आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
भारतासारख्या तत्वज्ञानाबद्दल जागरूक देशात वेगवेगळ्या कालखंडात मोठ्या प्रमाणावर अद्वैताचा विचार समोर आला. मुळात देव आणि मनुष्य हे वेगळे नाहीतच हा विचार भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातून स्पष्ट होतो. ‘अविनाशि तु तद्विद्धि’, त्या अविनाशी तत्वाला ओळख. यातंच मानवी जीवनाच्या तत्त्वज्ञानाचं सार येतं. भारताच्या तत्वज्ञानातच मुळी ‘दुजाभाव’ नसल्याचं दिसून येतं. म्हणजेच ‘अ’द्वैत! पण भारतातील काही विचारधारांना हा विचार मान्य नाही. इतक्या मोठ्या लोकसंख्येत लाखो विचार समोर येतात, त्यांच्यावरही बाह्य विचारांचा संस्कार झालेला आपल्याला दिसतो.
पण वादे वादे जायते तत्वबोध:। या उक्तीनुसार संवादाच्या माध्यमातून मतभेद दूर करणारे आणि एखाद्या नव्या संकल्पनेला जन्म देणाऱ्या घटना भारतीय इतिहासात क्वचितच आहेत. त्याउलट दोन संस्कृतींच्या भिन्नतेमुळे होणारे संघर्ष भारताने अनादि कालापासून पहिले. काही संस्कृती दुधात साखर विरघळावी तशा भारतीय संस्कृतीमध्ये मिसळल्या गेल्या, अशा संस्कृतीतील लोकांना आपण आज वेगळं मनातही नाही. उदाहरणार्थ, पारशी संस्कृती.
संस्कृतींच्या संघर्षातूनच काही ‘शे’ वर्षांपूर्वी एक आग भारताच्या उत्तर भागात पेटली. खैबर खिंडीतून अनेक आक्रमणं झाली. त्यात प्रामुख्याने धर्मांध इस्लामची आक्रमणं होती. आजच्या अफगाणिस्तान पासून ते बंगालपर्यंत याच धर्मांध प्रवृत्तींनी प्रदेश व्यापला. त्यांच्यामते ‘काफिर’ असलेल्या संस्कृतीचा विध्वंस सुरु केला. याच विध्वंसात दोन मोठ्या वैश्विक विद्यापीठांसह अनेक ग्रंथं जाळले गेले, लाखो मंदिरं पाडण्यात आली. याआधीही शक, हुण आणि कुशाणांनी या भूमीवर आक्रमणं केली, पण अरबस्तान आणि मंगोलियाच्या भागाकडून येणारी ही धर्मांध आक्रमणं रोखायला भारतीय क्षात्र विफल झाले.
या मोठ्या पराभवासाठी आपापसातले वाद, द्वेष आणि लालसा या गोष्टी कारणीभूत ठरल्याच, पण त्याहूनही अधिक नियोजनाचा आभाव आणि अतिआत्मविश्वास किंवा आत्मविश्वासाचाच आभाव या गोष्टी कारणीभूत असल्याचं दिसून येतं. सुमारे ३०० वर्षं या आक्रमकांनी भारतभूमीला आपल्या टाचेखाली ठेवलं होतं. पण तीनशे वर्षांचा अंधःकार दूर करण्यासाठीच जणू सह्याद्रीच्या शिवनेरीवर एक सूर्योदय झाला. शिवरायांमुळे आणि त्यांनी निर्मिलेल्या स्वराज्यातील वीरांमुळे महाराष्ट्र भूमीचे या धर्मांध शक्तींपासून कसे रक्षण झाले हे वेगळे सांगायला नको.
पण उत्तर भारत, सिंध आणि काबुल-कंदाहार मध्ये हाहा:कार माजलाच होता. काशी विश्वनाथ, सोमनाथ, मथुरा आणि अयोध्या ही वैदिक समाजाची सर्वोच्च शिखरे परकीय ध्वजांनी भ्रष्ट केली होती. काशी विश्वेश्वर भंगल्यानंतर शिवरायांनी औरंगजेबाला लिहिलेले पत्र आजच्या काळातही लागू होण्यासारखे आहे. त्यामध्ये ते एका ठिकाणी लिहितात, “माणुसकी जाणीत नाही तो धर्म कसला?”
