आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
रोजच्या दैनंदिन व्यवहारात आपल्याला विज्ञानाची कितीतरी मदत होते. अगदी घरातील छोट्या बल्बपासून ते हातातील मोबाइल किंवा टॅबपर्यंत आपण ज्या काही सुखसुविधा वापरतो त्या सगळ्या विज्ञानामुळेच. आज या सुखसोयी आणि वस्तूंशिवाय जगण्याची आपण कल्पनाही करू शकत नाही.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाने केलेल्या या प्रगतीत भारतीय शास्त्रज्ञांनी देखील मोलाची भर घातली आहे. जागतिक पातळीवर या शास्त्रज्ञांची आणि संशोधकांची दखल घेतली गेली.
आज आपण अशाच काही महान भारतीय संशोधाकांविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांनी भारताचा लौकिक जगभरात वाढवला.
१. सी. व्ही. रमण
चंद्रशेखर वेंकट रमण यांना भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी १९३० साली नोबेल प्रदान करण्यात आले. त्यांनी प्रकाश किरणांच्या प्रसारणाविषयी केलेल्या मुलभूत संशोधनाचा पुढील वैज्ञानिक अभ्यासासाठी मोठा फायदा झाला.
नोबेल मिळवणारे ते पहिले आशियायी आणि पहिले अश्वेत व्यक्ती होते.
त्यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८८८ रोजी तिरुचिरापल्ली येथे झाला. १९७०च्या ऑक्टोबरमध्ये त्याच्या प्रयोगशाळेतील कामात व्यस्त असताना त्यांना भोवळ आली. तातडीने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले.
डॉक्टरांनी त्यांना चार तासांचा अवधी दिला होता. परंतु यातून ते बचावले. त्यांनी हॉस्पिटलमध्ये राहण्यास नकार देत, हॉस्पिटलऐवजी प्रयोगशाळेच्या बागेतील आवारात मरणे पसंत करेन असे ते म्हणाले.
२१ नोव्हेंबर १९७० रोजी त्यांचे निधन झाले. मृत्युपूर्वी त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना सूचना देऊन ठेवल्या होत्या की, “संस्थेच्या जर्नलचा मृत्यू होऊ देऊ नका. या देशातील विज्ञान क्षेत्रात काही तरी घडामोडी घडत आहेत याचे द्योतक म्हणजे हे जर्नल्स आहेत. त्यामुळे त्यांना नामशेष होऊ देऊ नका.”
त्यांनी बंगळूरू येथे स्वतःची प्रयोगशाळा स्थापन केली होती. त्या प्रयोगशाळेला आज रमण रिसर्च इन्स्टिट्यूट या नावाने ओळखले जाते.
२. होमी भाभा
होमी भाभा यांचा जन्म ३० ऑक्टोंबर १९०९ रोजी मुंबई येथे झाला. पदार्थविज्ञानातील क्वांटम थेअरीच्या संशोधनात त्यांनी महत्वाची भर घातली.
भारताच्या अणू उर्जा आयोगाचे ते पहिले संचालक होते.
भारतात अणू आयोगाची स्थापना व्हावी आणि अणू उर्जेचा सकारात्मक कार्यासाठी उपयोग व्हावा या हेतूने त्यांनीच या आयोगाच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला. त्यांना भारताच्या आण्विक कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखले जाते. परंतु ते आ*ण्विक अस्त्रे बनवण्याच्या विरोधात होते.
२४ जानेवारी १९६६ रोजी विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात नसून घातपात असल्याच्याही शक्यता नंतर वर्तवण्यात आल्या. भारताचा आण्विक कार्यक्रमात अडथळे आणण्यासाठी कट रचल्याचेही बोलले जात होते.
३. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या
सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हे भारतातील एक उल्लेखनीय इंजिनियर, विद्वान, आणि मैसूर संस्थानचे दिवाण होते. यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६० रोजी झाला. त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आले.
औद्योगिकीकरणातून भारताचा विकास होईल आणि भारताने औद्योगिकीकरण वाढवण्याचा प्रयत्न केल्यास भारत नक्कीच विकसित राष्ट्र बनेल असेल असा त्यांचा दावा होता.
