आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
===
प्रसुतीचा काळ हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्वाचा काळ असतो. शारीरिक पातळीवर घडणाऱ्या अनेक बदलांना बाई सामोरी जात असते त्याचे पडसाद तिच्या भावनिक आणि मानसिक आरोग्यावर सुद्धा पडतात.
सर्वसाधारणपणे गर्भधारणा झाल्यापासून प्रसुतीच्या ९ व्या महिन्यापर्यंत बाईला योग्य आहाराची आणि विश्रांतीची गरज
असतेच.परंतु प्रत्येक बाईची गर्भारपणात काळजी घेतली जातेच असं नाही.
खरे पाहता विकसनशील भारतासमोर जी अनेक आव्हाने आहेत त्यातील एक आव्हान म्हणजे सक्षम माता आणि सक्षम पिढी निर्माण करणे त्यासाठी अनेक वेळा शासनाने अनेक प्रकारचे उपक्रम राबवलेले आहेत.
ग्रामीण भागातील स्त्रियांना डिलिव्हरी फुकट, त्यांच्यासाठी लोह, कॅल्शियमच्या गोळ्या मोफत, मुलगी जन्माला आल्यावर विशेष सवलती, गर्भार मातेला सरकारी दवाखान्यातून पोषक अन्नाची आणि प्रोटीनची पाकिटे पुरविणे इ.
हे जरी खरे असले तरी भारतात अनेक ठिकाणी मातेला कुपोषणाचा सामना करावा लागतो.
एक तर भारतातील अनेक दूरच्या खेड्यात आरोग्यव्यवस्थेचा पायाच नाही. अगदी टोकाला असणाऱ्या अनेक राज्यात दवाखाने अथवा गर्भारपणात ज्या सुविधा लागतात त्यांचा अभाव आहे.
मातेला काय काळजी घेतली पाहिजे यासंदर्भात लागणारे ज्ञान देण्यासाठी लागणारा प्रशिक्षित स्टाफ अथवा जनजागृती करणारे NGO तोकडे पडतात.भारतात दरवर्षी ५६००० बायका बाळंतपणात मृत्यमुखी पडतात.
हा आकडा २१ व्या शतकात देखील वाढतो आहे ही चिंतेची गोष्ट आहे. यापाठीमागची कारणे बघायला गेलं तर हादरून जायला होतं.
ग्रामीण भागात स्त्रियांना आजही शेती, मजुरी, घरकाम या तीनही आघाडींवर काम करावे लागते. शहरातील बायकांचे बहुतांशी काम हे बौद्धिक स्वरूपाचे असते तर खेड्यात मात्र बायकांना शारीरिक कष्टाची सवय ठेवावी लागते.
अनेक बायका स्वत:च्या मालकीच्या शेतात राबतात. ज्याचं स्वतःचं शेत नाही त्या दुसऱ्याच्या शेतावर मजूर म्हणून काम
करायला जातात.
बऱ्याचदा हे काम प्रचंड कष्टाचे आणि थकविणारे असते परंतु काम केल्याशिवाय घरात चूल पेटणार नाही अशी परिस्थिती असल्यामुळे बायकांना काम करावे लागते. यामध्ये गर्भारपण आले तरी सुटका नसते.
अनेक शेतकरी महिला, उसतोडणी कामगार, शेतावर आणि इतर ठिकाणी रोजंदारीवर जाणाऱ्या बायकांना रोज १० -१२ तासांचे काम चुकत नाही.
यामध्ये त्यांच्या शारीरिक क्षमतेची काळजी घेणारे कोणीही नसते. मध्यंतरी सोशल मीडियावर रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर वर चढून डोक्यावर उसाचा भारा घेतलेल्या गरोदर उसतोडणी मजूर असलेल्या महिलेचा फोटो व्हायरल झाला होता.
बीड जिल्ह्यातल्या एका गावातला तो फोटो बघून संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलेला. तो मुद्दा अगदी चांगल्या चांगल्या नेत्यांनी विधानसभेत सुद्धा उचलून धरलेला परंतू त्याबाबत अजून सुद्धा अजून काही ठोस कारवाई अथवा उपाययोजना झालेली दिसत नाही.
गर्भारपणात दर महिना दवाखान्यात जाऊन तपासणी करावी लागते, मल्टी व्हिटामिनच्या गोळ्या घ्याव्या लागतात, पोषक आहार ठेवावा लागतो याची अनेक बायकांना माहिती देखील नसते आणि कोणी ती तशी देत ही नाही.