फक्त भारतच नाही तर प्राचीन मेसोपोटेमियन, रोमन, यहुदी आणि अन्य मूर्तिपूजक संस्कृतींबरोबरही या धर्मांध शक्तिंचा संघर्ष दिसून येतो. पानिपतच्या तिसऱ्या युद्धालाही गिलच्यांनी (अफगाणी लोकांनी) जिहादचे नाव दिले तर मराठ्यांनी हे युद्ध देशाच्या रक्षणार्थ लढले. (*मराठा हा एका जातीचा उल्लेख नसून इतिहासात रणांगणावर जे जे छत्रपतींचे प्रतिनिधी म्हणून लढले त्या सर्वांसाठी हा व्यापक शब्द आहे) खरंतर तो जिहाद नसून फक्त नजीबखान रोहिल्याच्या स्वार्थासाठी लढली गेलेली लढाई होती असं म्हटलं तर अतिशयोक्ती वाटायला नको. म्हणजेच जिहाद आणि धर्माच्या नावाखाली सत्ता हस्तांतरित करण्याच्या राजकारणाला इसवी सन १७६१ पासून किंवा त्याआधीपासूनच सुरुवात झाली, असे म्हणायला हरकत नाही.
अफगाणिस्तान, बलुचिस्तान, आणि तत्कालीन यु.एस.एस.आर. च्या अधिपत्याखाली असलेले पूर्व आशियामधील काही देश आणि अरब देश यांच्यामध्ये खनिज आणि नैसर्गिक संपत्तीचा मोठा साठा आहे. या साठ्यावर अधिकार सांगण्यासाठी आणि त्यातून धनार्जन करण्यासाठी अनेक देश, सत्ता आणि व्यक्ती आतुर असतात. यासाठीच एका राजकीय आणि मुत्सद्देगिरीचा खेळ सुरु झाला होता. अफगाणिस्तानमध्ये शेवटची शक्तिशाली सत्ता म्हणजे दुर्राणी साम्राज्याची, या सत्तेचा आत्मविश्वासही पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर डगमगला होता आणि अहमदशहा अब्दालीच्या मृत्यूनंतर हळू हळू त्या साम्राज्याची जागतिक राजकारणातील प्रतिमा ढळू लागली.
राजकीय आणि मुत्सद्देगिरीच्या खेळाची सुरुवात १९व्या शतकात “ग्रेट गेम”ने झाली, हा राजकीय आणि मुत्सद्देगिरीचा खेळ रशियन साम्राज्याने सुरू केला. या वेळी रशियन साम्राज्य दक्षिणेकडे जाण्याच्या आणि ब्रिटिश साम्राज्यावर अतिक्रमण करून हिंद महासागरात उतरायच्या प्रयत्नात होती, जेणेकरून त्यांना भारतात आपला पाया मजबूत करता येईल शिवाय ब्रिटिश साम्राज्यातील बलुचिस्तान, अफगाणिस्तान सारख्या देशांतील खनिज आणि तेल-संपत्तीवर अधिकार सांगता येईल.
आज ज्या दक्षिण-उत्तर आंतरराष्ट्रीय महामार्गाला मूर्तस्वरूप आलं आहे, तोच खरंतर रशियन साम्राज्यांकडून अनेक वर्षांपासून वापरण्यात येत होता. याचे महत्वाचे कारण म्हणजे भारताची बाजारपेठ आणि मध्य-पूर्वेतील खनिज आणि तेल संपत्ती.
महासत्तांच्या या संघर्षात स्थानिकांच्या भावना आपसूकच दुखावल्या जात होत्या. या दरम्यानच अनेक आशियाई देशांना स्वातंत्र्य मिळालं होतं, तसंच इस्लामी मूलतत्त्ववादाचा आणि कट्टरवादाचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत होता. पाकिस्तानच्या निर्मितीने अप्रत्यक्षरित्या त्याला प्रोत्साहन मिळालं. याच कट्टरतावादाचा आणि मूलतत्त्ववादाचा ‘गैरवापर’ दुसऱ्या महायुद्धानंतरच्या महाशक्तींनी करायचा ठरवला.
