आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
कुठलीही कलाकृती एकदा बघून तिचे सगळे पैलू कळत नसतात, फक्त त्यातला अर्क आपल्याला भिडतो. चित्रपटाच्या बाबतीत हे जास्त खरं आहे, कारण ही खूप कलांची मिळून एक कला आहे!
कधी आपण प्लॉटवर लक्ष देऊ तरी कधी अभिनयावर. तांत्रिक बाबी नीट समजून घ्यायला तर अजूनही खूप वेळेस बघावं लागतं. पण यामुळं बऱ्याच महत्वाच्या पैलूंवर आणि त्याच्यासाठी जबाबदार लोकांकडे आपलं लक्ष जात नाही आणि त्यामुळं त्यांचं योगदान अधोरेखित होत नाही. या परिघामध्ये येणाऱ्या “फँड्री” मधल्या अशा एका पैलूबद्दल विचार करूयात.
पहिल्यांदा फँड्री बघितला तेव्हा त्या सगळ्या परिस्थितीमुळं सुन्न झालो, जब्याने मारलेला शेवटचा विद्रोहाचा दगड भयंकर लागला. दुसऱ्यांदा बघताना शेवटी शिगेला पोहोचवणाऱ्या त्या शेवटासाठी नागराजने प्लॉटमध्ये गुंफलेल्या बारीक सारीक गोष्टीने भारावून गेलो.
अभिनय बघताना नाटकाच्या स्टेजला जसं अभिनयाने भारून टाकावं तसं काम न करता परिस्थितीचे आपण सगळेच गुलाम आहोत असं काम सोमनाथ अवघडे, नागराज आणि किशोर कदम यांनी केलेलं जाणवलं.
कुठेही फोकसमध्ये यायला अभिनेत्यांनी गडबड केलेली नाही, नागराजने ती करूही दिली नसेल. आता पुन्हा एकदा बघताना कला दिग्दर्शन आणि जब्याच्या बहिणीने काढलेली ओबडधोबडब मेहंदी बघत होतो. तेव्हा जाणवलं की बराचसा स्क्रीनस्पेस असतानाही छाया कदम म्हणजे सिनेमात जब्याची आई माझ्या अजिबात लक्षात राहिली नाही. म्हणून लक्ष दिलं तर असं वाटलं की कोणीतरी वृद्ध अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातलं one of the best काम करतीए. इंटरनेटवर बघितलं तेव्हा कळालं की छाया कदमचं वय तर तेवढं नहीए.
खरं वय आणि पात्राचं वय यातलं अंतर जास्त असताना कोणीतरी एवढ्या कौशल्याने ते हाताळलय हे दुर्मिळ.
याआधी असंच एक उदाहरण म्हणजे रिचा चड्डा. गँग्स ऑफ वासेपुर मध्ये मनोज वाजपेयीच्या बायकोचा आणि नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आईचं पात्र करताना तिचं वय नवाज पेक्षा जवळ जवळ 10-15 वर्षांनी कमी होतं. तरी ते पात्र आपल्याला एवढं आवडलं. त्यामुळं मी पुन्हा सगळा चित्रपट छायासाठी बघायला घेतला.
सिनेमात बऱ्याचश्या भागात छाया आउट ऑफ फोकस तरी असते किंवा तिच्या असण्याने प्लॉटमध्ये कधीच काही भरही पडत नाही. त्यांचं पात्र फक्त मुख्य प्लॉटला आधार म्हणून काम करतं. पण हा आधार कमकुवत असेल तर मुख्य पात्रांना जे करायचंय ते काम नीट शोभून दिसत नाही.
जर जब्याचा बाप जब्याच्या आईवर रागावत असेल, तर आई किती नीट घाबरतीए यावर त्या प्रसंगाचा परिणाम ठरतो. म्हणून किशोर कदम यांचं घरी राग काढणं आणि जब्याचं हट्टी वागणं हे छायाच्या अभिनयामुळ शोभून दिसतं.
तिचा घरातला आणि गावातला वावर डायलॉग नसल्यामुळे फक्त आणि फक्त तिच्या सामान्य हालचालींवरून जज होणार. तिचं आयुष्य झोपडीत गेल्यामुळं तिच्या पाठीत थोडा वाक दिसतो. रात्री तिची पाठ दुखतही असेल, जे ती काम करताना लपवते. तिला त्या परिस्थितीशी उबग आणि कम्फर्ट दोन्ही आहे. एवढं सगळं ती स्क्रीनवर येऊन बोलण्याची गरज पडत नाही, ते तिच्या सामान्य हलचालींवरूनच कळतं.
तिचे डोळे फक्त जब्यासमोर वर होतात, एरवी ती खाली बघूनच वावरते. खेडे गावात बहुजनांना आणि इतर काही जमातीच्या कष्टकरी स्त्रियांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणून वाईट असते. अंगभर कपडे घालून पण बघणाऱ्या नजरा बघतातच. ती इज्जत न वाचवू शकणाऱ्या कपड्याची किंमत म्हणून की काय त्यांना फार नसते. फाटलेलं झंपर, पडू नये म्हणून कसाही खोचलेला पदर, काम करून तो एका जागी आल्यामुळे दिसणारी छाती, बसून उभा राहून ढिल्ली झालेली साडी आणि खाली घसरत जाणाऱ्या वर खोचलेल्या मिऱ्या, शॅम्पू नसल्याने रुक्ष पडलेले केस. हे सगळं खरतर रंगरंगवटी आणि पेहराव करणाऱ्यांचं काम आहे, पण त्यांच्या कामाची शोभाही ते कॅरी करू शकणाऱ्या छायामूळ येते.