‘ऑटोमॅटिक स्लुईस गेट्स’ आणि ‘ब्लॉक इर्रीगेशन सिस्टीम’चा शोध त्यांनी लावला. हे दोन्ही शोध इंजिनियरिंगमध्ये अत्यंत महत्वाचे मानले जातात. १८९५ साली कलेक्टर वॉटर नावाचा एक नवा प्रयोग त्यांनी जलशुद्धीकरणासाठी अंमलात आणला.
दरवर्षी त्यांचा जन्म दिवस इंजिनियर्स डे म्हणून साजरा केला जातो.
४. वेंकटरमण राधाकृष्णन
वेंकटरमण राधाकृष्णन यांचा जन्म १८ मे १९२९ रोजी तोंडारीपेट येथे झाला. वेंकटरमण हे एक जागतिक ख्यातीचे अवकाश संशोधक होते. रॉयल स्वीडिश अकादमीचे ते मानद सदस्य होते.
त्यांनी तयार केलेले अल्ट्रालाईट एअरक्राफ्ट आणि सेलबोट्सच्या डिझाईनसाठी आजही त्यांना ओळखले जाते. खगोलशास्त्रातील त्यांच्या ज्ञानाचा आणि संशोधनाचा आंतरराष्ट्रीय पातळीवरही स्वीकार केला जात असे.
त्यांच्या निरीक्षण आणि अभ्यासामुळे अवकाश गंगेची रचना आणि इतर अनेक खगोलीय गोष्टींबद्दल अधिक माहिती मिळाली.
५. एस. चंद्रशेखर
१० ऑक्टोबर, १९१० रोजी लाहोर येथे चंद्रशेखर यांचा जन्म झाला.
“ब्लॅक होल”बाबत त्यांनी मांडलेल्या सिद्धांतासाठी त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चंद्रशेखर लिमिट ही संज्ञा त्यांच्याच नावावरून देण्यात आली.
१९५३ साली त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले.
ताऱ्यातून उत्सर्जित होणाऱ्या किरणांचा त्यांनी अभ्यास केला. विशेषत: छोटे तारे जे मोठ्या ताऱ्यापासून निखळून तयार झालेले तुकडे असतात. २१ ऑगस्ट १९९५ रोजी शिकागो येथे त्यांचा मृत्यू झाला.
६. सत्येंद्रनाथ बोस
१ जानेवारी १८९४ रोजी कलकत्ता येथे त्यांचा जन्म झाला. क्वांटम मेकॅनिक्सवर त्यांचे प्रभुत्व होते.
हिग्स-बोसॉन पार्टिकल्सचा शोध लावण्यात त्यांचे योगदान महत्वाचे होते. म्हणूनच या कणांना त्यांचे नाव देण्यात आले.
बोस यांनी रेडीएशन आणि अल्ट्राव्हायोलेट कॅटास्ट्रॉफी विषयावर एक शोधनिबंध लिहून तो अल्बर्ट आईनस्टाईनला पाठवला. आईनस्टाईनने हाच शोधनिबंध जर्मन भाषेत भाषांतरित करून बोस यांच्या नावाने प्रकाशित केला. त्यांनी शोधलेल्या या फॉर्म्युलाला बोस-आईन्स्टाईन स्टॅटिक्स म्हटले जाते.
रवींद्रनाथ टागोर यांनी आपली एकमेव विज्ञान कादंबरी विश्व-परिचय सत्येंद्रनाथ बोस यांना अर्पित केली आहे. १९५४ साली भारत सरकारने त्यांना पद्म विभूषण देऊन सन्मानित केले होते.
७. मेघनाद सहा
मेघनाद सहा यांचा जन्म ६ ओक्टोंबर १८९३ रोजी सध्याच्या बांग्लादेशमधील ढाका येथे झाला. सहा इक्वेशन ही विज्ञानातील सूत्र त्यांच्याच नावाने ओळखले जाते. खगोलविज्ञानात ताऱ्यांच्या प्रभावळीचा अभ्यास करताना हे सूत्र वापरले जाते. सूर्यकिरणांचा दाब आणि वजन मोजण्याचे यंत्रही त्यांनी शोधले होते. दामोदर खोरे प्रकल्पाचे मूळ नियोजनही त्यांनीच आखले होते.
