आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
‘शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा’ या बाबासाहेबांनी दिलेल्या त्रिसूत्रीचा आधार घेत भारतीय राजकारण ढवळून काढणारे कांशीरामजी यांनी स्थापन केलेला बसपा हा पक्ष भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनलाय. उत्तरप्रदेशसारख्या विस्तृत राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एका दलित महिलेला बसवून दलितांना राजकारणाच्या मुख्यप्रवाहात आणण्यात त्यांनी यश मिळवले. अर्थात, फक्त मायावतीपर्यंतच त्यांच्या वारसा सीमित करणे हा एक प्रकारे त्यांच्यावरील अन्याय ठरेल.
इतर नेते आणि कांशीरामजी यांच्यात बराच फरक होता. त्यांच्या जीवनाचा प्रत्येक पैलु हा इतर राजकारण्यांहून वेगळा होता. इतर बड्या नेत्यांप्रमाणे त्यांनी कधीच पांढरेशुभ्र खादीचे कपडे नाही वापरले. ते पँट-शर्ट असा सामान्य लोकांप्रमाणेच पेहराव करत. हे कपडे देखील त्यांनी एखाद्या जुन्या बाजारातून घेतलेले असत. पुढे जाऊन त्यांनी सफारीसूट घालण्यास सुरुवात केली.
१५ मार्च १९३४ रोजी पंजाबमधील रोपड जिल्ह्यातील एका गावात कांशीराम यांचा जन्म झाला. त्यांचे कुटुंब पंजाबमधील एक चर्मकार कुटुंब होते. हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथांचा दलितांवर किती विपरीत परिणाम झाले हे तर जगजाहीर आहे. पंजाबमध्ये हिंदुतील बहुतांश दलित लोकांनी शीख धर्माचा स्वीकार केला. कांशीराम यांच्या कुटुंबीयांनीही शीख धर्माचा स्वीकार केला होता. शीख धर्म हा समानता मानणारा धर्म होता.
कांशीराम यांचे कुटुंब तसे ठीकठाक होते. फार गरीब नाही फार श्रीमंतही नाही. त्यांचे वडील घरची शेती पाहत. वडिलांचे सगळे भाऊ म्हणजे कांशीरामजींचे चुलते सैन्यात होते. त्यामुळे घरी तशी कुठल्या गोष्टीची कमतरता नव्हती. कांशीराम यांचे बालपण तसे सुखातच गेले. कांशीराम यांना दोन भाऊ आणि चार बहिणी होत्या. सगळ्या भावंडात फक्त कांशीरामच एकटे असे होते ज्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते.
१९५६ साली कांशीराम यांना सरकारी नोकरी मिळाली. १९५८ साली ते डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनमध्ये (डीआरडीओ) रुजू झाले. पुण्याजवळील डीआरडीओच्या एका प्रयोगशाळेत ते सहाय्यक म्हणून काम करत होते.
इथे आल्यावर त्यांनी पहिले की दलित जातींना खूपच हीन वागणूक दिली जाते. इथल्या अनुभवांनी त्यांना आरपार बदलून टाकले. पुढे डीआरडीओतील त्यांचे सहकारी डी. के. खापर्डे यांनी त्यांना बाबासाहेबांची दोन पुस्तके वाचण्यास दिली. यातील पहिले पुस्तक होते. ‘ऍनहिलेशन ऑफ कास्ट’ आणि दुसरे होते ‘व्हाॅट गांधी अँड कॉंग्रेस हॅव डन टू अनटचेबल्स.’ दोन्ही पुस्तके वाचल्यावर कांशीराम यांची झोपच उडाली. त्यांनी परत परत ही पुस्तके वाचून काढली. या दोन पुस्तकांनी त्यांच्यावर खूप प्रभाव पाडला, हे स्वतः कांशीरामजींनी अनेकदा जाहीरपणे मान्य केले.
कांशीरामजींनी सबआल्टर्न इतिहासाद्वारे दलितांमध्ये विद्रोह जागवला. त्यांनी फक्त राजकारणासाठी राजकारण केले नाही, तर राजकीय सत्ता हस्तगत केल्याशिवाय तुमच्या समस्या सुटणार नाहीत हे बाबासाहेबांचे वाक्य शिरोधार्य मानून त्यांनी दलितांच्यातील स्वाभिमान जागृत करण्यासाठी आणि त्यांना या देशातील राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी राजकारण केले. सरकारी नोकरी सोडून त्यांनी पूर्णवेळ राजकारण करण्याचा निर्णय घेता. राजकारणाप्रती ते किती गंभीर होते हे जेंव्हा पूर्णवेळ राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला तेंव्हा घरच्यांना २४ पानी पत्र लिहिले त्या पत्रातून कळेल. यात ते म्हणतात,
‘मी आता घरी कधीही येणार नाही. मी कधीच स्वतःचे घर विकत घेणार नाही. सर्व नात्यापासून आणि नातेवाईकांपासून मुक्त राहीन. कोणत्याही नातेवाईकाचे लग्न, वाढदिवस, अंत्यसंस्कार अशा कुठल्याच कार्यक्रमात सहभागी होणार नाही. जोपर्यंत बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही.’ कांशीरामजींनी या प्रतिज्ञांचे अखेर पर्यंत पालन केले. अगदी आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठीही ते घरी गेले नाहीत.
राजकारणात उतरण्याचा त्यांनी निर्णय घेतला तेंव्हा देशात दलितांचा म्हणवणारा एक पक्ष होता. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. कांशीरामजींनी या पक्षात प्रवेश केला पण, लवकरच त्यांचा अपेक्षा भंग झाला. त्यांनी या पक्षातून बाहेर पडून १४ ओक्टोंबर १९७१ रोजी शेड्युल कास्ट, शेड्युल ट्राइब, ऑदर बॅकवर्ड क्लासेज अँड मायनॉरीटी एम्प्लॉइज वेल्फेअर असोसिएशन नावाची पहिली संघटना स्थापन केली.