आता हा जुना ग्रेट गेम संपून “द न्यू ग्रेट गेम” सुरु झाला आहे, तो फक्त खनिज आणि तेल संपत्तीच्या बाबतीतच नाही तर सोयीसुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर), वाहतूक, व्यापार इत्यादींसाठी आहे. स्वातंत्र्यानंतर नेहरूंनी एक सर्वोत्तम निर्णय घेतला तो म्हणजे ‘नॉन-अलाइनमेंट’. तत्कालीन जागतिक राजकारणात दोन महाशक्तींचा पडद्यामागे संघर्ष सुरूच होता. त्यालाच पुढे कोल्ड-वॉर नाव प्राप्त झाले. कोल्ड वॉर कोणत्याही शस्त्रांविना गुप्तहेर संघटनांच्या, विज्ञान-तंत्रज्ञान आणि विघातक शस्त्रांच्या (वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन) स्पर्धेतून लढले जात होते. त्यामुळे आपसूकच या लढ्यात विचारधारा आणि राजकीय व्यवस्थांना महत्व प्राप्त झाले होते.
त्यावेळी जगात प्रामुख्याने दोन राजकीय आणि आर्थिक व्यवस्था होत्या. एक म्हणजे साम्यवादी व्यवस्था, ज्यामध्ये संपूर्ण अर्थकारणावर आणि उद्योगांवर सरकार नियंत्रण असेल. तर दुसरी होती लोकशाही आणि भांडवलशाही व्यवस्था, ज्यामध्ये अर्थकारण आणि उद्योगांवर सरकारचं प्रत्यक्ष नियंत्रण नसलं तरी यांचं नियमन सरकार करेल अशी व्यवस्था आहे. यापैकी साम्यवादी विचाराचा स्वीकार रशियाने म्हणजेच तत्कालीन यु.एस.एस.आर.ने केला होता. किंबहुना तिथूनच साम्यवादाचा उदय झाला होता.
भारतीय स्वातंत्र्यचळवळीत यांपैकी एकही विचारांचा जरी प्रभाव नसला तरी भारताचे पहिले पंतप्रधान नेहरू मात्र साम्यवादाकडे झुकत असल्याचा समज काही पाश्चिमात्य देशांनी करून घेतला. खरंतर वर सांगितल्याप्रमाणे नेहरूंची नॉन-अलाईनमेंटची म्हणजेच तटस्थ राहण्याची परराष्ट्र निती होती. याचाच स्वीकार अनेक आशियाई देशांनी केला. यामध्ये प्रामुख्याने युरोपीय वसाहतींपासून स्वातंत्र्य मिळालेले देश होते.
पण स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्वे साम्यवादाने प्रभावित झाली असल्याचा समज अथवा गैरसमज पाश्चिमात्य राष्ट्रांनी करून घेतला आणि भारताला साम्यवादी म्हणून ते समजू लागले. त्यात भर म्हणजे काही काळातच रशियाने भारताशी मैत्रीचा करार करून अनेक प्रकारची मदत भारताला देऊ केली. भारतीय सैन्यातील बरीच शस्त्रात्रे आजही रशियन आहेत. उदाहरणार्थ, मिग-२१ आणि सुखोई लढाऊ विमानं.
भारत साम्यवादी म्हणून त्याचा निपटारा व्हावा या हेतूने अमेरिका आणि काही युरोपीय राष्ट्रांनी पाकिस्तानला शस्त्र आणि निधीपुरवठा केला, इतकंच काय तर भारताबरोबर झालेल्या १९६५, १९७१ च्या युद्धांतही अमेरिकेने पाकिस्तानला सरळ सरळ पाठिंबा दिला. पाकिस्तानचा आण्विक कार्यक्रम चोरीचा आहे हे सर्वमान्य असूनही जगात या गोष्टीचा कोठेही विरोध होताना दिसला नाही. भारताने अणू-चाचणी केल्यावर मात्र जागतिक शांतता संकटात आली. अशा प्रकारे अमेरिकेने सर्वतोपरी मदत करूनही पाकिस्तान युद्धाच्या मैदानात धूळ खात राहिलं.
