आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
गेल्या काही दिवसांपूर्वी कोलकात्यामध्ये राहणाऱ्या बंगाली राष्ट्रवादी लेखिका गार्गी चॅटर्जी यांनी ट्विटरच्या माध्यमातून ‘अहोम राजवंशाचा’ संस्थापक असलेल्या सुखापा राजाला ‘चिनी आक्रमक’ म्हटल्यामुळे अटक करण्यात आली. त्यांच्या त्या ट्विटमुळे आसाममधील जनतेत रोष पसरला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर आसामचे मुख्यमंत्री सरबानंद सोनवाल यांनी गार्गी चॅटर्जी यांचा अटकेचे आदेश दिले.
हा राजा सुखापा आणि अहोम राजवंश कोण आहेत, यांचा आसामच्या इतिहासाशी असा कुठला संबंध आहे की आसामच्या जनतेत रोष पसरला आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी टीकाकाराला अटक करण्याचे आदेश दिले?
ते आपण जाणून घेऊ.
चौलांग सुखापा हा १३ व्या शतकातील अहोम साम्राज्याचा संस्थापक होता. अहोम राजवंशाने आसामच्या भूमीवर तब्बल ६ शतके राज्य केले.
सुखापा मूळचा ब्रह्मदेशातील होता. १३ व्या शतकात तो उत्तर ब्रम्हदेशातून ब्रम्हपुत्रेच्या खोऱ्यात ९००० सैनिकांना घेऊन आला.
आसामच्या इतिहासावर लिहलेल्या हिस्ट्री ऑफ आसाम या पुस्तकात एडवर्ड गेट नावाचा इतिहासकार लिहितो की सुखापा इसवी सन १२१५ मध्ये आपले ८ सरदार आणि ९००० चे सैन्य घेऊन उत्तर ब्रह्मदेशातील मौलुंग येथून ब्रम्हपुत्रेच्या खोऱ्यात उतरला. त्याच्यासोबत बहुतांश पुरुष सैनिक होते. त्याच्याजवळ दोन हत्ती आणि ३०० घोडे होते.
गेट पुढे लिहितो की, १२३५मध्ये आसामच्या चराईदेव भागात सुखापा आणि त्याचे सैन्य स्थिरावले. त्यांनी त्यांच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येकाचा पराभव करत आसामच्या या भागापर्यंत मजल मारली. चराईदेवमध्ये सुखापाने अहोम साम्राज्याचा पाया रचला.
अहोम राजवंशाला स्वतःची एक भाषा होती आणि स्वतः चा एक धर्म होता. परंतु अनेक शतके राज्य केल्यानंतर अहोम लोकांनी हिंदू धर्माचा आणि आसामी भाषेचा राजभाषा म्हणून स्वीकार केला. त्यांनी तिथल्या स्थानिक आदिवासींच्या संस्कृतीचा स्वीकार केला.
एडवर्ड गेट यांनी लिहलं आहे की सुखापासोबत बहुतांश पुरुष आले होते त्यांनी आसामच्या प्रदेशातील स्थानिक महिलांशी लग्न केले. आज अहोम जातीचे तब्बल ४० ते ५० लाख लोक आसाममध्ये राहतात.
सुखापा यांनी स्थानिक आदिवासी जमाती सुतीया, मोरान्स आणि कचारिस यांच्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करत. त्यांच्या मुलींशी लग्न करून पारिवारिक संबंध प्रस्थापित केले.
‘बोर असोम’ अर्थात आसाम साम्राज्याच्या संस्थापनेत सुखापा यांच्या प्रयत्नाने मोलाची भूमिका बजावली होती. सुखापा आणि त्याच्या माणसांनी आसामच्या प्रदेशात एकछत्री अंमल प्रस्थापित केले, त्यांच्या सैन्यात आणि साम्राज्यात विविध जाती जमातीचे लोक एकत्र आले. असंख्य आदिवासी टोळ्यांशी अहोम राजवंशाने शतकानुशतके आपले संबंध प्रस्थापित केले होते. यामुळेच दक्षिण पूर्व आशियात त्यांचा मोठा दरारा होता. सुखापा या अहोम राजाला या प्रचंड साम्राज्याचा शिल्पकार म्हणून या भागात पुजले जाते.
सुखापा आणि त्याच्या साम्राज्याच्या स्मृतीप्रित्यर्थ आसाममध्ये २ डिसेंबरला असोम दिवस साजरा केला जातो. मागच्या वर्षीच्या असोम दिवसाच्या कार्यक्रमात आसामचे मुख्यमंत्री सरबानंद सोनवाल यांनी सुखापाबद्दल गौरवोद्गार काढत त्याला राष्ट्रीय आयकॉन म्हटले होते.
गार्गी चॅटर्जी या बंगाली विचारवंत आणि लेखिकेने, सुखापा यांना भारतावर आक्रमण करणारा एक चिनी आक्रमक म्हणून त्याचा धिक्कार केला होता, इतकंच नाही त्यांनी भाजपाला त्याच्या नावाने ‘राज्य दिवस’ साजरा करतात म्हणून त्यांच्यावर टीका केली होती. चॅटर्जी यांच्या मते आसाममधील फुटीरतावादी उल्फा या संघटनेच्या लोकांचा सुखापा हा श्रद्धास्थान असून भाजपाने अशा चिनी आक्रमकाचे कौतुक करणे चुकीचे आहे.
गार्गी चॅटर्जी यांच्या वक्तव्यामुळे आसाममधील जनता पेटून उठली आणि सुखापाच्या अपमान करणाऱ्या महिलेवर कारवाई केली जावी अशी मागणी जोर धरू लागली, आसामी जनतेचा राग लक्षात घेऊन आसामच्या मुख्यमंत्र्यांनी गार्गी चॅटर्जी यांच्या अटकेचे आदेश आसाम पोलिसांना दिले.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.