The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्लेगचा बळी ठरलेल्या जहांगीर करानींचं दुकान १२० वर्षांनंतरही दिमाखात उभं आहे

by द पोस्टमन टीम
10 March 2025
in ब्लॉग, इतिहास, भटकंती
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


एशियाटीक सोसायटी ऑफ मुंबई येथून पुढे जात मुंबई टाऊन हॉलच्या पायऱ्यांवरून उतरताना आपण कुठल्या तरी ऐतिहासिक ठिकाणी फिरण्यासाठी आलो आहोत असेच वाटते. या परिसराचा नकाशा आजही तसाच आहे. आज या परिसराला थोडाफार नवेपणा आला असला तरी इथल्या जुन्या आठवणी कायम मनात रेंगाळत राहतात.

इथून पुढच्या परिसरातील इमारतींवर पारसी वास्तुकलेचा आणि शिल्पकलेचा छाप पडलेला दिसतो. इथून काही अंतर पुढे गेल्यावर पारसी बाजार लागतो. इथली बहुतांश दुकाने पारसी बंधावाकडूनच चालवली जात असत, म्हणून या बाजाराला पारसी बझार असे नाव पडले. या भागात पूर्वी अनेक प्रिटींग प्रेस आणि बुकशॉप्स होते. ही छोटी छोटी दुकाने देखील पारसी लोकांकडूनच चालवली जात असत. फ्रेशो-गार्ड प्रिटींग प्रेस आणि फोर्ट प्रिटींग प्रेस अशी त्यातली कित्येक नावे सांगता येतील. पण, काळाच्या ओघात ही नावे कधीच गायब झाली आहेत.

परंतु यातील एक नाव मात्र असे आहे, जे अजूनही या परिसरात दिमाखात उभे आहे. ते म्हणजे बेहरामजी बंगल्यातील तळमजल्यावरील जहांगीर बी करानी सन्स. एकोणिसाव्या शतकातील गुजराती पुस्तकांच्या प्रकाशनासाठी आणि छपाईसाठी हे दुकान प्रसिद्ध होते. याचे मालक जहांगीर बी करानी यांना प्लेगच्या साथीत मृत्यू आला मात्र त्यांच्या दुकानाचे अस्तित्व १२० वर्षानंतर आजही टिकून आहे.

जहांगीर बेझोंजी करानी यांचे बालपण मुंबईतच गेले. ब्रिटिशांच्या काळातील मुंबई नुकतीच कुठे कात टाकून मेट्रोसिटी बनण्याच्या तयारीत होती. मुंबईच्या लोकसंख्येने अचानक उसळी मारल्याने या शहराची अर्थव्यवस्था काहीशी कोलमडली होती. पण, याच दरम्यान आलेल्या पारसी व्यापाऱ्यांमुळे या शहराच्या अर्थव्यवस्थेची चाके पुन्हा रुळावर आली.



जहांगीर करानी यांचा जन्म १८५० साली मुंबईतच झाला. त्यांचे वडील एक नामांकित व्यापारी होते आणि त्यांची आई गृहिणी होती. परंतु तिचा स्वभाव मात्र खूपच गोड होता आणि ती हुशार होती. जहांगीर त्यांच्या भावंडात सर्वात छोटे असल्याने त्यांचे खुप लाड केले जात. त्यांचे प्राथमिक शिक्षण मेहताजी यांच्या शाळेत झाले. बलदेवराम मेहताजी यांच्या तालमीत त्यांचे पाचवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. या वयात जहांगीर फारच खोडसाळ होते.

परंतु नशिबाने त्यांना पुढील शिक्षणासाठी रुस्तमजी जमशेदजी शाळेमध्ये प्रवेश मिळाला आणि यासाठी त्यांना स्कॉलरशिपही मंजूर झाली. या शाळेत त्यांनी इंग्रजी शिकायला सुरुवात केली. याचवेळी त्यांच्या वडिलांना त्यांच्या व्यवसायात थोडी मंदी जाणवत होती. त्यांना दुकानात काही मदत व्हावी म्हणून जहांगीरजी शाळेला बुट्टी मारून दुकानात उपस्थित राहायचे. त्यांच्या वडिलांनाही जहांगीरमुळे व्यवसायात थोडी मदत होते म्हणून त्याचे दुकानात थांबणे आवडत असे.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