८०च्या दशकात दहशतवादाला सुरुवात झाली होती, ज्याप्रमाणे जिहादी मानसिकतेने धर्माच्या नावाखाली पाकिस्तान सैन्य आणि काही सामान्य तरुणही अफगाणिस्तानात रशियाविरुद्ध लढले होते त्याचप्रमाणे काश्मीर आणि अन्य भारतात लढण्याचं ठरलं आणि कारगिलच्या युद्धानंतर भारतात दहशतवादी कारवाया मोठ्या प्रमाणात होऊ लागल्या. भारतीय सैन्यानेही कंबर कसली आणि राष्ट्रीय रायफल्स या भारतीय सैन्याच्या युनिटने जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची दाणादाण उडवली. तरीही काश्मीरमधील बेरोजगारीमुळे आणि कट्टरतावादाच्या प्रसारामुळे दहशतवाद कमी होत नव्हता.
तिकडे अफगाणिस्तान आणि मध्य-पूर्वेत काही वेगळी परिस्थिती नव्हती. दहशतवाद प्रभावी होत चालल्याने अमेरिकेला आशेचे किरण दिसू लागले असावेत. कारण या दहशतवादाचा नायनाट करण्याच्या नावाखाली त्यांच्या सैन्याचं वर्चस्व त्या भूभागांवर राहणार होतं. पण खेळ पालटणार होता. एकीकडे चीन मोठ्या प्रमाणात प्रगती करून अमेरिकेला तोडीस तोड उभा राहातच होता.
मध्य-पूर्व, अरब देश आणि पाकिस्तानच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर धर्मांध इस्लाम आणि कट्टरतावादाचा प्रसार झाला. यातूनच ओसामा बिन लादेन सारख्या प्रवृत्तींचा जन्म झाला. यामध्ये कोणताही मूर्तिपूजक समाज हा ‘काफिर’ म्हणून गणला जाऊ लागला आणि जो त्यांचे निर्दालन करील त्याला स्वर्गप्राप्ती होईल अशा वल्गना होऊ लागल्या. यातूनच अनेक वाद निर्माण झाले. इस्रायल विरुद्ध दहशतवादी कारवाया होऊ लागल्या. मध्य-पूर्व भाग सतत युद्धाच्या छायेखाली होता. पण इस्रायलला अमेरिकेचा पाठिंबा असल्याने अमेरिकेने दोन दगडांवर पाय ठेवल्यासारखं झालं होतं.
दहशतवादाचा प्रश्न भारत वारंवार आंतरराष्ट्रीय माध्यमांसमोर आणि मंचावर मांडत असूनही त्याकडे जाणीवपूर्वकरित्या पूर्ण दुर्लक्ष करण्यात आले होते. दहशतवादाचा प्रश्न इतका गंभीर नाही अशा प्रकारची भूमिका आंतरराष्ट्रीय समुदायांनी विशेषतः अमेरिकेने घेतली होती.
११ सप्टेंबर २००१ रोजी इस्लामिक अतिरेकी संघटना अल कायदाच्या १९ अतिरेक्यांनी चार विमानांचे अपहरण केले आणि अमेरिकेत विमानांद्वारे आत्मघाती हल्ले केले. दोन विमाने न्यूयॉर्क शहरातील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवर्सवर आदळली गेली. तिसरे विमान वॉशिंग्टन डीसीच्या बाहेर पेंटागॉन या सुरक्षा संबंधी प्रमुख इमारतीला धडकले आणि चौथे विमान पेनसिल्व्हेनियाच्या शँक्सविले येथील एका शेतात कोसळले.
अमेरिकेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. अमेरिकेच्या मुख्य भूमीवर दोन महायुद्धांदरम्यानही जितका रक्तपात नाही झाला तितका या हल्ल्यामुळे झाला होता. भारताच्या दहशतवादाविरुद्ध एकत्रित लढा पुकारण्याचा आवाहनाला प्रतिसाद न देणारे अमेरिकेचे प्रशासन आता मात्र झोपेतून खडबडून जागे झाले होते. ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये जवळजवळ ३००० लोक मृत्युमुखी पडले, ज्यामुळे दहशतवादाचा सामना करण्यासाठी अमेरिकेच्या प्रशासनाला चालना मिळाली आणि जॉर्ज बुश यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी याविरुद्ध कारवाई करण्याचे ठरवले.