१९७३ पर्यंत ही संघटना इतर राज्यांतही पोहोचली. तेंव्हा कांशीरामजींनी या संघटनेचे नाव बदलले आणि इथून पुढे ही संघटना बामसेफ म्हणून ओळखली जाऊ लागली.
८०च्या दशकात तर या संघटनेचा विस्तार खूपच वाढला. त्यावेळी बामसेफचा असा दावा होता की त्यांच्या संघटनेत ९२ लाख सदस्य आहेत. ज्यापैकी काही सदस्य हे संशोधक आणि डॉक्टर होते. आणीबाणीनंतर लोक कॉंग्रेसला पर्याय शोधत होते. जनता पक्ष या एका पर्यायाच्या रूपाने समोर आला पण, अंतर्गत कलहामुळे हा पक्ष आपला प्रभाव टिकवू शकला नाही. याचवेळी दक्षिणेकडे प्रादेशिक पक्ष सत्ता हस्तगत करण्यात यशस्वी होत होते. उत्तरेतही कांशीरामजींच्या या संघटनेकडे एक पर्याय म्हणून पहिले जाऊ लागले होते.
काळाची पावले ओळखत, १९८१ साली कांशीरामजींनी डीएस-४ ची स्थापना केली. डीएस४ म्हणजे दलित शोषित समाज संघर्ष समिती. या संघटनेची मुख्य घोषणा होती, ठाकूर, ब्राह्मण, बनिया छोड बाकी सब हैं डीएसफोर. कांशीरामजींनी इतर नेत्यांप्रमाणे फक्त जातिवाद नष्ट झाला पाहिजे अशा पोकळ बढाया न मारता वर्मावर बोट ठेवले. फक्त दलितच नाहीत तर आदिवासी, इतर मागासवर्गीय, धार्मिक अल्पसंख्याक, अशा सर्वाना एकत्र करून ते गोळाबेरीज करण्याच्या प्रयत्नात होते.
महात्मा फुले, सावित्रीमाई फुले, झलकारी बाई आणि उदा देवी यासारख्या प्रतीकांचा वापर करून त्यांनी दलितांमध्ये चेतना जागवली. दलितांच्या समस्यांची चर्चा करताना या लोकांच्या कार्याची आणि विचारांचीही चर्चा अवश्य झाली पाहिजे असे त्यांचे मत होते.
१९८४ साली त्यांनी बहुजन समाज पक्षाची स्थापना केली. या पक्षाने प्रादेशिक अस्मितेचा नाही तर दलित असितेचा मुद्दा हा जास्त प्रभावी ठरवला. तरीही कांशीरमाजींची भूमिका फक्त दलित हितापुरती मर्यादित होते असे नाही. त्यांच्या दलित या संकल्पनेत आदिवासी, इतर मागासवर्गीय, तसेच धर्मिक अल्पसंख्याक अशा साऱ्यांचा समावेश होत असे.
बहुजन समाज पक्षाच्या माध्यमातून त्यांनी आक्रम*कपणे दलित अस्मितेला हात घातला. तरीही बसपा म्हणजे विशिष्ट जातीचा पक्ष या शिक्क्यापासून ते पक्षाला वाचवू शकले नाहीत.
बसपाचे यश म्हणजे कांशीरामजींच्या चळवळीचे यश म्हणणे म्हणजे आयुष्यभर त्यांनी केलेल्या संघर्षाला संकुचित केल्यासारखे होईल. हा पक्ष म्हणजे त्यांनी घडवून आणलेल्या बदलाचा एक भाग आहे. पंजाब, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थानसारख्या संपूर्ण हिंदी पट्ट्यात या पक्षाचा अतिशय वेगाने प्रसार झाला होता.
परंतु त्यांच्या पश्चात मात्र पक्षाचा हा विस्तार हळूहळू संकुचित होत गेला. सत्ता मिळताच दलित आंदोलनाने हाथी नहीं गणेश हैं, ब्राह्मण शंख बाजायेगा अशा घोषणात स्वतःची विद्रोही अस्मिता समर्पित करून टाकली. आज ते असते तर त्यांनी बसपाच्या नेतृत्वाला याची जरूर जाणीव करुन दिली असती. सामाजिक आंदोलन हे त्यागातून आणि जिद्दीतून उभे राहतात.
दलितांचे प्रश्न आणि समस्यांवर तोडगा काढण्यासाठी कोणत्याही इतर पक्षाच्या पाठींब्याने सत्ता भोगणारा कठपुतली बाहुली बनून राहणारा नेता नको, तर स्वबळावर सत्ता स्थापन करणारा नेता हवा, हे ते आपल्या भाषणातून वारंवार सांगत. मायावती उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या आणि १९९५मध्ये त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले. पण त्यानंतर मायावतीचा हा पक्ष मात्र एकाच जातीचा पक्ष बनून गेला. दलितांच्यातील विद्रोही आवाज जाऊन दलित आंदोलन म्हणजे फक्त एक सोशल इंजिनियरिंग होऊन बसले.
९ ऑक्टोबर २००६ रोजी प्रदीर्घ आजारानंतर हृदयविकारामुळे त्यांचे निधन झाले. फक्त दलितच नाही तर भारतीय राजकारणाची दिशा बदलण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.
आजच्या काळात त्यांच्यासारख्या त्याग आणि समर्पण या तत्वानुसार आचरण असणाऱ्या आणि प्रस्थापित राजकारणाला धक्का देणाऱ्या त्यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाची कमतरता प्रकर्षाने जाणवते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.