आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
जागतिक तापमानवाढ आणि तत्सम नैसर्गिक संकटे हा मानवाने निसर्गचक्रात केलेल्या ढवळाढवळीचा थेट परिणाम आहे हे तर आपण जाणतोच. आजपर्यंत माणसाने बरीच नैसर्गिक हानी केली आहे. पण स्वतःसाठी या नैसर्गिक संसाधनांचा मोठ्या प्रमाणात वापर करताना पुढच्या पिढ्यांच्या पृथ्वीवरील अस्तित्वाबद्दल कोणताही विचार आपण करत नाही यामुळे पुढच्या पिढ्यांचं भविष्य नक्कीच धोक्यात येण्याची शक्यता आहे.
‘अरल समुद्र’ हा जगातील चौथा सर्वांत मोठा तलाव होता. सध्याच्या कझाकस्तान आणि उझबेकिस्तान दरम्यान असलेला हा तलाव आयर्लंड देशाइतकाच मोठा होता. आज मात्र हा तलाव मूळ आकारापेक्षा दहा टक्के संकुचित झाला असून कालांतराने त्याच्या काही भागाचे वाळवंटात रूपांतर होईल असे दिसते. अशाच प्रकारे अनेक नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास मानवाद्वारे होत आहे. पण या तलावाचे एवढे मोठे नुकसान झाले तरी कसे याचा थोडक्यात आढावा घेण्यासाठी आजचा हा प्रयत्न..
मध्य आशियातील तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, ताझिकिस्तान, किर्गिझस्तान आणि कझाकस्तान या पाच स्तानांतील वाळवंटांवर सोव्हिएत युनियन कित्येक दशके लक्ष ठेऊन होतं. १९६० च्या दशकाच्या सुरुवातीला सोव्हिएत युनियनने ‘सिंचन योजना कार्यान्वित केली जात आहे’ हे जाहीर केले. अरल समुद्रामध्ये उत्तरेकडून सुर दर्या नदी आणि दक्षिणेकडून अमु दर्या नदी या नद्या प्रवाहित होत असल्याने तलावाचं बहुतांश पाणी याच नद्यांमधून येत असत. पण या दोन्ही नद्या तांदूळ, फळे, भाज्या आणि धान्य पिकवण्यासाठी आसपासच्या जमिनीकडे वळवल्या गेल्या. पण प्रामुख्याने हे सर्व पाणी ‘कापसाच्या भरघोस उत्पादनासाठी’ वळवले गेले.
असे केल्याने ‘अरल समुद्र’ तलाव कालांतराने कोरडा पडेल हे सोव्हीएट्सना चांगलेच माहिती होते. पण त्यांच्यासमोर ‘जगातील सर्वांत मोठे “कापूस निर्यातदार” बनण्याचे ध्येय होते. दोन्ही नद्यांमध्ये योग्य प्रमाणात पाणी नव्हते तरी या नद्यांचे प्रवाह वळवले गेले. असे केल्याने ‘धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का’ अशी परिस्थिती होऊन बसली. बहुतांश पाणी अरल समुद्राच्या दिशेने वाहत नव्हते पण ते पिकांपर्यंतही पोहोचत नव्हते. कारण सिंचन प्रणालीमध्ये अनेक दोष होते. बहुतांश पाणी सिंचन प्रणालीतून बाहेर गळून जात होते आणि बहुतांश पाण्याचे बाष्पीभवन होत होते.
सोविएट्स मात्र आपल्या निश्चयावर ठाम होते. त्यामुळे हे पाणी सतत प्रवाहित राहिले. यामुळे सगळी माती लवकरच पाण्याबरोबर वाहून गेली. त्याचप्रमाणे खते आणि कीटकनाशके यामुळे तेथील मातीची गुणवत्तासुद्धा खराब झाली. सोव्हिएत युनियनमध्ये, “पंचवार्षिक योजने”मध्ये निर्धारित केलेल्या ठराविक कोटाच्या तुलनेत उत्कृष्टता आणि उत्पादकता मोजली जात असे. त्यामुळे लोक अल्पकालीन लाभाकडे लक्ष देत होते. तसेच तात्काळ बक्षीस आणि शिक्षेच्या सोव्हिएत सिस्टीममुळे आपले दीर्घकालीन नुकसान होते आहे हे लोकांना कळतच नव्हते.
फक्त दोनच दशकांच्या काळात, १९८० च्या दशकापर्यंत अरल समुद्र अर्ध्याने संकुचित झाला होता. तसेच खत आणि कीटकनाशकांच्या अतिरिक्त वापरामुळे जमीनीचं आणि समुद्राच्या पाण्याचं मोठ्या प्रमाणात प्रदूषण झालं होतं. त्याचप्रमाणे उझबेकिस्तानचा प्रदेश जगातील सर्वांत मोठा कापूस निर्यातदार बनला होता. पण याचे भयानक परिणाम स्थानिक लोकसंख्येला भोगावे लागणार होते.
सगळे परिणाम दिसायला वेळ लागला असला तरी सिंचन योजना लागू झाल्यानंतर लगेचच हे घातक परिणाम दिसायला अत्यल्प प्रमाणात सुरुवात झाली होती. समुद्राच्या पाण्यातील खारटपणा वाढला आणि बहुतेक मासे मारले गेले. मासेमारी संस्कृती (दर वर्षी ४८ हजार टन मासे इतके उत्पन्न) कोसळली आणि ६० हजारहुन अधिक मच्छिमार लोकांना उदरनिर्वाहाचे काहीही साधन राहिले नाही.
