आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
मनोरंजनाचे कार्यक्रम असो की, बातम्या, जनजागृतीचे कार्यक्रम छोट्या पडद्यावर त्याकाळी दूरदर्शनची एकहाती सत्ता होती. १९८०च्या काळात दूरदर्शन या सरकारी ब्रॉडकास्टिंग चॅनेलवर प्रसारित होणारे कार्यक्रम अगदी साधे आणि माहितीपूर्ण असत. छोट्या पडद्यावर चॅनेल्सची गर्दी आणि टीआरपीसाठी चढाओढीचा तो जमाना नव्हता.
उदारीकरणाच्या युगाला नुकतीच सुरुवात झाली होती. बातम्यांच्या सादरीकरणात साधेपणा होता. बातम्यांच्या आड शाब्दिक चकमकींचा काळ अजून बराच दूर होता.
अशा काळात म्हणजे १९८० च्या उत्तरार्धात आणि १९९०च्या सुरुवातीला दूरदर्शनवर एक अनोखा कार्यक्रम प्रसारित होत होता. ज्यात प्रेक्षकांच्या ज्ञानात पडेल अशी विविधांगी माहिती दिली जात असे.
अधिवक्ता आणि संशोधन केंद्राचे कार्यकारी संचालक अखिल शिवदास यांनी एक नवा कार्यक्रम दूरदर्शनवरून प्रसारित करण्याची संकल्पना मांडली. या नव्या कार्यक्रमात उभरत्या भारताची झलक दाखवली जावी असे प्रयोजन होते. यातूनच “इंडिया धिस विक” या कार्यक्रमाची संकल्पना पुढे आली. दूरदर्शनने देखील कार्यक्रम प्रसारित करण्यास होकार दिला.
या कार्यक्रमातून बदलत्या, विकसनशील भारतासोबतच भारतातील वैशिष्ट्यपूर्ण वैविध्यता दाखवली जावी असेही ठरले. ज्यामुळे संपूर्ण जगाला नव्या, सक्षम, उदयोन्मुख, प्रगत भारतची ओळख होईल.
प्रणव रॉय यांच्या ‘वर्ल्ड धिस विक’ या कार्यक्रमावर ‘इंडिया धिस विक’ हा कार्यक्रम बेतलेला होता. ज्यात बातमी आणि मनोरंजन दोन्हींची भरपूर रेलचेल असेल याची खबरदारी घेतली जाईल, याची काळजी घेण्यात आली.
तशी एखाद्या साप्ताहिकात भरपूर माहिती आणि सोबत खमंग खुशखुशीत विनोदांची पेरणी असते अगदी तशीच या कार्यक्रमाची रूपरेखा असेल असे ठरवण्यात आले.
या कार्यक्रमाची निर्मिती आणि निवेदन दोन्ही जबाबदाऱ्या रमेश शर्मा यांच्याकडे सोपवण्यात आली. १९९४ साली हा कार्यक्रम लॉंच झाला. तो दर शनिवारी संध्याकाळी ८.०० वाजता प्रसारित केला जात असे. संध्याकाळचे आठ हा त्याकाळातील प्राईम टाईम होता. यावेळी बहुतांश प्रेक्षक डीडी मेट्रो लावून बसत असत.
३० मिनिटाच्या या कार्यक्रमाचे वेगवेगळ्या विषयांवर आधारित तीन भाग करण्यात आले होते. पहिल्या भागात राजकीय बातम्या, घडामोडींचे विश्लेषण, दुसऱ्या भागात व्यापार, व्यवसायविषयक काही घडामोडी आणि तिसऱ्या भागात मनोरंजन अशी कार्यक्रमाची साधारण आखणी होती.
“सुरुवातीला आंतरराष्ट्रीय प्रेक्षक वर्ग डोळ्यासमोर ठेवूनच हा कार्यक्रम सादर केला जात असे. अमेरिका, कॅनडा, आणि पश्चिम आशियाई तसेच युरोप मधील काही देशांतही या कार्यक्रमाला भरपूर प्रेक्षक वर्ग मिळाला. भारताची क्षमता आणि मजबूत लोकशाहीचे दर्शन संपूर्ण जगाला घडावे हाच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता,” शर्मा सांगतात.
“१९९१साली नुकताच भारतात आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारले गेले होते. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद आणि यश फारच आश्चर्यकारक होते.”
“इंडिया धिस विक” या कार्यक्रमाच्या टीममधील निलेंदू सेन यांच्या मते, “भारताची एक सकारात्मक प्रतिमा जगासमोर नेण्याचे ते एक मध्यम होते. आमचा देश प्रगतीपथावर आहे, खुला आहे, स्वतंत्र आहे, इथे लोकशाही आणि धर्मनिरपेक्षताही आहे. लक्षात घ्या बाबरी मस्जीदीच्या प्रकरणानंतर (१९९२) फक्त दोनच वर्षानंतर हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला होता.”
