आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
प्रयत्नांती परमेश्वर ही म्हण आपल्याकडे प्रचलित आहे, याचा अर्थ होतो की जर मनापासून प्रयत्न केले तर परमेश्वर देखील गवसतो. जर एखाद्या उदात्त ध्येयाचा अंगीकार करून जर प्रयत्न करत राहिलो तर एक न एक दिवस आपल्याला यश नक्की मिळतं.
एका ३३ वर्षीय युवकाने अश्याच प्रकारे एक ध्येय उराशी बाळगले, त्यासाठी त्याने स्वत:ची लाख रुपये पगाराची नोकरी सोडली आणि ध्येयाला साध्य करण्यासाठी प्रयत्न सुरु केले, आज त्याचा प्रयत्नांना यश मिळत आहे.
अरुण कृष्णमूर्ती असे या युवकाचे नाव असून, त्याने गुगलमधील आपली लाख रुपयांची नोकरी सोडून भारतातील तलावांच्या शुद्धीकरणाचं ध्येय बाळगून कार्य करायला सुरुवात केली. आज त्याचा प्रयत्नांना मोठं यश प्राप्त होताना दिसतं आहे.
अरुणने भारतातील १४ राज्यातील ९३ तलावांचे यशस्वीपणे शुद्धीकरण केले असून, अजून मोठ्या प्रमाणावर तलावांच्या शुद्धीकरणासाठी तो प्रयत्नशिल आहे. गुगलमधल्या एका चांगल्या पगाराची नोकरीला सोडून तलाव शुद्धीकरणाचे काम हाती घेण्यामागची प्रेरणा, त्याचा घराजवळच्या तलावाची दुरावस्था होय.
तमिळनाडू आणि चेन्नई येथे गेल्या काही वर्षात मोठं जल-दुर्भिक्ष्य निर्माण झालं आहे, यामुळे तेथील अनेक तलाव आटले होते, प्रदूषित झाले होते. अरुण हा मुळचा चेन्नईचा, तेथील मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्ये आणि आयआयएमसीएस मध्ये त्याचं शिक्षण झालं.
चेन्नईमधील तो लहानपणापासून ज्या तलावाच्या काठी खेळला-बागडला, त्या तलावाचं झालेलं प्रदूषित पाणी आणि त्याची झालेली दुरावस्था बघून त्याला वाईट वाटलं.
मग त्याने ठरवलं त्या तलावाच्या शुद्धीकरणाचं काम करायचं. त्याने तसं केलं देखील, त्याने तो तलाव शुद्ध केला खरा, पण त्याला जाणवलं कि जर एका तलावाची इतकी दुरावस्था आहे तर भारतातील इतर तलावांची अवस्था किती वाईट असेल याचा विचार त्याचा मनात आला.
बस्स! मग त्याने ठरवलं भारतातील तलावांचे शुद्धीकरण करायचे.
अरुणने त्याच्या कार्याची सुरुवात खूप आधी केली. २००८ साली त्याने फ्लोरिडा येथे पार पडलेल्या जेन गुडविल ग्लोबल युथ परिषदेत, भारतातल्या जलस्त्रोतांचे रक्षण कसे करायचे यावर आपले विचार मांडले.
त्यानंतर त्याने कधीही मागे वळून बघितले नाही. त्याने दोन पर्यावरणविषयक माहितीपटांचे दिग्दर्शन केलं तसेच रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि दिल्ली पोलिसांसोबत एकत्र येऊन जनजागृती करणाऱ्या जाहिरातींची निर्मिती केली आहे.
आपला मार्ग निश्चित केल्यावर त्याने एक अशासकीय संस्था सुरु केली, त्यामार्फत त्याने तलाव शुद्धीकरणाचे आपले काम सुरु ठेवलं. त्याची हि संघटना पूर्णपणे समाजाकडून मिळणाऱ्या पैश्यावर कार्यरत आहे.
त्याला वेगवेगळ्या माध्यामतून त्याचा कार्यासाठी देशाभरातील लोकांकडून देणग्या मिळतात.
‘तुमच्यातला माणूस शोधा’ हे त्याचा संस्थेचं ब्रीदवाक्य आहे. अरुण तलावांच्या स्वच्छतेसाठी तलावाच्या आसपास राहणाऱ्या लोकांनाच पुढे येण्यासाठी आवाहन करतो, प्रामुख्याने तो तरुणांना तलाव स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्यासाठी आग्रह धरतो.
तसंच त्याने आजवर हाती घेतलेल्या प्रत्येक स्वच्छता मोहिमेत तरुणांची मोलाची साथ मिळाली आहे, असं देखील तो प्रतिपादित करतो.
आता त्याची संस्था मुंबई, चेन्नई, कोलकाता यासारख्या अनेक शहरातील नदी आणि तलावांच्या शुद्धीकरणासाठी कार्यरत आहे. त्यांनी चेन्नईमधील एगातूर बॉड आणि तुतीकोरीन येथील पेरी कोलमच्या किनाथूकवडे येथील तलावाच्या प्रकल्पावर देखील काम केलं आहे. आज ते भारतभर ३९ प्रोजेक्ट्स वर काम करत आहेत.
अरुणच्या मताने तो हे सर्व उभारु शकला शिक्षणामुळे, शिक्षणामुळे त्याचा अंगी मुरलेल्या असंख्य गुणांमुळे त्याचात हे सर्व करण्याची इच्छाशक्ती निर्माण झाली, हे मूल्य प्रत्येकात रुजले पाहिजे आणि प्रत्येकाने पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेतला पाहिजे.
अरुणच्या संस्थेला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. २०१० साली त्याचा संस्थेला गुगल सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड प्रदान करण्यात आला. २०११ साली त्यांना ब्रिटिश कौन्सिल अवॉर्ड मिळाला.
तो प्रभावशाली ३५ तरुणांना मिळणाऱ्या रोलेक्स अवॉर्डचा मानकरी ठरला. त्याला ५०००० स्विस फ्रँकचा पुरस्कार मिळाला.
अरुण हा आज अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान आहे. एखाद्या उद्देशाला उराशी बाळगून त्यासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून देण्याचं एक उत्तम उदाहरण अरुण कृष्णमूर्तीच्या रूपाने आपल्या समोर आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.