आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
रमाबाई-माधवराव रानडे, सावित्रीबाई-जोतिबा फुले, आनंदी-गोपाळ जोशी, या सगळ्यांनी आदर्श सहजीवनाचा पाठ घालून दिला. महिलांना घरातून बाहेर पडण्याची देखील अनुमती नव्हती अशा काळात यांच्यासारख्या काही पुढाऱ्यांनी स्त्रीशिक्षणाचा वसा हाती घेतला.
समाजाच्या, प्रसंगी कुटुंबाच्या, विरोधात जाऊन त्यांनी हा ध्यास घेतला होतास. सुरुवात आपल्या पत्नीपासून केली. आपल्या पत्नीला लिहिता, वाचता यावं यासाठी अपार कष्ट घेतले. आणि अर्थात त्यांच्या पत्नीनेसुद्धा त्यांना पुर्ण साथ दिली. मोठ्या जिद्दीने मराठी, इंग्रजी शिकल्या व यशस्वी होऊन दाखवलं.
असंच एक उदाहरण म्हणजे लक्ष्मीबाई-नारायण टिळक. यांची कथा देखील थोडीफार अशीच काहीशी आहे.
लक्ष्मीबाईंचा जन्म १ जून १८६६ साली गोखले कुटुंबात झाला. कुटुंबात चार भावंड. त्यांचं नाव नाव मनकर्णिका ठेवलं. त्यांची जडणघडण त्यांच्या आत्याबाई मनुबाई खांबेटें यांच्या इथे नाशिकला झाली. त्याकाळच्या प्रथेनुसार वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचं लग्न नारायण वामन टिळक यांच्याशी झालं.
मनकर्णिका गोखले, माहेरची मनु, आता लक्ष्मीबाई टिळक म्हणुन सासरी नांदू लागल्या. नारायण गोखले अभ्यासू होते, उत्तम वक्ता म्हणुन त्यांची ख्याती होती.
लग्नाच्या आठ वर्षांनंतर त्यांनी लक्ष्मीबाईंना शिकवायला सुरुवात केली. सगळे पैसे खर्च करून त्यांच्यासाठी पुस्तके आणली. त्यांना अक्षरओळख करून दिली. पुढे बाराखडी त्या स्वतःहून शिकल्या.
‘मी अज्ञ आहे, अ पासून ज्ञपर्यंत येणारी अशी’ असं त्या नेहमी म्हणत. त्याकाळात ही ओळख फार सूचक होती.
शिक्षण घेता घेता, संसार करत होत्या. सुरुवातीचा काळ खूप कठीण होता. नारायणरावांना स्थिर नोकरी नव्हती आणि कुटुंब २२-२५ लोकांचं. अशात घर चालवण्याचं कठीण आव्हान अगदी लहान वयात त्या पेलत होत्या. पुढे त्या थोडफार इंग्रजी बोलायला आणि लिहायला देखील शिकल्या.
नारायण टिळकांनी ख्रिस्ती धर्म स्विकारला, तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला व अतीव दुःख झालं. आपलं दुःख त्यांनी कागदावर कवितेच्या स्वरूपात उतरवलं. पुढे पाच वर्षांत त्यांनीसुद्धा ख्रिस्ती धर्म स्वीकारला.
‘भरली घागर ‘ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहाला प्रसिध्दी मिळाली. पुढे अनेक त्यांच्या अनेक कविता मराठी साहित्यात झळकू लागल्या.
सौंदर्यविषयक, राष्ट्रीय, सामाजिक, प्रासंगिक, भक्तीपर, उपेदशात्मक, पती-पत्नी प्रेमावर, मुलांसाठी अशा अनेक विषयांवरील या कविता आहेत. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यांवर त्यांना कवितेसाठी स्पुर्ती मिळत गेली.