जहांगीरची शाळा बंद करून त्याला कायमचाच दुकानात थांबवून घ्यावा अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. मात्र, आईचा याला विरोध होता. तिच्या मते जहांगीरचे शिक्षण बंद करण्यात काही अर्थ नव्हता. उलट त्याने भरपूर शिकावे अशी तिची इच्छा होती. परंतु त्यांच्या वडिलांचा निर्णय दिवसेंदिवस अधिकाधिक पक्का होत गेला आणि शेवटी उन्हाळी सुट्ट्यानंतर त्यांची शाळा बंद झाली ती कायमचीच.

हळूहळू त्यांच्या वडिलांनी व्यवसायाची सर्व जबाबदारी जहांगीर यांच्यावरच सोपवली. अर्थात त्यांच्या आईने पुष्कळदा याला विरोध केला पण, त्यांच्या वडिलांनी आईच्या या विनवाण्यांना अजिबात भिक घातली नाही.

दोनच वर्षांत जहांगीर करानी यांनी आपल्या वडिलांचा व्यवसाय वाढवला. १८७० साली त्यांनी पारसी बझार रोडवर एक छोटेसे बुकशॉप सुरु केले. त्यावेळी गुजराती आणि मराठी पुस्तके छापणारी आणखी दोन बुकशॉप्स मुंबईत होती.

सुरुवातीला करानी यांनी शालेय पुस्तके आणि स्टेशनरी यांचाच स्टॉक ठेवला. शाळेची पुस्तके आणि व्यवसायमाला अशा पुस्तकांमुळे शालेय विद्यार्थ्यांनी अल्पावधीतच या दुकानाला चांगला प्रतिसाद दिला. लेखक आणि प्रकाशक स्वतःहून त्यांच्या दुकानात पुस्तकांची विक्री करण्याची विनंती करू लागले. १८७०च्या मध्यापर्यंत त्यांनी प्रकाशकांशी आणि लेखकांशी व्यवहार सुरु केला. पुस्तकाच्या मलपृष्ठावर पुस्तकाचे एकमेव विक्रेते म्हणून त्यांच्या दुकानाचे नाव छापले जाऊ लागले.

काही दिवसांतच करानी हे एक प्रसिद्ध पुस्तकविक्रेते म्हणून नावारूपास आले. १८७०च्या दशकात मुंबईत छापखाने स्थिरस्थावर झाले असले तरी साहित्यिक प्रकारात मोडणारी पुस्तके फारसी छापली जात नव्हती. त्यामुळे वाचकांना साहित्यिक मेजवानी मिळण्याचे वांधेच होते. त्या काळात बऱ्याच लेखकांना आपली पुस्तके स्वतःच प्रकाशित करावी लागत आणि छापणाऱ्यांना त्यांना स्वतःच पैसे द्यावे लागत. यासाठी लेखक काही आगाऊ रक्कम छापण्यासाठी म्हणून देत आणि त्या बदल्यात पुस्तकाच्या ठराविक प्रती घेत. उरलेल्या प्रती हे प्रिंटर्स स्वतः विकत आणि त्यांचा छपाई खर्च वसूल करत.

त्याकाळी मुंबईतील प्रसिद्ध छापखाने जसे की –बॉम्बे समाचार प्रेस, जेम जमशेद प्रेस आणि दुफ्तूर अश्कारा छापखाना अशा प्रिटींग प्रेस पारसी लोकांच्याच मालकीच्या असत. ही सर्व छापखाने फक्त मासिके किंवा पत्रिका छापण्याचेच काम करत किंवा झोरास्ट्रीयन धर्माशी संबंधित पुस्तके छापत असत.

