आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
===
‘अन्न हें पुर्णब्रम्ह’ मानलं जातं. अन्नदानाला आपल्याकडे अनन्यसाधारण महत्व आहे. अन्नदान श्रेष्ठदान मानलं जातं. पण तरीही बऱ्याचदा आपण अन्न वाया घालवतो. लग्न समारंभात किंवा इतर प्रसंगी भरपुर प्रमाणात अन्न वाया जातं.
ताटात घेताना आपल्याला किती अन्न पुरेसं होईल याचा विचारच करत नाही. शिवाय घरी स्वयंपाक बनवताना सुद्धा अंदाज चुकला की अन्न वाया जातं. अन्नाच्या प्रत्येक कणाकणावर प्रचंड मेहनत असते. अन्न आपल्या ताटात येईपर्यंत अनेक लोकांनी आपला घाम गाळला असतो. त्यांची मेहनत सुद्धा आपण मातीमोल करतो. एकीकडे हीं परिस्थिती आहे तर दूसरीकडे अन्न नाही म्हणुन लोकांना कुपोषणाचे अनेक आजार होतं आहेत.
केवळ भरतात नव्हें तर जगात जेवायला अन्न मिळालं नाही म्हणुन मृत्यू होणाऱ्यांची संख्या काळजीत टाकण्यासारखी आहे.
भारतातील व काही इतर देशांच्या मागासवर्गीय भागांत कुपोषणा आणि त्यामुळे होणारे आजार हा जटिल प्रश्न आहे. त्यामुळे या प्रश्नाची जागतिक पातळीवर नोंद घेतली जाते. भूक लागल्यावर प्रत्येक व्यक्ती समोर जेवणाच ताट सजतच असं नाही. एकीकडे अन्नाची नासाडी होणं आणि दुसरीकडे पोटभर सुद्धा अन्न मिळू नये.
अन्नाचा प्रचंड प्रमाणात तुटवडा आहे असं नाही, पण मिळालेल्या अन्नाच नियोजन पद्धतशिरपणे त्याचं वितरण व्ह्यायला हवं. हीं परिस्थिती बदलण्याच्या दिशेने पाऊलं उचलली पाहिजे.
ओडिसतील संबलपूर जिल्ह्यात यावर उपाय म्हणुन एक नावीन्यपुर्ण उपक्रम सुरू करण्यांत आला आहे . अन्नाची ‘एटीएएम’ सुरू करण्यांत आली आहे. प्रत्येक शहराच्या कोपऱ्यात पैश्यांच एटीएम आहे. बँकेच्या रांगा चुकवून आपण पैसे काढण्यासाठी एटीएमवरून पैसे काढणं सोपं जातं. पण असं एटीएम जिथून पैश्यांच्या जागी अन्न निघेल असं एटीएम संबंलपूर येथें सुरू करण्यांत आलं आहे.
जिल्हा सामाजिक रुग्णालयच्या बाहेर हें एटीएम उभारण्यात आलं आहे. सकाळी ७-१० या वेळात अनेक गरजू लोकं निःशुल्क अन्न घेऊ शकतात.
स्वैच्छा या सामाजिक संघटनेने माहानगर पालिकेच्या मदतीने हें एटीएम सुरू केले आहेत. तृप्ती असं त्या एटीएमला नाव देण्यात आलं आहे. जवळपास ७०० लिटर अन्न साठा इथे होउ शकतो. १२ नोव्हेंबर २०१९ रोजी उद्घाटन केलं गेलं. माहानगर पालिकाचे आयुक्तांनी माहिती दिली की अद्याप शिजवलेले अन्न ठेवण्यासाठी सोय नाही. त्यामुळे फळ, भाज्या धान्य, पॉक्ड फूड जसं बिस्कीट इत्यादी पदार्थ ते ठेवतात.
जर कुणाला शिजवलेल अन्न दान करायचं असेल तर ते नक्किच करु शकतात. शिवाय घरी पिकवलेलें फळं, भाज्या सुद्धा इथे दान करु शकतात.
