितीमुळे त्याला १९३३ साली ढाका न्यायालयात खटला दाखल करावा लागला. बॅरिस्टर बी. सी. चॅटर्जी यांनी साधुच्यावतीनं खटला लढला. त्यांनी शेकडो साक्षीदार आणि अनेक पुरावे न्यायालयात सादर केले. जवळजवळ प्रत्येकानं एकच साक्ष दिली की, कुमार रामेंद्र आपली पत्नी, मेहुणा आणि फॅमिली डॉक्टरच्या षड्यंत्राचा बळी ठरला. ढाका न्यायालयानंतर हा खटला कलकत्ता उच्च न्यायालयात गेला. तिथे ढाका न्यायालयाचाच निर्णय कायम ठेवण्यात आला.
यानंतर हे प्रकरण थेट लंडनच्या प्रिव्ही कौन्सिलकडे गेलं मात्र, तिथे देखील साधुचाच विजय झाला. त्यानंतर साधूला कायदेशीरपणे भवालचा दुसरा कुमार म्हणून घोषित करण्यात आलं. कुमार कलकत्ता येथील काली मंदिरात पूजा करण्यासाठी गेला, तिथे मंदिराच्या पायऱ्यावर अचानक त्याला स्ट्रोक आला आणि दोन दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. १३ ऑगस्ट १९४६ रोजी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्याच्या मृत्यूनंतर राणी विभावती देवीच्या मागणीनुसार साधूच्या मृतदेहाची पुन्हा तपासणी करण्यात आली. त्यानंतर आलेल्या फॉरेन्सिक अहवालाने पुष्टी केली होती की, शारीरिक ओळख पटवणाऱ्या २१ खुणांच्या आधारावर साधुच्या शरीराची तपासणी केली असता त्यातील तब्बल १९ कुमारसारख्या होत्या. सांख्यिकीय शास्त्राच्या आधारावर याची पडताळणी केली असता, ही संख्या खरोखरच जबरदस्त होती. यातून मृत झालेला साधू हाच कुमार रामेंद्र असल्याचं पुन्हा सिद्ध झालं.
साधू रामेंद्र होता की नाही हे त्यालाचं माहिती. मात्र, हे प्रकरण बंगालच्या इतिहासात गाजलेलं सर्वात मोठं रहस्यमयी प्रकरण ठरलं.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.