८. श्रीनिवास रामानुजन
रामानुजन यांचा जन्म २२ डिसेंबर १८८७ रोजी तमिळनाडूमध्ये झाला. ते एक प्रख्यात गणितज्ञ होते. गणितीय विश्लेषण, अंक सिद्धांत, अशा अनेक बाबतीत त्यांनी महत्वाची भर घातली.
वयाच्या ११ व्या वर्षी त्याच्या घरी भाडेकरू म्हणून राहणाऱ्या दोन कॉलेज तरुणांना त्यांनी आपल्या गणितीय कौशल्याने अवाक करून सोडले होते. या तरुणांनी त्यांना एस. एल. लोणी यांचे ट्रिग्नोमेट्रीचे पुस्तक भेद दिले. १३ व्या वर्षापर्यंत त्यांनी त्या पुस्तकावर प्रभुत्व मिळवून स्वतःचा सिद्धांत विकसित केला होता.
इंग्लंडमध्ये असताना तिथे शाकाहारी जेवण न मिळाल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला. भारतात आल्यावर वायच्या ३२व्या वर्षीच त्यांचे निधन झाले.
रामानुजन यांचा जन्मदिवस त्याच्या राज्यात म्हणजेच तमिळनाडूमध्ये राज्य आयटी दिवस म्हणून साजरा केला जातो.
९. जगदीशचंद्र बोस
आचार्य जगदीशचंद्र बोस हे अनेक विषयात पारंगत होते. ३० नोव्हेंबर १८५८ रोजी पश्चिम बंगालमधील बिक्रमपूर येथे त्यांचा जन्म झाला. ते जीवशास्त्रज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ आणि पुरातत्वशास्त्रज्ञ होते.
रेडीओ आणि मायक्रोवेव्हचा अभ्यास करणारे ते पहिले शास्त्रज्ञ होते.
वनस्पतीशास्त्रात त्यांनी अनेक महत्वाचे शोध लावले. भारतीय उपखंडात त्यांनी प्रयोगशील विज्ञानाचा पाया घातला. वनस्पती वेगवेगळ्या वातावरणाला कसा प्रतिसाद देतात याचा त्यांनी अभ्यास केला. झाडांना देखील वेदना होतात आणि त्यांना देखील प्रेमाची भावना समजू शकते हाही शोध त्यांनीच लावला.
ते एक प्रसिद्ध वैज्ञानिक तर होतेच शिवाय उत्तम विज्ञान लेखकही होते. त्यांना बंगाली विज्ञान कथांचा जनक मानले जाते.
१०. विक्रम साराभाई
विक्रम साराभाई यांना भारतीय अवकाश संशोधनाचे जनक मानले जाते. १२ ऑगस्ट १९१९ रोजी त्यांचा अहमदाबाद येथे जन्म झाला. भारतीय अवकाश संशोधन स्थापनेत त यांची भूमिका महत्वाची होती. रशियाने स्फुटनिक उपग्रह अवकाशात सोडल्यानंतर त्यांनी भारत सरकारला अवकाश संशोधनाचे महत्व समजावून दिले. त्यांना पद्मभूषण आणि पदवीभूषण देऊन सन्मानित करण्यात आले.
विज्ञानातील प्रगत तंत्रज्ञानाचा वापर आपण मानवी जीवनातील समस्यांचे निवारण करण्यासाठी केला पाहिजे असे त्यांचे मत होते.
जागतिक पातळीवर विज्ञानाच्या क्षेत्रात इतर देशाची स्पर्धा नाही तर बरोबरी करण्यासाठी आपणही अवकाश संशोधन केले पाहिजे असे त्यांचे मत होते.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद आणि नेहरू फाउंडेशन फॉर डेव्हलपमेंट या संस्थांच्या स्थापनेतही त्यांनी पुढाकार घेतला.
११. सलीम आली
सलीम मोईझुद्दिन अब्दुल आली यांचा जन्म १२ नोव्हेंबर १८९६ रोजी मुंबई येथे झाला. ते पक्षी शास्त्रज्ञ होते.
