आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
===
फिलिपाईन्समध्ये एका मोठ्या नैसर्गिक आपत्तीने डोकं वर काढलं असून, ज्याने फिलिपाईन्स सरकारचंच नव्हे तर त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या देशांचं सुद्धा धाबं दणाणलं आहे.
फिलिपाईन्सची राजधानी मनिला शहरापासून ६० किलोमीटरवर असणाऱ्या लूझॉन बेटावर असलेल्या ज्वालामुखींतून १४ किलोमीटर इतकी लांब राख बाहेर फेकली गेली आहे.
ह्यातून एका मोठ्या ज्वालामुखीच्या स्फोटाची शक्यता निर्माण झाली आहे. ताल असे ह्या ज्वालामुखीचे नाव असून गेली अनेक वर्षे हा ज्वालामुखी शांत होता. अचानक त्यात हालचाल होऊन मोठ्या प्रमाणावर राख बाहेर पडली आहे.
ह्या ज्वालामुखीच्या भयाने तब्बल २० हजारापेक्षा जास्त लोकांचे स्थलांतर निवासी छावण्यात करण्यात आले आहे. ११८ छावण्या सरकारकडून स्थापन करण्यात आल्या असून सर्वत्र एकदम भयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बरेच लोकं या भागातील स्वतःचे घर सोडून देशाच्या इतर भागात वास्तव्यास असलेल्या आपल्या नातेवाईकांच्या घरी रहायला गेले आहे. त्यामुळे विस्थापित झालेल्या लोकांचा आकडा मोठा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पण अशा परिस्थितीत सुद्धा काही लोक आपल्या मालमत्तेला आणण्यासाठी घरी परतले आहेत, त्यांना तिथून सुरक्षित जागी हलवण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरु झाला आहे. अनेक लोक हे ज्वालामुखीच्या बाजूच्या तळ्यात मासेमारीकरून आपला उदरनिर्वाह करतात.
जर ते प्राथमिक निवास छावणीत परतले तर त्यांच्या मुख्य व्यवसायावर गंडांतर येण्याची भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आहे.
ह्या ज्वालामुखीच्या सभोवताली दोन वर्तुळाकार झोन्स असून ह्यापैकी पहिला झोन हा १४ किमी लांबीचा आहे. ह्या १४ किमी लांबीच्या झोनमध्ये तब्बल ४ लाख ३५ हजार लोक वास्तव्याला आहे.
दुसरा झोन हा १८ किमीचा असून ह्यात ९ लाख ३० हजार लोक वास्तव्यास आहे.
मनिलाच्या ज्वालामुखी संशोधन केंद्राने १७ किमीच्या परिसरातील नागरिकांना हलवण्याची सूचना सरकारला केली आहे. त्यामुळे तब्बल १० लाख लोकांचे विस्थापन करण्याचे मोठे आव्हान सरकारसमोर उभे राहिले आहे.
ह्या ज्वालामुखीच्या आसपास असणाऱ्या लोकांच्या जीवाला मोठा धोका असून, जेव्हापासून त्या ज्वालामुखीचा पहिला विस्फोट झाला आहे, तेव्हापासून आतापर्यंत ह्या भागात तब्बल ३३५ लहान मोठे भूकंप झाले.
ही एका मोठ्या ज्वालामुखी स्फोटाची नांदी असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
त्यामुळे लोकांचा जीव वाचवायचा असेल तर लवकरात लवकर कृती करणे सरकारला भाग आहे.
हा ज्वालामुखी अचानक कार्यान्वित झाला असून, आधी त्यातुन ८०० मीटर राख बाहेर पडली आहे. तेव्हापासून ज्वालामुखी मोठ्या प्रमाणात राख ओकत आहे. शास्त्रज्ञांना लाव्हारसाचे अंश देखील बाहेर पडताना दिसले आहेत. मोठ्या प्रमाणावर बाहेर पडलेली राख ही आसपासच्या गावांवर जाऊन पडली आहे.
सोबतच हा राखेचा धूर पावसाच्या ढगात मिसळल्यामुळे अजून भयंकर परिस्थिती निर्माण झाली असून काळ्या रंगाचा पाऊस पडत असल्याचे बोलले जात आहे, ज्यामुळे गावंच्या गावं काळवंडली आहेत.