दहशतवाद्यांनी फक्त लोकच मारले नव्हते तर पेंटागॉन आणि वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला करून अमेरिकेच्या ‘सर्वशक्तिशाली’ आणि ‘महाशक्ती’ या उपमांना इजा पोहोचवली होती. ११ सप्टेंबरच्या सकाळी ९च्या दरम्यान २० हजार गॅलन जेट इंधनाने भरलेले अमेरिकन एअरलाइन्सचे बोईंग ७६७ विमान न्यू यॉर्क शहरातील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या उत्तर टॉवरवर आदळले. प्रचंड धक्क्याने ११० मजली गगनचुंबी इमारतीच्या ८०व्या मजल्यावर जळणारे छिद्र पडले, या हल्ल्याने तब्बल शंभर लोकांना ठार केले आणि शेकडो लोक वरच्या मजल्यांवर अडकले होते.
उत्तर आणि दक्षिण टॉवर रिकामे करण्याचे काम सुरू असताना, दूरचित्रवाणीच्या प्रतिनिधींनी सुरुवातीला एक अपघाताची घटना म्हणून बातम्या प्रसारित केल्या. पण पहिल्या विमानाने धडक दिल्यानंतर सुमारे वीस मिनिटांनी दुसरे बोईंग ७६७ विमान – युनायटेड एअरलाइन्स फ्लाइट १७५ आकाशात दिसू लागले, ते वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दिशेने झपाट्याने वळले आणि दक्षिण टॉवर्सच्या ६०व्या मजल्यावर आदळले. या धडकेमुळे एक मोठा स्फोट झाला. आसपासच्या इमारतींवर आणि रस्त्यावर जळता मलबा पडला. अमेरिकेवर हल्ला होत असल्याचे स्पष्ट झाले.
दुसरीकडे अमेरिकन एअरलाइन्स फ्लाईट ७७ विमान पेंटागॉन इमारतीच्या पश्चिमेकडे आदळण्यापूर्वी वॉशिंग्टन डीसी शहराभोवती फिरले. विमान आदळल्यानंतर लगेचच त्या बोईंग ७५७ मधील जेट इंधनामुळे विनाशकारी आगडोंब निर्माण झाला. पेंटागॉन या महाकाय इमारतीचा एक भाग कोसळला. पेंटागॉनमधील हा भाग अमेरिकी संरक्षण खात्याचे मुख्यालय आहे.
दहशतवाद्यांनी सैन्याच्या या मुख्यालयावर हल्ला केल्यानंतर १५ मिनिटांच्या अवधीतच वर्ल्ड ट्रेड सेंटरचा एक टॉवर कोसळला. यामुळे न्यू यॉर्क शहरात प्रचंड धुराचे आणि धुळीचे लोट उठले. या विशाल, गगनचुंबी इमारतीच्या वरील स्टील हे २०० किमी प्रती तासाच्या वाऱ्यातही टिकेल अशा प्रकारे बांधले होते. पण विमानाच्या इंधनाच्या ज्वलनाने त्या स्टीलनेही तग धरला नाही. तीन विमानांच्या हल्ल्यानंतर चौथे विमान एका शेतात कोसळले.
रात्री ९ वाजता अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी व्हाईट हाऊसच्या ओव्हल कार्यालयातून दूरदर्शनच्या माध्यमातून भाषण दिले आणि घोषित केले, “दहशतवादी हल्ले आमच्या सर्वात मोठ्या इमारतींचा पाया हादरवू शकतात, पण ते अमेरिकेच्या पायाला स्पर्श करू शकत नाहीत. हे कृत्य स्टीलचे तुकडे करतात, पण ते अमेरिकन पोलादी संकल्पाला धक्काही लावू शकत नाहीत. ” या नंतर अमेरिकेत डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी स्थापन झाले.
