आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकत्याच पार पडलेल्या मन की बात या कार्यक्रमामध्ये एका व्यक्तीचा उल्लेख केला ज्याने स्वबळावर कर्नाटकच्या एका खेड्यात ४० वर्षांची मेहनत घेऊन कुठल्याही प्रकारची आर्थिक अथवा मनुष्यबळाची सहायता न घेता कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. त्या व्यक्तीचे नाव केरे कामेगौडा आहे. आत्मनिर्भरतेचे यशस्वी उदाहरण म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे कौतुक केले आहे.
केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनीदेखील कामेगौडा यांच्याशी चर्चा केली असून त्यांनी यांच्या कामाचे कौतुक करत, त्यांना संपुर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी कर्नाटक सरकारला कामेगौडा यांच्या कार्यात त्यांना सहाय्य करण्याचे आदेश जारी केले आहेत.
तर, हे केरे कामेगौडा कोण आहेत आणि ते गेल्या ४० वर्षांपासून तलाव बांधण्याचे काम का करत आहेत याची कथा खूप रंजक आहे. ती कथा आपण जाणून घेऊया.
केरे कामेगौडा यांचा जन्म मूळचा कर्नाटकाच्या मांड्या जिल्ह्यातील मालावल्ली तालुक्यातील दासनडोड्डी या गावात झाला. ते शेळी पालनाचा पारंपरिक व्यवसाय करतात. ते ५ वर्षांचे होते तेव्हापासूनच शेळ्या चरायला जात होते.
४० वर्षांपूर्वी केरे कामेगौडा हे शेळ्या चारायला घेऊन गेले असताना त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या भागात सततच्या पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे वनसंपदा नष्ट होत होती. अगदी त्यांच्या जनावरांना चारण्याइतकं गवत उगवू शकेल एवढंदेखील पाणी त्यांच्या भागात उरलेलं नाही.
त्या भागातील वन्यप्राणी त्यांच्या गावाजवळच्या कुंडीनबेट्टा डोंगरातील कड्याकपाऱ्यात असलेल्या डबक्यातील पाणी पिऊन जगत आहेत, ही भीषण परिस्थिती बघून कामेगौडा व्यथित झाले. पण यातूनच त्यांना नवीन प्रेरणा मिळाली.
कामेगौडा यांनी या भीषण परिस्थितीवर उपाय म्हणून स्वतःच काहीतरी करण्याचे ठरवले. मग त्यानुसार कामेगौडा हातात कुदळ व इतर अवजार घेऊन त्यांचा गावाच्या जवळ असलेल्या कुंडीनबेट्टाच्या डोंगरावर गेले व त्याठिकाणी त्यांनी लहान लहान तलाव निर्माण करण्यासाठी खोदकाम करायला सुरुवात केली. रोज सकाळी ५ वाजता उठून ते डोंगरावर जात व खोदकाम करत आणि ९ वाजेपर्यंत घरी परत येऊन दिवसभर शेळ्या चारण्याचे काम करत.
ते रोज सकाळी बाहेर जाऊन काय करतात आणि असे का करतात यासंबंधी अनेक प्रश्न त्यांच्या घरच्यांना पडत ते त्यांना तसे करण्यापासून थांबवतदेखील पण ते कोणाचे न ऐकता रोज सकाळची आपली दिनचर्या पाळत डोंगरात जाऊन खोदकाम करत.
त्यांच्या अशा वागण्यामुळे लोक त्यांची खिल्ली उडवू लागले. त्यांना वेडा, मूर्ख माणूस म्हणू लागले.
लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत कामेगौडा यांनी आपले काम सुरूच ठेवले व त्यांच्या प्रयत्नांना यश आले. सर्वात आधी त्यांनी एक तलाव बांधून पूर्ण केला. मग त्यानंतर एक एक करून त्यांनी १४ तलावांची निर्मिती केली.
तलाव कोणत्या जागी बांधावा हे समजून घेण्यासाठी कामेगौडा हे अत्यंत सोप्या पद्धतीचा अवलंब करत. ते डोंगरावर जात व महाशिवरात्री, उगाडी या उत्सवाच्या काळात ज्या भागात गवत दिसेल त्या भागात खोदकाम सुरू करत, कारण गवत असेल त्या भागात पाणी असते हे त्यांना शेळीपालन करताना लक्षात आले होते.
कामेगौडा यांनी २०१८ पर्यंत १४ तलाव बांधले. त्यासाठी त्यांनी फक्त कुदळ आणि इतर पारंपारिकच अवजार वापरले असे नाही तर जेसीबीचीदेखील मदत घेतली. यासाठी त्यांनी आपल्या घरातील सोनं विकून पैसा उभा केला व आपल्या कमाईचा हिस्सादेखील या कामासाठी खर्च केला. त्यांना घरातून, त्यांच्या मुलांकडून होणाऱ्या विरोधाला त्यांनी जुमानलं नाही. एका मुलाखतीत ते म्हणाले की आज मी माझ्या भावी पिढीला सोनं-नाणं देण्यापेक्षा पाण्याचे समाजोपयोगी स्रोत देऊन जातो आहे.
जेव्हा त्यांच्या तलावनिर्मीतीमुळे त्या परिसरात पुन्हा हिरवळ दिसू लागली व पशुपक्षांना पाणी मिळू लागले तेव्हा त्या भागातील लोकांना त्यांचा कार्याचे महत्व समजले व कर्नाटक सरकारला कामेगौडा यांच्या अद्वितीय कार्याची माहिती मिळाली. अनेक सामाजिक संस्थांनी त्यानंतर कामेगौडा यांना असंख्य पुरस्कार व आर्थिक मदत देऊ केली. कामेगौडा यांनी ती संपूर्ण रक्कम तलाव निर्मितीसाठीच खर्च करत अजून २ तलाव बांधले.
या तलावांना त्यांनी त्यांचा दोन नातींची नावं दिली आहे. हे तलाव संपूर्ण भरले असून, कामेगौडा यांनी तलावांची निर्मिती वेगवेगळ्या स्तरावर केली आहेजेणेकरून ते एका खाली एक भरत जातील. त्यांच्या प्रयत्नाने त्या भागातील दुर्भिक्ष्य कमी झाले व परिसर हिरवाईने नटला आहे.
कर्नाटक सरकारने केरे कामेगौडा यांना राज्य शासनाचा बसवश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कामेगौडा यांचा केलेल्या गौरवानंतर त्यांनी नम्रपणे आभार व्यक्त केले. तसेच, या क्षेत्रात अजून राष्ट्रीय स्तरावर अशाप्रकारे जलसंवर्धन प्रक्रियेत हातभार लावण्याचा उपक्रमासाठी कामेगौडा यांची मदत घेणार असल्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी दिले आहे.
कामेगौडा यांच्याप्रमाणेच आज देशभरात अनेक लोक वैयक्तिक स्तरावर प्रयत्न करून पर्यावरण रक्षणासाठी विविध उपाययोजना राबवत आहेत. त्यांचे कार्य निश्चित कौतुकास्पद असून त्याचा गौरव होत आहे, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.