भारतातील पक्षांची पद्धतशीर वर्गवारी करणारे ते पहिले अभ्यासक होते. त्यांनी पक्षांवर लिहिलेल्या पुस्तकामुळे भारतीय उपखंडात पक्षीशास्त्राविषयी अधिक जिज्ञासा निर्माण झाली.
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीची स्थापना व्हावी यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. या संस्थेला सरकारी मदत मिळवून देण्यासाठीही त्यांनी भरपूर प्रयत्न केले. १९७६ साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
१२. हरगोबिंद खुराना
९ जानेवारी १९२२ रोजी पश्चिम पंजाब प्रांतातील रायपुर येथे खुराना यांचा जन्म झाला. त्यांनी सिंथेटिक प्रोटीन आणि जनुकिय रचना याबाबत महत्वाचे सिद्धांत मांडले. त्यांच्या या संशोधनाबद्दल त्यांना १९६८ साली नोबेल पुरस्कारही मिळाला होता. जैवतंत्रज्ञान विषयातील पुढील अभ्यासाला त्यांच्या संशोधनामुळे चालना मिळाली.
विस्कॉन्सिन-मॅडीसन विद्यापीठ, भारत सरकार आणि भारत-अमेरिका सायन्स अँड टेक्नोलॉजी फोरमने २००७ साली संयुक्तरित्या खुराना प्रोग्राम सुरु केला होता.
अमेरिका आणि भारतात शास्त्रज्ञ, मोठे उद्योजक आणि सामाजिक उद्योजक यांची एक साखळी तयार करणे हा या प्रकल्पाचा उद्देश होता. ९ नोव्हेंबर २०११ रोजी वयाच्या ८९व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.
१३. बिरबल साहनी
बिरबल सहानी एक जीवाश्मशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८९१ रोजी पंजाब प्रांतात झाला. भारतीय उपखंडातील जीवाश्मांचा त्यांनी सखोल अभ्यास केला. त्यांना पुरातत्वशास्त्रातही रुची होती. भारतात आढळणाऱ्या वनस्पतींचा त्यांनी ऐतिहासिक आणि वर्तमान संदर्भात अभ्यास केला.
१९३६ साली रॉयल सोसायटी ऑफ लंडनचे सदस्य म्हणूनही त्यांची निवड झाली होती. भारतीय जीवशास्त्रज्ञाला हा सन्मान पहिल्यांदाच मिळाला होता.
ब्रिटनमधील हा सर्वोच्च वैज्ञानिक पुरस्कार मानला जातो. जीवाश्मशास्त्र संस्थेचीही त त्यांनी स्थापना केली. १० एप्रिल १९४९ रोजी त्यांचे निधन झाले.
१४. ए. पी. जे. अब्दुल कलाम
अवुल पाकीर जैनुलब्दीन अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ओक्टोंबर १९३१ रोजी झाला. त्यांनी एरोस्पेस इंजिनियरिंगमध्ये संशोधनाचे काम केले. तसेच डिफेन्स रिसर्च आणि डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) आणि भारतीय अवकाश संशोधन संघटना (इस्रो)साठीही त्यांनी काम केले.
भारतीय लष्करासाठी एक छोटे हेलिकॉप्टर तयार करण्यापासून कलाम यांनी सुरुवात केली. भारताचा पहिला उपग्रह त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सोडण्यात आला. त्यांनी १९८० साली पृथ्वीच्या कक्षेत रोहिणी उपग्रह प्रस्थापित करण्यात महत्वपूर्ण योगदान दिले.
२००२ ते २००७ या काळात ते भारताचे ११वे राष्ट्रपती होते. २०२० पर्यंत भारताला महासत्ता बनवण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यांना अनेक सन्मानीय पुरस्कार, अवॉर्ड प्रदान करण्यात आले. भारतरत्न पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले.
१९९९ मध्ये वैज्ञानिक सल्लागार पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी देशातील एक लाख विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांना प्रेरित करण्याचे ध्येय ठेवले होते. त्यांच्या वक्तृत्वातून त्यांनी लाखो विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याचे कार्य सुरु ठेवले.
या सगळ्याच वैज्ञानिकांमुळे आज भारताचे नाव विज्ञानाच्या क्षेत्रात एका मोठ्या उंचीवर पोहचले आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.