इंडिया धिस विक या फक्त टीव्ही पुरता मर्यादित असणारा कार्यक्रम नव्हता. भारतातील एअर इंडियाने आपल्या विमानातील स्क्रीनवर देखील हा कार्यक्रम दाखवाला. शर्मा म्हणाले, “यामागे नव्या भारताची प्रतिमा दर्शवणे आणि भारतावर एक नवा प्रकाशझोत टाकणे असा त्यामागचा हेतू होता. भारताची वेगाने बदलणारी आर्थिक स्थिती देखील जगासमोर मांडण्याची ही एक चांगली संधी होती.”
विमानातून प्रवास करणारे भारतीय आणि विदेशी प्रवासी असो की पर्यटक त्यांच्यासमोर भारताची सकारात्मक प्रतिमा तयार करण्यात या कार्यक्रमाचा मोठा हातभार लागत होता.
या कार्यक्रमाच्या उद्योग विश्वातील माहितीत दावोसमध्ये सहभागी झालेल्या शिष्टमंडळाची माहिती आणि ह्युंदाईचे भारतात आगमन झाल्याच्या बातम्या दाखवण्यात आल्या होत्या. एका भागात जम्मूतील विस्थापितांविषयीची माहिती देण्यात आली होती. तर पुढच्या एका भागात भारतात जमणाऱ्या कुंभमेळ्याचे तपशीलवार चित्रण दाखवण्यात आले होते. या कार्यक्रमामुळे परदेशी नागरिकांनाही नेमका भारत समजून घेणे सोपे झाले असेल.
देशातील तरुण पत्रकारांसाठीही हा कार्यक्रम म्हणजे एक चांगली संधी होता. या कार्यक्रमातून या नव्या तरुणांना पत्रकारितेतील बरेच बारीकसारीक कंगोरे समजावून घेता आले. यात पत्रकारितेच्या अंगाने शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी होत्या. या कार्यक्रमाने नव्या युगातील पत्रकारीतेचा पाया रचला.
नव्या युगातील ही पत्रकारिता बरीचशी तंत्रज्ञानावर आधारलेली आहे. तशीच या कार्यक्रमात देखील अनेक तांत्रिक बाबींचा समावेश करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, बजरंगी भाईजान या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते कबीर खान यांनी शर्मा यांच्यासाठी कॅमेरामनचे काम केले होते.
हळूहळू खाजगी वाहिन्यांची संख्या वाढत गेली तसतसा दूरदर्शनला मिळणारा प्रतिसाद कमी होत गेला. दूरदर्शनचा बराचसा प्रेक्षकवर्ग इतर खाजगी वाहिन्यांवर प्रसारित होणाऱ्या मालिकांकडे आकर्षिला गेला. दूरदर्शनचे कार्यक्रम सरकारकडून सादर केले जात ज्याला सरकारी अनुदान मिळत असे. पण, नंतर सरकारने यातील निधीमध्ये कपात केल्याने २००० मध्ये हा कार्यक्रम प्रायोजित करण्यात आला.
आता या कार्यक्रमासाठी प्रायोजक शोधणे ही एक अतिरिक्त जबाबदारी शर्मा यांच्यावर येऊन पडली. शर्मा यांना जाहिरातदार शोधणे भाग पडले. सुरुवातीला जाहिरातदारांचा प्रतिसाद चांगला होता.
मात्र खाजगी वाहिन्यांचा वाढता टीआरपी आणि तिकडे झुकत चाललेला प्रेक्षक वर्ग यामुळे जाहिरातदारांवरही परिणाम जाणवू लागला. तोपर्यंत टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या मालिकांचा पैलू देखील बदलून गेला होता.
खाजगी वाहिन्यांवरील चटपटीत मसालेदार मालिका, त्यावरील न्यूजरूम मधून घातले जाणारे वादविवाद आणि उच्चस्वरात बातम्या सांगण्याची शैली यामुळे खाजगी चॅनेलने बहुंताश प्रेक्षकवर्ग आपल्याकडे खेचण्यात यश मिळवले.
दूरदर्शनला या सगळ्या स्पर्धेत टिकणे फारच अवघड झाले होते. शर्मा आणि सेन आजही त्या आठवणी जागवताना म्हणतात, “सॅटेलाईट न्यूज चॅनेल्सच्या भाऊगर्दीत बातम्यांचा साधेपणा हरवत गेला.”
अशा सगळ्या परिस्थितीत नाईलाजाने इंडिया धिस विक हा कार्यक्रम बंद करण्याचा दुर्दैवी निर्णय घ्यावा लागला. ज्या मालिकेने भारताची प्रतिमा जगभरात उजळली तिलाच एका बंदिस्त पेटीत बंद व्हावे लागले.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.