त्यांचा मुलगा देवदत्त टिळक याच्या हट्टामुळे त्यांनी आत्मचरित्र लिहिण्यास सुरुवात केली. ‘स्मृतीचित्रे ‘ या नावाने प्रसिद्ध असलेलं त्यांचं आत्मचरित्र मराठी साहित्यात एक मोतीच! त्यांच्या लिखाणाची शैली ओघवती आणि मनाला भिडणारी आहे. कुठलाही कृत्रिमपणा त्यांच्या लिखाणात जाणवत नाही. मोठमोठे पल्लेदार वाक्य वापरण्याऐवजी त्या सरळ सोप्या भाषेत लिहायच्या.
स्मृतीचित्रेमधे त्यांच्या आयुष्यातील अनेक आनंदी आणि दुःखी प्रसंगाचं वर्णन आहे. त्याकाळातील महिलांची अवस्थेवर भाष्य या पुस्तकात आहे.
या पुस्तकाचा पहिला भाग १५ डिसेंबर १९६४ रोजी तात्यासाहेब कोल्हटकर यांच्या हस्ते प्रकाशित झाला. त्यानंतर पहिला, दुसरा, तिसरा व चौथा भाग १५ डिसेंबर १९६५ वि. द. घाटे यांच्या हस्ते प्रकाशित झाला. शेवटचा व पाचवा भाग, मुलगा देवदत्त टिळकांनी लिहून ‘स्मृतिचित्रें’ पूर्ण केले. या आत्मचरित्रात त्यांनी त्यांच्या आयुष्यातील चढ उतारांच ह्रुदयस्पर्शी वर्णन केलं आहे.
आपल्या सासुरवासाबद्दल त्या लिहितात, “एकदा मामंजी संतापले. म्हणाले, ‘‘तू दगड झाली असतीस तर तुझा पायखान्याच्या पायरीला तरी उपयोग झाला असता.’’
कोणास ठाऊक पायखान्याच्या पायरीला उपयोग झाला असता का देवाच्या मूर्तीला उपयोग झाला असता? माझे हे म्हणणे मात्र मनातल्या मनात होते.’ प्रत्येक प्रसंगावर फारच मार्मिकपणे भाष्य त्यांनी केलं आहे .
आत्मचरित्रानंतर त्यांच त्यांचं प्रचंड प्रसिद्ध झालेल लेखन कार्य म्हणजे ‘ख्रिस्तायना’. या मागेसुद्धा मोठी कथा आहे.
ख्रिस्तीचरित्र सांगणारे ओविबद्ध महाकाव्य म्हणजे ख्रिस्तायना. पण त्यांचं हे कार्य पुर्ण झालं नाही. लक्ष्मीबाईंचे पती नारायण टिळकांनी हे काम हाती घेतलं पण, इथेही खंड पडला.
एकूण ७६ अध्यायांपैकी १० अध्याय टिळकांचे आहेत. शेवटी लक्ष्मीबाईंनी वयाच्या ६५ व्या वर्षी आत्मचरित्राचं कार्य थांबवून हे अर्धवट कार्य पूर्णत्वास नेलं. अवघ्या पाच वर्षांत त्यांनी हे महाकाव्य पुर्ण केलं.
नाशकात त्यांचा व त्यांच्या साहित्यातील योगदानासाठी भव्य सत्कार करण्यात आला. आचार्य अत्रे अध्यक्षस्थानी होते. त्यांनी लक्ष्मीबाईंचा उल्लेख ‘साहित्यलक्ष्मी’ असा केला. त्यांच्या लेखनकार्याची तुलना त्यांनी महात्मा गांधीजींनी लिहिलेल्या ‘सत्याचे प्रयोग’ या पुस्तकातील निर्भीडता व स्पष्टवक्तेपणाशी केली.
१९६६ साली झालेल्या कवी संमेलनाध्यक्ष होण्याचा मान त्यांना लाभला. ज्या समाजात मान वर करून बोलायची परवानगी नव्हती, तिथे त्यांनी खणखणीतपणे भाषण दिलं.
‘स्मृतीचित्रे’ आजही वाचकांच्या पसंतीस उतरतं. आपली आजी आपल्याला तिच्या काळातील गोष्ट सांगत आहे असाच अनुभव प्रत्येकाला येतो.
२३ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांचं निधन झालं. या साहित्यलक्ष्मीचं साहित्य मराठी वाङ्मयाला समृद्ध करतंय.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.