१८७० नंतर या व्यवसायात खऱ्या अर्थाने प्रकाशकांची एन्ट्री होऊ लागली. याच वेळी पुस्तकांची मागणीही वाढत होती. ज्यामुळे प्रकाशकांना हा एक फायद्याचा सौदा वाटू लागला. हीच संधी साधत जहांगीर यांनी एकमेव प्रसिद्ध पुस्तके विक्रेते ते एकमेव प्रसिद्ध पुस्तक प्रकाशक होण्याचा निर्णय घेतला. यावेळी जहांगीर यांनी इतर कोणत्याही पुस्तकांपेक्षा शालेय विद्यार्थ्यांना उपयोगी ठरतील असे गाईड्स आणि ट्यूटोरीयल्स प्रकाशित केली. आधीच त्यांचे दुकान शालेय पुस्तके आणि वह्या यांसाठी प्रसिद्ध असल्याने त्यांच्या या नव्या उत्पादनांनाही चांगला प्रतिसाद मिळू लागला.

१८७९ साली त्यांनी पहिल्यांदा आपल्या ठरलेल्या चाकोरी बाहेर जाऊन एक उर्दू कवितांचा संग्रह प्रकाशित केला. त्याकाळी पारसी लोकांमध्ये उर्दू कवितेंची आवड होती. त्यांची मागणी लक्षात घेऊन त्यांनी ‘हिंदुस्तानी गायन संग्रह’ नावाचे पुस्तक प्रकाशित केले.

यानंतर अनेकांनी अशाच वेगवेगळ्या विषयांवर पुस्तके प्रकाशित करण्याचा सपाटा लावला. यात लोककथा आणि प्रसिद्ध गोष्टी, वैद्यकीय माहिती, इतिहास, ज्योतिषशास्त्र असे कितीतरी विषय होते. करानींनी आपल्या पुस्तकांना थोडेसे हटके शीर्षक देण्यास सुरुवात केली. ज्यामुळे त्या पुस्तकाच्या नावावरून तेच याचे प्रकाशक आहेत, हे चटकन ओळखले जाईल. उदाहरणार्थ १८८२ साली त्यांनी ‘करानीवालो रागास्तान’ नावाचा संग्रह प्रकाशित केला. यामध्ये गझल, लवणी आणि इतर सांगीतिक साहित्य एकत्रित करून प्रकाशित करण्यात आले होते. याचवेळी आपल्या व्यवसायाचा भाग म्हणून त्यांनी काही नियतकालिके प्रकाशित करण्यास सुरुवात केली.

१८८० साली त्यांनी ‘ज्ञानवर्धक’ नावाचे गुजराती मासिक प्रकाशित करण्यास सुरुवात केली. हे मासिक १८७३पासून प्रकाशित होत होते. त्यातील वेगवेगळ्या विषयावरील लेख खूपच लोकप्रिय होते. त्यानंतर त्यांनी ‘मुंबई पंच’ नावाचे साप्ताहिक वार्तापत्र सुरु केले. काही विनोदी चुटकुले, कार्टून, उपहासात्मक लेख आणि कविता, अशा प्रकारचे साहित्य या साप्ताहिकातून प्रकशित केले जात असे. परंतु हा उपक्रम एक वर्षाहून फार काळ चालू शकला नाही.

करानी आपली पुस्तके वेगवेगळ्या छापखान्यातून छापून घेत असत. परंतु आता त्यांचा प्रकाशनाचा व्यवसाय चांगलाच विस्तारला होता तेंव्हा त्यांनी स्वतःचाच छापखाना सुरु करण्याचे ठरवले. १८८९ मध्ये त्यांनी स्वतःची प्रिंटींग प्रेस सुरु केली. करानी यांचे नाव आता मुंबईतील तीन मोठ्या प्रिंटर्स आणि संस्थापकांसोबत घेतले जाऊ लागले.

प्रिटींग क्षेत्रातही त्यांचा चांगला जम बसला. एका मोठ्या कंपनीशी भागीदारी करून त्यांनी आपला उद्योगव्यवसाय चांगलाच विस्तारला. वाढत्या उद्योगाच्या आणखी विस्तारासाठी त्यांनी मुंबईत शाखाविस्तार करण्याचे ठरवले. मिडो रोड, कालबादेवी रोड अशा ठिकाणी त्यांनी आणखी दोन दुकाने सुरु केली. आता करानी गुजरातीसोबतच इंग्रजी पुस्तकेही प्रकाशित करू लागले. ही पुस्तके देखील ते स्वतःच्याच छापखान्यात छापत असत.

