आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
मराठवाड्यातील नेत्यांना कायम एक भ्रम असतो तो म्हणजे ते अख्ख्या महाराष्ट्राचे नेते आहेत अन् ते प्रगत लोकांचे नेतृत्व करतात असं ते कायम दाखवतात. यांचे जिल्हे विकासाच्या आकडेवारीवर तपासले तर बिहारच्या खालोखाल किंवा आजूबाजूला खितपत पडलेले सापडतील.एक दोन अपवाद वगळता बाकी जवळपास मराठवाड्यातील सगळेच नेते स्वतःच्या जिल्ह्याबाहेर जाऊन स्वतःला राज्याचा नेता म्हणून प्रस्थापित करू शकले नाहीत. त्यात हे नेते मराठवाड्याला मागास समजतच नाहीत, हक्काने यांनी मराठवाड्यासाठी कधी काही मागितले असेल असे आठवत नाही.
पण न मागता मराठवाड्याला मराठवाडा विद्यापीठ नामांतरासारखे बिना पेट्रोल आग लावणारे मुद्दे पश्चिम महाराष्ट्राच्या कृपेने मिळालेले आहेत अन् ते आमच्या लोकांनी सहर्ष स्वीकारले आहेत .
मला आठवतं, शिवराज पाटील चाकूरकर गृहमंत्री असताना जेव्हा त्यांच्या जनता दरबारात गोरगरीब मदतीसाठी जायचा तेव्हा ते,
“मी देशाचा नेता आहे, माझ्याकडे राष्ट्राचे प्रश्न घेऊन लोक येतात. मी देशपातळीवर राजकारण करतो. असले बदली करा, खोट्या केसेस मिटवा, जमिनीचे वाद अन् शासकिय योजनांचे अनुदान वगैरे गोष्टीत मदत लागत असेल तर तुम्ही विलासराव अन् शरद पवारसारख्या लोकल लेवलच्या नेत्यांकडे मागत चला…!” असं त्या गरिबाच्या मुस्काटात पेटवल्यासारखं बोलायचे.
याच गृहमंत्र्याला इथल्या लोकांनी लोकसभेत आपटवला अन् २६/११ नंतर जबरदस्ती घरी बसवला. पण मुळात हा माणूस सलग ७ वेळा निवडून जाऊ शकला यातच मराठवाड्याच्या मागासलेपणाचे मूळ आहे.
इथली जनता म्हणजे चढाओढीच्या लढाईत कहर आहे. आम्ही पोरं जोपर्यंत पुणे बघितलं नव्हतं तोपर्यंत १२वीत असताना विकासाच्या मुद्द्यावर वादविवाद करत बसायचो. बीडची जनता स्वतःला परभणीपेक्षा प्रगत समजायची. परभणीची जनता स्वतःला बीडपेक्षा विकसित समजायची. दुष्काळी लातूर तीन मजली पुलाच्या जोरावर स्वतःला या दोन जिल्ह्यापेक्षा उजवा समजायला लागायचं. अन् उरले सुरले जालना, हिंगोली, उस्मानाबाद आपण जिल्हा आहोत हेच बास झालं म्हणून स्पर्धेत प्रेक्षक म्हणून शामील व्हायचे. त्यात नांदेड अन् औरंगाबादची पोरं आम्ही लंडन अन् पॅरिसच्या बरोबरीत विकसित झालो असून पुढची पन्नास वर्षे हाय हे टिकवून धरलं तरी बीड, परभणी आणि उस्मानाबादच्या कायम पुढेच असू म्हणून माज दाखवायची…!
विदर्भ मागास म्हणून काहीना काही बार्गेन करून, स्वतःचे नेते गल्ली ते दिल्ली बसवून एकत्र मिळून मेट्रो, आयआयएम, एन.आय.टी, आयआयटी, तसेच समृद्धी महामार्ग जो विदर्भाला थेट मुंबईशी जोडतो अन् इतर संस्था गोळा करून विदर्भात घेऊन जातो तेव्हा ते बघून मराठवड्यातला दुष्काळी माणूस वेरूळ-अजिंठातल्या बोधीसत्त्वासारखा मुक्तीची वाट आवासून बघतो.
थोडासा अन्याय होऊ द्या विदर्भवाले “वेगळा विदर्भ द्या” म्हणून घोडे नाचवायला सुरुवात करतात अन् मराठवाडा दुष्काळात सांगलीवाल्यांनी आम्हाला पाण्याचे डबे भरून वाघिणी रेल्वे पाठवल्या म्हणून खुश होतो. विदर्भवाल्यांनी पुण्यातले बाणेर, वारजे अन् कोथरुडसारखे पॉश, विकासित भाग व्यापून टाकलेत अन् आमच्या पोरांनी शिक्रापुर, वाघोली, भोसरी ही आजूबाजूची गावं व्यापून टाकलीत. काहीजण तर आता तिथल्या ग्रामपंचायतला मतदान आलं म्हणून खुश आहेत.
भागवाभागवी (तडजोड) ही इथल्या लोकांच्या रक्तात इतकी मिसळली आहे की हाय त्यात समाधान मानून दिवस काढण्यापलीकडे काही होईल असं स्वप्न देखील इथल्या जनतेला पडत नाही आणि ते कुणाला पडलं तर त्याला सगळे मिळून येड्यात काढण्यापलीकडे दुसरा बदल होत नाही.
मराठवड्यातले शेतकरी हक्काच्या पाण्यासाठी लढण्याऐवजी नगरची धरणं भरली की मग सोडतील जायकवाडीत पाणी म्हणून वाट बघतात.
सगळं इथं न भांडता मिळाले पाहिजे म्हणून इथली जनता निरामय वागते अन् तिकडे पश्चिम महाराष्ट्रवाले दुष्काळात पिण्यासाठी पाणी मागितले तर रक्ताचे पाट वाहतील म्हणून मराठवाड्याला धमक्या देतात. असाच एक धमक्या देणारा कोल्हापूरचा जयवंत आवळे आपल्याच लातूरच्या लोकांनी खासदार म्हणून निवडून आणला. इतके निष्क्रिय लोक आहेत त्यामुळे त्यांचे नेतेही तितकेच निष्क्रिय अन् आळशी आहेत.
मीही हसायला कंटेंट मिळतं म्हणून दानवेच्या भाषिक शैलीच्या अन् मराठवाडी बाजावर आणि मराठवाडी माणसाच्या माणूसकीवर चार ओळी लिहून मोकळा होतो. बाकी आमचा जिल्हा, मराठवाडा हे सगळं मागास आहे, भकास आहे अन् त्यात अजून शे-दोनशे वर्षे तरी बदल होणार नाही याची हमी आज इथेच देतो. बदलाचे अन् विकासाचे स्वप्न बालीश असताना पडायची आता सगळा धूर दिसतोय. हे निराशावादी चित्र नाही हे वास्तव आहे. हे सगळं आठवलं कारण याला पंजाबच्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या हक्कासाठी जो दिल्लीत लढा उभारला आहे त्याची मोठी किनार आहे.
टिपः इतकं सगळं नकारात्मक वाचून मी निराशावादी मनुक्ष झालोय असं वाटणाऱ्या मानसरोगतज्ज्ञांना माझा आधीच कोपरापासून दंडवत.
या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.