या सगळ्यात ही भूमिका निरस, रुक्ष होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून कलाकाराने मूळ पात्राचा स्वभाव सतत डोळ्यात ठेवण गरजेचं असतं. काहीश्या मेथड एक्टिंगने तिने ते कदाचित साध्य केलं असावं. म्हणून तिची शेवटपर्यंत तिची ओळख आभाळभर माया असणारी जब्याची माय म्हणूनच राहते.
चित्रपटभर आपल्याला जुनं गाव दिसतं. सध्या आहे त्या सिमेंटच्या घराच्याजागी पाटलाचा जुना मातीचा वाडा असावा. गावातल्या सगळ्या इमारती जणू तिथं कित्येक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या रुढींच प्रतीक म्हणून उभ्या आहेत. गावाबाहेर जब्याची झोपडी. हागणदारी नेहमीपासून इथेच असेल. त्याच्या पलीकडे गाव संपताना शाळा, आणि मध्ये कित्येक वर्षांपासून धूळ उडवणारे रस्ते. हे सगळं कसं इथलच वाटतं, एकमेकांचे मित्र-वैरी, सगळंच कसं एका परिस्थितीचे शिकार वाटतात, तरीही तिथंच पाय रोवून उभे आहेत.
त्या सगळ्यात जब्याची आई तिथं पिढ्यान पिढ्या आहे असं वाटतं. ती खुप तिथली वाटते. मे बी ही जाईल पण तिच्यानंतर तिच्या मुली त्या रोल मध्ये जातील, आणि ती आई तशीच तिथं ठाण मांडून बसेल. बाप तिच्यावर राग काढेल, जब्या त्याचं रडणं तिच्याकडे काढेल, मुली तिच्याकडे काहीच बोलून दाखवत नाहीत, याचं ओझंही तीच वाहेल. ती तिथंच राहील. हे सगळं वाचताना तुम्हाला छाया कदम दिसत असेल तर तिने तिच्या पात्राला किती नीट न्याय दिलाय हे वेगळं सांगायची गरज नाही.
न्यूडमध्ये पण एवढं लाजिरवाणं काम करत असताना एवढा खमकीपणा तिने नीट कॅरी केलाय. कॉलेजला जाणाऱ्या तिच्या पुतणीचा मुलगा जेव्हा स्वतःच्या आईचा अपमान करतो तेव्हा तीला दुःख आणि पाश्चात्ताप दोन्ही होत असतो. त्यावर रडावं की त्याच्या कानाखाली देऊन त्याला समजावं? या अतिगुंत्याच्या प्रसंगाला त्या सगळ्या सीनमध्ये आपण त्या आईपेक्षा छायाला जास्त बघत असतो. ती एखाद्या डॉनप्रमाणे त्या झोपडपट्टीतुन चालते तेव्हा आपल्याला ते कनव्हिंसिंग वाटतं.
अंदाधुंदमध्ये इतर पात्रांइतकंच तिचं पात्रंही गुंतागुंतीचं असतं. काही महिन्यांपूर्वी मी आलोक राजवाडेला मुलाखतीत विचारलं होतं की तू जे गाण्यासारखे आलाप घेतो त्यातून तुला जगाला काय सांगायचं असतं? तसं छाया कदम यांना विचारावस वाटतं की, तुम्ही त्या पात्रांशी नेमकं असं काय बोलता की त्यांना साकारणं तुम्हाला एवढं आपलंस वाटतं? तुम्ही तिथंही राहू शकता, तुम्हाला ते तुमच्यापेक्षा वेगळे वाटत नाही. ही सहृदयता नेमकी येते कुठून?
सिनेमातल्या अभिनयात जास्त अभिनय हा वाईट अभिनय मानला जातो. नाटकात प्रेक्षक तुमच्यापासून खूप दूर असतात म्हणून तुमचे हावभाव तुम्हाला लाऊड करावे लागतात. सिनेमात तुमच्या डोळ्यातल्या हालचाली पण अतिस्पष्ट दिसतात. याचं भान असणारे “सिनेमा” जाणणारे अभिनेते/अभिनेत्री मराठीत खूपच दुर्मिळ आहेत.त्यापैकी खूप महत्वाचं नाव मला छाया कदम यांचं वाटतं.
खूप अभिनेत्यांना त्यांनी त्यांची कुवत दाखवून दिली तरी प्रसिद्धी मिळत नाही. छाया कदम यांनी चांगला प्रसिद्ध पावलेल्या “न्यूड” या चित्रपटात मुख्य भूमिका बजावली. तब्बू, आयुषमान खुराणा सोबत त्या अंदाधुंदमध्ये होत्या. तरी त्यांबद्दल बोलताना कोण छाया कदम? असा प्रश्न हमखास येतो. त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देताना मी म्हणत असतो, “ती नाही का… जब्याची आई!”
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.