आज ग्रामीण भारतातील सुमारे ६३% बायका या प्रसुतीच्या नवव्या महिन्यापर्यंत काम करतच राहतात. यातील अनेक बायकांनी बाळंत झाल्यावर शारीरिक थकवा, कंबरदुखी, थकवा या समस्यांची तक्रार केलेली आहे.
दुर्दैवाची गोष्ट म्हणजे प्रसूत झाल्यानंतर देखील अशा बायकांना कामाचा प्रश्न भेडसावत असतो. त्यामुळे पुरेशी विश्रांती न घेता त्यांना कामावर पुन्हा हजर व्हावे लागते.
भारतात मॅटर्निटी बेनिफिटचे कायदे आहेत खरं परंतु असंघटीत क्षेत्रात, अगदी रिमोट एरियात काम करणाऱ्या बायकांना याचा फारसा उपयोग होत नाही.
यातला दुसरा गंभीर प्रश्न म्हणजे प्रसूतीमध्ये दगवाणाऱ्या बायकांचे वाढते प्रमाण. अनेक वेळा बायका पैशाअभावी घराच्या घरी प्रसूत होण्याचा धोका पत्करतात.
अननुभवी सुईण अथवा नातेवाईकांची मदत त्यासाठी घेतली जाते यात अनेकदा गंभीर रक्तस्त्रावा सारख्या घटना घडून बाई दगावण्याच्या अथवा मुल गर्भातच दगावण्याच्या घटना घडतात.
दुसरीकडे जरी दवाखाण्यात भरती केले तरी अनेकदा डॉक्टरची अनुपस्थिती, अननुभवी स्टाफ, चुकीची उपाययोजना यामुळे डिलिव्हरी पेशंट दगावण्याचे प्रमाण लक्षणीय आहे.
यासंदर्भात शासन काय पाऊले उचलते का? याचं उत्तर मिश्र स्वरूपाचे देता येईल. हॉस्पिटल्स तर बांधली पण तिथे अनेकदा नर्सच्या जागा रिकाम्या असतात.
रिमोट एरिया मधल्या हॉस्पिटल्स मध्ये कुणी काम करायला तयार नसत. शिवाय ग्रामीण भाग गर्भारपण हा फार काळजीचा विषय मानला जात नाही.
२०१८ साली भारताच्या महिला आणि बालकल्याण विभागाने एक सर्व्हे केला होता त्यात भारताच्या ग्रामीण भागात दर १० गर्भवती मातांच्या मागे २ माता बाळंतपणामध्ये दगावतात असा धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे.
अनेकदा बाईचे बाळंतपण नॉर्मल न होता सीझर केले जाते तेव्हा टाके घातल्यानंतर बाईने ३ महिने सक्त विश्रांती घेणे गरजेचे असते.
या काळात तिने वजन उचलू नये, खूप अवजड कामे करू नयेत अशा डॉक्टरांच्या सूचना असतात परंतु दुर्दैवाने अशा सूचनांचे पालन फार कमी लोक करताना दिसून येतात.
अनेकदा बाई बाळंत होऊन घरी आली की तिला घरकामाला जुंपले जाते त्यामुळे हवी तशी विश्रांती नाही मिळाली की अनेक प्रकारच्या बाळंतरोगाला बाईला सामोरे जावे लागते.
बाळंतपणानंतर आवश्यक असलेल्या पोषक आहाराची अनेकदा कमतरता दिसून येते. त्यामुळे हाडे ठिसूळ होणे, पाय सुजणे, पाळीत अति रक्तस्त्राव होणे अशा त्रासाला मध्यम वयातच त्या आईला सामोरे जावे लागते.
याची परिणीती म्हणजे लहान वयात गर्भाशय काढून टाकणे यामध्ये बरेचदा होते.
खरे पाहता सक्षम पिढी हे देशाचे भविष्य असते त्यामुळे अशी सक्षम पिढीचे भारत निर्माण व्हावे यासाठी त्या बालकांना जन्म देणाऱ्या मातेचे सक्षमीकरण व्हायला हवे.
यासंदर्भात सरकार आणि समाज यांनी ठोस उपाययोजना अमलात आणणे गरजेचे आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.