स्वतःची छापील पुस्तके विकाण्यासोबतच ते आता इंग्लंडहून पुस्तके आयात करू लागले. टाइम्स ऑफ इंडियासारख्या पेपरमधून त्यांच्या दुकानाच्या जाहिराती छापल्या जात असत. भारतीय प्रकाशन उद्योगात त्यांनी स्वतःचा चांगलाच दबदबा निर्माण केला होता.

अगदी कमी कालावधीत करानी उद्योग समूहाचे इवलेसे रोपटे एका वटवृक्षात रुपांतरीत झाले होते. परंतु जितक्या कमी कालावधीत हा उद्योग विस्तारला अगदी तसाच तो कोलमडला देखील. खर्च आणि जमा यांच्यातील ताळमेळ न जमल्याने लवकरच करानी उद्योग समूह तोट्यात आला. या उद्योगात गुंतवणूक करणारे जे मोठमोठे उद्योगपती होते त्यांनीही आपली गुंतवणूक काढून घेतली. करानी उद्योग समूहाचा ताबा लवकरच भाटीया कंपनीने घेतला. १८९५नंतर करानी या उद्योगातून पूर्णत: बाहेर फेकले गेले. १८९६ मध्ये अर्थार्जन करण्याच्या उद्देशाने त्यांनी सरस्वती प्रिंटींग प्रेस चालवण्यास घेतली.

करानी आता ना पुस्तक विक्रेते होते ना प्रकाशक होते. परंतु तरीही त्यांच्या नावाला मार्केटमध्ये आजही तितकीच प्रसिद्धी होती. १८९६च्या मार्चमध्ये त्यांनी पुन्हा एकदा श्री गणेशा करण्याचे ठरवले. यावेळी त्याच पारसी बझार रोडवर पुन्हा एकदा त्यांनी एक छोटेखानी पुस्तकांचे दुकान टाकले. त्यांच्या वडिलांप्रमाणेच जहांगीर करानी यांनी आपल्या मोठ्या मुलाला माणेकशहाला या व्यवसायात आणले. त्यावेळी माणिकशहांचे वय फक्त सोळा वर्षे होते. माणेकशहांनी देखील पुस्तक प्रकाशनासाठी मोठमोठी प्रोजेक्ट्स घ्यायला सुरुवात केली.

त्याच्या वडिलांनी म्हणजेच जहांगीर करानी यांनी लिहिलेले जहांगीर करानीवाली नवी अरेबियन नाईट्स नावाचे पुस्तक खूपच गाजले होते. याच पुस्तकाची तिसरी आवृत्ती पुन्हा प्रकाशित करण्याचा निर्णय माणेकशहा यांनी घेतला. या पुस्तकाची तिसरी आवृत्ती प्रिंटींगसाठी प्रेस मध्ये गेली. बऱ्याच पुस्तकांची प्रिटींगही झाली होती, तोच मुंबईत प्लेगच्या महामारीने धुमाकूळ घातला. या महामारीने अक्षरश: मुंबईशहर धुवून निघाले. मुंबईतील बहुतांश लोक हे स्थलांतरित मजूर होते. जे कामाच्या आशेने दूरहून मुंबईत येऊन स्थायिक झाले होते. अशा सर्व लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्नही तीव्र बनला.

कामासाठी कोणी कामगारच उपलब्ध नसल्याने अनेक प्रिंटींग प्रेस बंद पडल्या. यामुळे करानींच्या या तिसऱ्या आवृत्तीचे कामही अर्ध्यातच थांबवावे लागले. सरस्वती प्रिंटींग प्रेसचे कामही बंद पडले. त्यामुळे करानी कुटुंबियांसमोर पुन्हा एकदा कामाचा प्रश्न आ वासून उभा राहिला. या दरम्यान जहांगीर करानी यांची पत्नी आणि माणेकशहा यांच्या आईचा अचानक मृत्यू ओढवला.

आधीच संकटात असलेल्या कुटुंबावर आणखी एक आघात बसला. करानी यांना आठ लहान-लहान मुलांची काळजी लागून राहिली. आधीच प्लेगची साथ त्यात त्या लहान मुलांवरील आईचे छत्रही हरपले.