कालांतराने पाणी कमी झाल्याने पाण्याच्या खालच्या थरांमध्ये क्षारांचा मोठा भाग साचून राहत असे. क्षाराचे प्रमाण जितके जास्त तितका तलावाच्या तळाचा थर जड झाला. एका विशिष्ट काळानंतर क्षाराच्या अति-प्रमाणामुळे पाणी झिरपणे बंद झाले. खालचे थर, मीठाने जड, थंड आणि अचल होते. वरचे थर, थंड पाण्यात मिसळण्यास सक्षम नसल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन अधिक वेगाने होत होते.
यामुळे अरल समुद्रातून राखाडी वाळू तयार होत होती. ही वाळू किनाऱ्यावर आल्यानंतर वाऱ्यामुळे आर्क्टिकपर्यंत गेली. या वाऱ्याबरोबर आलेल्या वाळूमुळे वाटेतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रदेशातील नैसर्गिक नुकसान यावरच थांबले नाही तर कीटकनाशके आणि खतांनी युक्त मातीचे भूमिगत थर समुद्रात शिरले. यामुळे पुन्हा समुद्राचे नैसर्गिक नुकसान झाले.
रसायनांमुळे मातीवर धुळीचा एक थरच तयार झाला. या रसायनांच्या थरांचे सूक्ष्म कण वाऱ्यामुळे जवळच्या शहरांवर आणि गावांवर पडू लागले. पाणी आणि हवेमध्ये रसायने मिसळली गेल्याने अनेक लोकांमध्ये विविध आजार बळावू लागले. त्यानंतरच्या वर्षांमध्ये कर्करोग, क्षयरोग, रक्ताचा कर्करोग, त्वचेचे संक्रमण आणि हिपॅटायटीसचे प्रमाण दुप्पट झाले. बालमृत्यूचे प्रमाण वाढले. गर्भधारणेदरम्यान नवजात बालकांना गंभीर अपंगत्वांना सामोरे जावे लागले. मातांनी आपल्या मुलांना स्तनपान देणे बंद केले.
आजपर्यंत, या प्रदेशात आजार आणि मृत्यूचे प्रमाण प्रचंड आहे. अनेक शहरे बेबंद झाली. एक उदाहरण म्हणजे ‘मुयनाक’. हे शहर आजच्या उझबेकिस्तानमध्ये आहे. या शहराची लोकसंख्या ४२ हजारांपेक्षा जास्त होती. आता त्याठिकाणी फक्त काही हजार लोकसंख्या आहे आणि अजूनही तेथील लोकसंख्या कमी होतच आहे.
१९९१ साली सोव्हिएट रशियाचा अस्त होऊन उझबेकिस्तान आणि कझाकिस्तान हे स्वायत्त देश झाले. प्रत्येकाकडे आता विभाजित अरल समुद्राचा एक भाग आहे. दक्षिण अरल समुद्राचा अर्धा भाग उझबेकिस्तानच्या प्रदेशात आला. उर्वरित अर्धा, लहान उत्तर अरल समुद्रासह कझाकिस्तानमध्ये राहिला.
उझबेकिस्तान तोपर्यंत जगातील सर्वात मोठा कापसाचा निर्यातदार बनला होता. नव्याने स्वतंत्र झालेल्या देशाचे नेते इस्लाम करीमोव्ह यांना पर्यावरणाची चिंता नव्हती. त्याला जगामध्ये आपली सर्वोत्तम आर्थिक स्थिती असल्याचे दाखवायचे होते. म्हणून जेव्हा प्रदेशाच्या कापूस धोरणाचा विचार केला तेव्हा काहीतरी बदलाव आणावा असे त्याला वाटले नाही. कीटकनाशके आणि खतांमुळे होणारे बहुतेक नुकसान करीमोवच्या राजवटीतच होत होते.
या दरम्यान कझाकस्तानच्या नागरिकांनी उत्तम पर्यायांची निवड केली. स्वातंत्र्य मिळवल्यानंतर लगेचच, त्यांनी सूर दर्या नदीच्या पाण्याच्या प्रवाहात सुधारणा करण्यास सुरवात केली. २००३ साली अरल समुद्राला दक्षिण भागापासून वेगळे करण्यासाठी काँक्रीट धरण बांधण्याची योजना जाहीर करण्यात आली. २००५ साली धरण बांधल्यानंतर लगेचच समुद्राची पातळी वाढू लागली. पाण्यातील क्षारांचे प्रमाण चार पटीने कमी झाले. गोड्या पाण्यातील माशांच्या काही डझन प्रजाती परत त्या तलावात आल्या. यामुळे प्रदेशातील मासेमारी उद्योगाचे अंशतः का होईना पण पुनरुज्जीवन झाले.
याउलट उझबेकिस्तान अजूनही आपल्या कापूस उद्योगाच्या सिंचनसाठी अमू दर्या नदीचा वापर करत आहे. अरल समुद्राबद्दल त्यांना कोणतीही चिंता असल्याचे दिसत नाही. कझाकस्तान नियमितपणे उत्तर समुद्रातून पाण्याची पातळी कमी होत चाललेल्या दक्षिणेकडील अरल समुद्रात पाणी सोडत आहे.
आज, उत्तर अरल समुद्र आणि दक्षिण अरल समुद्र समान आकाराचे आहेत: प्रत्येकी सुमारे १३०० चौरस मैल. आणखी काही वर्षांमध्ये, दक्षिण अरल समुद्र पूर्णपणे नाहीसा होऊन त्याच्या पात्राचे भूखंडात रूपांतर होईल आणि हा भूखंड जगातील सर्वात मोठ्या वाळवंटांपैकी एक होईल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.