आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारत पाकिस्तानचा इतिहास कायमच संघर्षाचा राहिलेला आहे. दोन्ही देशात कायमच वातावरण तणावाचे असते. पण बऱ्याचदा दोन्ही देशात शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न देखील केले जात असतात. असं असलं तरी ती शांतता फार काळ टिकून राहत नाही. पाकिस्तानच्या कुरापती सदैव सुरूच असतात.
मागे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विमानाला पाकिस्तानी हवाई हद्दीतून प्रवेश देण्यात यावा ही मागणी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तान सरकारकडे केली होती. ती पाकिस्तान ने नाकारली हा भाग अलाहिदा पण त्यावेळी अचानक इतिहासात पाकिस्तानने हवाई हद्दीवरून केलेली एक कुरापत पुन्हा चर्चेत आली होती.
पाकिस्तानने १९६५ साली गुजरातच्या मुख्यमंत्र्याचे विमान आपल्या हवाई हद्दीत घुसल्याचा संशय घेऊन कच्छच्या रणात पाडले होते. पाकिस्तानच्या या हल्ल्यात गुजरात राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री बलवंतराय मेहता व त्यांच्या सोबतच्या सात साथीदारांना आपला जीव गमवावा लागला होता. हो! एका भारतीय मुख्यमंत्र्याचा बळी पाकिस्तानने घेतला होता.
१९ सप्टेंबर १९६५ ला गुजरात राज्याचे काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री बलवंतराय मेहता यांचे नागरी विमान राजधानी अहमदाबादहून मिठापुरच्या दिशेने झेपावले, त्यांच्या बरोबर त्यांची पत्नी सरोज, गुजरात समाचार वृत्तपत्राचे पत्रकार आणि तीन अधिकारी होते. वायुदलाचे माजी अधिकारी जहांगीर इंजिनिअर हे विमान आपल्या एका साथीदाराला सोबत घेऊन चालवत होते.
दुपारी तीन वाजता मिठापुरला विमान पोहचणे अपेक्षित होते. पाकिस्तानी वेळेनुसार ३.३० वाजेच्या आसपास, लेफ्टनंट ए आय बुखारी हे विमान घेऊन वैमानिक कुएस हुसेनला पाकिस्तानी रडारवर आग्नेय दिशेला दिसणारे एक ‘संशयीत विमान’ बघण्यासाठी पाठवण्यात आले.
हे विमान कच्छच्या रणात भुज जवळ उडत होते. हुसेन सोबत त्याचा एक जोडीदार पण होता. २० हजार फुटावर लढाऊ विमान उडवत हे दोघी पाकिस्तानी त्या संशयित विमानाच्या शोधात भारतीय हद्दीत घुसले, त्यांना ते संशयित विमान आढळले व त्यांनी त्यावर निशाणा लावत, आपल्या हायकमांडकडला पुढील कारवाईसाठी सूचना केली.
त्यांनी हाय कमांडला माहिती देताना ते विमान एक नागरी वाहतूक विमान असल्याची सूचना दिली होती. थोड्या वेळात त्या विमानाला पाडण्याचे आदेश हुसेनला प्राप्त झाले.
हुसेनने त्या नागरी विमानाच्या डाव्या बाजूवर एक बॉम्ब फेकला ज्यामुळे विमान डगमगत होते तरी उडत होते, हे बघून चवताळून हुसेनने उजव्या बाजूच्या पंखावर हल्ला केला, ज्यामुळे विमानाच्या इंजिनला आग लागून ते विमान सरळ कच्छच्या रणात कोसळले. हे तेच विमान होते ज्यातून बलवंतराय मेहता प्रवास करत होते. हे विमान पाडल्या बरोबर हुसेन आपलं विमान घेऊन पाकिस्तानी हद्दीत परतला.
हे विमान पाडल्यानंतर पाकिस्तानने आरोप लावला की भारतीय वायुदल पाकिस्तानी हद्दीच्या जवळून नागरी विमान नेते व त्याचा वापर पाकिस्तानवर रेकी ठेवण्यासाठी करते. आमची सुरक्षा म्हणून आम्ही ते विमान पाडले.
पुढील चार दिवस दोन्ही देशात तणावाचे वातावरण होते. २३ सप्टेंबर १९६५ ला अय्युब खानने अखेर सीजफायर करून हे प्रकरण मिटवले. खरंतर तत्कालीन भारतीय राज्यकर्त्यांनी कुठलीच ठोस भूमिका न घेतल्यामुळे हे प्रकरण इतिहासाच्या पानात गडप झालं.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.