सर्वात भयानक गोष्ट म्हणजे ह्या ज्वालामुखीचा स्फोट कधी आणि कसा होईल, त्याचे परिणाम काय होतील याबाबतीत शास्त्रज्ञ देखील साशंक आहे. काही तासांत किंवा काही दिवसांत हा स्फोट होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.
याआधी १७५४ मध्ये हा ज्वालामुखी फुटला होता, त्यावेळी सहा महिने तो तसाच लाव्हा बाहेर फेकत होता.
१९११ साली अजून एकदा हा ज्वालामुखी फुटला होता तेव्हा त्याने १३४४ लोकांचे जीव घेतले होते. फार मोठे नुकसान या ज्वालामुखीच्या आग ओकण्यामुळे झाले होते. त्यावेळी ह्या ज्वालामुखीची तीव्रता देखील कमी होती.
लोकांना ह्या परिसरातून बाहेर काढण्यासाठी सेनेची मोठी फौज उतरवण्यात आली आहे. आज ह्या परिसरात सैन्याच्या ताफ्यातील तब्बल २० वाहनं आणि १२० अधिकारी कार्यरत असून मोठ्या प्रमाणावर लोकांचे स्थलांतर केले जात आहे.
तब्बल १० लाखाच्या आसपास लोकांचे स्थलांतर कुठे करायचे हा मोठा प्रश्न सरकारसमोर उभा राहिला आहे.
ह्यावेळी रेड क्रॉस सोसायटीने देखील लोकांच्या स्थलांतराला मदत करायला सुरवात केली असून तत्काळ लोकांना हलवून, पीडितांची सेवा करण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचं रेड क्रॉसच्या प्रमुखांनी म्हटलं आहे.
राखेमुळे ह्या भागातील पिण्याचे पाणी प्रचंड प्रदूषित झाले असून आता पिण्याच्या पाण्याचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. आता हा तुटवडा भरून काढण्यासाठी सरकारला देशाच्या इतर भागातून पाणी उपलब्ध करून द्यावे लागणार आहे.
याशिवाय अजून एक समस्या अशी आहे की फिलिपाईन्सकडे इतके जलस्त्रोत नाहीत, मग इतक्या मोठ्या लोकसंख्येला पाणी पुरवठा कसा उपलब्ध करून द्यावा ह्या विवंचनेत सरकार असणार आहे.
विस्फोटानंतर ह्या भागातील जनतेसमोर अजून एक मोठे आव्हान असणार आहे, ते जमिनीच्या नापिकीचे, ज्वालामुखीच्या स्फोटानंतर ह्या भागात मोठ्या प्रमाणात राखेचे उत्सर्जन होणार असून परिणामी जमिनीवर त्या राखेच्या कणांमुळे नापिकीचे संकट उभे राहणार आहे.
ह्या संकटाला सामोरे जाण्याइतकी यंत्रणा आणि पाठबळ आता सरकारला उभे करावे लागणार आहे. हे निश्चितच एक मोठे आव्हान असणार आहे.
एवढेच नाही तर तलाव देखील प्रचंड प्रदूषित होऊन त्या तलावातील जीव संपदा नष्ट होऊन, रोजच्या जगण्यासाठी इथल्या मासेमारीवर अवलंबून असलेल्या समाजाला मोठी पिडा सहन करावी लागणार आहे.
एकूणच ह्या ज्वालामुखीच्या स्फोटामुळे फिलीपाईन्सच्या अर्थकारणावर गंभीर परिणाम होणार आहे.
ह्या परिणामांना सामोरं जाण्यासाठी आणि पुन्हा संघर्ष करून उभं राहण्यासाठी फिलीपाईन्स किती तयार आहे, हे येणारा काळंच सांगणार आहे.
जागतिक स्तरावरून फिलीपाईन्सला मदत करण्यात येईल असे आश्वासन मिळाले असले तरी ह्या आपत्ती काळात नागरिकांना स्वत: संघर्ष करून ह्या समस्येवर उभं रहावं लागणार आहे.
फिलीपाईन्स हा एक गरीब देश आहे. ह्या देशाच्या जनतेला ह्या भयंकर समस्येला तोंड देण्याचे सामर्थ्य मिळो अशीच आपण प्रार्थना करू शकतो.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.