हे एटीएम फ्रीज सारखं बनवण्यात आलं. लोकं रागेंत लागून जे हवं ते निःशुल्क घेवू शकतात. स्वैच्छा या संस्थेच कार्य बघणारे अनेक तरुण व महाविद्यालयिन विद्यार्थी ईथे सेवा देतात. सर्व कार्यकर्ते या एटीएम कडे जातीने लक्ष देतात. अन्न वाया जावू नये व सर्वांपर्यंत अन्न पोहचाव या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला अशी माहिती दिलीप कुमार पांडव यांनी दिली.
दिलीप कुमार पांडव स्वैच्छा या संस्थेचे संस्थापक आहेत. हीं संघटना स्वतः एटीएम मधे अन्न पुरवते. शिवाय वाढदिवस किंवा आनंदाच्या प्रसंगी नागरिक सुद्धा मोठ्या प्रमाणात अन्नदान करतात.
स्वैच्छा या सामजिक संघटनेच्या ३०-४० कार्यकर्त्यांनी ५०,००० रूपये गोळा करून फ्रीज घेतली व हे एटीएम सुरू केले. तृप्ती हा यांचा पहिलाच उपक्रम नाही. अन्नदानासाठी या आधी अनेक उपक्रम त्यांनी राबवले आहेत. दर रविवारी या संघटनेचे कार्यकर्ते मिळून अन्न शिजवतात व रेल्वेस्टेशन, बस स्टॉप, मार्केट, मंदिर येथें जावून अन्न वाटतात.
जवळपास २००० लोकांना अन्न वाटण्यात येतं. या संस्थेचे संस्थापक दिलीप कुमार स्वतः या उपक्रमात जातीने लक्ष घालतात. या कार्यासाठी प्रेरणा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाली असं ते सांगतात.
त्यांचे वडील अनाथ होते. खुप कष्ट करून , अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून ते शिकले व पोलिस म्हणुन काम करत होते. त्यांची शिकवण पुढे नेवून दिलीप हे सामाजकार्य करत आहेत.
या एटीमची समाजात गरज ओळखून अनेक सामाजिक संघटना मदतीसाठी पुढे येत आहेत. असे आणखी एटीएम सुरू करण्याचे अर्ज माहानगर पालिकेकडे आले आहेत.
हा वाढता प्रतिसाद बघून कुचिंडा येथें सुध्दा नुकतच हे एटीएम सुरू करण्यात आलं आहे. सबलपूर पासून 70 किमी अंतरावर असलेला छोटा जिल्हा आहे .त्याच सोबत एक महिना पुर्वी भुवनेश्वर येथें एटीएम सुरू करण्यांत आलं होतं. काही प्रख्यात संघटना व संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणात असं लक्षात आलं आहे, की ओडिशा राज्य कुपोषण व संबंधित आजाराने ग्रस्त असलेल्या सात राज्यांपैकी आहे, त्यामुळे असे उपक्रम नक्कीच स्वागतार्ह आहे. लोकांना आपल्याला मिळत असलेल्या अन्नाचा आदर असायला हवा. आपण टाकत असलेल्या प्रत्येक कणामुळे कुणीतरी उपाशी झोपतय याची जाणीव असावी.
अन्नाचा अपमान हा साक्षात परमेश्वराचा अपमान असतो. त्यामुळे अन्नाची नासाडी होवु नये, अशा उपक्रमांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. असे एटीएम प्रत्येक शहरात, प्रत्येक जिल्हयात, प्रत्येक गावात सुरू व्ह्यायला हवे.
त्यासाठी पुढाकार घेणं आवश्यक आहे.स्वैच्छा या संघटनेने पुढाकार घेवून, या मुद्द्यावर विचर करून हा नावीन्यपूर्ण उपाय शोधला व तो यशस्वीरित्या राबवला या साठी ते नक्कीच कौतुकास पात्र आहेत.
त्यांच्या पुढील उपक्रमांसाठी खुप खुप शुभेच्छा..!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.