विमानांचे अपहरण करणारे सौदी अरेबिया आणि इतर अनेक अरब राष्ट्रांचे इस्लामिक दहशतवादी होते. सौदी अरेबिया मधून फरार असलेल्या ओसामा बिन लादेनच्या अल कायदा दहशतवादी संघटनेने या हल्ल्यासाठी वित्तपुरवठा केला होता. अमेरिकेने इस्रायलला दिलेला पाठिंबा, पर्शियन आखाती युद्धात त्याचा सहभाग आणि मध्यपूर्वेत सतत लष्करी उपस्थितीचा बदला घेण्यासाठी अल-कायद्याने हा हल्ला केला. काही दहशतवादी अमेरिकेत एक वर्षाहून अधिक काळ राहिले होते आणि त्यांनी अमेरिकन कमर्शियल फ्लाईट स्कुल्समधून उड्डाणाचे प्रशिक्षण घेतले होते. इतर ११ सप्टेंबरच्या एक महिना आधी अमेरिकेत आले होते.
ईस्ट कोस्ट वरील तीन विमानतळांवरील सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून १९ दहशतवाद्यांनी बॉक्स-कटर आणि चाकू सहजपणे मिळवले आणि ते कॅलिफोर्नियाला जाणाऱ्या पहाटेच्या चार विमानांमध्ये चढले. लांब अंतरमहाद्वीपीय प्रवासासाठी विमाने इंधनाने पूर्ण भरलेली होती. उड्डाणानंतर लगेचच, दहशतवाद्यांनी चार विमानांचे नियंत्रण घेतले. त्यांनी सामान्य प्रवासी जेट्सचे गाईडेड मिसाईल्समध्ये रूपांतर केले.
या हल्ल्यानंतर ऑपरेशन एंड्युरिंग फ्रीडम, अमेरिकन नेतृत्वाखालील अफगाणिस्तानातील तालिबान राजवट उखडून टाकण्याचा आणि तेथे असलेल्या ओसामा बिन लादेनचे दहशतवादी नेटवर्क नष्ट करण्याचा आंतरराष्ट्रीय प्रयत्न ७ ऑक्टोबर २००१ यादिवशी सुरू झाला. दोन महिन्यांच्या आत, अमेरिकन सैन्याने तालिबानला सत्तेमधून काढून टाकले.
काही तज्ज्ञांच्या मते, या कारवाईमुळे ओसामा बिन लादेनला दुरंड लाईन (अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमारेषा) पासून कोणत्याही अडचणींचा सामना करायला लागू नये यासाठी पाकिस्तानी गुप्तहेर संस्थेने भारतात संसदेवर हल्ला घडवून आणला.
संसदेवरील हल्ल्यामुळे भारताचं संपूर्ण सैन्य सीमेवर तैनात करण्यात आलं. स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सैन्याचं इतकं मोठं मोबिलायजेशन झालं होतं. याच भारतीय सैन्याच्या तैनातीला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानने दुरंड लाइनवरील सैन्य भारतीय सीमेवर आणलं, पण युद्ध होईल असं कोणतंही कृत्य केलं नाही.
अपेक्षेप्रमाणे याच वेळी लादेन अबोटाबादला पोहोचला. शेवटी २ मे २०११ रोजी त्याला अमेरिकेच्या सैन्याने शोधून काढले आणि पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून ठार केले. जून २०११ मध्ये, तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अफगाणिस्तानातून मोठ्या प्रमाणावर सैन्य मागे घेण्याची घोषणा केली. पण अमेरिकन सैन्याने माघार घेण्यासाठी ऑगस्ट २०२१ पर्यंत वेळ घेतला. आज या माघार घेण्यामुळे अफगाणिस्तान मोठ्या संकटात सापडल्याचं चित्र आहे. अफगाणिस्तानातील पंजशीरमध्ये सुरु असलेल्या लढाईत अफगाणी नागरिकांनी दहशतवादावर विजय मिळवावा. अन्यथा दहशतवादाच्या या राक्षसाला आणखी बळ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कारण युद्ध हेच शांतीची किंमत असतं.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.