मुलांच्या सुरक्षेसाठी करानी यांनी मुंबई सोडून बडोद्याला जाण्याचा निर्णय घेतला. ते बडोद्याला गेले पण, तिथे जास्त काळ राहू शकले नाहीत. मुंबईत अर्ध्यावर सोडून गेलेली कामे पूर्ण करण्यासाठी ते एकटे मुंबईत परत आले. यावेळी मुंबईत प्लेगच्या साथीने उच्चांक गाठला होता. यातच त्यांनाही प्लेगची लागण झाली. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी भायखळ्यातील पारसी फिवर हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करण्यात आले पण, त्यांच्यावरील उपचार यशस्वी ठरले नाहीत. ४ फेब्रुवारी १८९७ रोजी जहांगीर करानी यांच्या प्लेगने मृत्यू झाला.

आधीच आईविना पोरक्या झालेल्या त्या आठ मुलांवरील पितृछत्रही काळाने हिरावून घेतले. अगदी कमी कालवधीत आई आणि वडील दोघांनाही गमावलेल्या या मुलांची अवस्था काय झाली असेल याची कल्पनाही करवणे शक्य नाही. परंतु माणेकशहा यांनी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. त्यांच्या वडिलांच्या मित्रांच्या मदतीने करानी यांचे पुस्तकाचे अर्धवट राहिलेले काम त्यांनी पूर्ण केले. १८९७ च्या जून मध्ये ‘जहांगीर करानीवाली अरेबियन नाईट्स’चे प्रकाशन झाले. जहांगीर बी करानी अँड सन्सने पुन्हा एकदा जोमात कामाला सुरुवात केली. या फर्मने मोठ्या प्रमाणावर झोरास्ट्रीयनिजमशी संबधित पुस्तके प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला.

१९११ साली माणेकशहा यांनी आर्ट प्रिंटींग वर्क्स सुरु केले. इथे ते विविध प्रकारचे ग्रीटिंग कार्ड छापत आणि आपल्याच दुकानात विक्रीसाठी ठेवत. गुजराती भाषेत छापलेले आणि फक्त पारसी सणांसाठी डिझाईन केले गेलेले हे कार्ड्स त्याकाळी खूपच लोकप्रिय झाले होते.

माणेकशहांनी आपल्या वडिलांनी आधी प्रकाशित केलेले पुस्तकांचे हक्कही डी लाखीमदास अँड कंपनीकडून विकत घेतले. १९४० मध्ये माणेकशहा यांचा मृत्यू झाला. परंतु त्याआधी त्यांनी स्टेशनरी, डायरीज गिफ्ट कार्ड्स- यातही इम्ब्रोयडरी केलेले, सेंटेड, फोटोग्रेव्हर, असे अनेक नवीन प्रकार बाजारात आणले होते. पूर्वी हे कार्ड्स फक्त पारसी सणांच्या निमित्तानेच छापले जात असत. आता मात्र ख्रिसमस, नववर्ष आणि दिवाळी नवरोज अशा बहुतांश सर्वच सणांसाठी त्यांनी ग्रीटिंग कार्ड्स छापले जात होते. एकाचवेळी आईवडील दोघांचाही मृत्यू झाल्याने निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीतून माणेकशहा यांनी पुन्हा एकदा एकेकाळी डबघाईला गेलेला व्यवसाय स्वतःच्या हिमतीवर उभा करून दाखवला.

१९२० साली पारसी बझार मधील जहांगीर बी करानी अँड सन्सचे हे दुकान फिरोजशाह मेहता रोडवर स्थलांतरीत केले तेंव्हापासून आजतागायत ते त्याच ठिकाणी दिमाखात उभे आहे. मुंबई शहराच्या उभारणीत पारसींचे योगदान मोठे आहे. त्यात जहांगीर बी करानी हे शेवटचा दुवा ठरले.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

१६० वर्षांपूर्वी झालेल्या संथाल विद्रोहाने आपल्याला आपल्या मातीसाठी लढायला शिकवलं

Next Post

मराठवाडी नेते, जनता अन् पंजाबचे शेतकरी…!

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
भटकंती

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

6 June 2024
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
Next Post

मराठवाडी नेते, जनता अन् पंजाबचे शेतकरी...!

अजब कॅलेंडर! अजूनही या देशात २०१७ सालच चालू आहे!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.